सब्बे संक्खारा अनिच्चाति...
१४व्या शतकातील प्रसिद्ध झेन आचार्य इक्कयु लहान असताना एका झेन विहारात शिकत होते. तेथील आचार्यांकडे एक अतिशय दुर्मिळ कप-बशी होती जी मौल्यवान होती. एकदा साफ सफाई करताना इक्कयु यांच्या हातून ही कप-बशी खाली पडली आणि तिचे तुकडे झाले.
इक्कयु यांना काय करावे हे समजले नाही. तितक्यात त्यांना त्यांचे आचार्य येताना दिसले. इक्कयु यांनी भराभर सर्व तुकडे हातात एकत्र केले आणि हात पाठमागे लपवले. आचार्य येताच त्यांनी विचारले,
"आचार्य, माणसे मृत्य का पावतात?
आचार्य म्हणाले, "सृष्टीतील सर्वच जीवमात्रा कधी ना कधी मृत्यू पावतात. एवढेच काय, सर्व अजीव वस्तू देखील वातावरण बदलामुळे ऱ्हास पावतात म्हणजेच एका अर्थाने त्यांचा मृत्यू होतो.
इक्कयूंनी विचारले,"मग आपण त्याचे दुःख करायला पाहिजे का?
"सर्व वस्तूंचा मृत्य अटळ असल्याने आपण त्याचे दुःख करता कामा नये"
इक्कयूंनी हात पुढे केला आणि म्हणाले,
"आचार्य, या कप-बशीचा आज मृत्यू झाला आहे!
बुद्ध म्हणतात - सब्बे संक्खारा अनिच्चाति, यदा पञां न पस्सति, अथ निबन्धति दुक्खे, एस धम्मो विसुध्दिया
- सर्व जीव-अजीव नाशवंत आहेत. जो हे प्रज्ञेने पाहतो, त्याला दुःख होत नाही. हाच विशुद्धीचा मार्ग आहे!
आम्हीं मात्र प्रत्येक वस्तूला किंवा व्यक्तीला कवटाळून बसतो....
No comments:
Post a Comment