Friday, 14 October 2022

सुपटिवेधन

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सुपटिवेधन_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

               _*अभय राजकुमाराला भगवानांनी सांगितलेली सम्यक वाणीची धर्ममय व्याख्या अतिशय आवडली आणि कल्याणकारीही वाटली. त्याचवेळी त्याच्या मनात आणखी एक प्रश्न निर्माण झाला. तो प्रश्न विचारल्यावाचून त्याला राहवले नाही. म्हणून त्याने आपली जिज्ञासा भगवानांजवळ प्रकट केली.*_

              _“भन्ते भगवान! आपल्याजवळ अनेक ब्राह्मण, श्रमण आणि गृहस्थ विद्वान येत असतात आणि विविध प्रकारचे प्रश्न विचारतात. त्या वार्तालापाचे आपण मनन चिंतन करता का की मला कोणी अमुक एक प्रश्न विचारील व मग मी त्याचे असे उत्तर देईन अथवा पूर्वमनन चिंतनाशिवाय प्रश्न विचारल्याबरोबर लगेच योग्य आणि स्पष्ट उत्तर आपण सहजगत्या देत असता ?"_

           _या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी भगवानांनी त्यालाच प्रतिप्रश्न विचारला. “राजकुमार हा जो तुझा रथ आहे त्याचे अंग-प्रत्यंग तू चांगल्या प्रकारे जाणतोस का?"_

         _“होय भगवान, मी याचा भरपूर उपयोग केला आहे. स्वानुभवाने मी यांचे अंगप्रत्यंग चांगले जाणतो."_

          _“तर मग राजकुमार! तू हे मनन चिंतन करतोस का की कधी कोणी मला याच्या कोणत्यातरी भागाबद्दल प्रश्न विचारील, तर मी त्याचे असे असे उत्तर देईन."_

              _"नाही भगवान! यासाठी मनन चिंतन कशाला ? हा रथ मी माझ्या अनुभवानेच चांगला जाणतो म्हणून या संबंधात मला जेव्हा कोणी काही प्रश्न विचारील तेव्हा त्याचक्षणी मी योग्य आणि स्पष्ट असेल तेच उत्तर देईन अनुभवसिद्ध वास्तववादी उत्तर देतांना मनन चिंतन कसले ? त्याची काय गरज?"_

            _“अगदी तसेच आहे, राजकुमार! ज्याप्रमाणे एकादा सारथी आपल्या रथाचे अंग प्रत्यंग स्वानुभवाने जाणतो आणि रथाच्या कोणत्याही भागाबद्दल कोणीह प्रश्न विचारला तर लगेच उत्तर देतो. त्याला त्यासाठी पूर्वमनमन, चिंतनाची गरज पडत नाही. तसेच *तथागतांनी धर्मधातुबाबत म्हणजे धर्माच्या गुण स्वभावाचे छेद-विच्छेदन करून, विघटन करून, विभाजन करून अलग अलग करून चांगल्या प्रकारे पाहिले, स्वानुभवाने जाणले आहे. म्हणूनच धर्मासंबंधी कोणी प्रश्न विचारताच त्यांना चिंतन मनन करून उत्तर देण्याची आवश्यकता नाही. त्या विषयाचे त्यांना चांगले ज्ञान आहे. म्हणून तत्क्षणीच योग्य स्पष्ट उत्तर ते देत असतात. खरं बोलण्यासाठी चिंतन मननाची आवश्यकता नसते.*_

           _भगवानांच्या या विवेचनामुळे अभय राजकुमार आणखीनच अधिक सश्रद्ध झाला. भगवानांची महानता आणि सर्वज्ञता यांच्याविषयी त्याच्या मनांत किंचितही संदेह राहिला नाही. विरोधी पक्षाकडून त्यांच्याविषयी जे काही खोटे नाटे आरोप-दोषारोप केले गेले होते, त्या सर्वांचे सहज निराकरण झाले. उन्मूलन झाले. मूळापासून उखडले गेले._

            _अत्यंत श्रद्धाविनीत होऊन त्याने भगवानांना पुन्हा पंचांग प्रणाम केला आणि हर्षोद्गारयुक्त शब्दांनी आपल्या मनातील आदर व्यक्त करतांना तो म्हणाला, *“भगवान अद्भुत आहेत, आश्चर्यजनक आहेत. भगवान, आपण 'धर्म' इतक्या स्पष्ट शब्दात समजाविला आहे की, जसे कोणी पालथ्याला सुलटे करावे, झाकलेल्याला उघडे करावे, जसा अंधारात दिवा लावावा आणि डोळस माणसाने सत्य स्वतःच पहावे. मी धन्य झालोय भगवान! आजपासून मी त्रिरत्ने ग्रहण करतो. त्यांना शरण जातो. आजपासून मला आपला आजन्म अनन्य उपासक म्हणून स्वीकार करावे."*_

_खरोखर अभय राजकुमार कृतार्थ झाला._ 

_वरील संवादात दोन शब्दांचा प्रयोग वापर केला आहे._

            _*'धम्मधातु सुप्पटिविद्धो.' धर्म म्हणजे प्रकृती. धातु म्हणजे स्वभाव. गुणधर्म. निसर्गाचा प्रकृतीचा स्वभाव त्याचे सुपटिवेधन म्हणजे चांगल्या प्रकारचे विच्छेदन करून पिंजण करून समजून घेणे. ज्याप्रमाणे परियत्ति [पर्याप्ति] ज्ञानाला म्हणतात. पटिपत्ति [प्रतिपत्ति] या ज्ञान मार्गावर प्रतिपादन करणे म्हणजे मार्गावर चालण्याला म्हणतात. त्याचप्रमाणे पटिवेधन [प्रतिवेधन] सत्याचे विभाजन-विच्छेदन करून पहाण्याला म्हणतात. हीच ‘विपश्यना' आहे. विपश्यना केल्याशिवाय अनुभूतीच्या पातळीवर विच्छेदनाचे पिंजण्याचे कामच होणार नाही. विपश्यनेचा अभ्यास सुरू करताच विच्छेदनाचे कार्य सुरू असते. होते. विपश्यना साधनेची फलश्रुती परिवेधनाची शेवटची परिणती असते.*_

              *_धातु सहा प्रकारचे असतात. पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश है। पाच भौतिक धातु आहेत. यांना रूपधातु म्हणतात. आणि विज्ञान म्हणजे चित्त. एक धातु आहे. त्याला नामधातु म्हणतात. विपश्यना करणारा साधक आपल्या अंतरंगात होणाऱ्या सघन-घनीभूत संवेदनांकडे त्रयस्थ भावनांनी पहातो तेव्हा स्वतःच त्यांचे विच्छेदन आरंभिले जाते. विभाजन करीत करीत तो अशा स्थितीला पोहोचतो व समजतो की सर्व धातु तरंगच-तरंग आहेत. अनित्य स्वभावाचे आहेत, उदय-व्यव स्वभावाचे, उत्पन्न होऊन नष्ट होणारे आहेत व या तरंगांवर आपली किंचितही हुकुमत नाही. या नामरूप प्रपंचाला अशा रीतीने पाहतांना विभाजन करतांना साधक तटस्थ भावाने म्हणजे प्रज्ञापूर्ण उपेक्षाभावाने प्रगत होत जातो तेव्हा त्याचे मन विकार विहीन होऊ लागते. निर्मळ होऊ लागते. आणि शेवटी अशी एक अवस्था येत असते जेव्हा विपश्यना सबळ होते. संस्काराचे निष्कासन [निघून जाणे] होते, नाम आणि रूपाच्या पलिकडे, शरीर आणि मन यांच्या पलिकडे, या सहा धातूंच्याही पलिकडे परमसत्य निर्वाणाचा साक्षात्कार अनुभवतो; जो नित्य आहे, शाश्वत आहे, ध्रुव-स्थिर आहे, अमृत आहे. विभाजन करून आलेल्या अनुभूतीच्या आधारे जाणतो व नितांत विमुक्त अवस्थेपर्यंत पोहोचतो तेव्हाच 'सुपटिविद्धत्ता' म्हटले जाते. म्हणजे ज्याने पूर्णपणे चांगल्याप्रकारे प्रतिवेधन केले आहे. आता अशा व्यक्तीला कोणी धर्मासंबंधी कसलाही प्रश्न केला तर त्याला चिंतन मनन करण्याची, तर्क वितर्क करण्याची, उहापोह, चर्चा करण्याची गरजच कुठे राहते ? जसे माझ्यासमोर हे टेबल आहे आणि कोणी प्रश्न केला की हे काय आहे? तर 'हे टेबल आहे' असे उत्तर देतांना चितन मननाची तर्कवितर्काची, उहापोह करण्याची कुठे आवश्यकता असते ? तसेच हातात ही लेखणी आहे. 'लेखणी आहे' हे सांगतांना मला कुठे कठीण वाटते ? काय कल्पना करावी लागते? काय विचार करावा लागतो? तळहातावर आवळा ठेवला आणि चारही बाजूंनी गोल फिरवून पाहिला तेव्हा हा आवळा आहे असे सांगणे कोणालाही कसे कठीण वाटणार? त्याच प्रमाणे विपश्यना साधनेच्या सहाय्याने प्रकृतीचे निसर्गाच्या नियमांचे आपल्या प्रज्ञेच्या सहाय्यान विच्छेदन-विभाजन करून पाहिल्यानंतर त्यासंबंधी उत्तर देतांना कुठेच कसलीच अडचण होत नाही. जेथे समजून उमजून खोटे बोलणे आहे. छळ-कपटाने कुणाला फसवायचे आहे अथवा काल्पनिक मान्यता सिद्ध करायची असते, तेव्हा विचार करावा लागतो, मनातल्या मनांत तर्क वितर्क करावे लागतात. ज्या सत्याचे स्वतःच विच्छेदन करून पिंजून पिंजून अनुभूतीद्वारा दर्शन घेतले त्यासाठी या सर्वांची आवश्यकताच कोठे असते?_*

              _मित्रहो, या आपण सर्व धर्माचे सूक्ष्मातिसूक्ष्म विच्छेदन करून पहायला शिकू या आणि सुपटिवेधनाची अंतिम अवस्था प्राप्त करून घेऊ या व त्यातच आपले कल्याण साधू या._

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- १४/१०/२०२२

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_17.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...