Tuesday, 18 October 2022

पहा घाणच घाण देहाची

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पहा घाणच घाण देहाची_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

             _भारतातील प्राचीन लोकभाषेतील एका विपुल साहित्याचा साठा सुमारे तेवीसशे वर्षापूर्वी शेजारच्या देशात गेला आणि तो संग्रह गुरुशिष्यांच्या परंपरेनुसार मौखिक आणि लिखित रूपात पीढ़ी दर पीढी चालत राहिला. पण भारतातून मात्र तो साहित्यसाठा विलुप्त झाला. *संशोधनामध्ये त्या साहित्यात बिम्बिसारचा पुत्र अभय राजकुमार याच्या जीवन वृत्तांतासमवेत त्याच्या मातेचेही जीवन प्रकाशांत आले आहे.* तिचे यौवनावस्थेतील जीवन जितके निंदनीय होते, कलंकीत होते तेच जीवन उत्तरार्धात आध्यात्मिक उच्चतम अवस्थेला पोहोचून तितकेच उज्ज्वल झाले, प्रेरणा देणारे झाले, साधक साधिकांना वंदनीय ठरले व भावी पिढ्यांना प्रेरणेचा अजस्र स्रोत बनले._

              _ज्याप्रमाणे आजच्या आधुनिक युगात देशादेशातून युवतीच्या सौंदर्यस्पर्धा आयोजित केल्या जातात आणि सर्वश्रेष्ठ सौंदर्यशालिनीला 'सौंदर्यसम्राज्ञी' बिरुदावली दिली जाते त्याप्रमाणेच *सव्वीसशे वर्षांपूर्वी भारतातील गणराज्यातूनही अशा स्पर्धा होत असत. जी युवती केवळ रूपसौंदर्यातच नव्हे तर नृत्य, वाद्य, संगीत इत्यादि ललितकलातही सर्वश्रेष्ठ ठरेल तिला 'जनपदकल्याणी' ही पदवी देउन सन्मानित केले जात असे.* त्या साहित्यात फक्त एकच प्रसंग असा आढळतो की कुणा जनपदकल्याणीचा एका राजपुत्राशी वाङ्निश्चय झाला. पण ती त्या राजकुमाराशी विवाहबद्ध होऊ शकली नाही, कारण तो राजपुत्र विवाह होण्यापूर्वीच गृहत्याग करून भिक्षु बनला. नाहीतर *त्या दिवसातील सामाजिक रीतीरिवाजानुसार ती जनपदकल्याणी कोणाच्या तरी कुटुंबात कुलवधू होऊन गृहस्वामिनी होण्याऐवजी नगरवधू बनून नगरशोभिनी होत असे आणि आपलं रूपसौंदर्य व ललितकलांचा विक्रय करून आपला जीवन निर्वाह करीत असे.* अशा एकाहून अधिक जनपदकल्याणींचे वर्णन प्राचीन साहित्यात दिलेले आढळते. *पद्मावती ही अशीच एक नगरवधू अवन्ती गणराज्याची एक नगरशोभिनी होती.* तिच्या रूपसौंदर्याचा आणि कलागुणांचा डंका दूरवरच्या देशात पसरलेला होता._

                    _त्या काळात मगध नरेश बिम्बिसार यौवनाच्या ऐन भरात होता. आणि आपल्या बेफाम-उद्दाम कामवासनेचा विवश गुलाम होता. पद्मावतीच्या रूपसौंदर्याची आणि कलासंपन्नतेची ख्याती त्याने ऐकली तेव्हा तिच्या प्राप्तीसाठी तो उतावीळ झाला होता. एवढा दूरचा प्रवास अन् तोही गुप्तपणे करणे अतिशय कठीण पण अशा  कामात निपुण असलेल्या एका राजपुरोहित सहयोग्याचे सहकार्य घेऊन तो उज्जैनला जाऊन पोचला. बिम्बिसारने एक रात्र तिच्या सहवासात काढली. ज्यामुळे ती गर्भवती झाली. परततांना त्याने पद्मावतीला आपला परिचय करून दिला आणि सांगितले की जर गर्भधारणा झाली व पुत्रप्राप्ती झाली तर त्याच्या पालनपोषणाची पूर्ण जबाबदारी माझी त्यासाठी शैशवकाळातले लालनपालन पूर्ण झाल्यावर त्याला राजगिरीला पाठवून दे. राजचिन्ह म्हणून ओळख पटविण्यासाठी बिम्बिसारने आपल्या बोटातील अंगठी तिच्या स्वाधीन केली._

            _दहा महिन्यानंतर 'अभय' चा जन्म झाला. पद्मावतीने त्याला सात वर्षांपर्यंत सांभाळला आणि बिम्बिसारच्या आदेशानुसार राजगिरीला पाठविले. बिम्बिसारने त्याला अत्यंत प्रेमळपणाने सर्व राजसी सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या._

                     _अभयमाता पद्मावतीने त्याच्या पित्याच्या इच्छेचा आदर करण्यासाठीच नव्हे तर उज्ज्वल भविष्याच्या शक्यतेला डोळ्यासमोर ठेवून अभयला राजगिरीच्या राजमहालात पाठविले होते. तरीही मातेचे हृदय ते! म्हणून असे यथार्थ अनुमान करणे स्वाभाविक आहे की, ती सदैव आपल्या मुलाचे क्षेमकुशल व त्याच्या सुखसुविधांची चौकशी करीत असावी. क्षेमकुशलतेच्या सूचना तिला मिळत असाव्यात. राजकुमारांप्रमाणेच त्याचे संगोपन होत असल्याचे तिला कळत असावे. त्याची किशोरावस्था संपून तो वाढतो आहे तरुण झाला आहे. सैन्य संचालनाचे शिक्षण घेत आहे. राजकुमाराला आवश्यक अशा अन्य अनेक विद्यात त्याने प्राविण्य मिळविले आहे. वडिलांना त्याच्या या कर्तृत्वाचा-गुणांचा अभिमान वाटत आहे. आता त्याला प्रत्यंत प्रदेशातील म्हणजे सीमेवरील बंडाचा बीमोड करण्यासाठी पाठवले आहे. तेथून तो विजयी होऊन परतला आहे. महाराज बिम्बिसारांनी प्रसन्न होऊन त्याला सात दिवसपर्यंत राज्य संचालनाचे कार्य दिले आहे. तिचा लाडका पुत्र विशाल साम्राज्याचा, भले सात दिवसांकरता का होईना, पण शासक बनला आहे. हे सारं ऐकून तिचं हृदय गद्गदित होई. पंख लावून आकाशमार्गे राजगिरीला जाण्याची तीव्र इच्छा झाली तरी विवेक जागवून आपल्या मुलाला. कवटाळण्याची तीव्र इच्छा ती दाबून ठेवते. तो 'गणिकापुत्र' आहे हे कळल्याने पुत्राची प्रतिष्ठा मातीमोल होईल, याची तिला जाण येते. म्हणून दूर राहूनच मुलाचे मंगल चितन करते. अन् अकस्मात वज्रपात व्हावा तसे भयानक वृत्त येते. राजकुमार अजातशत्रूने बिम्बिसारला कैद केले आहे व स्वतःच राजसिंहासन बळकाविले आहे. काही दिवसानंतर महाराजांची हत्या केली गेली. आता तर तिला कळले की अभयने दाढी, मिशा व डोक्याचे केस काढून गृह त्याग केला आहे. विरक्त होऊन भगवान बुद्धांच्या भिक्षुसंघात सामील झाला आहे. दुःखग्रस्त व्याकुळ अभयमाता आता आपल्या मुलाला भेटायला अधिकच उताविळ झाली. आणि प्रदीर्घ यात्रा करून ती उज्जैन नगरीतून मगधाची राजधानी राजगिरीला पोहोचली. भिक्षु अभयने तिचे सांत्वन केले, धीर दिला व धर्माचे महत्व समजावले. तिला भगवान बुद्धांच्या सान्निध्यात नेले. त्यामुळे तिचा धर्मसंवेग प्रबळ झाला. तिने संन्यस्त जीवन अंगिकारले. शिर मुंडन केले. भिक्षुणींच्या संघात सामील झाली. तिथे तिला विपश्यना साधना शिकविली गेली._

                       _ती विपश्यना साधनेचा अभ्यास करू लागली. परंतु जीवनभर संचित केल्या गेलेल्या, कामवासनेचे संस्कार तिच्या साधनेत बाधक होत होते. शरीरातील अनित्य बोधयुक्त संवेदना जागृत करून विकारमुक्त होणे तर दूरच राहिले पण काही क्षण देखील मनाची एकाग्रता साधणे तिला शक्य होईना. तोपर्यंत *भिक्षु अभय अरहंत झाला होता. आपल्या जन्मदात्या आईच्या साधनेतील प्रगतीची बाधा कळली तेव्हा तिला भेटला आणि उद्बोधन करून भरल्या शब्दांच्या सहाय्याने तिच्या धर्मसंवेगांना फिरून प्रेरणा दिली, एवढेच नाही तर साधनेसाठी नवे कर्मस्थान दिले, नव्याने विधी शिकविला. तो हे समजून चुकला होता की अधिकांश जीवन आपले भौतिक शरीर साजशृंगार करून, सजवून, नटवून लोकांची कामवासना जागृत करण्याच्या निंदनीय कार्यात व्यतीत झाले आहे. त्यामुळे तिला आपल्या सुंदर शरीराविषयी प्रगाढ आसक्ती आहे. अंतर्मुखी होऊन त्या शरीराविषयी संवेदनांच्या आधाराने अनित्यबोध जागवू शकत नाही. यासाठी तिला प्रथम आपल्या शरीराविषयी जुगुप्सा-घृणा निर्माण झाली पाहिजे. म्हणून शरीराची अशुचि म्हणजे घाणेरडेपण याचे मनसिकार म्हणजे चिंतन करण्याचा पहिला पाठ शिकविला.*_

                       _पुत्र, पण आता आचार्य झालेल्या अभयची धर्मवाणी ऐकून माता- शिष्या अत्यंत प्रभावित झाली. जशी शिकवण दिली गेली तसेच चिंतन सुरू झाले._

                      _खरोखर, चामड्याने झाकलेल्या या शरीराच्या आत हाडे, मांस, पेशी, रक्त, पू, थुकी-लाळ, कफ, मळ, मूत्र, सारी घाणच घाण आहे. याशिवाय दुसरे काय आहे? अशा रीतीने चिंतन मनन करता करता कायेसंबंधीची आसक्ती गळून पडू लगली. बौद्धिक पातळीवर भले हे घडून आले. तद्वतच आपोआप शारीरिक संवेदनाजन्य अनुभूती जागृत झाल्यावर अनित्यबोध जागला. व हळू हळू अभ्यास करता करता अनित्यधर्म असलेले हे शरीर आणि चित्त, आणि त्यांचा सतत बदलणारा प्रपंच ह्याची जाण होताच निर्वेद पुष्ट झाला. राग [ लोभ ] आणि द्वेष यांची जन्मजन्मांची बंधने तुटली. विपश्यना साधनेच्या अभ्यासाने मुक्तीमार्गावर दृढ निश्चयाने आरुढ होऊन भिक्षुणी पद्मावती या अनित्य, क्षणभंगूर, नश्वराचा त्याग करून नित्य, शाश्वत, ध्रुव सत्याकडे घोडदौड करू लागली आणि लवकरच स्रोतापन्न, सकदागामी, अनागामी अवस्थांच्या पुढे जाऊन नितांत वीतराग अरहंत अवस्था प्राप्त करून कृतकृत्य झाली, धन्य झाली._

                           _भवबंधनातून मुक्त झालेल्या अनेक अरहंत-संतांप्रमाणे तिच्या मुखावाटे आनंदोद्गार निघाले. ते सर्व प्रथम आपला पुत्र आचार्य अभय याविषयी असीम कृतज्ञता व्यक्त करणारे भावच प्रकटले. साधनेसंबंधी जे आदेश त्याने दिले होते ते बोल ती पुन्हा बोलली :-_

*_उद्धं पादतला अम्ब! अधो वे केसमत्थका ।_*

*_पच्चवेक्खस्सु' मं कायं असुचि पूतिगन्धिकं ॥_*

                    _'हे माते! पायांच्या तळव्यांपासून वर आणि डोक्याच्या केसांच्या खालपर्यंत अशुचि घाण आणि दुर्गंध ह्याने भरलेल्या या कायेचे [शरीराचे] नीट निरीक्षण कर."_

                   _उद्बोधनच्या या शब्दांचे पुन्हा उच्चारण केल्यावर तिचे स्वतःचे सुवचनाचे हे सहजोद्वार निघाले._

*_एवं विहरमानाय सब्बो रागो समूहतो ।_* 

*_परिळाहो समुच्छित्रो सीतिभूताम्हि निब्बुता ॥_*

                           _"त्याच्या आदेशाचे अनुकरण करून मी माझे रागाचे संस्कार मूळातूनच उखडून काढले. काम वासनेची सारी जळजळ नष्ट करून मी आता शीतलीभूत आहे. शांत आहे निर्वाणाप्राप्त आहे. अभयची माता धन्य झाली. रूप  सौंदर्याच्या कामवासनेच्या चिखलात आकंठ बुडालेली शरीर व्यवसाय • करणारी कुठे आणि पुनः पुन्हा जन्म-मृत्यू प्रपंचाच्या बंधनातून मुक्त झालेली मोहविहीन अशी परम अत्युच्च अवस्था प्राप्त करून घेतलेली अरहंत साध्वी कुठे. खरंच! *विपश्यना साधना हे मुळीच पहात नाही की, कुणाला तारावे आणि कुणाला नाही. जो कोणी विपश्यना साधनेत मग्न झाला तो उद्धरला. मुक्त झाला. राजा असो वा रंक. पुरुष असो वा स्त्री, गणिका असो वा गृहिणी.. धर्मगंगा कोणताच भेदभाव करीत नाही.*_

                           _भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर चार महिन्यांनी पाचशे वयोवृद्ध अरहंतांनी जे त्या काळच्या घटनांचे साक्षी होते. भगवानांच्या नव्हे तर अनेक अरहंत-संतांच्या वाणीचे संकलन केले, ती वाणी दोनतीनशे वर्षानंतर शेजारच्या अनेक देशांत गेली._

                         _ही धर्मवाणी भारतात सर्वथा लुप्त झाली. तरीदेखील त्या त्या देशांनी आपल्या मूळ मौलिक रूपात सांभाळून ठेवली. त्या तिपिटक साहित्यात अभय मातेचे उपरोक्त दोन्ही सुविचार संग्रहित आहेत. त्या समवेतच दुसऱ्या एका ठिकाणी काही दुसरे सुविचार देखील आढळतात._

                       _*अरहंत अवस्था प्राप्त करून घेतल्यावर जेव्हा अभय मातेला अनेक सिद्धी प्राप्त झाल्या. त्यात एक 'पुब्बेनिवासानुस्सति' अभिज्ञानाची सिद्धी प्राप्त झाली... त्यामुळे ती आपल्या अनेक कल्पापूर्वीच्या जन्मांचे स्मरण करू शकली. त्यात तिला असे आढळले की, अनेक कल्पापूर्वी 'तिस्स' नावाचे एक बुद्ध झाले होते.* एक दिवस ते नगरात भिक्षाटनाला निघाले तेव्हा तिने अत्यंत श्रद्धाभावनेने मूठभर भात त्यांच्या भिक्षापात्रात घातला होता. त्या पुण्य कर्माचे फळ म्हणून संसारचक्राच्या या भ्रमणकालात असे हे कल्याणकारी फल म्हणजे विपश्यना साधनारुपी अमूल्य संपदा तिला मिळाली. आपल्या पूर्व जीवनांतील तिने केलेल्या दुष्कर्माचे फळ म्हणून तिला असे तिरस्कृत गणिकेचे जीवन व्यतीत करावे लागले. परंतु त्या दानाच्या सत्कर्मामुळे, महान पुण्य प्राप्तीमुळे, तिला अभयसारखा सद्गुणी पुत्र प्राप्त झाला. ज्याने स्वतः अरहंत अवस्था तर प्राप्त करून घेतलीच व मातेच्या मुक्तीलाही सहाय्यभूत ठरला. हे सत्य सांगतांना प्रकट झालेला एक सुविचार उपरोक्त पुरातन साहित्य संग्रहात संकलित आहे._

*_सुदिन्नं मे दानवरं सुयिट्ठा यागसम्पदा ।_*

*_कटच्छुभिक्खं दत्वान पत्ताहं अचलं पदं ॥_*

                       _मी चांगल्याप्रकारे श्रद्धायुक्त अंतःकरणाने नम्र होउन शुभ दान दिले आणि ह्या सुयज्ञाची संपदा मिळवली. ती जी मूठभर भिक्षा दिली त्याच पुण्यामुळे मला आज हे नित्य, ध्रुव, अचल अमृतपद प्राप्त झाले._

                       *_खरोखर दुष्कर्माचे दुष्फल व सत्कर्माचे चांगले फळ केव्हा ना केव्हा प्राप्त झाल्यावाचून राहात नाही._*

                     _म्हणून दुष्कर्मापासून दूर रहावे आणि सत्कर्मे करीत रहावे यातच आपले कल्याण सामावलेले आहे._

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- १८/१०/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_18.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...