Sunday, 16 October 2022

अभय अभय झाला

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अभय अभय झाला_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                            *_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

                   _आपल्यासमोर एक चित्र प्रकट झाले आहे. ज्या चित्रात बिम्बिसारच्या वात्सल्यप्रेमाचे सुंदर चित्रण व्यक्त झाले आहे. आपल्याला असे दिसते की, *त्याने आपल्या सर्व मुलांना समान रूपाने पितृप्रेम दिले आहे. कोणाशीच भेदभाव केला नाही. अभय एक वेश्यापुत्र असूनही त्याला अन्य राजपुत्रांप्रमाणे राजमहालातच पालन-पोषणार्थ ठेवले आहे. राजपुत्राला योग्य असेच शिक्षण दिले आहे. रणकौशल्य कलेत पारंगत केले आहे. अन्य राजपुत्रांप्रमाणेच तो शूरवीर आहे.*_

                _एकदा मगध साम्राज्याच्या सरहद्दीवरील प्रदेशांत विद्रोह झाला आहे. त्या बंडाचे शमन करण्यासाठी राजसैन्यासह राजकुमार अभयला पाठविले आहे. बिम्बिसारचा आपला पुत्र अभयवर पूर्ण विश्वास आहे. त्याची योग्यता तो जाणतो आहे. अभय या विश्वासास पात्र ठरतो, विद्रोह मोडून काढतो आणि विजयी होऊन राजगृहास परत येतो. पिता बिम्बिसाराला अपरिमित आनंद होतो. *या विजयोत्सवानिमित्त त्याला उचित पारितोषिक देऊ इच्छितो. कोणते पारितोषिक योग्य ठरेल? अभय अजून तरुण आहे. बिम्बिसारला आपली युवावस्था आठवते. त्या कालात आपली कामवासना किती प्रबल होती. कुमार अभयलाही तशीच या युवावस्थेत काम-राग रतिरंगाची आकांक्षा असेलच. त्याच्या इच्छापूर्तीसाठी बिम्बिसारने त्याला नगरातील एक सर्वांगसुंदर युवा नृत्यांगना भेटीदाखल दिली. पण एवढ्यावर त्याचे समाधान झाले नाही. 'माझा' हा पुत्र वेश्येपासून झाला आहे. मी आता भले याच्यासमवेत अन्य राजकुमारांप्रमाणे वर्तन करीन पण वंश परंपरेच्या नियमानुसार माझ्या मृत्यूनंतर कोणत्याही परिस्थितीत राज्यसिंहासनाचा उत्तराधिकारी होऊ शकणार नाही. म्हणून आत्ताच अल्पकालासाठी का होईना याला राजसत्ता का उपभोगू देऊ नये? याच्याकडे राजसत्ता देऊ या. माझा लाडका मुलगा सात दिवसांपर्यंत तरी राज्य वैभवाचा उपभोग घेईल! या वात्सल्य भावनेने प्रेरीत होऊन त्याने अभयला एक आठवडाभर राज्य सिंहासनावर बसविले. सात दिवस राजसत्तेची सूत्रे त्याच्या हाती सोपविली.* विपुल राजवैभवाच्या अतुल ऐश्वर्याचा अधिकार त्याच्या हाती होता. त्याचा त्याने भरपूर उपयोग केला. सात दिवस राजमहालात राहून राजविलासात घालविले. सात दिवस उपभोग घेऊनही त्याची कामवासना शमली नाही तर आणखीनच चेतावली. आठव्या दिवशी त्या नृत्यांगनेला घेऊन तो राजमहालाच्या बाहेर आला व कामक्रीडेसाठी नदीकिनारी गेला._

                 _नदीत स्नान करून ती दोघे पुन्हा आमोद प्रमोदात तल्लीन झाली. नृत्यांगनेच्या कामोत्तेजक नृत्यकलेने अभयला मोहित केले. तरुण नर्तकी खुल्या आकाशाखाली नदी किनारी नाचत राहिली अन् अभय निर्निमिष नेत्रांनी ते नृत्य पहात राहिला. एकाएकी नृत्यिकेच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या. पोटशूळ उठला. असह्य पीडेने ती अतिविव्हळ झाली. नृत्याची गती मंद झाली. आपले पोट धरीत ती तिथेच खाली बसली. मोह विमूढ़ अभयला वाटले की हा नृत्यकलेतील अभिनयच आहे. भावाभिनयाचे प्रकटीकरण आहे._

            _पण पाहता पाहता ती नर्तकी तेथेच मृत होऊन कोसळली. अभयला जाणवले तोपर्यंत ती गतप्राण झाली होती. निखळ निर्जीव शरीर जमिनीवर पडले होते._

              _राजकुमार अभयला मोठाच धक्का बसला. एवढा हष्टपुष्ट देह क्षणार्धात काष्ठवत निर्जीव झाला. काही क्षणापूर्वी उद्दाम वासना जागृत करणारी नृत्यांगना आता कशी निश्चल पडली आहे. पराकोटीची अभिनय निपुण असलेली नृत्यांगना कशी दगड झाली. डोळे सताड उघडे पडलेले. पापणी देखील हलत नाही. सदा हसतमुख असणाऱ्या अधर द्वयीवर ओठांवर भयानक भीषण पीडेची विक्राळ काळ छाया उमटली आहे. हे दृश्य पाहणे अभयच्या आवाक्याबाहेरचे होते. त्याला ते पाहणे असह्य झाले. त्याला या गोष्टीचा फार पश्चाताप झाला की, ज्याने विद्रोह्यांच्या फार मोठ्या सैन्य-समूहाचा पराभव करून आपल्या सेनेतील एक एक सैनिक सुखरूप परत आणला होता, त्या महापराक्रमी राजकुमार अभयला आपल्या प्राणप्रिय प्रेयसीला काळाच्या मृत्यूदाढेतून वाचविता आले नाही. प्रियतमेचा विरह आणि तिला वाचवू शकलो नाही याचा पश्चाताप अशा दुहेरी आघातांनी तो शोक विव्हळ झाला. ते दुःख त्याला अजिबात विसरता येईना. प्रतिक्षण ते वाढतच जात होते._

               _या अतीव शोकमग्न अवस्थेतून त्याला कोण बाहेर काढणार ? त्याच्या हृदयाचे घाव कोण भरून काढणार? *एकाएकी राजकुमार अभयला भगवान बुद्धांची आठवण झाली. त्या महान कारुणिक, मैत्रीचित प्रज्ञासंयुक्त वाणीचे त्याला स्मरण झाले. कारण ती सुवचने अनेकदा ऐकली होती. त्यांनी सांगितलेल्या साधना मार्गाचे त्याने अनुवर्तन केले नव्हते परंतु त्या सत्धर्माचे अद्भुत विश्लेषण त्याने अनेकदा ऐकले होते. त्यामुळे तो आश्वस्त विश्वस्त झाला होता. त्याला पूर्वी पासूनच विश्वास वाटत होता की, हा महापुरुष खरोखर शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे, सर्वज्ञ आहे. त्यांनी सर्व दुःखाचे मूळ कारण जाणले आहे. त्या दुःख निवारणाचा मार्ग जाणला आहे. ते स्वतः दुःखमुक्त झाले आहेत. इतरांना दुःख मुक्तीची साधना शिकवीत आहेत. हे असे महापुरुष आहेत जे मला देखील या असह्य दुःखमुक्तीचा मार्ग दाखवतील. दुःखमुक्त करू शकतील.*_

               _व्यथेने विव्हळ, आतुर उतावळा, कातर राजकुमार भगवान तथागतांना शरण गेला. भगवानांनी त्याची शोक संतप्त मनोदशा पाहिली त्यांच्या करुणामृत सिंचन वाणीच्या वर्षावाने त्याचे शोक विव्हळ हृदय शीतल झाले._

                  _भगवानांनी समजाविले 'राजकुमार! कल्पामागून कल्प लोटले. या असंख्य कल्पातील अगणित जन्मात यासारख्या अगणित प्रियजनांशी तुझा वियोग झाला आहे. या विरहावस्थेत तू जे विलाप अश्रू ढाळलेस त्याला प्रमाण नाही. ते सारे अश्रू एकत्र केले तर कोणत्याही महासागराहून कमी होणार नाहीत. भविष्य काळातील अगणित जीवनात देखील याचप्रकारे प्रियजनांचा वियोग होत राहणार आहे. त्यातून तुझी सुटका नाही. म्हणून तुझे हे रडणे वेडेपणाचे आहे. अखेर तू कुणासाठी रडत आहेस ?_

                  _*अभयच्या लक्षात येऊ लागले. खरंच मी कोणासाठी रडत आहे? आठ दिवसापूर्वी या मुलीला मी ओळखतही नव्हतो. हिचे तोंडदेखील मी पाहिले नव्हते. नाव देखील ऐकले नव्हते. हे रडणं केवळ माझ्या आसक्तीमुळे आहे. जिला प्रिय मानलं तिच्याकडे आसक्त झालो. तिच्याविषयी आकर्षण निर्माण झाले. वियोग होताच विव्हळ झालो. ज्या विषयी आकर्षण नाही त्याचा वियोग झाला तरी ही व्याकुळता कुठे निर्माण होते ? या व्याकुळतेमागे सतृष्ण भावनेची आसक्तीच आहे. जे अनित्य आहे आज ना उद्या नष्ट होणारे आहे, त्याविषयी निर्माण झालेला मोह-आसक्ती हीच दुःखाची जननी असते. आज ना उद्या. सर्वच कालग्रस्त होणार आहेत. सर्वच नाशवंत आहे. कोणीही कुणाला वाचवू शकत नाही.*_

               *_भगवानांनी त्याची सुधारलेली मनोदशा पाहिली तेव्हा प्रज्ञायुक्त वाणीने ते म्हणाले, "शोकात बुडून जाणे हा वेडेपणा आहे. यातून तुला बाहेर पडले पाहिजे", आणि ही धर्मवाणी त्यांच्या मुखावाटे बाहेर पडली. :-_*

*_एत्थ पस्सथ इमं लोकं चित्तं राजरथूपमं ।_"

*_यत्थ बाला विसीदन्ति नत्थि सङ्गो विजानतं ॥_*

               *_पहा या 'लोका'ला, हा रंगबेरंगी राजरथासमान सुंदर दिसतो. पण कालांतराने ज्याप्रमाणे चित्र विचित्र रथ जुनापुराणा, जीर्णशीर्ण होतो तसाच हा लोकही जीर्णशीर्ण होऊन नाश पावणार आहे. मूर्ख लोकच याला असा जीर्णशीर्ण झालेला पाहून व्याकुळ होतात. पण सूज्ञ लोक यावर आसक्त होत नाहीत व दुःखीही होत नाहीत._*

                 _राजकुमार अभयने कधीही विपश्यना साधनेचा अभ्यास केला नव्हता. अजूनपर्यंत तो भगवान बुद्धांच्या प्रज्ञापूर्ण वाणीने फक्त बौद्धिक पातळीवरच प्रभावित झाला होता. धर्माचे असे सांगोपांग विश्लेषण करणारा त्यांच्यासारखा दुसरा आचार्य त्याला मिळाला नव्हता. त्यांच्याविषयी त्यांच्या मनांत अपार श्रद्धा निर्माण झाली. त्यांच्या धर्मवचनांनी त्याला खूपच आश्वासन मिळाले. या दुःखाच्या क्षणी तो त्यांना शरण आला होता. परंतु आता त्याच्या पूर्वसंचित पुण्याचा उदय झाला. अनेक जन्मातील पुण्याईचे सामर्थ्य जागृत झाले. *जस जशी भगवानांची वाणी तो ऐकत गेला तस तसे त्याचे मन शांत होत गेले. समाहित होत गेला आणि आपल्या अंतरंगात यथाभूत सत्याचे, जसे आहे तसे यथार्थ दर्शन घेत गेला. अनुभूती घेऊ लागला. आपोआप विपश्यना होऊ लागली. अंतःशरीरात संवेदनांची जाणीव होऊ लागली. सगळीकडे उदय-व्यय, उदय-व्यय, साऱ्या शरीरात अनित्य बोधाची धारा प्रवाहत झाली व मन त्या अनित्यबोधाच्या आधाराने समतेत स्थिर होत गेले. काही वेळाने शरीर आणि मन यांच्या अनित्यतेचे सारे क्षेत्र एकाएकी थांबले व त्या पलीकडील इंद्रियातीत, नित्य, शाश्वत, ध्रुव, परमसत्याचा काही क्षण साक्षात्कार झाला. अभय मुक्तीच्या प्रवाहात पडला. स्रोतापन्न अवस्थेला पोहोचला. आता त्याची श्रद्धा केवळ बुद्धिजन्य न राहता अनुभूतीजन्य झाली होती.*_

                 _त्यानंतर पुष्कळसा काळ लोटल्यानंतर जेव्हा *महाराज बिम्बिसारांचा अंत झाला, तेव्हा त्याच्या मनात धर्मसंवेग जागा झाला आणि त्याने गृहत्याग केला भगवान बुद्धांजवळ जाऊन प्रब्रजित होऊन 'तालच्छिग्गलूपम सुत्त' याचे धर्मप्रवचन ऐकून नजिकच्या वनप्रदेशात एकांतवासात विपश्यना साधने आंतर-तप करू लागला. त्याला आपल्या जुन्या पूर्व पुण्याईचे सामर्थ्य लाभले आणि आतल्या आंत अनित्यबोधाचा अधिक स्पष्ट अनुभव येऊ लागला सूक्ष्मातिसूक्ष्म अवस्थेतून जाता जाता नितांत समत्व भावात स्थिर होऊन आपल्या पूर्व संचित कर्माचा निचरा करू लागला. अशा रीतीने कर्माच्या फळबंधनांतून मुक्त होत एकामागून एक फलांचे निराकरण करीत समापत्ति उपलब्ध करीत करीत अरहंत अवस्थेला जाऊन पोहोचला. त्याचा जन्म मरणाचा फेरा संपला. तो नितांत दुःखमुक्त झाला.*_

                 _त्याने प्रत्यवेक्षण - समालोचन केले. भगवानांच्या संपर्कात येण्याच्या वेळेपासून, त्याने त्या परममुक्त अवस्था प्राप्त होईपर्यंतच्या कल्याणकारी अनुभूतीचे पुनरावलोकन केले. गजावलोकन केले. तेव्हा आपोआपच त्याच्या तोंडून हे सहजोद्गार निघाले. :-_

*_सुत्वा सुभासितं वाचं बुद्धस्सादिच्चबन्धुनो।_*

*_पञ्चब्यधि हि निपुणं बालगं उसुना यथा ॥_*

                _*ज्याप्रमाणे एखादा कुशल धनुर्धर आपल्या सूक्ष्म बाणाने केसाचे अग्र सातवेळा अचूकपणे वेध करण्यात निपुण होतो. त्याचप्रमाणे आदित्यबंधु भगवान बुद्धांची आर्यसत्याला भेदणारी निपुण वाणी मी ऐकली.*_

               _आणि राजकुमार अभयचे भाग्य उदयास आले. त्या *धर्मवाणीने प्रेरीत होऊन स्वतःच आपली विभाजन बिंधनभेदन करणारी प्रज्ञा जागवली. त्याच्या सहाय्याने अज्ञानाचा वेध घेणाऱ्या परमनिरोध अवस्थेचा साक्षात्कार होऊ शकला व भवभयातून मुक्त झाला. खन्या अर्थाने अभय अभय होऊ शकला.*_

                _आपण देखील दुप्पट उत्साहाने या धर्मपथावर चालता चालता परम अभय अवस्था प्राप्त करू या व आपले कल्याण साधू या!_

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- १६/१०/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_16.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...