🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*_मार्गावरील वाटचाल_*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
_उत्तर भारतातील श्रावस्ती या शहरी भगवान बुद्धांचे फार मोठे साधना केंद्र होते. खूप लोक तेथे ध्यानासाठी व धर्मावरील व्याख्याने ऐकण्यासाठी येत असत. ही व्याख्याने ऐकून एक तरुण रोज संध्याकाळी होणाऱ्या धर्मचर्चेसाठी पण येत असे. वर्षानुवर्षे हा क्रम चालू होता. *बुद्धांची व्याख्याने तो नियमितपणे श्रवण करीत असे. पण ती त्याने कधीही व्यवहारात आणली नव्हती.*_
_काही वर्षांनी एकदा हा तरुण, व्याख्यानासाठी नेहमीपेक्षा जरा लवकर आला. तेव्हा बुद्धांना एकटे बसलेले बघून तो त्यांना भेटला व म्हणाला, "गुरुवर्य, मला एक प्रश्न सतत सतावत असतो व माझ्या मनात शंका निर्माण करीत असतो."_
_'हो का! धर्माच्या मार्गावर चालताना कोणत्याही प्रकारची शंका राहता उपयोगाची नाही, ती निरसन करून घ्या. कोणता प्रश्न आहे तुम्हाला?'_
_'गुरुवर्य! अनेक वर्षे मी आपल्या व्याख्यानाला येतो आहे. मी बघतो आहे की, आपल्या सभोवताली घरदार सोडून आलेले बरेच भिक्षु, भिक्षुनी व बऱ्याच मोठ्या प्रमाणात सामान्य संसारी स्त्री-पुरुषही येतात. मी वर्षानुवर्षे त्यांना बघतो आहे. त्यातील काहींना नक्कीच निर्वाणाचा साक्षात्कार झालेला असणार हे मला जाणवते आहे. काहींची तर या मार्गावर बरीच प्रगती झालेली मी स्वतः बघतो आहे. काहींना निर्वाणाचा साक्षात्कार झालेला नसला तरी, त्यांच्या आयुष्यात बराच बदल झालेला दिसतो आहे, आणि गुरुवर्य, त्याचबरोबर मी असगी बरीच माणसे बघतो आहे की, त्यांच्यात काहीच बदल झालेला नाही. त्यांच्यात माझाही समावेश आहे. काही तर चक्क घसरलेले दिसतात. त्यांच्यात काहीच बदल झालेला नाही किंवा चांगला बदल होण्याची चिन्हेही दिसत नाहीत. गुरुवर्य, हे असे का व्हावे? *आपल्यासारख्या सामर्थ्यशाली, निर्वाणाचा साक्षत्कार झालेला महापुरुष, करूणहृदय संत त्यांना मार्गदर्शक लाभला असताना असे का व्हावे? आपण आपले सामर्थ्य व करुणा यांचा उपयोग करून त्यांना मुक्त का करीत नाही?*'_
_भगवान बुद्धांनी हसत त्या तरुणाला विचारलं, 'आपण राहता कुठे? आपले मूळ गाव कोणते?'_
_'गुरुवर्य, मी या कोसल राज्याची राजधानी श्रावस्ती येथेच राहतो.'_
_'हो पण, आपल्या चेहरेपट्टीवरून आपण या प्रदेशातले रहिवासी वाटत नाहीत. मग आपण मूळचे कुठले?'_
_'गुरुवर्य, मी मूळचा मगध देशाची राजधानी राजगिरि येथील आहे. काही वर्षांपूर्वीच मी श्रावस्ती येथे येऊन स्थायिक झालो आहे.'_
_'मग काय आपण राजगिरीचे संबंध तोडून टाकलेत का?'_
_'नाही गुरुवर्य, माझे अनेक नातेवाईक तेथे आहेत, माझा मित्रपरिवार तेथे आहे आणि माझा व्यापारपण तेथे आहे.'_
_'मग नक्कीच श्रावस्तीहून अनेकदा राजगिरीस जात असणार?'_
_'हो गुरुवर्य, वर्षातून अनेकदा राजगिरीस जातो व श्रावस्तीला परत येतो.'_
_'अनेकवेळा एकाच रस्त्याने राजगिरीस जाऊन, त्याच मार्गाने परत श्रावस्तीला आल्यामुळे, ह्या मार्गाची आपल्याला खंडान खडा माहिती झालेली असणार! हो ना?'_
_'होय गुरुवर्य, मला हा मार्ग पुर्णपणे पाठ आहे. मी जरी डोळे झाकून या मार्गाने गेलो तरी तो अचूक सांगू शकेन असे म्हटले तर वावगे होणार नाही, कारण इतक्या वेळा मी या रस्त्यावरून आलो गेलो आहे.'_
_'आणि आपल्या अनेक मित्रांना तुम्ही राजगिरीहून येऊन येथे स्थायिक झालात हे नक्कीच माहीत असणार! तुम्ही नेहमीच येथून राजगिरीस जाता व येथून राजगिरीला जाण्याचा मार्ग ही तुम्हाला चांगलाच माहीत आहे, ह्याचीही त्यांना चांगली कल्पना असणार! होय ना?'_
_'होय गुरुवर्य, माझे सगळे जवळचे मित्र, नातेवाईक हे जाणून आहेत की, मला राजगिरीला जाणाऱ्या रस्त्याचे पूर्ण ज्ञान आहे.'_
_'मग ज्या वेळेला ह्या मंडळींना राजगिरीला जायचे असते, तेव्हा ती या मार्गाबद्दल तुम्हाला नक्कीच विचारत असतील, तेव्हा तुम्ही काही गोष्टी लपवून ठेवता का? की हा मार्ग त्यांना समजेल अशा स्पष्टपणे समजावून सांगता?'_
_'त्यात लपवण्यासारखे आहे काय गुरुवर्य! मी तर त्यांना मला शक्य आहे तितक्या स्पष्टपणे समजावून सांगतो. तुम्ही पूर्वेकडे चालायला सुरुवात केलीत म्हणजे बनारसला पोहोचाल, तसेच पुढे गेलात म्हणजे गया येथे पोहोचाल व तसेच पुढे गेलात की राजगिरि येथे जाल. असे अगदी साध्या व समजेल अशा शब्दांत मी त्यांना सांगतो.'_
_'आणि ज्यांना ज्यांना तुम्ही स्पष्ट व समजेल अशा शब्दांत हा मार्ग दाखवता ते सर्व राजगिरीस जाऊन पोहोचतात का?'_
_गुरुवर्य, हे सांगणे जरा अवघड आहे. जे जे हा मार्ग सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी सांगितला आहे त्याचप्रमाणे चालतात, तेच राजगिरीला पोहोचू शकतील.'_
_'*तरुण गृहस्था! हेच तर मला तुला सांगायचे आहे. अनेक लोक मी येथून निर्वाणापर्यंत जाऊन आलो आहे, मला हा मार्ग पुर्णपणे माहीत आहे म्हणून माझ्याकडे येतात. निर्वाणापर्यंत, मुक्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणता, म्हणून मला विचारतात आणि त्यात लपवण्यासारखे काय आहे? मी त्यांना स्पष्टपणे "हाच तो मार्ग" म्हणून सांगतो! जर कोणी नुसतेच आपले डोके हलवीत म्हणाला, छान! फारच छान! फारच कल्याणकारी मार्ग! फारच छान मार्ग आहे! पण मी त्यावर एक पाऊलही चालणार नाही! त्यावर चालण्याचा त्रासही घेणार नाही! तर मग अशी माणसे हे उद्दिष्ट, ध्येय कसे बरे गाठू शकतील?*'_
_'*मी कोणालाही ह्या अंतिम ध्येयापर्यंत माझयाया खांद्यावर घेऊन जाऊ शकत नाही. कोणीही कोणालाही अंतिम उद्दिष्टापर्यंत आपल्या खांद्यावर घेऊन जाऊ शकत नाही. फार तर अत्यंत प्रेमाने व करुणेने म्हणता येईल, 'होय, हाच तर्क मार्ग' आणि अशा प्रकारे मी या मार्गावर चाललो, तुम्हीपण या मार्गाचा अवलंब करा. त्यावर चाला म्हणजे अंतिम उद्दिष्टांपर्यंत नक्कीच पोहोचाल.*'_
_*'प्रत्येक माणसाला स्वतःलाच या मार्गावरून वाटचाल केली पाहिजे. एक एक पाऊल उचलले पाहिजे. जे जे या मार्गावर एक पाऊल चालले, ते आपल्या उद्दिष्टाच्या एक पाऊल जवळ गेले आहेत. ज्यांनी या मार्गानी शंभर पावले पुढे टाकली, ते उद्दिष्टाच्या शंभर पावले जवळ आले आहेत. ज्यांनी हा सर्व मार्ग पादाक्रांत केला, त्यांनी अंतिम ध्येय गाठले. महत्वाचे म्हणजे, तुम्हाला स्वतःच या मार्गावर चालले पाहिजे.'*_
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*संदर्भ : जगण्याची कला*
*संकलन : महेश कांबळे*
*२२/१०/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
No comments:
Post a Comment