🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_वीतशोक खरोखरच शोकमुक्त झाला !_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर दोन शतकांनी या देशात अशोक नावाचा सम्राट झाला. त्याच्या अनेक भावांपैकी एकाचे नाव होते वीतशोक,* त्या काळात राजकुमारांना ज्या अनेक हस्तकला [शिल्प] आणि विद्यांमध्ये नैपुण्य मिळवावे लागे, त्या सगळ्यांमध्ये राजकुमार युवावस्थेत पोहोचेपर्यंत निपुण झाला व आपल्या वडिल भावाच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभारातील जबाबदाऱ्या सांभाळू लागला. कालांतराने अशोकात परिवर्तन झाले. प्रारंभी मध्य आणि अंतीही सर्वथा शुद्ध कल्याणकारी धर्माच्या संपर्कात तो आला तर तो चण्डाशोकाऐवजी धर्माशोक झाला. *भगवानांची, सर्व मांगल्यमयी धर्माची वाणी व त्यांनी सांगितलेल्या साधनामार्गाचा तत्कालिन धर्माचार्यांच्या कुशल निर्देशनानुसार अवलंब केल्यामुळे सम्राट अशोकाला अपूर्व मनःशांतीचा अनुभव आला. त्या धर्मराजाच्या मनात आपल्या प्रजेविषयी अनंत वात्सल्य जागले. राज्याचे उत्पन्न प्रजेच्या संरक्षणाप्रमाणेच त्यांच्या सुखसोयी करण्यात खर्च होऊ लागले. नवे राजमार्ग बनले, रस्त्याच्या काठांवर फळे व छाया देणारे वृक्ष लावले. थोड्या थोड्या अंतरावर पाणपोयांची सोय केली. ठिकठिकाणी धर्मशाळा बांधल्या. दवाखाने उघडले. केवळ माणसांसाठी नव्हे तर पशुंसाठीही औषध व्यवस्था केली. यापेक्षाही महत्त्वाचे कार्य म्हणजे लोकांना संप्रदायविहीन, शुद्ध धर्माची सैद्धांतिक आणि व्यावहारिक शिकवण देण्यासाठी धर्म अमात्य नियुक्त केले. ठिकठिकाणी प्रशस्त शिलांवर आणि पाषाणस्तंभावर शुद्ध धर्मवचने खोदली. हेतू हा की, राज्यातील प्रशासकीय अधिकारी आणि प्रजा तेथे जाऊन ती धर्मवाणी वाचून सत्धर्माकडे प्रवृत्त व्हावे. ठिकठिकाणी साधना केंद्रे स्थापन केली. लोकांनी तेथे जाऊन संयम आणि चित्तशुद्धीचा अभ्यास करून लाभान्वित व्हावे.*_
_धर्माचा प्रभाव लोकांच्यावर वाढत होता. त्यासमवेत राजपरिवारांतील सदस्यांची धार्मिक भावना वाढत होती. सारे नाही, पण बरेच जण धर्मगंगेत डुबकी मारू लागले आणि धर्मामृताचे रसपान करून कृतार्थ होऊ लागले. राजघराण्यातील अंतःपुरातही अशोकाने विशेष धर्माचार्य नियुक्त केले होते._
_*सम्राट अशोकाचा धाकटा भाऊ वीतशोक पुण्यवान होता. धर्माने नो प्रभावित झाला. भगवान बुद्धांच्या वाणीत त्याला शांती आणि निर्मलता यांचा संदेश मिळाला. तो स्वतः विवाहित असतांनाही त्याने पूज्य भिक्षु गिरिदत्त धेर यांचे चरणांपाशी वसून सारा 'सुत्तपिटक' वाचला. चांगले अध्ययन केले. त्या हृदयस्पर्शी महामंगलमय भगवद्वाणीने राजकुमार वीतशोक भारावून गेला. सरळ भाषेत सांगितलेली भगवानांची अमृतवाणी वाचून धर्मातील गहनता गुंतागुंतीची राहिली नाही. कल्पना आणि अंधश्रद्धा यांचे जंजाळ आपोआप दूर झाले. सत्याचा स्वच्छ प्रकाश अज्ञानाचा अंधार दूर करू लागला. कार्य-कारण भावाचे नैसर्गिक नियम स्पष्टपणे समजू लागले. 'प्रतीत्य-समुत्पाद' च्या साखळीवर आधारीत भव-प्रवाह स्पष्टपणे लक्षात आला. ह्या साखळीतील कड्या तोडल्या तर भवप्रवास कसा संपतो हे सुद्धा स्वच्छपणे समजले. चित्त आणि चित्तवृत्ती तसेच भौतिक शरीराची क्षणा-क्षणाला परिवर्तित झाल्यानंतरची संतति कसे एकमेकाला स्पर्श करून प्रभावित करतात आणि ह्या प्रपंचाला योग्य प्रकारे समजून घेऊन भवधारेतून कशी मुक्ती मिळवता येईल. ही बाबसुद्धा स्पष्ट झाली. भवप्रवाह दुःखदायकच आहे. आणि त्यांचे मूळ कारण आहे - तृष्णा. जिच्याबरोबर दुःखाचा समुदय होत रहातो. हे कारण दूर केले त्याचे निवारण केले की प्रवाह स्वतःच थांबतो. ह्या कारणाच्या निवारणासाठी किती स्पष्ट परंतु परिश्रम करून साध्य होणारा विधी आहे, ज्याच्या अभ्यासाने कुणाही व्यक्ती दुःखनिरोधाची परमावस्था प्राप्त करू शकतो. अशाप्रकारे सुत्तपिटकचा अभ्यास पूर्ण करून घेऊन आचार्य गिरिदत्त स्थविरांनी वीतशोकाकडून अभिम्मपिटकच्या गंभीर उपदेशाचे पारायण करविले.*_
_नाम आणि रूप यांच्या पारस्परिक संबंधाचे सूक्ष्म ज्ञान होताच राजकुमार वीतशोकचे हृदय आल्हाद-विभोर झाले. या दोन्ही पिटकांचे परियत्तिजनक शिक्षण म्हणजे शास्त्रीय शिक्षणासमवेतच आचार्य गिरिदत्त भिक्षूंनी आपल्या राजशिष्याकडून पटिपत्तीचा देखील अभ्यास करवून घेतला म्हणजेच साधना देखील करवून घेतली. वाचलेले आणि ऐकलेले ज्ञान जेव्हा सत्यतेच्या अनुभूतीवर खरे ठरू लागले तेव्हा चित्त श्रद्धेने प्रभावित होऊन सरळमार्गी झाले. तो ऋजु चित्त होत गेला. *आपल्या कौटुंबिक आणि राजकीय जबाबदाऱ्या पार पाडीत वीतशोक एक आदर्श गृहस्थ जीवन व्यतीत करू लागला.*_
_बराच काळ लोटला. एक दिवस न्हावी केस कापण्यासाठी आला. त्याने डोक्याचे, मिशीचे, दाढीचे केस कापले व्यवस्थित सावरले तेव्हा वीतशोक नेहमीप्रमाणे आरशात चेहरा बघू लागला, बघितले की, आपले केस पहिल्यासारखे मुलायम आणि काळेभोर राहले नाहीत. ठिकठिकाणी पांढरे केस शरीर वृद्धावस्थेकडे झुकत असल्याचे दर्शवीत होते. चेहऱ्यावरही वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागली आहेत._
_ते पाहून वीताशोकाच्या मनांत प्रबळ धर्मसंवेग जागृत झाला. अनेक पूर्वजन्माप्रमाणे हे जीवन देखील असेच जाणार की काय? अमूल्य असा मनुष्यजन्म मिळाला आहे. याचा योग्य लाभ मला घेतलाच पाहिजे. मृत्यूचा काय भरवसा ? केव्हाही येऊ शकतो._
_अशी धर्मवृत्ति जागृत झाली. दृढसंकल्पपूर्वक साधना करू लागला. आणि *अल्पावधीतच स्रोतापन्न अवस्थेला पोहोचला. जेव्हा शरीर आणि चित्त यापलिकडील इंद्रियातीत अमृतावस्थेचा साक्षात्कार झाला तेव्हा त्याचा धर्मसंवेग अधिकच घनीभूत झाला. मला या मानवी जीवनाचा आणि या मुक्तीदायिनी विपश्यना साधनेचा पुरेपूर लाभ घेतलाच पाहिजे. त्याने गृहस्थ जीवन सोडले. राजप्रासादातील पोकळ प्रलोभनांचा त्याग करून डोक्यावरील केस काढून चीवर धारण केले. प्रव्रजित होऊन आचार्य गिरिदत्तांच्या मार्गदर्शनाखाली विपश्यना साधनेत लीन झाला. सूक्ष्म सत्यदर्शनाचा अभ्यास करता करता कालांतराने वीतराग, वीतद्वेष, वीतमोही झाला. अरहंत झाला.* मानवी जीवनाचे परम लक्ष्य साध्य केले. तेव्हा स्वतःच्या तोंडून स्वानुभवाचे बोल बाहेर पडले._
_'केस कापण्यासाठी न्हावी माझ्याजवळ आला. त्याच्याकडून आरसा घेऊन मी माझ्या शरीराचे सूक्ष्म निरीक्षण केले आणि तेव्हा विपश्यनेची अंतर्दृष्टी जागली._
_*'तुच्छो कायो अदिस्सित्थ'* - या जराधर्मा, मरण धर्मा, क्षणोक्षणी परिवर्तन धर्मा शरीराची नीरसता, तुच्छता कायानुपश्यना करून प्रत्यक्ष अनुभूतीने बघितली._
_*'अंधकारे तमो ब्यगा'* अज्ञानाचा सारा अंधार दूर झाला._
_*'सब्बे चोळा समुच्छिन्ना'* - भवसंस्काराचे सारे पडदे उघडले गेले व परम सत्य अनावरित झाले._
_*'नत्थिदानि पुनब्भवो'* - आता मला पुनर्जन्म नाही. पुनर्जन्माला कारणीभूत भवसंस्काराचे निर्मूलन झाले. [मूळासकट उखडले गेले.] भव पुन्हा पुन्हा रहाण्यास कारण असलेली भवनेत्री तुटली तर आता पुनर्जन्म कसला ?_
_पांढऱ्या केसांच्या दर्शनाने साधकाला परम सत्याचे दर्शन करू शकण्याची प्रेरणा दिली. एका भाग्यशाली सम्राट अशोकाला शुद्ध धर्माची प्राप्ती झाली तर सारा देश धन्य झाला. देशातील असंख्य लोकांना खऱ्या सुखशांतीचा मार्ग मिळाला._
_*राज्य परिवारातील एकाद-दुसरा माणूस अभागी राहिला. धर्मापासून विमुख राहिला. परंतु बाकी सर्व जणांना मंगल कल्याणकारी मार्ग मिळाला. त्यांच्यातील अनेकजण जीवनमुक्त झाले. अरहंत झाले. वीतशोक हा त्यांच्यापैकी एक होता.*_
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- २१/१०/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_21.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment