🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_महान परित्याग_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_आपल्या अनेक जन्मातील परिश्रम पुरुषार्थाने जेव्हा एखादी व्यक्ती सम्यक् सम्बुद्ध। बनते तेव्हा त्या प्रदीर्घ भवयात्रेच्या अंतीम जीवनात सहाजिकच अनेक लोक त्या व्यक्तीच्या सान्निध्यात येत असतात. त्या व्यक्तीच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाने, त्या व्यक्तीच्या उज्ज्वल चारित्र्याने, निष्कपट व्यवहाराने, सर्वथा निस्संग, निस्पृह, निर्लिप्त परंतु कठोर, कर्मठ, आदर्श जीवनचर्येने त्या व्यक्तीद्वारे संप्रदायविहीन सार्वजनिन, सार्वभौमिक सनातन सत्यधर्माच्या प्रकाशन-प्रशिक्षणाने, लोकमंगलकारक सद्भावनांनी ओतप्रोत अशा करुणायुक्त वाणीने त्या व्यक्तीकडे आकर्षित होणे सहज स्वाभाविक घटना आहे. अशा लोकात काही लोक असेही असतात की ज्यांच्या मनात अशा प्रकारचा प्रवल धर्मसंवेग जागा होतो की, आपणदेखील अशाप्रकारे सर्वगुणसंपन्न, सर्वज्ञ महामानव बनावे. केवळ आपलाच उद्धार करून घेऊन न थांबता या 'सम्यक् सम्बुद्ध' व्यक्तीप्रमाणे अनेकानेक प्राण्यांच्या उद्धारासाठी सहाय्यक बनावे._
_*पण ज्या ज्या लोकांच्या मनात अशी कल्याणकारी धर्मकामना जागृत होते तेव्हा तत्कालिन सम्यक् सम्बुद्ध त्या सर्वांनाच सम्यक सम्बुद्ध होण्याचा आशीर्वाद देत नाहीत. कारण ते त्रिकालज्ञ [भूत, भविष्य, वर्तमान जाणणारे ] असतात. आपल्या बोधीनेत्रांनी ते त्या व्यक्तीचा भूत, वर्तमान, भविष्यकाल पहातात. आणि सुयोग्य-सत्पात्र अनुकूल अशा व्यक्तीला केवळ 'सम्यक सम्बुद्ध' होण्याचा आशीर्वादच देत नाहीत तर त्या व्यक्ती संबंधात भविष्यवाणीही करतात की ही व्यक्ती केव्हा, कुठे, कोणत्या ठिकाणी जन्म घेऊन, कोणत्या नावाने, कोणत्या गोत्रात उत्पन्न होऊन सम्यक सम्बुद्ध होणार आहे.*_
*_सम्यक् सम्बुद्ध बनण्याची धर्मकामना ठेवणाऱ्या माणसाला फार मोठा त्याग करावा लागतो. उपस्थित सम्यक् सम्बुद्ध, त्या व्यक्तीची योग्यता तपासून पाहतात. त्या व्यक्तीजवळ पूर्वसंचित पुण्याईचा एवढा संचय आवश्यकच असतो की, वर्तमानकालातील धर्मोपदेश ऐकता ऐकता त्याच्या अंतरंगातील साधना जागृत होऊन ती व्यक्ती जीवनमुक्त अरहंत अवस्था प्राप्त करेल. त्या व्यक्तीला हे माहित असते की मी कोणत्या सम्यक् सम्बुद्धाच्या सान्निध्यात त्याच्या चरणी लीन झालो आहे. आणि माझे मानस इतके विकार-विमुक्त झाले आहे की जे अनुशय क्लेश म्हणजे पूर्व जन्मातील सुप्त विकारांची क्षीण मुळे फक्त राहिलेली आहेत ती आता नष्ट होऊ शकतात आणि मी भवमुक्त होऊ शकतो. याचे संपूर्ण ज्ञान असूनही तात्काळ प्राप्त होणाऱ्या मुक्तीचा तो जाणीवपूर्वक त्याग करतो. मीच नव्हे माझ्यासमवेत आणखी अगणित दुःखी जीवांच्या मुक्ततेसाठी मुक्तीद्वार खुले व्हावे या भव्योदात्त भावनेने ते अरहंतफल त्यागतो. उपस्थित सम्यक् सम्बुद्धाला हे पहावेच लागते की ही व्यक्ती खरोखरच मनापासून त्याग करीत आहे की नाही? त्याच्याजवळ पूर्वसंचित पुण्याईचा संग्रहच नाही आणि तो जर म्हणाला की मी महान त्याग करीत आहे तर त्यात काही अर्थ नाही. ज्या व्यक्तीच्या ठिकाणी आतापर्यंत या जीवनात जीवनमुक्त [अरहंत] होण्याची क्षमता आणि योग्यताच नसेल तर त्या व्यक्तीने 'मी आपल्या जीवनमुक्तीचा त्याग करीत आहे' असे म्हणणे किती हास्यास्पद होईल !_*
*_पुरेसा विपुल पुण्यसंचय असेल तर सम्यक् सम्बुद्धांचे प्रवचन ऐकता ऐकताच साधक आपल्या अंतःकरणात अनित्य बोधाची अनुभूती अनुभवू लागतो आणि कोणत्याही क्षणी निरोध अवस्था प्राप्त करून घेऊन नित्य, शाश्वत, ध्रुव, इंद्रियातीत निर्वाणपदाचा साक्षात्कार घेऊ लागतो. अशा त-हेने जन्म, वृद्धत्व, व्याधी, मरण या भवचक्राच्या फेऱ्यातून संपूर्णपणे मुक्त होण्याचा त्याला पहिला अनुभव येतो. साधक सामान्य जनांतील अनार्य अवस्थेतून आर्य अवस्थेत प्रतिस्थापित होतो. या अवस्थेत तो चारही अधोगतींतून [निरय, असुर, प्रेत आणि तिरश्छन्न म्हणजे पशू पक्षी कृमी कीटक] पूर्णपणे मुक्त होतो. याच अवस्थेला स्रोतापन्न [सोतापन्न] अवस्था म्हणतात. म्हणजेच ती व्यक्ती आता विमुक्त अवस्थेच्या प्रवाहात पडली असे म्हणतात. त्या व्यक्तीच्या पूर्णतया भव विमुक्तीच्या प्रवाहास कुणीही अडवू शकत नाही. बाधक ठरू शकत नाही. आणि ती व्यक्ती विपश्यना साधना करीत करीत स्रोतापन्न अवस्थेपुढील प्रगत अशा सकदागामी, अनागामी आणि अरहंत अशा तीनही अवस्था प्राप्त करून घेते व पूर्णतयः विमुक्त होते. अशा व्यक्तीला पुनर्जन्म नसतो. या जीवनाचा अंत हे त्याचे अंतीम मरण असते._*
_*अशा रीतीने तो जीव [व्यक्ती] जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटतो. साऱ्या दुःखांतून मुक्त होतो. ज्या कोणाला अशा प्रकारची दुःखविमुक्ती सहज उपलब्ध आहे, तो जेव्हा त्या अवस्थेचा त्याग करतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने योग्य असा महान परित्याग असतो. हेच त्याचे बोधिसत्व होण्याचे म्हणजे भावी बुद्ध बनण्याचे सामर्थ्य असल्याचे प्रमाण आहे.*_
_सम्यक् सम्बुद्ध भगवान दीपंकर यांनी अशीच अद्भुत क्षमता तपस्वी ब्राह्मण सुमेधमध्ये पाहिली, तेव्हाच त्याच्यासंबंधी मंगल भविष्यवाणी उच्चारून त्याला आशीर्वाद दिला. त्यांनी पाहिले की या तपस्वी सुमेधमध्ये अनेक कल्पांची, अनेकानेक जन्मांची संचित पूर्वपुण्याई विपुल प्रमाणांत आहे. या जीवनातही पित्याकडून वारसाहक्कने प्राप्त झालेल्या प्रचंड धनऐश्वर्याचा याने त्याग केला आहे आणि हिमालयाच्या घनगर्द वनप्रदेशांत गंभीर तपश्चर्या करून आठही ध्यानसमाधि अवस्थांची परीसीमा गाठली आहे._
_*पहिल्या ध्यानसमाधि अवस्थेपासून चौथ्या ध्यान समाधीपर्यंत सफलता प्राप्त झाल्यामुळे या तपस्व्याला रूप ब्रह्मलोकांत जन्म घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. दान, शीलपालन, सदाचरण इत्यादी पुण्यकर्मे केल्यामुळे कोणाही व्यक्तीला सहापैकी कोणत्याही एका देव भूमीवर अथवा पुन्हा मनुष्यलोकी जन्म मिळू शकतो. परंतु पहिल्या ध्यानसमाधीची सफलता प्राप्त होताच त्या व्यक्तीचा सरळ संपर्क ब्रह्मलोकांशीच साधला जातो. पहिल्या ते चौथ्या समाधीपर्यंतचे ध्यानक्षेत्र साडेतीन हाताचे शरीरच असते आणि नाम, रूप म्हणजेच मन आणि भौतिक शरीर यांच्याशीच संबंधित असते. म्हणून या चार ध्यानांचा साधक आपल्या ध्यानांची सूक्ष्मता व गहनता यांनी अंगभूत अशा क्रमाने सूक्ष्मतर होत होत पहिल्यापासून सोळाव्या रूप ब्रह्मलोकात जन्म घेत असतो. तिथे प्राण्याचे आयुष्य अनेक कल्पांपर्यंत असते. या लोकी प्राणी सूक्ष्मातिसूक्ष्म भौतिक शरीरधारी असतात म्हणून या निवासस्थानाला रूप ब्रह्मलोक म्हटले जाते.*_
_*पाचव्या ते आठव्या ध्यान समाधीला अरूप ध्यानसमाधि म्हणतात. चौथ्या ध्यानापासून साधक, रूपापासून म्हणजे भौतिक साधनांवाचून [त्या साधनाशी संबंध तोडून] आपल्या भौतिक शरीरालाही सोडून आकाशाला आपल्या ध्यानसाधनेचे आलंबन [साधन] बनवून त्याचा विस्तार करीत करीत 'अनंत आकाशांत" समाविष्ट होऊन पाचवी ध्यानावस्था गाठतो. तेथे प्रतिष्ठित होतो. नंतर त्या समाधितून मुक्त होऊन तो विज्ञान म्हणजे चित्ताच्या प्रथम खंडाला समजून घेण्याचे काम करतो, त्यालाच आलंबन बनवून त्याच्या सहाय्याने काम सुरू करून त्याचा क्रमाक्रमाने विस्तार करीत अनंत विज्ञानाचे आलंबनाचारे सहाव्या समाचित प्रतिष्ठित होतो. त्यापुढची अवस्था 'अकिच्चन' म्हणजे 'काहीच नाही' हे आलंबन ग्रहण करून त्यातच समाविष्ट होऊन साधक सातव्या ध्यानावस्थेत प्रतिष्ठित होतो, स्थिरावतो. पाचव्या समाधि अवस्थेपासून सातव्या ध्यानावस्थेपर्यंत मानसाचा जो हिस्सा ओळखणे व मूल्यमापन करणे ही दोन कामे करणारा, जो 'संज्ञा' या नावाने ओळखला जातो आणि जो साऱ्या प्रपंच विस्ताराचे मुळ आहे तो भाग क्षीण [नष्ट] होत जातो. जेव्हा साधक अशा अवस्थेला पोहोचतो त्या अवस्थेला 'नेवसञ्ञा-नासञ्ञा' असे म्हणतात. या अवस्थेत संज्ञा एवढी क्षीण होत असते की ती आहे की नाही याचा स्पष्ट आभास होत नाही. अशा रीतीने तो आठव्या समाधि अवस्थेत प्रवेश करून स्थिरावतो.*_
_*पाचव्या समाधि अवस्थेपासून आठव्या समाधि अवस्थेपर्यंत आकाश अथवा मनाच्या अंगाला सोडून आणखी कोणतेही भौतिक आलंबन असत नाही. म्हणून या समाधि अवस्थेत पोहोचलेला साधक अरूप ब्रह्मलोकीच्या क्रमशः पहिल्या ते चौथ्या भवाग्र लोकात जन्म घेण्याचा अधिकारी होतो. अधोगतीकडे नेणाऱ्या चार, मनुष्य जातीची एक, देवजातीच्या सहा आणि रूप ब्रह्मलोकाच्या सोळा, अरूप ब्रह्मलोकाच्या चार अशा रीतीने एकतीस लोकात कुठेही जन्म घेतला जातो. त्या जन्माचा कालावधी काही क्षणांचा असतो. अथवा अरूप ब्रह्मलोकाप्रमाणे अगणित कल्पांचा ही असू शकतो. अधोगतीची दुःखे असोत वा देव-ब्रह्मलोकींचा असीम सुख-आनंद असो. प्रत्येक जन्मात कमीअधिक काळाने मृत्यू होत असतो आणि पुनर्जन्म होत असतो. यामुळे जन्ममरणाचे भवचक्र चालूच राहते. भवमुक्ती होत नाही.*_
_*आठही समाधितील निपुण साधकातही दोन प्रकार असतात. त्यातील अधिकांश साधक जे आठव्या समाधि अवस्थेत जाताच साधनेचा अंतीम टप्पा असे समजून तीच मुक्ती समजतात तोच मोक्ष समजून संतुष्ट होतात आणि काही थोडेसे जे या अवस्थेत अत्यंत सूक्ष्म स्तरावर उत्पाद-व्ययाची अनुभूती घेत असतात. म्हणून त्याला अनित्यतेचे क्षेत्र जाणून त्या पलिकडील नित्य, शाश्वत, ध्रुवाचा शोध चालूच ठेवतात. या अवस्थेत एक वा अधिक इंद्रिये काम करतात त्यामुळे इंद्रिय क्षेत्रापलिकडील इंद्रियातीत अवस्थेचा शोध चालूच ठेवतात. चौथ्या ध्यानानंतर म्हणजेच भौतिक शरीर तद्वत सगळ्याच भौतिक पदार्थांचा संबंध तुटतो. परंतु नाम म्हणजे चित्त [ मानस ] व चैतसिक [चित्तवृत्तीचे] क्षेत्र कायम असते. म्हणून चित्तापलिकडील, इंद्रियातीत परमोच्च अवस्थेचा शोध चालूच राहतो.*_
_अशी व्यक्ती आपल्या मनातील भवांगातील खोलवर सुप्तावस्थेतील वासना विकारांची दडून बसलेली सूक्ष्मातिसूक्ष्म बीज-मुळे पाहतो आणि समजून घेतो की जोपर्यंत ही पूर्व संस्कारांची बीजे माझ्या अंतरंगात कायम आहेत तोपर्यंत मी भवमुक्त होत नाही. वेळ येताच ही बीजे विकसित होणार, फुलणार, फळणार व नवनवीन भवांना [जन्म-पुनर्जन्मांना] कारणीभूत होणार. हे वासना विकाराचे क्लेश पाचव्या ते आठव्या ध्यान समाधिपर्यंत सुषुप्तावस्थेत होते. पण त्यांचे समूळ निर्मूलन झाले नव्हते. हे अनुशय क्लेश म्हणजेच सुप्तावस्थेतील भवदुःखे यथावकाश पुन्हा जागृत होतात. ही अंतशायी भवबीजे केव्हाही अंकुरित होऊ शकतात. म्हणून साधक ही गोष्ट चांगलीच जाणतो की अजून मी भवमुक्त झालो नाही. *मला अद्यापही भवमुक्तीचा मार्ग शोधायचा आहे. असा मुमुक्षु जेव्हा कोणा सम्यक् सम्बुद्धाला सामोरा जातो आणि मनात सम्यक सम्बुद्ध होण्याची धर्मेच्छा करतो तेव्हा तोच खरा अधिकारी व्यक्ती असतो.*_
_*भगवान दीपंकर सम्यक सम्बुद्धासमोर चिखलात साष्टांग नमस्कारावस्थेत पडलेला ब्राह्मण तपस्वी सुमेध हा असाच अधिकारी व्यक्ती होता. त्याच्याजवळ अनेक कल्पांच्या पारमितांचा असाच विपुल आधार होता. जर त्यावेळी भगवानांनी उपदेश दिला असता तर तो उपदेश ऐकता ऐकता सुमेधाच्या अंतःकरणात उदय-व्यय या अनित्य तत्त्वाचा साक्षात्कार झाला असता आणि तात्काळ नित्य ध्रुव अशा अवस्थेचे दर्शन झाले असते व क्रमशः अरहंताच्या निरोध अवस्थेला पोहाचला असता. परंतु अशाप्रकारे या अवस्थेपर्यंत पोहोचू शकणाऱ्या तापसी सुमेधाने त्या फलाचा त्याग केला. या अर्थाने तो महान त्याग करणारा परित्यागी ठरला.*_
_*चौथ्या ते आठव्या ध्यान समाधी अवस्थेत पोहोचता पोहचता साधक पाच लोकीय अभिञ्ञा [अभिज्ञान] म्हणजे लोकीय सिद्धी प्राप्त करीत असतो. त्या अशा -*_
_*१. ऋद्विविध :* विविध प्रकारच्या ऋद्धी. उदाहरणार्थ एकातून अनेक रूपांत जाणे, अदृश्य होणे इत्यादी चमत्कारमय प्रयोग._
_*२. दिव्य श्रोत्र :* ज्या सिद्धीप्राप्तीमुळे जवळच्या आणि दूरच्या मनुष्याची किंवा मनुष्येतर प्राण्यांची वाणी समजण्याचे सामर्थ्य प्राप्त होणे._
_*३. चेतोपर्यज्ञान :* ही अशी सिद्धी आहे की ज्यामुळे दुसऱ्या माणसाच्या मनातील विचार समजण्याची शक्ती प्राप्त होते._
_*४. पूर्वेनिवासानुस्मृती :* या सिद्धीमुळे पूर्वीच्या अनेक जन्मांचे ज्ञान प्राप्त होते._
_*५. दिव्यचक्षु [च्युत्योत्पादज्ञान] *अशी सिद्धावस्था, की दृष्टी दिव्य होते व त्यामुळे सर्व लोकातील प्राण्यांची त्यांच्या गतिविधीची, त्यांच्या च्युतिची म्हणजे मृत्युची आणि मरणोपरांत उत्पाद म्हणजे पुनर्जन्माची माहिती जाणता येते._
_*अर्थात हे उघडच आहे या पाच लोकीय सिद्धी प्राप्त झाल्या तरी भवमुक्ती त्या सहाव्या लोकोत्तर सिद्धीमुळेच होते जिला आश्रव-क्षय ज्ञान सिद्धी म्हणतात. त्या सिद्धी प्राप्तीमुळे साधक आपला स्वतःचा तद्वतच अन्य लोकांच्या अंतरंगातील पूर्णतः क्षय झालेल्या आश्रवांच्याद्वारे नितांत विमुक्ती अनुभवतो व परम विमुक्त सिद्ध पुरुष बनतो.*_
_*ब्राह्मण तपस्वी सुमेध पांचही लोकीय सिद्धींचा धनी होता. परंतु सहाव्या सिद्धीचा त्याच्याकडे अभाव होता. त्याची त्याला उत्कंठा होती. शोध घेत होता. त्याला समजत होते की आश्रव-क्षय अवस्थेतील सहावी सिद्धी आठ ध्यानावस्थेच्या पलिकडील सिद्धी आहे. त्याला हे देखील समजत होते की ह्याच सिद्धीच्या प्राप्तीनंतर मनुष्य भवमुक्त होतो. आणि त्यालाच बुद्ध म्हटले जाते.* या कारणामुळे या लोकी बुद्ध निर्माण झाल्याच्या वृत्तानेच तो हर्षविभोर, रोमांचित झाला. त्यांच्या दर्शनाची त्याला तीव्र अभिलाषा उत्पन्न झाली. आणि त्यांची सेवा करायला तो सिद्ध झाला._
_*भगवान दीपंकर सम्यक सम्बुद्धांना सामोरे येताच, त्याने परचित्तज्ञान सिद्धीच्या सहाय्याने पाहिले की, खरोखरच हे आश्रव विमुक्त आहेत. म्हणून निश्चितपणे अरहंत आहेत. बुद्ध आहेत. मी आठ ध्यानांचा अभ्यास केला. या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे मला नक्कीच अरहंत अवस्था प्राप्त होऊ शकेल की ज्या अवस्थेची मला गरज होती, जिच्या मी शोधात होतो. पण लगेच तो विचार करतो, 'माझ्या एकट्याच्या मुक्तीसाठी प्रयत्न करणे म्हणजे काही विशेष गोष्ट नाही. ही तर क्षुल्लक कामना आहे. आपल्या समवेतच आणखीही अगणित प्राण्यांना मुक्त होण्यास सहाय्यक होऊ शकलो तर त्यात जीवनाची सार्थकता आहे.'*_
_*यासाठी आश्रवमुक्त करू शकणारी विद्या मागण्याऐवजी सम्यक् सम्बुद्ध होण्याची कामना व्यक्त केली, तर लोककल्याणासाठी आपल्या तात्काळ पूर्ण होऊ शकणाऱ्या स्वार्थाचाच त्याने परित्याग केला. महामंगलदायी परमपरित्याग होता तो!*_
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०१/११/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/11/blog-post.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment