Friday, 24 December 2021

मनुस्मृती दहन

 *_मनुस्मृती दहन : एक क्रांतीकारी घटना_* 


                    प्रा. प्रेमरत्न चौकेकर 


         महाड येथील चवदार तळ्यावर दिनांक 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. ही एक ऐतिहासिक क्रांतीकारी घटना होती. या  घटनेमुळे भारतीय समाजमनावर दूरगामी परिणाम घडून आले. 

         

         "महाडची परिषद दनांक 25/26/27 डिसेंबर 1927 रोजी भरविण्यात आली होती. सभेची पूर्वतयारी करण्याकरिता रा. अनंत विनायक यांची योजना करण्यात आली होती. महाड सत्याग्रहाच्या बाबतीत चित्रे हे आघाडीचे वीर होते. रा. चित्रे हे 15 दिवस अगोदर महाडास जाऊन पोहोचले. काही तरुण मंडळीखेरीज महाडातील सर्व स्पृश्य लोक सत्याग्रहास प्रतिकूल आहेत असे त्यांना दिसले. व परिषदेच्या कार्यात सर्वतोपरी विघ्ने उत्पन्न‌ करुन गावात परिषदेला कोणत्याही प्रकारचे सामान मिळू द्यावयाचे नाही, असा गाववाल्यांचा कट असल्याचेही  त्यांना दिसून आले. तेव्हा आपल्या कायस्थ ज्ञातीतील काही तरुण मंडळींना हाती धरुन आपला उद्दिष्ट तडीस नेण्याचे त्यांनी ठरविले. याकामी त्यांना शांताराम पोतनीस, केशवराव देशपांडे, रा. वामनराव पत्की, कमलाकर टिपणीस वगैरे मंडळीचे पुष्कळ सहाय्य झाले. त्यातल्या त्यात रा. पत्की यांचा तर फारच उपयोग झाला. त्यांची मदत नसती तर परिषदेच्या सामग्रीसाठी लागणारे सामान मुळी मिळालेच नसते. परिषदेला पुष्कळशा गोष्टी उसनवार घेऊन थोड्या खर्चात कार्यभाग आटोपता आला असता. पण गावात लोकमत प्रतिकूल असल्याकारणाने सर्वच वस्तू तात्पुरत्या कामासाठी देखील खरेदी कराव्या लागल्या.  तेणेकरुन परिषद खर्चाची झाली. परंतु जिथे भाराभर सुवर्ण दिले असताही काही मिळणे शक्य नव्हते, तिथे इतकी उत्तम व्यवस्था आली हीच मोठी आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे व त्याबद्दल रा. चित्रे व पत्की यांना द्यावा तेव्हढा धन्यवाद थोडाच आहे. त्यांच्या जोडीला पुण्याहून सुभेदार घाटगे, रा. थोरात व भानगरहून रा. भानगरकर जमेदार हे ता. 24 रोजी महाडास येऊन दाखल झाले होते. जमलेल्या प्रतिनिधीस लष्करी शिस्त लावणे, एवढ्या समुदायाची जेवणाची व्यवस्था करणे वगैरे अवघड कामे सुभेदार घाटगे यांच्यावर सोपविण्यात आली होती. ती त्यांनी इतक्या शिताफीने व धडाडीने पार पाडली की सगळे लोक थक्क झाले." 

         

         महाडच्या परिषदेचा हा वृत्तांत वाचला की या परिषदेला उच्च जातीय हिंदुंचा किती कट्टर विरोध होता हे लक्षात येईल. परिषदेला कोणत्याही प्रकारचे सहाय्य मिळणार नाही याचा बंदोबस्त गाववाल्यांनी केला होता. अर्थात चित्रे, पत्की व त्यांचे काही तरुण मित्र यांनी ही परिषद यशस्वी व्हावी यासाठी प्रचंड मेहनत घेतली हे विसरुन चालणार नाही. 

         1 जानेवारी 2018 रोजी भिमा कोरेगाव येथे  दंगल घडवून आणली गेली. भिमा कोरेगावच्या विजय स्तंभाला सलामी देण्यासाठी या दिवशी लाखो आंबेडकरी अनुयायी तेथे पोहोचतात. 1जानेवारी 2018 रोजी या भीमसैनिकांवर उच्च जातीय गाववाल्यांनी भ्याड हल्ला केला. या भीम सैनिकांना पाणि सुद्धा मिळणार नाही अशी व्यवस्था भिमा कोरेगावच्या गाववाल्यांनी सुद्धा केली होती. उच्च जातीय हिंदुंची मानसिकता अजून बदलेली नाही हेच यातून दिसून येते. 

         

         महाडच्या स्पृश्य लोकांनी कट करुन परिषदेच्या कामाला कोणत्याच प्रकारची सामुग्री मिळू नये याची गावक-यांकडून खबरदारी घेण्यात आली होती.  त्यामुळे मंडपासाठी जागा मिळणे ही एक मोठी अडचणीची बाब होऊन बसली होती. महाड शहरातल्या आजुबाजूच्या बहुतेक सर्व जमिनी गुजर ब्राम्हणांच्या असल्यामुळे परिषद भरविणारांची शेंडी आयतीच आपल्या हातात सापडली आहे या भावनेतून हे लोक अगदी खुषीत गाजरे खात बसले होते. 

         परंतु जवळपासच फत्तेखान नावाच्या एका मुसलमान गृहस्थाची जमीन होती. ती जमीन त्याने मोठ्या खुषीने परिषद भरविण्याकरिता दिली. ही बातमी गुजर ब्राम्हणांच्या कानावर गेल्याबरोबर त्यांचे हात पाय थंडगार पडले. परंतु शक्य तो उपाय करुन परिषद भरवू द्यावयाची नाही असा त्यांनी चंग बांधला असल्यामुळे रा. फत्तेखानच्या दारी जावून त्यांनी धरणे धरले व तुम्ही अस्पृश्य लोकांना परिषद भरविण्याकरिता जागा देऊ नका म्हणून त्यांचे पाय धरले. परंतु त्यांची डाळ शिजली नाही. "दिलेले वचन मी कधिही मोडणार नाही," असे सांगून त्यांनी या लोकांची हकालपट्टी केली.  

         

         अशा प्रकारे मिळालेल्या जागेत सात आठ हजार लोक बसू शकतील इतका मोठा मंडप उभारण्यात आला होता. 


मनुस्मृती दहन : 

मंडपाच्या दारात मनुस्मृतीचा दहनविधी करण्याकरिता एक उत्तम प्रकारे शृंगारलेली वेदी तयार करण्यात आली होती. मनुस्मृतीचे दहन केल्याबद्दल ज्या ब्राम्हण्यग्रस्त लोकांना त्वेष आला ते सांगत सुटले होते की, सत्याग्रह करता आला नाही म्हणून आल्यासारखे काहीतरी करावे म्हणून मनुस्मृती जाळण्याचा उपक्रम डाॅ आंबेडकर यानी केला. हे म्हणणे किती खोटे आहे, हे मंडप उभारतानाच  मनुस्मृती जाळण्याकरिता वेदीही तयार करण्यात आली होती, हे जो ध्यानात घेईल, त्यास सहज कळण्यासारखे आहे.  

         मनुस्मृती जाळण्याचा निश्चय हा आयत्या वेळचा नसून पूर्वीच ठरला होता, हे खाली दिलेला परिषदेचा जो कार्य्रक्रम ठरलेला होता त्यावरुनही दिसून येण्यासारखे आहे:- 

             

                महाड सत्याग्रह परिषद 

                         कार्यक्रम  

            ता. 25 माहे डिसेंबर सन 1927  


        सकाळी 10 वाजता अध्यक्षांचे भाषण, नंतर सर्व परिषदेने तळ्यावर जावयाचे व पाणी भरुन आणावयाचे. 

        दुपारी साडेबारा वाजता जेवण, नंतर 3 वाजता मनुस्मृतीचा दहनविधी व प्रासंगिक भाषणे, त्यानंतर सर्व परिषदेने पुन्हा तळ्यावर जाऊन पाणी भरुन आणावयाचे. रात्री 7.30 वाजता अल्पाहार, नंतर किर्तन व सत्यशोधक तमाशा.  


         मनुस्मृती दहन हा आयत्या वेळचा कृती कार्यक्रम नसून तो पूर्व‌ नियोजीत होता हे वरील पुराव्यांवरून सिद्ध व्हावे. 


         महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हा जगातील एकमेवाद्वितीय अशीच क्रांतीकारी घटना होती. हिंदु धर्मातील एका घटकाला हिंदु धर्मानेच अस्पृश्य मानले होते. अस्पृश्यांचे जीवन बरबाद केले होते. त्यांना सर्व हक्क नाकारले होते. शिक्षण, ज्ञान, अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, आरोग्य हे सगळंच नाकारलं होतं. पाण्यासाठीसुद्धा अस्पृश्यांना वरिष्ठ जातींच्या दयेवर आवलंबून रहावे लागत होते. वरिष्ठ मानल्या गेलेल्या  हिंदुंकडून अस्पृश्यांवर हजारो वर्षे हा अन्याय केला जात होता. मनुस्मृतीच्या अमानुष कायद्यामुळे हा विकृत सामाजिक व्यवहार हिंदुंकडून केला जात होता. अशा विकृत, अमानुष, समाजद्रोही, देशद्रोही कायद्याचे चोपडे म्हणजे मनुस्मृतीचे दहन करण्याचे क्रांतीकारी कार्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे केले.  

         

         सदर प्रसंगी केलेल्या भाषणात बाबासाहेब  म्हणाले, 

         "हिंदू धर्मात बेटीबंदी, रोटीबंदी, लोटीबंदी,  भेटीबंदी व व्यवसायबंदी या परस्परातील नुसत्या सहवासाच्या मर्यादा आहेत, असा सर्वसाधारण समज आहे. पण हा समज अपुरा आहे. कारण या पाच प्रकारच्या बंदी या सहवासाच्या मर्यादा तर आहेतच पण त्या असमान दर्जाच्या लोकांना त्यांचा दर्जा कोणता हे दर्शविण्याकरिता घातलेल्या आहेत. अर्थात या सहवासाच्या मर्यादा म्हणजे असमानतेची चिन्हे आहेत. 

         महाडचे स्पृश्य लोक अस्पृश्य लोकांना चवदार तळ्याचे पाणी पिऊ देत नाहीत याचे कारण अस्पृश्यांनी स्पर्श केला असता, ते पाणी नासेल किंवा त्याची वाफ होऊन ते नाहिसे होईल अशामुळे नव्हे. अस्पृश्यांना ते पाणि पिऊ देत नाहीत याचे कारण हेच की, शास्त्रांनी असमान ठरविलेल्या जातींना आपल्या तळ्यात पाणी भरु देऊन त्या जाती आपल्यसमान आहेत असे मान्य करण्याची त्यांची इच्छा नाही. 

        

       सद्गृहस्थहो! आपण आरंभलेल्या या झगड्याचा भावार्थ काय आहे, हे यावरुन आपल्याला कळेलच." 

       

         बाबासाहेब पुढे म्हणतात, 

         "सत्याग्रह कमिटीने आपणास महाडला बोलाविले आहे ते महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी बोलाविले आहे, असा आपला समज होऊ देऊ नका.‌ चवदार तळ्याचे पाणी प्याल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही.  आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यालो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरिता जावयाचे नाही. इतरांप्रमाणेच आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपणास जावयाचे आहे. म्हणजे ही सभा समतेची मुहूर्तमेढ रोविण्यासाठीच बोलविण्यात आली आहे, हे उघड आहे."  

         

         या परिषदेत खालील ठराव पारित करण्यात आले.  

         

     *हिंदुमात्राच्या जन्मसिद्ध हक्कांचा जाहीरनामा* 

     

     ठराव 1: 

     सामाजिक अन्याय, धार्मिक ग्लानी, राजकीय अवनती आणि आर्थिक गुलामगिरी यांच्यामुळे राष्ट्र कसे अधोगतीस जाते याचे सांप्रतचा  हिंदु समाज हे एक ठळक व अनुकंपनीय उदाहरण आृहे, असे या सभेचे ठाम मत आहे. हिंदु समाजास अशी घोर दशा प्राप्त होण्याचे मुख्य कारण असे की, बहुजन समाजाने मनुष्यमात्राचे जन्मसिद्ध हक्क कोणते याची जाणीव करुन घेण्याची तत्परता दाखविली नाही आणि ते अबाधित ठेवण्याची खबरदारी घेतली नाही व स्वार्थसाधू लोकांच्या कृष्णकारस्थानांना आळा घातला नाही, आपले जन्मसिद्ध हक्क समजून घेणे, त्यांचे आपद्प्रसंगी संरक्षण करणे व परस्परांमधील व्यवहारात त्यांची पायमल्ली होणार नाही, अशाविषयीची काळजी घेणे हे समाजातील प्रत्येक मनुष्यमात्राचे पवित्र कर्तव्य आहे. हिंदुमात्राचे जन्मसिद्ध हक्क कोणते हे सतत हिंदुजनांच्या डोळ्यासमोर असावेत म्हणून खालील जाहिरनामा ही सभा सर्वांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करीत आहे. 

     

     (1) सर्व माणसे ही जन्मत: समान दर्जाचीच आहेत व ती मरेपर्यंत समान दर्जाचीच राहतील. लोकोपयोगित्वाच्या दृष्टीनेच त्यांच्या दर्जात फरक पडू शकेल. एरवी त्यांचा समान दर्जा तसाच कायम राहिला पाहिजे. म्हणून राज्यकारभारात व सार्वजनिक व्यवहारात समानतेच्या तत्वाला बाध येईल अशा कोणत्याही धोरणाला व विचारांना थारा मिळू नये, असे या सभेचे मत आहे.  

     (2) वरिल जन्मसिद्ध मानवी हक्क कायम राहावेत हाच राज्यव्यवस्थेचा व समाजव्यवस्थेचा अंतीम हेतू असला पाहिजे. याकरिता हिंदु समाजाच्या विषमतामूलक रचनेचा व तशा रचनेचा पुरस्कार करणा-या प्राचीन व अर्वाचीन ग्रंथवचनांचा ही सभा तीव्र निषेध करते. 

     (3) अखिल प्रजा हेच सर्व प्रकारच्या अधिकारांचे व सत्तेचे उगमस्थान आहे. कोणत्याही व्यक्तीचे, समुदायाचे अगर वर्गाचे विशिष्ट हक्क जर ते बहुजन समाजाने दिलेले नसतील तर ते इतर कशाच्याही आधारावर मग तो आधार राजकारणाचा असो अगर धर्मकारणाचा असो, मान्य होण्यास पात्र नाहीत. यास्तव समाजव्यवस्थेच्या बाबतीत श्रुती, स्मृती व पुराणे वगैरे ग्रंथांचे प्रामाण्य कबूल करण्यास ही सभा तयार नाही. 

     (4) कोणत्याही व्यक्तीला आपल्या जन्मसिद्ध हक्कांप्रमाणे वागण्यास पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यावर जर मर्यादा घालण्यात आली तर ती दुस-या व्यक्तीला तिच्या तशाच प्रकारचा जन्मसिद्ध हक्क उपभोगण्यास अवसर मिळावा इतक्यापुरतीच घालता येईल. ती मर्यादा खुद्द लोकांनी केलेल्या कायद्यांनी ठरविली पाहिजे. धर्मशास्त्राच्या किंवा दुस-या कसल्याही आधाराने ती ठरविली जाता कामा नये. यास्तव अष्टाधिकारासारख्या जातीजातीत ठरवून दिलेल्या असमानतेच्या व्यवस्थेचा ही सभा धिक्कार करते. 

       (5) जेवढ्या गोष्टी समाजास विघातक होतील तेवढ्याच करण्याची कायद्याने बंदी केली पाहिजे. जी गोष्ट कायद्याने मना केली नसेल ती  करण्यास सर्वांना मुभा असली पाहिजे. तसेच, जी गोष्ट करणे  कायद्याने अवश्य ठरविले नसेल ती गोष्ट करावयास कोणालाही भाग पाडता कामा नये. यास्तव रस्त्यांचा, सार्वजनिक जागांचा, सार्वजनिक पाणवठ्यांचा व देवालयांचा वगैरे उपयोग करण्यास  कोणाचा कोणाला मज्जाव असता कामा नये. यास्तव तसा मज्जाव करु पाहणारे लोक हे सुव्यवस्थित समाजरचनेचे आणि न्यायाचे शत्रू आहेत, असे ही सभा समजते. 

     (6) कायदा म्हणजे अमूक एक वर्गानेच ठरविलेली बंधने नव्हेत. तो कोणत्या प्रकारचा असावा, हे ठरविण्याचा हक्क सर्व प्रजेस अगर तिच्या प्रतिनिधीस असला पाहिजे. हा कायदा संरक्षणात्मक असो अगर  शासनात्मक असो, तो सर्वांना सारखाच लागू असला पाहिजे आणि समाजरचना समतेच्या पायावर करावयाची असल्यामुळे मानसन्मान, अधिकार व व्यवसाय यांच्याबाबतीत जात आड येता कामा नये. भेदाभेद व्हावयाचा तो केवळ व्यक्तींच्या गुणभेदांमुळेच झाला पाहिजे, जन्मामुळे होता कामा नये. याकरिता प्रचलित जातिभेद पद्धतीचा व तद्नुषंगिक विषमतेचा ही सभा तीव्र निषेध करते.  

     

 ठराव 2 : 

 शूद्र जातीचा उपमर्द करणारी, त्यांची प्रगती  खुंटविणारी, त्यांचे आत्मबल नष्ट करुन त्यांची सामाजिक, राजकिय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी मनुस्मृतीतील वचने ध्यानात घेऊन व वरील हिंदुमात्राच्या जन्मसिद्ध हक्कांच्या जाहीरनाम्यात गोवलेल्या तत्वांशी तुलना करुन सदरहू ग्रंथ ' धर्मग्रंथ' या पवित्र नावास शोभण्यास अपात्र आहे असे या परिषदेचे ठाम मत आहे व ते मत व्यक्त करण्यासाठी असल्या लोकविग्रही व माणुसकीचा उच्छेद करणा-या धर्मग्रंथाचा ती दहनविधी करीत आहे.  

 

 ठराव 3 :  

सर्व हिंदु धर्मिय लोक हे एक वर्णिय समजण्यात यावेत. हिंदु या संज्ञेने हा वर्ग ओळखण्यात व संबोधण्यात यावा. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य वगैरे वर्णविषयक संज्ञानी अगर महार, मांग वगैरे जातिविषयक संज्ञानी स्वत:ला अगर दुस-याला संबोधण्याची कायदेशीर मनाई करण्यात यावी असे या परिषदेचे मत आहे. वाटल्यास धंद्यावरुन शिंपी, सोनार, माळी असे म्हणवून घेण्यास तसेच मराठा, कोकणस्थ,  देशस्थ वगैरे प्रांत अगर देशनिदर्शक नावे उपयोगात आणण्यास हरकत नाही.  

 

 ठराव 4 : 

 या परिषदेचे असे मत आहे की,  

 1. धर्माधिकारी हि संस्था लोकमतानुवर्ती व लोकनियुक्त करण्यात यावी. 

 2.  हा पेशा स्विकारण्याचा व त्याच्याकरिता स्वत:ला लायक करुन घेण्याचा हक्क व योग प्रत्येक हिंदुमात्राला देण्यात यावा. 

 3. धर्माधिका-यांची परीक्षा घेण्यात येऊन मग त्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात यावीत. प्रशस्तीपत्रे न मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीला धर्माधिकारी म्हणविण्याची अगर तत्संबंधी विधीकर्मे करण्याची कायदेशीर मनाई करण्यात यावी. 

 4. ग्राम धर्माधिकारी, तालुका धर्माधिकारी व प्रांत धर्माधिकारी अशी सामान्यत: धर्माधिका-यांची योजना करण्यात यावी. 

 5. वरीलप्रमाणे नियोजित केलेल्या धर्माधिका-यास धर्मवीधी केल्याबद्दल दक्षिणा अगर इतर प्रकारचा मेहनताना अगर पारितोषिक घेण्याचा अधिकार असू नये. त्याऐवजी ईतर सर्व खात्यातील अधिकारी वर्गाप्रमाणे याही खात्यातील लहानमोठ्या अधिका-यांना सरकारी नोकर समजण्यात यावे व त्यांना सरकारातून योग्य तो पगार देण्यात यावा.  


         या ठरावांचा विचार करता असे दिसून येईल की हिंदु धर्म व संस्कृतीमध्ये क्रांतीकारी बदल घडविण्याच्या उद्देशानेच बाबासाहेबांनी मनुस्मृती दहनाचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. 


         "सत्याग्रह सभेतील मनुस्मृतीची दहनभूमी तयार करायला सहा कारागीर दोन दिवस खपत होते. सहा इंच खोल व सुमारे दीड फूट चौरस खड्डा खणून तो चंदनाच्या लाकडांनी भरुन काढला होता. चार फूट उंचीचे चार खांब चार कोनावर उभे केले होते. 'मनुस्मृतीची दहनभूमी', 'अस्पृश्यता नष्ट करा' 'भिक्षुकशाहीला गाडून टाका' वगैरे पताका तीन बाजूंनी लावल्या होत्या. तारीख 25 डिसेंबर 1927 रोजी रात्री 9 वाजता बापूसाहेब सहसत्रबुद्धे व दुसरे पाच सहा आस्पृश्य साधू यांच्या हस्ते या दहनभूमीवर मनुस्मृतीचे पुस्तक ठेवून ते जाळण्यात आले." 


        अशा प्रकारे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.  धर्माधिष्ठीत वर्णजातवर्गप्रणित व्यवस्था व त्याआधारे सुरु असणा-या धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकिय, मानसिक व बौद्धिक गुलामगिरीला व शोषणाला नाकारले गेले व जाळण्यात आले. 

        

        मनुस्मृतीच्या दहनामुळे व्यक्ती, समाज व राष्ट्र यांच्या पुनर्रचनेसाठी अवकाश प्राप्त झाले, ही फार महत्वाची बाब आहे! 


        वर्णजातवर्गप्रणित ब्राह्मणी प्रतिक्रांती विरूद्ध न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व प्रणित आंबेडकरी क्रांती यांतील संघर्ष आज तीव्र झाला आहे. या संघर्षामध्ये आंबेडकरी क्रांतीला विजय प्राप्त करुन देण्यासाठी सर्व व्यक्ती, संस्था व संघटनांनी आंबेडकरी क्रांती रसायन समजून घेणे आणि त्याप्रमाणे वाटचाल करणे आज अत्यावश्यक झाले  आहे!

No comments:

Post a Comment

योग

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_योग_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_19.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _भगवंतांनी संबोधी मार्गा...