Wednesday, 2 November 2022

वास्तवाची अनुभूती

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_वास्तवाची अनुभूती_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                  _*कामवासना माणसाच्या मनातील सर्वात मोठी दुर्बलता आहे. ज्या तीन तृष्णामुळे तो संसार बंधनात अडकतो त्यात पहिल्या क्रमांकाची तृष्णा कामवासना असते.* मातापितांच्या समागमाने मानवाची उत्पत्ती होत असते. म्हणून अंतर्मनांतील खोल तळापर्यंत काम वासनेचा प्रभाव असतो. या अनेक जन्मांच्या कर्माचे संस्कार आपल्या समवेत वाटचाल करीत असतात. यासाठी *मोक्ष मार्गावर पावले टाकणाऱ्या व्यक्तीला कामवासनेच्या संस्कारांपासून सुटका करून घेणे महाकठीण कर्म असते.* विपश्यना करता आली नाही तर ते अधिकच असंभव होते._

                  _कामवासनेतून सुटण्यासाठी एखादी व्यक्ती ब्रह्मचर्याचे जीवन जगू इच्छिते. परंतु मनात वारंवार कामवासनेची वादळे घोंघावत राहतात, आणि त्याला व्याकूळ करून सोडतात. ब्रह्मचर्याचा भंग होऊ नये म्हणून अत्यंत कठोरतेने वासनांचे दमन करतो पण त्याचा परिणाम अंतर्मनात गाठी बांधण्यात होत असतो. दमन केल्यामुळे वासनेपासून मुक्ती मिळत नाही. ती आतल्या आत धगधगत राहते. त्यामुळे मनात वासनेच्या विचारांचे मंथन चालूच राहते. अशाप्रकारे दमन करून ब्रह्मचर्य पाळणारा विश्वामित्रासारखा तपस्वी, मेनके सारख्या सौंदर्यवतीच्या रूपमाधुर्यापुढे घसरतो अन् मग आत्मग्लानी, आत्मक्षोभ आणि आत्मघृणा यांनी कासावीस होतो. असे झाले की पुन्हा अंतर्मनात अपराधीवृत्तीच्या गाठी बांधत बांधत आपली व्याकुळता अधिक वाढवितो._

                     _म्हणून *फ्राइडसारख्या मनोवैज्ञानिकाने कामवासनेच्या दमनाला मानसिक ताणतणाव आणि व्याकुळता यांचे प्रमुख कारण मानले आहे.* आणि कामतृप्तीचा मार्ग खुला करण्यास प्रोत्साहन दिले आहे. अनेकांनी त्याला दुजोरा दिला. आजच्या युगात काही साधना शिकविणारे लोकही या प्रवाहात सामील झाले आहेत. या लोकांना रोगाचे निदान चांगल्या प्रकारे समजले पण रोगनिवारण्याचा जो मार्ग शोधला तोच रोग वाढविण्याचे कारण ठरला. *कामवासनेचे दमन हा एक अंत आहे. पण तो रोगनिवारणाचा खरा मार्ग नाही. आणि त्याला स्वैर संचाराची मुभा देणे हा दुसरा अंत आहे, की ज्यामुळे रोगाचा शेवट न होता रोगसंवर्धनाचेच काम करतो.*_

                     *_जेव्हा कुणी व्यक्ती बुद्ध होतो तेव्हा तृष्णेच्या सर्व बंधांना भग्न करून विकार विमुक्तीचे वैभवशाली जीवन जगतो. म्हणून तो 'भगवान' या संज्ञेचा अधिकारी ठरतो. अशी व्यक्ती कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा या तिघांपासून सुटका करून घेतो आणि ज्या विपश्यना साधनेमुळे त्याला ही मुक्ती मिळते ती विद्या सर्वांना करुणचित्ताने वाटतो._*

                        _*विपश्यना साधना ही विकारांचे दमन करणारी साधना नाही. तसेच त्यांना स्वैर सोडणारी साधना नाही. विपश्यना साधना या दोन टोकांतील मध्यम मंगलकारी मार्ग आहे.* जी जागलेल्या विकाराकडे तटस्थतेने साक्षीभावाने पाहण्यास शिकविते. ज्यामुळे विकारांचे शमन होते, दमन नाही. *विपश्यना शरीरावर होणाऱ्या तात्कालिन संवेदनांकडेही तटस्थ भावनेने पाहण्यास शिकविते. त्यामुळे अंतर्मनाच्या तळात दबून राहिलेल्या काम विकारांचे मूळापासून निर्मूलन करण्याचे कार्य सुरू करते. कुशल विपश्यी साधक कालांतराने या विधीत पारंगत होत असतो आणि काम विकाराचा संपूर्ण नायनाट करतो व सहजतेने ब्रह्मचर्याचे पालन करू लागतो. याच्या अभ्यासाला बराच वेळ लागतो. फार मेहनत घ्यावी लागते. परिश्रम करावे लागतात. पराक्रम करावा लागतो. परंतु हा पराक्रम म्हणजे शारीरिक यातना नव्हेत. देह दंड नव्हे, मनाला दाबून ठेवणे नव्हे तर मनोविकारांकडे साक्षीभावनेने पहाणे, पहाण्याची क्षमता वाढविणे, हे असते.* प्रारंभी हे काम बरेच कठीण वाटते. परंतु अथक परिश्रम आणि निष्ठेने अभ्यास करू लागताच साधकाला अशी अनुभूती येऊ लागते की हळुहळु त्याच्या मनावरील वासनांची पकड सैल होत चालली आहे. वासना दाबून न ठेवल्याने ताणही वाढत नाही आणि कालांतराने साऱ्या काम विकारातून मुक्तता होऊन ब्रह्मचर्याचे जीवन सहजसाध्य झाले आहे असा अनुभव येतो._

*_हे सारे कसे घडते? तेही समजून घेऊ या._*

                  _पुरुषासाठी स्त्री आणि स्त्रीसाठी पुरुषाचे रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्श डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या इंद्रियांवर आघात करतात किंवा यांच्याहून अन्य कोणतेही लोभस आलंबन नसते. ही पाच इंद्रियजन्य आकर्षणे यांच्या नुसत्या स्मृती आणि काल्पनिक चिंतनरुपाने मनरुपी इंद्रियांवर आघात करतात. तेव्हाच वासनेचे विकार जगण्याचे काम सुरू होते. पहिली पाचही इंद्रिये शरीराधीन आहेतच. सहावे मन इंद्रिय हे ही शरीराच्या सीमेतच असते. म्हणून *विपश्यना साधनेचा अभ्यास हा साडेतीन हात शरीराच्या परीघातच करायचा असतो, बाहेर नाही.* कामवासनेची जिथे जागृती होते, तिथेच त्याचे उन्मूलन करता येते. अन्यत्र नाही. साडेतीन हात शरीराच्या मर्यादितच त्याची उत्पती होते. तिथेच त्या विकाराचा निवास असतो. तिथेच त्याचे संवर्धन होत असते. म्हणून विपश्यना साधनेच्या सहाय्याने तिथेच त्याचे उन्मूलन करणे शक्य होते._

               _पहावयाचे हे की बाहेरील आलंबनामुळे अंतर्मनात काय खळबळ सुरू झाली! डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा यावर रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्श यांचा संपर्क होताच, पहिला आघात होताच, अत्यंत सूक्ष्म स्तरावर त्या इंद्रियाशी संबंधित दरवाज्यावर आणि नंतर साऱ्या शरीरावर प्रकंपने [लहरी] निर्माण होतात. स्पर्श होताच संवेदना निर्माण होते. जसे कास्यपात्राला स्पर्श करताच त्यात झंकार उत्पन्न होतो. तद्वतच या पहिल्याच आघातानंतर लगेचच मनाचा हिस्सा, ज्याला संज्ञा म्हणा वा बुद्धी. आपला पूर्वानुभव आणि स्मृती [स्मरण] यांच्या आधाराने या आलंबनाला ओळखून हा पुरुष किंवा स्त्रीचा रूप, शब्द, गंध इत्यादी आहे हे जाणून त्याचे मूल्यांकन करतो. 'ओहो ! फारच सुंदर, फारच मधुर, फारच छान असे वाटताच शरीरावर होणारी स्पंदने प्रिय वाटू लागतात. आणि मन त्याकडे आसक्त होऊन आनंदाचे डोहात डुंबू लागते. *'वेदना पच्चया तण्हा'* या संवेदनातूनच कामतृष्णा निर्माण होते. येथूनच वासनांचा प्रभाव बाद लागतो. वारंवार रूप, शब्द, गंध इत्यादीशी इंद्रियांची टक्कर होऊ लागते. आघात होतच राहतात. वारंवार त्याचे हवेसे, प्रिय, गोड असे मूल्यांकन होत राहते. वारंवार त्याची प्रतिक्रिया म्हणून वासनेचे संस्कार बनतात. अशा रीतीने प्रत्येक क्षणाला एकामागून एक वासनेचा संस्कार होता होता ते दगडावरील रेषेप्रमाणे भक्कम होत जातात. जेव्हा रूप, शब्द, गंध, रस इत्यादी बाह्य आघाताचे प्रत्यक्षतः डोळे, कान, नाक इत्यादी इंद्रियांच्या संपर्काने होणारे संबंध थांबताच मनाचा सहाव्या इंद्रियाचा दरवाजा खुला होतो. आता मनाच्या इंद्रियावर पूर्वानुभवामुळे रूप, शब्द, गंध इत्यादीच्या सहाय्याने कल्पना आणि चिंतन यांची टक्कर होऊ लागते. हाच क्रम पुढे चालू होतो. प्रथम आघाताने प्रकंपन होणे, नंतर प्रिय वाटणारे मूल्यांकन, नंतर संवेदना, संवेदनेची प्रतिक्रिया म्हणून वासनेचे संस्कार बनणे. क्षणाक्षणाला चिंतनाचे आलंबन चित्तधारेला टक्करणे आणि त्याक्षणीच वासनेचा संस्कार निर्माण होत राहणे हा प्रवाह जितका वेळ चालू राहतो तसतशी वासना समर्थ बलवान होत जाते. मनात उफाळून आलेली ही तीव्र वासना वाणी आणि शरीर यावर प्रकट होण्यासाठी उत्कट होते. आणि सारे चित्तच या वासनाप्रवाहात आकंठ बुडून जाते._

                 _*वासनेत रमणीय झालेल्या व्यक्तीला 'सति' म्हणजे 'स्मृति' [या ठिकाणी स्मृती या शब्दाचा अर्थ आठवण नव्हे] म्हणजे सावधानता-जागृती असते. वासना पीडित व्यक्ती स्मृतिमान-सजग असतो. परंतु सजग असतो फक्त रूप, शब्द, गंध, रस, स्पर्श अथवा चिंतन यांचे आलंबानाविषयीच. या सहापैकी कोणत्या ना कोणत्या आलंबनाकडे त्याचे लक्ष केंद्रित झालेले असते. ह्या आलंबनाचे ध्यान वासनेला उद्दीप्त करते. म्हणून स्मृति राहूनही त्याला योग्य स्मृती म्हणत नाहीत. सम्यक् स्मृति म्हणत नाहीत. मिथ्या स्मृति म्हणतात. 'सतिमुट्ठा' म्हणतात. या सहा आलंबनांपैकी कोणतेही एक तत्संबंधी इंद्रियाच्या दरवाजाशी खुडबुड सुरू करते. तोच स्वानुभवाचे काम सुरू होते. संपर्क होताच तरंगरुपी वेदनारंभ, संज्ञेच्याद्वारे मूल्यांकन करणे, संवेदना प्रिय वाटणे आणि त्या प्रिय संवेदनेचे रसास्वादन करून संस्काराची प्रतिक्रिया आरंभ होणे, हे सारे स्वानुभूतीच्या क्षेत्रात येते. म्हणून ते सत्याचे क्षेत्र असते. याविषयी सावध राहिले तर स्मृती सम्यक् आहे. फक्त आलंबनाविषयी सजग राहिले आणि आलंबनाच्या स्पर्शाचेसुद्धा निरीक्षण करू शकलो नाही, त्यापुढील स्वानुभूती तर दूरच राहिल्या, तर स्मृती मिथ्याच झाली. कारण सखोल अनुभूतीचे क्षेत्रच राहिले. स्मृति म्हणजे जागरुकता, सजगता जेव्हा सम्पजञ्ञ शी जोडली जाते तेव्हा ती 'सम्यक् स्मृति' होते. साधक 'आतापी सम्पजानो सत्तिमा' होऊन जातो. यालाच विपश्यना म्हणतात. याला 'सतिपट्ठान' म्हणतात. म्हणजे 'सति' चे सम्यक्रुपाने स्वानुभूतीजन्य सत्यामध्ये प्रतिष्ठित होणे. विपश्यी साधक हेच करतो. तो सत्यदर्शी म्हणजे सत्य पाहणारा असतो. आत्मदर्शी म्हणजे अंतरंगात पाहणारा असतो. आत्मदर्शी म्हणजे ज्याचा स्वतः कधी अनुभव घेतलाच नाही, केवळ ऐकीव व ग्रांथिक तत्वज्ञानाच्या दार्शनिक मान्यतावाल्या काल्पनिक आत्म्याचे दर्शन करणे नव्हे. ह्या आत्मदर्शन याचा अर्थ आहे स्वदर्शन, अनुभूतीच्या पातळीवर स्वतःविषयीचे ज्या क्षणाला जे जे सत्य अनुभवास येते त्याला तटस्थ, केवळ साक्षीभावाने पहाणे ते सत्यदर्शन, स्वदर्शन, आत्मदर्शन होय. मोक्षप्राप्तीचा, मुक्तीचा सहज उपाय. कोणत्या तरी कल्पनेने केलेले ध्यान मनाला काही काळ संभ्रमित अवस्थेत ठेवील पण वासना -विकारमुक्त करू शकणार नाही.*_

                _*केवळ कोरड्या बौद्धिक किंवा भक्तीभावनेने भारावलेल्या श्रद्धेवर आधारित अशा परिसरातून बाहेर पडून, साधक जेव्हा अनुभूतीच्या पातळीवरून वास्तवाच्या भूमीवर पाय ठेवतो तेव्हा विपश्वी होतो. जे सत्य आहे ते जाणतो. हे जाणणे म्हणजे मान्यता नव्हे. जाणतो- 'जानाति' आणि प्रज्ञापूर्वक जाणतो त्याला 'पजानाति' म्हणतात. साक्षीभावाने, तटस्थ भावनेने, ज्यात राग नाही. द्वेष नाही, मोह नाही- जसे आहे तसे, त्याचा सत्य स्वभावच, वास्तवरूपच जाणणे. फक्त जाणणे, कोणतीही प्रतिक्रिया नसावी, त्याला दूर ढकलायची नाही की जवळ घ्यायची नाही. केवळ दर्शन, पहाणे केवळ ज्ञानयालाच 'पजानाति' म्हणायचे.*_

                 _बाहेरचे आलंबन कसेही असो आपल्या अंतरंगात कामवासना जागृत झाली तर बाहेरील आलंबन गौण मानून अंतरंगातील अनुभूतीजन्य सत्यता समजून घेण्याचा अभ्यास साधक सुरू करतो._

               _*‘सन्तं वा अज्झत्तं कामछन्दं’* जेव्हा अंतरंगात कामतृष्णा आहे तर *'अत्थि मे अज्झत्तं कामच्छन्दो ति पजानाति'* माझ्यामध्ये कामछंद म्हणजे कामतृष्णा आहे हे प्रज्ञापूर्वक जाणतो. प्रज्ञापूर्वक म्हणजे ही नश्वर अनित्य स्वभावाची आहे. अनंतकाळ टिकणारी नाही. ह्या ज्ञानासह तो तटस्थभाव ठेवतो. [त्या वासनेला दूर करण्याचा जरादेखील प्रयत्न करीत नाही. नाहीतर दाबून ठेवण्याच्या एका टोकाला ती झुकेल. तसेच वाणीवाटे वा शरीरावाटे प्रकट होण्याची सवलत देत नाही. नाही तर आगीत तूप ओतल्याप्रमाणे दुसऱ्या टोकाला झुकला जाईल.] बस्स फक्त त्या वासनेच्या अनित्य स्वभावाला समजून केवळ जाणतो 'पजानाति'. आता तिला प्रोत्साहन मिळत नसल्याने परिणामतः काही वेळानंतर जागृत झालेली कामतृष्णा आपण होऊन सहजपणे स्वतःच दूर जाते. नष्ट होते. साधक हे सत्य देखील फक्त साक्षीभावाने प्रज्ञापूर्वक, सजगतेने समजून घेतो. *‘असन्तं वा अज्झत्तं कामछन्दं'* कामवासना आतमध्ये नाही तर *'नत्थिमे अज्झत्तं कामच्छन्दो ति पजानाति'* माझ्या मनात कामवासना नाही या सत्याला तो प्रज्ञेच्या तटस्थ स्वभावाने जाणून घेतो._

               _आणि विपश्यना करतो आहे म्हणून तर 'सतिमुट्ठा' झाली नाही. 'सतिपट्टान' चा अभ्यासक आहे म्हणजेच आपल्या अंतरंगातील नाम-रूपाचा (आपल्या शरीराचा आणि मनाचा) प्रपंच प्रज्ञापूर्वक अनुभूतीच्या पातळीवर समजून घेण्याचे काम करीत आहे. यालाच 'सति' समवेत 'संपजञ्ञ' जोडणे म्हणतात.  शरीर व मनाचा प्रपंच व्यवहार वेदनांच्या रूपाने प्रकट होत असतो. साधक मानस पटलावर उमटलेल्या संवेदनांकडे तटस्थवृत्तीने पाहतो. या संवेदना अंतर्मनाशी जोडलेल्या असतात. म्हणून मनाच्या खोल कप्प्यात दबलेले कामवासनेचे संस्कार [अनुशय क्लेश] बाहेर पडून नष्ट होऊ लागतात. या सर्व संचित अनुत्पन्न [आतापर्यंत उत्पन्न न झालेल्या ] कामवासनांचा उत्पाद होतो. *'यथा च अनुप्पन्नस्स कामच्छन्दस्स उप्पादो होति तं च पजानाति,'*_

                  _आणि उदीर्ण झालेल्या या दीर्घकाळापासून साचलेल्या कामवासनेकडेही तो साक्षीभावाने संवेदनांच्या पातळीवर पाहू लागतो. तेव्हा त्या जुन्या संस्कारांचे स्तरावर स्तर उतरत त्यांचा निचरा होतो. क्षय होतो. *'यथा च उपवास कामन्द पहानं होति तं च पजानाति'* अशा प्रकारे उदीर्णा व निर्जरा होता होता. प्राण [निर्मूलन] होता होता एक वेळ अशी येते की तेव्हा अंतर्मनाच्या खोल तळातील कामवासनेचे सारे संस्कारच समूळ नाश पावतात. त्याचे नामोनिशाणही राहात नाही. आणि मग कोणतीच कामवासना जागी होत नाही. मग आलंबन, वर्तमान काळातील असो वा भूतकाळातील संग्रहातील असो. *‘यथा च पहीनस्स कामच्छन्दस्स आयति अनुष्पादो होति तं च पजानाति '* साधक परम मुक्त अवस्थेला पोहोचतो._

                    _*जो परिश्रम करील तोच या मुक्तावस्थेला पोहोचेल. कोणत्याही जातीचा असो, वर्णाचा असो, रंगरुपाचा असो, देश-विदेशातील असो, बोलीभाषेचा असो. जो करील तो मुक्त, जो करणार नाही त्याला कसा लाभ मिळणार ? कुणी कुणी अशामुळे करीत नाही की हे तर आमच्या परंपरागत दार्शनिक मान्यतेला अनुकूल नाही, आम्ही हे कसे करणार? आणि कुणी कुणी अशामुळे करीत नाही की, फुशारकीत फक्त म्हणतो, 'बघा हे आमच्या मान्यतेशी अनुकूल आहे, मेळ खात आहे, तर बघा आमची मान्यता किती महान आहे!' अशा पोकळ गर्विष्ठपणातच समाधान मानीत रहातो. मान्यतांमध्ये गुरफटलेले लोक विपश्यना करू शकत नाहीत, लाभान्वित होऊ शकत नाहीत. करतील तर अवश्य लाभधारी होतील.*_

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०२/११/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/11/blog-post_2.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...