Thursday, 3 November 2022

खरा विजय

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_खरा विजय_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                _*विजय पर्व साजरे करण्याचा एकमेव उद्देश्य हा असावा की ज्यांचा विजय झालेला असतो त्यांच्या स्मरणाने आपण देखील तसाच विजय मिळवावा. ही प्रेरणा प्राप्त करून त्याप्रमाणे स्वतः प्रयत्नशील राहून तसाच विजय प्राप्त करून घ्यावा. एखाद्याच्या विजयाप्रित्यर्थ त्याचे गुणगान करून उत्सव साजरा करून आणि आनंदाने नाचून आपल्याला काय मिळणार? स्वतःच तसा विजय संपादन करणे हाच खरा लाभ असतो.* एखाद्याने आपल्या शत्रूवर विजय मिळविला आणि त्याच्या अत्याचारापासून मुक्तता प्राप्त करून घेतली व तो सुखी झाला. त्यामुळे आपल्याला सुख समाधान कसले ? जेव्हा आपण स्वतः आपल्या शत्रूशी मुकाबला करून त्याचा नायनाट करतो तेव्हाच आपल्याला सुख मिळते व आपण अत्याचारांपासून मुक्त होतो. तो खरा आनंद!_

               _*भगवान बुद्धांनी आपल्या शत्रूवर विजय मिळविला. त्यांचा शत्रू होता मार म्हणजे मृत्यूराज.* हा तर आपणा सर्वांचाच शत्रू आहे. मृत्यूच्या पंजातून सुटका करून घेणे हे खरोखरच अत्यंत कठीण कार्य आहे. *राग [आसक्ति], रति आणि तृष्णा या त्याच्या कन्या आहेत.* या कन्यांच्या सामर्थ्यावर त्याने सर्व लोकांवर आपली सत्ता प्रस्थापित केलेली आहे. या वासनांच्या जाळ्यात फसले जाऊन सर्व प्राणी वारंवार जन्मतात, आणि मृत्यूच्या मुखात पडतात. *भगवान बुद्धांची हीच सम्यक् सम्बोधी होती, हीच त्यांची विमुक्ती होती, की त्यांनी तृष्णा, आसक्ती, मोह, रति, उपभोग यांना मुळापासून उखडून फेकून दिले. आणि मृत्यूराजला निरुपाय केले, विनाहत्यार, निःशस्त्र, निर्बल करून पराभूत केले.* आता बुद्धांना पुनःपुन्हा जन्म घेणे आवश्यक राहिले नाही आणि पुनःपुन्हा मरणही नाही. ते जन्ममृत्यूच्या बंधनातून कायमचे मुक्त झाले.._

                    _बुद्धांनी माराला पराभूत केले, त्याच्यावर विजय मिळविला म्हणून आपण सारे आनंदाने नाचलो, बुद्धांचे गुणगान केले तर त्यापासून आपल्याला काय कसला फायदा ? त्यामुळे आपण मुक्त होणार आहोत का? आपली मृत्यूपासून सुटका होणार आहे का ? त्यामुळे आपल्याला अमृतपद प्राप्त होणार आहे का? जर असे घडले असते तर ह्या आनंदोत्सवाला काही तरी अर्थ होता. परंतु असे कुठे होते? जर बुद्धाकडून मार जिंकला गेल्यावर सारे जग नेहमीसाठीच मृत्यूच्या जबड्यातून सुटले असते तर अशा प्रकारचा आनंदोत्सव करणे उचित ठरले असते. पण असे तर घडलेले नाही. असे कधी घडतही नाही. सर्व लोक तृष्णाधीन आहेत म्हणून ते मृत्यूच्याही आधीन आहेत. मग आनंदोत्सव कशाचा? अमृतत्व प्राप्तीसाठी प्रत्येकाला आपापली स्वतंत्र लढाई ढायची आहे. आपल्या स्वतःच्या अंतरंगात एकवटलेली तृष्णा नेस्तनाबूत करावी लागेल. तिचे संपूर्ण निर्मूलन करावे लागेल, तेव्हाच विजयश्री प्राप्त होईल. तेव्हा मुक्ती मिळेल. *बुद्धांचा विजय हा त्यांच्यासाठी मुक्तीदायक ठरला. याच प्रकाराने एकेका व्यक्तीचा आपला विजय त्या त्या व्यक्तीलाच मुक्तिदायक ठरेल. हां! अशी दुसऱ्या एखाद्याची विजयश्री, एखाद्याची मुक्ती आपल्याला प्रेरणा देणारी अवश्य ठरू शकेल. त्यामुळे आपल्याला जरूर मार्गदर्शनही मिळेल. आपण त्या मार्गाचा स्वीकार करू, जो मार्ग स्वीकारल्यामुळे, कुणी विजयी झाला व त्याला मुक्ती मिळाली तो मार्ग आपल्याला स्वीकार्य ठरेल. तेव्हाच त्या विजयोत्सवाच्या आनंदपर्वाला काही अर्थ प्राप्त होईल, काही लाभ होईल, काही स्वार्थ साधेल. तो सर्वार्थाने खरा विजयोत्सव ठरेल.*_

                _कोणा एखाद्या विशिष्ट व्यक्तीने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर विजय मिळविला तर त्या स्मृतीप्रित्यर्थ आनंदोत्सव साजरा करणे आणखीनच अनुचित आहे. *विजयादशमीच्या दिवशी सम्राट अशोकाने कलिंग देशाचा पराभव केला. त्या भीषण युद्धात हजारो लोक मारले गेले. लाखो अपंग झाले. कित्येक अनाथ झाले, कित्येक भगिनींच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले. कित्येकांच्या पदरी अपत्यहीनता आली, कित्येक घरे उध्वस्त झाली, कित्येक बगीचे ओसाड पडले. विनाशाच्या या भयाण वातावरणात अशोकाने कलिंग देशावर विजय मिळविला. आपण या विजयाचा आनंदोत्सव साजरा करावा का ? काय हा विजय खराखुरा विजय होता? या विजयाचे महात्म्य वाढविण्यासाठी आणि विजेत्याच्या गौरवार्थ कुणाला ठाऊक किती कवींनी, लेखकांनी आणि साहित्यिकांनी कलिंग देशावर हर प्रकाराने दुष्टतेचा आणि अशोकावर सर्व प्रकारच्या सौजन्यशीलतेचा गहरा रंग चढविला असता पण त्यामुळेही हा विजय खऱ्या अर्थाने विजय झाला नसता. हा तर अशोकाचा पराजय होता. तो आपल्या सत्तापिसासू वृत्तीचा गुलाम होता. आकांक्षेचा दास होता, तृष्णेचा कैदी होता. त्या साऱ्यांना त्याने कुठे जिंकले होते? आणि त्यांना जिंकले असते तर इतका भयानक विध्वंस त्याने कसा केला असता?*_

                    _*या विनाश लीलेमुळे त्याचे डोळे जेव्हा उघडले तेव्हा त्याचा खरा विजय झाला. संत पुरुष अरहंत मोग्गलिपुत्र तिस्स याच्या संपर्कात आल्यामुळे या विजयादशमीच्या दिवशीच त्याला आपली चूक कळून आली. परिणाम स्वरूप त्याने हिंसेचा मार्ग सोडून शांतीपथ स्वीकारला. हा त्याचा पहिला विजय होता. त्याने स्वतःला जिंकले, आपले मन जिंकले, मनात एकवटलेल्या दुर्गुणांचा पराजय केला. तेव्हाच चण्ड-असोक धम्म-असोक बनला. देवतासह सर्व प्राण्यांचा आवडता झाला. 'देवांना प्रिय असोक' बनला. युद्धाच्या विक्राळ ज्वाला विझल्या. शांततेचे सौम्य चांदणे पसरले. सान्या देशात प्रेम, करुणा आणि लोक सेवेच्या धर्मगंगेचा प्रवाह सुरू झाला. सर्वत्र सुख-शांती-समृद्धता यांचे साम्राज्य पसरले. हाच अशोकाचा खरा विजय होता.*_

               _*असाच विजय आपल्यालाही मिळावा. आपणदेखील आपल्या मनात साचलेल्या साऱ्या दुर्गुणांची आग विझवू या. आपले अंतर्मन निर्मल शांत लहरींनी लहरू द्या. हाच आपला विजय. बाहेरील शत्रूंना जिंकणे म्हणजे खरा विजय नव्हे. हिंसेच्या बळावर एखाद्याला आपण जिंकूदेखील तर दुसरा त्याहून अधिक सामर्थ्यवान डोके वर काढील आणि आपल्याला भीती दाखवील. जयपराजयाचे हे चक्र नेहमी आपल्याला अशांत ठेवील. आपण नेहमीच आपल्याहून बलवानाला भीतच राहू. निर्भयता सदैव आपल्या पासून शेकडो कोस दूरच राहील. अशा अवस्थेत आपण आपल्याला विजयी कसे म्हणू शकणार? भगवान बुद्धांनी किती योग्य सांगितले आहे! हजारो वेळा, हजारो रणक्षेत्रांवर, हजार-हजार योद्धांना एकट्याने पराभूत करणारादेखील विजयी म्हणण्यास योग्य ठरत नाही. ज्याने स्वतःला जिंकले तोच खरा विजयी होय.*_

                 _*खरंच आहे, ज्याने आपल्या मनाला जिंकले त्यानेच जग जिंकले.* अजूनपर्यंत जो आपल्या मानसिक व्यसनांचा गुलाम आहे, तो चक्रवर्ती सम्राट होऊनही पराजितच असतो. म्हणून दुसऱ्यांना जिंकून आपल्याला काय मिळणार? *जिंकायचेच असेल तर स्वतःच स्वतःला जिंकावे. ही खरी विजयश्री असते. जर दुसऱ्या कोणाला जिंकायचे असेल तर आपल्या निश्चल प्रेमाने जिंका, असीम करुणेने जिंका, बंदुकीने नव्हे. दंडे आणि बंदुकांनी मिळालेला विजय, खरा विजय नव्हे.* प्रत्येक दंड्याला लाठीचा मुकाबला करण्यासाठी कुणाचा ना कुणाचा मोठा दंडा तयारच असतो. प्रत्येक बंदुकीला तोंड देण्यासाठी दुसरी मोठी बंदूक उद्यत असतेच. या स्पर्धेत विजय का? *परंतु ज्याला प्रेमाने जिंकले, करुणेने जिंकले त्या विजयाचे कधीही पराजयात परिवर्तन होत नाही. त्याहून अधिक मैत्रीभावना निर्माण करून कुणी त्या विजयाला बलकटीच आणील. तो नष्ट होण्याची किंवा त्याचा नाश होण्याची किंचितही शंका नसते.*_

                 _*अंगुलीमाल नावाचा एक अत्यंत क्रूर डाकू होता. मानव देहधारी पिशाच्चच.* कोशल देशाचा राजा प्रसेनजित त्या राक्षसाच्या तावडीतून जनतेची सुटका करावी, पृथ्वीचा भार हलका करावा, म्हणून प्रयत्नशील होता. तो त्याला ठार मारण्यात यशस्वी झाला नाही. *जरी त्याने आपल्या सैन्याच्या सामर्थ्यावर अंगुलीमालला ठार मारले असते तरी त्यामुळे त्या समस्येचे समाधानकारक असे उत्तर मिळाले असते का? कोणालाही ठार मारल्याने मेलेल्याचा उद्धार होत नाही किंवा अन्य लोकांचाही उद्धार होत नाही. खरा उद्धार तर त्यांच्यात परिवर्तन करवून आणण्यात आहे. दानवाचा मानव बनविण्यात आहे. त्यांची पाशवी अघोरी वृत्ती नष्ट करण्यात आहे आणि हे कार्य असीम मैत्री, करुणा, प्रेम यांनीच होऊ शकते. दंड्यांनी नाही किंवा बंदुकीच्या नळ्यांनी नाही. भगवान बुद्धांनी मैत्री आणि करुणा यांच्या सामर्थ्यावरच त्या मार्ग चुकलेल्या व्यक्तीला सरळमार्गी बनण्यास सहाय्य केले. जे काम राजा प्रसेनजितच्या सैन्याच्या तलवारी-बंदुकींना जमले नाही तेच काम तथागतांच्या असीम मैत्रीभावनेने करून दाखविले.* ही कामे दंडे-बंदुका-तलवारींनी होत नसतात हे सिद्ध केले. अंगुलीमालला कायमचे जिंकून घेतले. *धर्माचे अध्ययन करून तो अरहंत झाला. जीवनमुक्त झाला. अंतर्मनात साठलेल्या साऱ्या पायवृत्तीचा क्षय झाला. आता तो धरतीला भार राहिला नाही. लोकांना त्रासदायक राहिला नाही. तो संतपुरुष बनून लोकसेवेत रत झाला. शुद्ध मनाने लोकसेवा करू लागला. खन्या अर्थाने त्याचाही उद्धार झाला आणि जनतेचाही उद्धार झाला.* अशा प्रकारचा उद्धार दंडाच्या बळावर कधीच होत नाही. हिंसेने हिंसेवर कधीच विजय मिळविता येत नाही. वैराने वैर विझत नाही. *अहिंसा आणि मैत्रीभावना यांनीच हिंसा पराजित होते. तिचे शमन होते. ती शांत होऊ शकते. हाच सनातन धर्म आहे. हाच निसर्गाचा अतूट नियम आहे.* धर्माचे हे रहस्य आपणदेखील समजून घ्यावे आणि हत्या करण्याऐवजी प्रेम आणि करुणा यांच्या मदतीने कोणत्याही वाईट प्रवृत्तीला जिंकण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा आपण आपल्यातील वाईट प्रवृत्तींना जिंकू, तेव्हाच हा प्रयत्न यशस्वी होईल तेव्हाच ते इतरांना प्रभावित करील. जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत आपण आपल्याला जिंकण्याचा प्रयत्न करण्यातच मग्न राहावे. आपणच आपले मन स्वच्छ व निर्मल करण्याचे काम करीत राहावे. *विपश्यना साधनेच्या सहाय्याने सतत अभ्यासाने आत्मविजयी बनावे. तृष्णा, विकार, वासनांना मूळातूनच उखडून टाकावे. मोह आसक्तीच्या बंधनातून स्वतः मुक्त व्हावे व अशा प्रकारे आपणच आपल्यावर विजय मिळवावा. व खऱ्या अर्थाने विजयपर्व साजरे करावे. यातच आपले मंगल आहे. कल्याण आहे. भले आहे. हाच आपला खरा विजय आहे. हा विजय मिळवून आपण स्वतः सुखी व्हावे आणि इतरांच्या सुखात वाढ करावी. सुखवर्धन करावे.*_

                 *_व्यावहारिक जीवनात आपल्याला कधी कधी वेडपट व्यक्तीशी संघर्ष करावा लागतो. तेव्हा त्याच्याशी कठोर व्यवहार करणे आवश्यक असते. अशा वेळी कठोर व्हावे ते त्याच्या वेडेपणाबाबत. त्याच्याविषयी आपल्या मनात प्रगाढ सहानुभूती व करुणा असावी. ज्याप्रमाणे डॉक्टर एकादे गळू मोठ्या कठोरतेने चिरतो पण रोग्याच्या विषयी त्याच्या मनात अपार कारुण्य आणि प्रेमच सामावलेले असते._*

*_'सब्बे सत्ता सुखिता होन्तु'._*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०३/११/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/11/blog-post_3.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

योग

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_योग_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_19.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _भगवंतांनी संबोधी मार्गा...