🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_तात्कालिक कारण_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_वास्तवात आणि परिकथेतील जगात, जेथे सर्वजण कायमचे सुखसमाधानात राहतात, काहीही साम्य नसते. आयुष्य हे दोषयुक्त, अपूर्ण, असमाधानी व दुःखमय आहे हे सत्य आपण टाळू शकत नाही._
_एकदा हे सत्य कळल्यावर दुःखाचे कारण काय व असे कारण असल्यास ते कारण दूर होण्याचा मार्ग कोणता की ज्यामुळे सर्व दुःखे दूर होऊ शकतील ह्याचा शोध घेणे आपल्याला महत्त्वाचे ठरते. जर दुःखद घटना ह्या केवळ योगायोगाने, वाटेल तशा, विनाकारण घडत असतील, त्यावर आपले कोणतेही आधिपत्य किंवा नियंत्रण नसेल तर मग मात्र आपण निर्बल, बलहीन ठरू व असे असल्यास दुःख नियंत्रणाचा मार्ग शोधणे आपण सोडलेलेच बरे. किंवा ह्या दुःखाचा निर्माता अन्य कोणीतरी सर्वशक्तिमान आहे व तो हे दुःख आपल्यावर त्याच्या लहरीप्रमाणे व अनाकलनीय रीतीने लादतो आहे असे वाटत असेल तर मात्र आपल्याला त्याला संतुष्ट करण्याचा, प्रसन्न करण्याचा असा काहीतरी मार्ग शोधलाच पाहिजे, की जेणेकरून तो आपल्यावर दुःख लादणार नाही._
_*भगवान बुद्धांनी हे जाणले की, आपल्याला होणारे दुःख हे काही केवळ दैवयोगाचे फलित नाही, तर इतर कोणतीही गोष्ट जशी कारणाशिवाय घडत नाही, त्याप्रमाणेच दुःखामागेसुद्धा काहीना काही कारण आहे. कारण व परिणाम-कर्म हा जीवनाचा वैश्विक व मूलभूत सिद्धांत आहे आणि सर्व प्रकारची कारणे आपल्या आवाक्यातील आहेत. कोणतीही कारणे आपल्या आवाक्याबाहेरची नाहीत.*_
*_कम्म [कर्म]_*
_कर्म ह्या संस्कृतमधील प्रसिद्ध शब्दाला पालीत 'कम्म' असे म्हणतात. हा शब्द साधारणतः नशीब या अर्थाने वापरला जातो. *पण भगवान बुद्धांना अभिप्रेत असणारा ह्याचा अर्थ मात्र अगदी वेगळा होता.* नशीब किंवा देव याचा अर्थ, जे आपल्या आवाक्याबाहेरचे असते, ईश्वराच्या कृपेवर अवलंबून असते असा समज आहे. आपल्या प्रत्येकाचे जे विधिलिखित मानले जाते, त्याला आपण कर्म [प्रारब्ध] समजतो. *तथापि 'कर्म' ह्याचा शब्दश: अर्थ 'कृती' असा आहे. आपल्याला येणारे कोणतेही अनुभव हे आपल्या कृतीचे फलित किंवा परिणाम असतात.* प्रत्येक प्राणी हा त्याच्या कृत्यास जबाबदार असतो. हे पूर्वापार चालत आलेले असते. आज केलेल्या कृत्यावर पुढचे भवितव्य अवलंबून असते. खरे म्हणजे कर्मच आपले आधारस्थान असते. ज्यांची कर्मे थोर असतात त्यांचे जीवनही उदात्त असते._
_ज्या ज्या गोष्टीचा जीवनात आपल्याला सामना करावा लागतो, त्या त्या सर्व आपल्या कर्मातूनच निर्माण झालेल्या असतात. आपण जर आपल्या कर्माचे स्वामित्व आपल्याकडे घेतले तर पर्यायाने आपण आपल्या दैवाचे मालक, शिल्पकार होऊ. आपण सर्वजण आपल्या कर्माना जबाबदार आहोत की जी आपल्याला दुःखी करतात. आपली दुःखे निवारण्याचे साधन, आपली कृती आपल्या प्रत्येकाजवळच आहे. भगवान बुद्धांनी म्हटले आहे:_
*_'आपणच आपले स्वामी असतो._*
*_आपणच आपले भाग्य ठरवितो._*
_आपण एखाद्या गजबजलेल्या रस्त्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीच्या चालकाच्या जागी बसलेल्या अंध व्यक्तिसारखे आहोत. अशा परिस्थितीत गाडी चालविण्याची कलाच जो शिकला नाही, तो भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीतून कोणताही अपघात न होता. आपल्या इच्छित स्थळी कसा पोचणार? आपणास असे वाटते की, आपणच गाडी चालवीत आहोत. पण प्रत्यक्षात मात्र गाडीच आपल्याला चालवीत असते. इच्छित स्थान तर सोडाच, पण जरी आपल्याला नुसती गाडी चालवायची असेल, अपघात टाळायचा असेल, तर त्यासाठी आपल्या डोळ्यावरील झापड दूर केले पाहिजे, लवकरात लवकर सारथ्य शिकले पाहिजे व गाडीचे चाक हातात घेऊन संकटातून बाहेर पडले पाहिजे. त्याचप्रमाणे आपण काय करतो आहोत ह्याबद्दल जागरुक राहून अशी कृती अंगिकारली पाहिजे की ज्यायोगे आपण आपले ध्येय गाठू शकू इच्छित स्थळी पोहोचू शकू._
*_तीन प्रकारच्या कृती_*
_*कृतीचे तीन प्रकार आहेत ते असे, कायिक, वाचिक व मानसिक.* सर्वसाधारणपणे आपण शारीरिक क्रियांना जास्त महत्त्व देतो. शाब्दिक क्रिया त्यापेक्षा कमी महत्त्वाच्या मानतो. तर मानसिक कृत्ये अगदीच गौण समजतो. एखाद्याला शारीरिक इजा करणे, याला आपण सगळ्यात गंभीर कृत्य समजतो. एखाद्याचा अपमान करणे, त्याला टाकून बोलणे, हे त्या मानाने कमी गंभीर वाटते. तर त्यापेक्षाही कमी महत्त्व, आपण एखाद्याबद्दल मनात असणाऱ्या अव्यक्त दुष्टभावनेला देतो. अर्थात असे मत आपापल्या देशातील माणसांनी केलेल्या कायद्यांना अनुसरून आहे. परंतु धर्माप्रमाणे, नियमांप्रमाणे मानसिक कृतीला सर्वाधिक महत्त्व आहे. शारीरिक व शाब्दिक क्रिया ह्या त्यामागील मनाची प्रेरणा, चित्ताची चेतना कोणती आहे त्याप्रमाणे अगदीच वेगवेगळे महत्त्व धारण करतात._
_एखादा सर्जन प्राण वाचविण्यासाठी तातडीची शस्त्रक्रिया करतांना धारधार चाकू आपल्या हातात घेतो व तो चाकू त्या रोग्याच्या शरीरावर चालवतो. शस्त्रक्रिया अयशस्वी ठरून रोगी दगावतो. दुसरीकडे एक खुनी आपला खंजीर एखाद्या माणसाच्या शरीरात खुपसतो व त्यातही तो माणूस दगावतो. शारीरिकदृष्ट्या या दोन्हीही क्रिया सारख्याच नाहीत का? पण मानसिक दृष्ट्या ह्यात जमीन अस्मानचे अंतर आहे. सर्जन हे कृत्य करुणामय अंतःकरणाने रोग्याला रोगमुक्त करण्यासाठी करतो, तर खुन्याचे हृदय द्वेषाने भरलेले असते. *त्या कृतींचा दोघांवर होणारा परिणाम हा अगदी वेगवेगळा त्यांच्या चित्ताच्या प्रेरणेला अनुसरूनच असणार!*_
_आपल्या बोलण्याचेही तसेच आहे. *उच्चारलेल्या शब्दामागील मनातील भावना फार महत्त्वाची आहे.* एखादा माणूस आपल्या सहकार्याशी भांडतो त्याला मूर्ख म्हणून त्याचा अपमान करतो. तो हे मनातील द्वेषामुळे बोलतो. पण तोच माणूस घरी आपला मुलगा मातीत खेळताना बघून 'मुर्खा, मातीत काय खेळतोस?' असे म्हणतो. तो हे मायेने म्हणतो. दोन्हीही वेळेस त्याने सारख्या शब्दांचा उपयोग केलेला असतो, पण परस्पर विरोधी वृत्तीचे दर्शन त्यात होते. म्हणूनच *बोलण्यामागील आपला हेतू काय आहे, त्यावरच त्यापासून होणारे परिणाम अवलंबून असतात.*_
_*मानसिक क्रियाच शब्द आणि शारीरिक कृत्ये ह्यांच्या बाह्य परिणामांमधून अभिव्यक्त होतात.* ह्या शारीरिक कृतीचे योग्य मूल्यांकन त्यामागील हेतु काय आहे ह्यावरूनच करता येते. आणि म्हणूनच मानसिक क्रियाच भविष्यात परिणाम करण्यास कारण ठरतात, खरी कर्मे ठरतात. ह्या सत्यास जाणूनच भगवान बुद्धांनी असे प्रगट केले की,_
_मनापासूनच सर्व घटना जन्मतात._
_मनच सगळ्यात महत्त्वाचे आहे. सर्व गोष्टी मनोनिर्मित आहेत._
_अशुद्ध वा मलिन मनाने तुम्ही बोललात किंवा वागलात की -_
_गाडीची चाके जशी त्याला जोडलेल्या प्राण्यांमागे जातात._
_त्याचप्रमाणे दुःख तुमच्या मागे येते._
_शुद्ध वा निर्मळ मनाने तुम्ही बोललात किंवा वागलात की,_
_कधीही न सोडणाऱ्या सावलीसारखी सुख-शांती तुमच्या मागोमाग येणारच._
_*दुःखाचे कारण*_
_परंतु कोणत्या मानसिक क्रिया आपले भविष्य ठरवतात ? *जर मन हे विज्ञान [जाणीव]. संज्ञा [मूल्यांकन] संवेदना व संस्कार [प्रतिक्रिया] यांनी बनलेले असते, तर यापैकी काय दुःख निर्मितीस जबाबदार आहे?* ह्यापैकी प्रत्येकजण दुःख निर्मितीत थोड्या फार प्रमाणात जबाबदार आहे. *तरी पण पहिल्या तीन क्रिया प्रामुख्याने तटस्थ असतात. विज्ञान केवळ अनुभवाची कच्ची माहिती जमवून त्याची नोंद घेते. संज्ञा माहितीचे मूल्यांकन करते. संवेदनाच घटना घडल्याची वर्दी देते, संकेत देते. या तिघांचे काम हे आलेल्या माहितीचे वा अनुभवाचे नुसते ग्रहण करणे हे आहे. परंतु जेव्हा मन संस्कार बनवण्यास तयार होते, तेव्हा तटस्थता संपते आणि राग [लोभ, हवेहवेसे वाटणे] व द्वेष [नकोनकोसे वाटणे] जन्म घेतात. ह्या प्रतिक्रियेपासूनच नवीन घटनांची शृंखला सुरू होते. ह्या शृंखलेची सुरुवातच प्रतिक्रियेतून होते व यालाच पालीभाषेत 'सङ्खार' असे नाव आहे.*_
_भगवान बुद्ध म्हणतात,_
_*कुठलेही दुःख निर्माण होवो, त्याचे कारण 'संस्कार' [प्रतिक्रिया] असते.. जर सर्व संस्कार क्षय पावले तर दुःख उरणारच नाही.*_
_*मनाचे हे कार्य, संस्कार हेच दुःखाचे खरे कारण - 'कर्म' होय.* आवड-नावडीचा एखादा क्षणिक संस्कार खूप सशक्त असेलच असे नाही. तो खूप परिणामकारक ठरेल असे नाही. असे अनेक संस्कार बनत राहिले तर सशक्त होण्याची शक्यता असते. *प्रतिक्रिया जेव्हा वारंवार उमटतात, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांची तीव्रता वाढत जाते व त्यातूनच अभिलाषा व तिटकारा यांची निर्मिती होते. यालाच भगवान बुद्धांनी आपल्या पहिल्या धर्मोपदेशात 'तण्हा' असे म्हटले आहे. याचा शब्दशः अर्थ 'तृष्णा', तहान; जे नाही त्याची, कधीही तृप्त न होणारी मनाची अभिलाषा. अर्थातच यात असलेल्या गोष्टीबद्दलची अतृप्तीही [असंतुष्टता ] अभिप्रेत आहे."* ही अभिलाषा किंवा असमाधान जेवढे जास्त, तेवढी त्याची गाढ छाया आपल्या विचारांवर, बोलण्यावर व वागण्यावर पडते व परिणामी तेवढेच दुःख आपण निर्माण करतो._
_*भगवान बुद्धांनी या प्रतिक्रियांचेही [संस्कारांचे] तीन प्रकार सांगितले आहेत. पहिला प्रकार हा पाण्यावर ओढलेल्या रेषेसारखा असतो. ओढल्याबरोबरच ती नष्ट होते. दुसरा प्रकार हा नदीच्या पात्रातील वाळूवर ओढलेल्या रेषेसारखा असतो. सकाळी ओढलेली रेषा पाण्याने किंवा वाऱ्याने संध्याकाळपर्यंत नाहीशी होते. तिसरा प्रकार हा छिन्नी व हातोडीने दगडावर कोरलेल्या रेषेप्रमाणे असतो. त्या काळाच्या ओघात जसजशी दगडाची झीज होते त्याप्रमाणे नष्ट होतातच, पण त्यांना नष्ट होण्यास बराच काळ जावा लागतो इतकेच.*_
_आयुष्यात रोजच आपले मन दिवसभर प्रतिक्रिया व्यक्त करीत असते. दिवसाच्या शेवटी बसून जर आपण विचार केला तर आपल्याला एखाद दुसरीच प्रतिक्रिया आठवेल, की ज्यांनी आपल्या मनावर त्या दिवशी खोल ठसा उमटवला आहे. परत जर महिनाभराने आपण अशा प्रतिक्रियांचा आढावा घेण्यास बसलो, तर त्या महिन्यातील खोलवर परिणाम केलेल्या एखाददुसऱ्याच प्रतिक्रियेची आठवण आपल्याला होईल. असाच विचार जर आपण वर्षाच्या शेवटी केला, तर त्या वर्षातील एखाददुसरी अशी प्रतिक्रिया की जिने आपल्या मनावर खोलवर गंभीर परिणाम केला आहे. तिचीच आठवण आपल्याला राहील._
_*ह्या दुःखातून मुक्त होण्याची पहिली पायरी म्हणजे दुःखाचे अस्तित्व स्वीकारणे. अर्थात हा स्वीकार केवळ एक तात्त्विक कल्पना किंवा एक श्रद्धेची बाब असे असता कामा नये, तर आपल्या आयुष्यावर परिणाम करणारे वास्तव म्हणून तिचा स्वीकार होणे महत्त्वाचे आहे. एकदा हे मान्य केल्यावर आणि दुःख म्हणजे नेमके काय आहे, आपण दुःखी का होतो हे नीट समजावून घेतल्यावर, आपण प्रवाहपीडित न होता, त्या प्रवाहावर नियंत्रण ठेवू शकतो. एकदा आपण आपला मूळ स्वभाव स्पष्टपणे ओळखावयास शिकलो की, दुःखातून पार होण्याचा मार्ग आपल्याला मोकळा होतो.*_
*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- जगण्याची कला_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०५/०८/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/08/blog-post_5.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment