Saturday, 22 October 2022

धन्य आहे मैत्रीभावना

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_धन्य आहे मैत्रीभावना_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                              _फार सोपे आहे शांत रहाणे, फारच सोपे आहे, क्रोध-कोप विहीन रहाणे. हसतमुख रहाणे तर अधिकच सोपे आहे, जेव्हा जीवनधारा मधुर संगीताप्रमाणे सर्वार्थाने मनासारखी वहात असेल. विशेषत: जेव्हा आपल्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ति मनाला रुचेल असे बोलत असेल, मनासारखे करीत असेल, आपल्या साऱ्या मनोकामना सुरळितपणे सहजच पूर्ण होत असतील, चारी दिशांना वसंताची हिरवळच हिरवळ पसरलेली असेल._

                              _पण हिरवळ नावालासुद्धा दिसू नये, जो भेटतो तो कठोर व्यवहार करणारा असावा, उगाचच अपमान करणारा निघावा, सगळ्या घटना मनाविरुद्ध घडून एकसुद्धा घटना मनासारखी घडू नये, तरीसुद्धा जो आपल्या मनात यत्किंचितही द्वेष-क्रोध जागवीत नाही, विद्रोह करीत नाही. थोडेसुद्धा मन कलुषित करीत नाही तोच खरोखर परिपक्व विपश्यी साधक आहे. आपल्याला अशा अवस्थेला पोहोचण्यासाठी सतत प्रयत्नशील असायला पाहिजे._

                                _भगवानांनी ही गोष्ट चांगली समजावण्यासाठी एक उदाहरण सांगितले. कोणे एके काळी श्रावस्ती नगरीत वैदेहिका नावाची एक गृहिणी ह्यासाठी प्रसिद्ध होती की ती फार शांत स्वभावाची आहे. तिच्यात भांडणतंट्याचा अजिबातच वाव नव्हता. कडवटपणा तिच्या बोलण्यात कधी येत नसे. तिच्याकडे काली नावाची एक मोलकरीण काम करीत असे. अत्यंत कष्टाळू, सेवाभावी, हसतमुख आणि विनयशील. मालकिणीच्या आधी लवकर उठून घरातले सारे कामकाज मोठ्या हुषारीने कुशलतापूर्वक करून ठेवीत असे. मालकिणीला तिच्याविषयी तक्रार करायला काही जागाच ठेवीत नसे. घर नेहमीच स्वच्छ आणि सुशोभित असे. मनपसंत भोजन वेळेवर तयार ठेवीत असे. घरी कुणी पाहुणेमंडळी आल्यास त्यांच्या आगतस्वागतात व उठाबशीत ती कमतरता राहू देत नसे. सगळे मनासारखे, सगळे मनाला भावणारे! सारे कसे सुंदर आणि सुखद. आणि हे सगळे काली मोलकरणीच्या कर्तृत्वाने. मालकिणीच्या ओठांवर सतत मंद स्मित आणि मंद हास्य._

                              _मालकिणीच्या सौम्य स्वभावाला काली रोज बघत होती. बाहेरसुद्धा त्याची चर्चा ऐकायची. एक वेळा तिच्या मनात आले, 'मालकिणीची जरा परीक्षा घ्यावी. निसर्गतःच ती अशी सौम्य स्वभावाची आहे की, काली मोलकरणीच्या निर्दोष सेवेमुळे आहे, ते बघावे.'_

                                _दुसऱ्या दिवशी काली जाणूनबुजून उशीरा उठली आणि घरातली कामे वेळेवर करू शकली नाही. मालकिणीला आवडले नाही. पुढल्या दिवशी पुन्हा उशीरा उठली तर मालकिणीचा पारा चढला. ती रागात कालीला शिव्या देऊ लागली. तिसऱ्या दिवशी आणखी उशीरा उठली. आता तर मालकिणीला असह्य झाले. तिचा संयम सुटला. गोष्ट शिव्यांवरच थांबली नाही तर संतापात जवळच पडलेली कळशी कालीच्या डोक्यावर आपटली. डोक्यातून भळाभळा रक्त येऊ लागले. मालकिणीच्या सौम्य स्वभावाचे रहस्य उघड झाले. *नावडीच्या गोष्टीविषयी क्रोध करण्याच्या दूषित स्वभावाची पकड मनाच्या तळापर्यंत घट्ट बसलेली असते. परंतु मनासारखे होत राहिले तर वरवरची प्रसन्नता त्या दूषित स्वभावाला झाकून ठेवते. स्वभाव तर अंतर्मनातून बदलला पाहिजे. शिकायचे हे आहे की, नावडत्या परिस्थितीत आपण न रागावता शांत व सौम्य कसे रहावे.*

                                _त्याच काळातील एका भिक्षुची भिक्षुणी संघाशी जास्तच जवळीक झाली होती. भिक्षुणीविरुद्ध एकसुद्धा शब्द काढलेला त्याला चालत नसे. त्यालाच समोर ठेवून भगवानांनी खऱ्या आणि गहन सहिष्णु मैत्रीचा सारगर्भित उपदेश दिला. *भगवानांनी समजाविले, “भिक्षूंनो, कुणी तुमच्याशी अनुकूल बोलो वा प्रतिकूल, खरे बोलो वा खोटे, स्निग्ध-मृदु बोलो वा कर्कश कटु, सार्थक बोलो वा निरर्थक, मैत्रीपूर्ण चित्ताने बोलो वा द्वेषयुक्त चित्ताने बोलो तुम्हाला तर सगळ्या अवस्थांमध्ये आपले चित्त विकार-विमुक्त ठेवायला पाहिजे. तुमच्या तोंडून चुकूनसुद्धा दुर्वचन येऊ नये. चित्त सदासर्वदा मैत्रीभावयुक्त राहिले पाहिजे. जरासुद्धा द्वेष-दुर्भाव जागता कामा नये. त्याउलट त्याच व्यक्तीला आलंबन करून आपली मंगलमैत्री अपरिमित करण्याचा अभ्यास करायला सुरुवात करावी. अशाप्रकारे त्याला आपल्या कल्याणाला कारणीभूत करावे."*_

_त्या गृहत्यागी, निर्वाणोन्मुख भिक्षूंना भगवानांनी उपमांच्या आधारे समजाविले :_

_*१.* कुणी नादान व्यक्ती हातात कुदळ पावडे घेऊन म्हणू लागेल की, मी ह्या महापृथ्वीला खोदून खोदून संपवून टाकीन._

_*२.* कुणी नादान व्यक्ती लाखेच्या हळदीच्या अथवा मजिठीच्या लाल फळांना एकत्र घोटून केलेल्या रंगाने सारे आकाश रंगवीन असे म्हणेल._

_*३.* कुणी नादान व्यक्ती काडी कचरा एकत्र करून आग पेटवील आणि त्यात सारे गंगाजल तापवू म्हणेल._

_*४.* कुणी नादान व्यक्ती सुकोमल, मुलायम केसांच्या मांजराला खडबडीत लाकडाने घासून त्याच्या केसांना खडबडीत करीन म्हणतो._

                             _तर ह्या साऱ्या गोष्टी असफलच होतील. अशाच प्रकारे जर कुणी तुमची समता भंग करू पाहील, तुम्हाला क्रोधित करण्यासाठी हजार प्रयत्न करील, पण जर तुमची मैत्री सबळ असेल तर तो अयशस्वीच होईल._

                            _पृथ्वी महान आहे; कुणाच्या कुदळींनी खोदण्याने नष्ट होणारी नाही. आकाश अनंत आहे; कुणाच्या रंगाने रंगविले जाणारे नाही. गंगा विशाल आहे; कुणाच्या काडी-कचऱ्याच्या आगीने तापविली जाणार नाही. मांजरीचे केस निसर्गतःच सुकोमल-मऊ आहेत. कुणाच्या खडबडीत काठीच्या रगडण्याने खडबडीत होणार नाहीत._

                       _*त्याचप्रमाणे कुणा भिक्षुची मैत्री अनंत अपरिमित असावी आणि हा त्याचा सहज स्वभाव झाला असावा, तर कुणा व्यक्तीच्या मर्यादित प्रयत्नांनी त्याचे मैत्रीबळ नष्ट होणार नाही. म्हणून भिक्षूंनी आपले मैत्रीबळ अपरिमित करून घ्यायला पाहिजे. इथपर्यंत की कुणी, दुष्ट-दुर्जन दोन बाजूंनी करवतीच्या मुठी पकडून भिक्षूच्या कुठल्याही अंगावर चालवून कापू लागेल तरी द्वेष न जागता मैत्रीच जागेल. तरच भगवानांच्या उपदेशांच्या पालनाची सफलता आहे. म्हणून भिक्षूंनी आपले मैत्रीबल अपरिमित करावे.*_

                              _अनेक भिक्षु होते की, जे भगवानांचे आदेश शिरोधार्य करून गंभीरतापूर्वक त्याचे पालन करीत असत. उदाहरणस्वरूप *एकदा भगवानांनी सांगितले की ते एकासन भोजनसेवी आहेत म्हणजे चोवीस तासात एकदाच भोजन घेतात, त्यामुळे त्यांचे स्वास्थ्य चांगले राहाते. ते निरोगी रहातात. त्यांची स्फूर्ति आणि बळ वाढते; शारीरिक सौख्यसुद्धा. हे ऐकून, जरी भिक्षुविनयानुसार विकालभोजन म्हणजेच मध्यान्हानंतर भोजन न घेणे एवढेच पुरेसे होते तरी अनेक भिक्षु एकासन भोजनसेवी झालेत.*_

_अशाप्रकारे सबळ मैत्रीभावनेच्या विकासाचा अनेक भिक्षु अभ्यास करु लागले. एक उज्वल उदाहरण :-_

                           _*सूनापरांत प्रदेशातील सुप्पारकप्पत्तन बंदरग्रामवासी 'पूर्ण' नावाचा व्यापारी आपल्या व्यवसायासाठी श्रावस्तीला गेला.* तिथे भगवानांच्या संपर्कात आला तर धर्माच्याच संपर्कात आला. खूप वैराग्य जागले आणि प्रव्रजित होऊन भिक्षुसंघात सामिल झाला. तो भगवानांचे उपदेश निश्चयपूर्वक पाळणारा होता काही काळानंतर स्वदेशी परत जाण्याची इच्छा जागली तर भगवानांची आज्ञा घेण्यासाठी उपस्थित झाला._

                              _भगवानांनी विचारले, ‘सूनापरांत प्रदेशातील नगरवासी फार कठोर आहेत, अत्यंत क्रोधी आहेत. ते तुझ्यावर ओरडतील. तुला अपशब्द बोलतील तर तुला कसे वाटेल पूर्ण ?_

                            _'मला बरेच वाटेल भगवान! माझ्या मनात हाच भाव जागेल की, 'सूनापूरांतचे रहिशवाशी मोठे पवित्र आहेत, शुद्ध आहेत, फारच भले आहेत. माझ्यावर नाराज झाले तरी फक्त थोडेसे अपशब्द बोलून थांबतात. मला हातांनी मारठोक तर करीत नाहीत."_

_"जर तुला ते हातांनी मारू लागले, तर कसे वाटेल पूर्ण ?”_

_"बरेच वाटेल भगवान! माझ्या मनात हाच भाव जागेल की ते किती पवित्र आहेत, शुद्ध आहेत. ते मला केवळ हातानेच मारतात. दगडांनी तर नाही ना मारत. '_ 

_"आणि जर ते दगडगोट्यांनी मारू लागले तर कसे वाटेल पूर्ण ?"_

_“बरेच वाटेल भगवान! माझ्या मनात हाच भाव जागेल की, कसे भले आहेत हे लोक. किती पवित्र आणि शुद्ध आहेत हे लोक. लाठ्याकाठ्यांनी तर नाही मारत. खरोखरच किती भले आहेत!"_

_"आणि लाठ्यांनी मारले तर कसे वाटेल पूर्ण ?"_

_"भगवान! माझ्या मनात हाच भाव जागेल की, कसे भले आहेत हे लोक. किती पवित्र आणि शुद्ध आहेत हे लोक. केवळ काठ्यांनी मारतात. शस्त्राने तर नाही ना मारत. खरोखरच मोठे भले आहेत!"_

_"आणि शस्त्राने मारले तर कसे वाटेल पूर्ण ?"_

_"बरेच वाटेल भगवान! माझ्या मनात हाच भाव जागेल की, कसे भले आहेत हे लोक किती पवित्र आणि शुद्ध आहेत हे लोक सामान्य शस्त्राने मारून केवळ तर केले कुठल्या धारदार शस्त्राने मारून माझे प्राण तर नाही घेतले!"_

_"आणि जर तुला धारदार शस्त्राने त्यानी मारून टाकले तर कसे वाटेल पूर्ण ?"_

_'बरेच वाटेल भगवान! काही लोक असेही असतात की, जे दुःखमय जीवनाला कंटाळून मरणासाठी कुठल्या प्राणघातक शस्त्रधान्याला शोधतात, आणि मला तर न शोधताच शस्त्रधारी प्राणघातक मिळाले. किती भले आहेत इथले लोक!_

_"साधु! साधु! साधु!" भगवानांनी साधुकार केला आणि म्हटले, 'पूर्ण, तू अशा धर्ममय चित्ताने मातृभूमीमध्ये यशस्वीरित्या राहू शकशील आणि धर्मसेवा करू शकशील. "_

                               _*असे भगवानांचे आशीर्वाद घेऊन पूर्ण स्वदेशी परतला आणि आल्या आल्याच जी भगवानांकडून साधनाविधी शिकला होता त्याचा अभ्यास करीत पहिल्याच वर्षावासात अरहंत अवस्था प्राप्त केली. पहिल्याच वर्षावासात एक हजार महिला पुरुषांना शुद्ध धर्मात प्रतिष्ठित केले त्यानंतर त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. अनेकांना धर्मलाभ झाला.*_

                            _भगवानांच्या प्रशिक्षणाने साध्य झालेल्या असीम मैत्रीबलाने 'पूर्ण' भिक्षुने त्या प्रदेशात जे शुद्ध धर्मबीज पेरले ते कालांतराने खूप पसरले, खूप फुलले, अतिशय फलदायी झाले._

                               *_आजच्या महाराष्ट्राचा संपूर्ण उत्तरेकडील तथा पश्चिमेकडील प्रदेश अरहंत 'पूर्ण'च्या धर्मसेवेच्या कारणाने शुद्धधर्माच्या पावनगंगेने न्हाऊन निघाला. मैत्रीबळाने कठोर स्वभावाचे लोक मधुर स्वभावाचे झाले. ह्या प्रदेशात ठिकठिकाणी कठीण खडकात कोरलेल्या ध्यानलेणी बघायला मिळतात. त्या आपल्याला मैत्रीप्रबळ अरहंत पूर्ण आणि त्याच्या शिष्य-प्रशिष्यांच्या अपूर्व यशाची मधुर आठवण करून देतात. तिथल्या पावन लहरी आजही त्यांची पावनगाथा गात आहेत._*

                           *_धन्य आहे. मंगलमयी मैत्री भावना! धन्य आहे मैत्री भावनेने परिपूर्ण असलेला पूर्ण !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २२/१०/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_22.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...