Sunday, 26 December 2021

कोथिंबिरीची काडी आणि बुद्धीत शिरणारी माहिती

 *कोथिंबिरीची काडी आणि बुद्धीत शिरणारी माहिती*

*लेखक-डॉ. आ.ह.साळुंखे*


आपण शेतातून वा मंडईतून भाजीबरोबर कोथिंबिरीची पेंढी आणतो. स्वयंपाकघरात आपली आई भाजी शिजवण्याची तयारी करते. भाजीमधे कोथिंबीर टाकायची असते. पण आई कोथिंबिरीच्या पेंढीतील एक काडी देखील भाजीमधे जशीच्या तशी टाकत नाही. ती एखादी काडी हातात घेते. तिची मुळं काढून टाकते. किडलेली, खराब झालेली पानं काढून टाकते. ती काडी नीट धुऊन घेते. एवढं सगळं केल्यानंतर ती त्या काडीचा योग्य तो भाग भाजीमधे टाकते.


कोथिंबिरीच्या या काडीचं आपल्या जीवनातील स्थान किती? महत्त्व किती ? एक वेळच्या जेवणात आपल्या जिभेला थोडीशी छान चव मिळण्याएवढं ! काही जीवनसत्त्वं आणि इतर अन्नघटक देखील मिळत असतील, पण ते अगदी अल्पांशानं. याचा अर्थ त्या काडीचं आपल्या जीवनातील स्थान अगदी छोटं आणि फार थोडा काळ टिकणारं असतं, हे अगदी उघड आहे. समजा, आईनं त्या काडीवर काही संस्कार न करता ती जशीच्या तशी भाजीत टाकली, तर कदाचित आपलं पोट थोडसं बिघडण्याची शक्यता आहे. एखादा दिवस थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे. पण या त्रासाची तीव्रता अगदीच कमी असेल आणि तो त्रास फार काळ टिकण्याची शक्यताही नसेल. याचा अर्थ, सर्वसामान्यपणे पहायचं झालं, तर कोथिंबिरीच्या त्या काडीचा आपल्या जीवनावर होणारा बरा-वाईट परिणाम हा फार मोठी दखल घेण्याइतका नसतो; त्याचं मोठं कौतुक करावं किंवा फार काळजी करावी, असंही त्यामधे काही नसतं.


खरं तर, ही आपल्या दैनंदिन जीवनातील नेहमीच्या अनुभवाची गोष्ट. घटना अगदी साधी. सर्वांना माहीत असलेली. नवीन काहीच नाही. आगळंवेगळं काहीच नाही. असं असूनही मी ही साधी घटना एखादी नवीन गोष्ट सांगितल्याप्रमाणं आपल्यापुढं नोंदवण्याचं धाडस करत आहे, त्यामागं काही कारण आहे.


आपल्या पोटात जाणाऱ्या कोथिंबिरीच्या या काडीची तुलना आपल्या जीवनातील एका वेगळ्या घटनेशी करणं, हा या काडीची चर्चा करण्यामागचा माझा प्रमुख उद्देश आहे. आपल्या पोटात ज्याप्रमाणं बाहेरून अन्नाचा प्रवेश होतो, तसाच आपल्या मेंदूतील बुद्धीमधे बाहेरून नाना प्रकारच्या माहितीचा, विचारांचा, मतांचा, दृष्टिकोणांचा प्रवेश होत असतो. आपला मेंदू आपल्या अवघ्या अस्तित्वाचं नियंत्रण करीत असतो, त्याला जपत असतो, त्याची काळजी घेत असतो. शरीरात घेतल्या जाणाऱ्या प्राणवायूचा एक चतुर्थांश वाटा निसर्गानं आपल्या या अवयवाला दिला आहे. या छोट्याशा अवयवावर अब्जावधी पेशी असतात. त्या चिंतन करतात. आपल्या जीवनाला आकार देतात. त्याला दिशा दाखवतात. त्याला सुखाकडं वा दुःखाकडं नेऊ शकतात. चांगलं जगण्यासाठी शरीरातील प्रत्येक पेशीचं, स्नायूचं, अस्थीचं महत्त्व आहे, हे खरंच आहे. हृदयासारखे अवयव तर आपलं जगणं मरणंही ठरवू शकतात. हे सगळं मान्य करून देखील आपल्या शरीरातील मेंदूचं स्थान आपलं 'मनुष्यत्व' जपण्याच्या बाबतीत सर्वोच्च आहे, याविषयी बहुधा कुणाचाच मतभेद होणार नाही, असं मला वाटतं.


आता, पोटात भाजीबरोबर जाणारी कोथिंबिरीची एक काडी आणि बुद्धीत बाहेरून जाणारी माहिती, यांची थोडी तुलना करू या. पोटात जाणाऱ्या कोथिंबिरीच्या काडीपेक्षा बुद्धीत जाणारी माहिती हजारो पटींनी, किंबहुना अनंत पटींनी अधिक महत्त्वाची असते, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ही गोष्ट अगदी स्वयंस्पष्ट आहे. आणि इथंच मला एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. *आपण कोथिंबिरीच्या एका काडीला आपल्या पोटात जाऊ देण्यापूर्वी जितकी काळजी घेतो, तितकी तरी काळजी बाहेरच्या माहितीला आपल्या बुद्धीमधे जाऊ देण्यापूर्वी घेतो काय, हा माझा प्रश्न आहे.* कोथिंबिरीच्या काडीचा आपल्या जीवनावर पडणारा प्रभाव हा जवळपास नगण्य असतो आणि बुद्धीमधे जाणाऱ्या माहितीमुळं आपला कमालीचा उत्कर्षही होऊ शकतो अथवा आपल्या सर्वस्वाचा विध्वंसही होऊ शकतो. या दोन प्रक्रियांमध्ये इतकं मोठं अंतर असूनही सामान्यत: आपण कोथिंबिरीच्या काडीला जितकं तपासतो, जितकं निवडून घेतो, जितकं स्वच्छ करून घेतो, त्याच्या एका अंशानं देखील छाननी न करता आपण बाहेरच्या माहितीला आपल्या मेंदूमधे सहजपणे प्रवेश देतो, असं अनेकदा घडतं. मी जे नोंदवत आहे, ते काही काल्पनिक नाही. खरं तर, हे आपल्या जीवनाचं वास्तव आहे. ही एक क्रूर विसंगती आहे. हे प्रमाणबद्धतेचं भान नसल्याचं आहे. एखाद्या माणसानं आपली परवानगी न घेता आपल्या भाकरीचा चतकोर तुकडा तोडून घेतला असता त्याला न्यायालयात खेचावं आणि आपलं सर्वस्व लुटणाऱ्या माणसाच्या मात्र गळ्यात हार घालून त्याच्या पाया पडावं, असा काहीसा हा प्रकार आहे. 'मोरीला बोळा घालून दरवाजा उघडा ठेवणं', असं आपले पूर्वज म्हणत आले, त्याचं हे एक छान उदाहरण म्हणता येईल.


खरं म्हणजे आपल्या शरीरात बाहेरून एखादा अनिष्ट पदार्थ घुसू लागला, तर त्याला रोखून धरणं, हा आपल्या शरीराचा स्वभावच आहे. एखादा रोगजंतू शरीरात घुसू लागला, तर आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी लगेच त्याच्यावर तुटून पडतात. अन्न अन्ननलिकेतून जात असताना त्याचा एखादा कण वाट चुकून श्वासनलिकेकडं वळला, तरी देखील त्या कणाला बाहेर ढकलण्यासाठी आपल्याला ठसका लागतो. निसर्गानं आपल्या शरीराला ही मोठी विवेचक आणि संरक्षक देणगी दिली आहे. पण आपल्या बुद्धीला आणि मनाला मात्र असा ठसका आपोआप लागत नाही. म्हणूनच, नको असलेल्या गोष्टी बुद्धीत शिरू लागल्या, तर आपल्या बुद्धीला ठसका लागावा, याचे संस्कार स्वत:वर करणं गरजेचं असतं.


मानवी समाजानं विकासाचा आजच्या इतका सर्व अंशांनी प्रगत टप्पा गाठलेला नव्हता, तेव्हा माहितीचं प्रमाण कमी होतं. माहितीची देवाण-घेवाण करणारी साधनं कमीही आणि आजच्या तुलनेनं अप्रगतही होती. स्वाभाविकच, माहिती पोचण्याचा वेगही कमी होता. त्याबरोबरच, माहितीची चिकित्सा करण्याच्या बाबतीतही भरपूर अडथळे होते.


आज परिस्थिती आरपार बदलली आहे. माणसावर माहितीचा प्रचंड मारा होत आहे. प्रगत साधनांची विपुलता थक्क करणारी आहे. माहिती पोचण्याचा वेग चकित करणारा आहे. पण त्याबरोबरच माहितीची चिकित्सा करण्यासाठी आवश्यक असलेलं वातावरण मोठ्या प्रमाणात अनुकूलही झालं आहे.


अशा स्थितीत आपण काय करणार आहोत, हा खरा प्रश्न आहे. माहितीच्या महापुरात निष्क्रियपणे वहात जाणार आहोत, की आपल्या चिकित्सक बुद्धीच्या जोरावर सक्रियपणे त्या महापुराच्या प्रवाहाला उचित दिशेनं वळवणार आहोत? पूर्वी, छापून आलंय् म्हणजे खरंच असलं पाहिजे असं काही लोक म्हणायचे (अजूनही काही जण तसं म्हणतातच), आता वृत्तवाहिनीवर वा महाजालावर (इंटरनेटवर) आहे मग ते खोटं कसं असेल, असं तर आपण म्हणणार नाही ना ?



*पुस्तकाचे नाव - मन निरभ्र व्हावं*

*लेखक-डॉ. आ.ह.साळुंखे* 

*लेखाचे शीर्षक- कोथिंबिरीची काडी आणि बुद्धीत शिरणारी माहिती*

*पान नंबर - २४ ते २६*


No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...