Tuesday, 31 August 2021

गोपनीयता न राखणारे नऊ प्रकारचे व्यक्ती

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

   *_गोपनीयता न राखणारे नऊ प्रकारचे व्यक्ती_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

             *_भंते, गुप्त गोष्टी सुद्धा न पचविता त्या जिकडे तिकडे सांगत सुटणारे नऊ प्रकारच्या व्यक्ती विद्यमान आहेत. कोणतीही सांगितलेली गोष्ट ते हृदयात ठेऊ शकत नाही."_*

           *_"ते नऊ प्रकारचे लोक कोणते आणि त्यांच्यातील दोष कोणता?"_*

       *_ते नऊ प्रकारचे लोक असे-_*

*१)* _लालसी मनुष्य लालसेच्या आहारी जाऊन गुप्त गोष्ट प्रसूत करतो_

*२)* _द्वेषी मनुष्य विध्वंसक विचारसरणीमुळे कटाला बळी पडून गुप्त गोष्ट प्रसूत करतो_

*३)* _भ्रमिष्ट मनुष्य मोहाला बळी पडून गुप्त गोष्ट प्रसूत करतो_

*४)* _भित्रा मनुष्य भेकड स्वभावामुळे गुप्त गोष्ट प्रसूत करतो_

*५)* _घुसखोर मनुष्य स्वार्थापायी गुप्त गोष्ट प्रसूत करतो_

*६)* _स्त्री ही आपल्या दुर्बलतेमुळे गुप्त गोष्ट प्रसूत करते_

*७)* _दारुड्या मनुष्य दारूच्या नशेत सर्व गुप्त गोष्ट प्रसूत करतो_

*८)* _नपुंसक मनुष्य आपल्या अपूर्णत्वामुळे सर्व गोष्टी प्रसूत करतो_

*९)* _बालक आपल्या मनमोकळेपणामुळे गुप्त गोष्टी न पचविता उघड करून टाकतो_


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*

*संकलन : महेश कांबळे*

http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Monday, 30 August 2021

धार्मिक चर्चा करण्यास अयोग्य अशा आठ व्यक्ती

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

   *_धार्मिक चर्चा करण्यास अयोग्य अशा आठ व्यक्ती_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


             *_भंते नागसेन, चर्चेचा विषय बिघडवून अर्थाचा अनर्थ करणारे आठ प्रकारचे लोक असतात. म्हणून महत्वपूर्ण चर्चा करीत असता त्यांचा संग टाळला पाहिजे," ते आठ प्रकारचे लोक असे -_*

*१)* लालसी

*२)* द्वेषी म्हणजे दुष्ट

*३)* भ्रमिष्ट

*४)* गर्विष्ठ

*५)* लोभी

*६)* आळशी

*७)* एकच कल्पना धरून ठेवणारी हट्टी

*८)* मूर्ख


          _स्थविर म्हणाले, "महाराज, या आठ प्रकारच्या लोकांत कोणते दोष आहेत की, जेणेकरून त्याचा संग त्याज्य मानला आहे?_

       *_भंते, लालसी व्यक्ती लालसेपायी, दुष्ट व्यक्ती आपल्या दुष्टपणाने, भ्रमिष्ट व्यक्ती अभिभूत स्वभावामुळे म्हणजे भ्रामक कल्पनांमुळे, गर्विष्ठ व्यक्ती गर्वाभिमाने, लोभी व्यक्ती लोभाच्या कारणाने, आळशी मनुष्य आळसामुळे, एकच कल्पना धरून ठेवणारा हट्टी मनुष्य संकुचितपणाने आणि मूर्ख व्यक्ती मुर्खपणामुळे एकदमच अर्थाचा विचका करून टाकतो."_*


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*

*संकलन : महेश कांबळे*

http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Sunday, 29 August 2021

शब्द माझा परंतु अर्थ तुमचा

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

       *_शब्द माझा परंतु अर्थ तुमचा_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


                  _एकदा एका रात्री तथागत आपल्या भिक्षूंना उपदेश देत होते. त्यात *एक चोर व गणिका* त्यांचा उपदेश ऐकण्यासाठी बसले होते. जेव्हा तथागत रात्री उपदेश देत असत तेव्हा शेवटी म्हणत, *भिक्षु हो! आत्ता जा, रात्रीचे काम पूर्ण करण्याची वेळ आली आहे. तुम्ही जा, रात्रीचे काम पूर्ण करा."*_

           _रात्रीचे काम होते ध्यानाला बसणे सर्व जग जेव्हा झोपेल तेव्हा तुम्ही जागे रहा. सर्व जगाचा हल्लाकल्लोळ बंद होईल तेव्हा तुम्ही शांततेत लीन व्हा. सर्व तऱ्हेचा गोंधळ शांत झाल्यावर त्या मौल्यवान वेळेचा सदुपयोग करा!_

              _अर्ध्या रात्री खेरीज ध्यानाला दुसरी योग्य वेळ नाही. रोज रोज तेच सांगायचे की ध्यान करा, म्हणून भगवान म्हणाले, 'आत्ता जा रात्रीचे काम पूर्ण करा.'_

             _जेव्हा भगवान असे म्हणाले, तेव्हा तो *चोर* चमकला, मनात म्हणाला, भगवान म्हणतात ते योग्यच आहे. जवळजवळ अर्धीरात्र झाली आहे. आपल्या कामाला लागावे, लोक झोपले असतील हीच योग्य वेळ आहे. *गणिका* म्हणाली, 'धन्य आहे! कसे इतक्या लोकांत बुद्धांनी मला ओळखले आणि आठवण करून दिली. चला कामाला सुरुवात करावी.'_

                  _दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान म्हणाले, "रात्री येथे एक चोर आणि गणिका माझा उपदेश ऐकण्यासाठी आले होते. भिक्षूंनो! तुम्ही ध्यान करण्याकरिता निघून गेलात, *चोर चोरीसाठी गेला आणि गणिका आपल्या कामासाठी निघून गेली.* सगळे असे समजून निघून गेलात की मी जणू काही तुम्हांला हवे तेच सांगितले होते._

                 _*"तुम्ही तर तेच ऐकता जे तुम्हाला अभिप्रेत आहे. तुम्ही ऐकणार तर तुमचेच शब्द ना! शब्द माझे असले तरी अर्थ तुमचा असतो. अर्थ माझा असूच शकत नाही. शब्द माझ्या मुखाद्वारे निघून तुमच्या कानात ध्वनी निर्माण करतात. अर्थ तर माझ्या प्राणातून निघून माझ्या प्राणातच राहतो. पुन्हा तो शब्द गुंजरावत तुमच्या हृदयात जातो. तुमच्या हृदयात तुमच्या धारनेनुसार त्याला अर्थ दिला जातो. शब्द माझे परंतु अर्थ तुमचा असतो.*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ : नमो तस्स* *लेखक पी बी पिसाळ*          

*संकलन : महेश कांबळे*

http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Saturday, 28 August 2021

धर्म चर्चेस अयोग्य अशी आठ स्थाने

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

    *_धर्म चर्चेस अयोग्य अशी आठ स्थाने_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

             

             _राजा मिलिंद आणि त्यांचे गुरू नागसेन हे दोघेही ठरल्याप्रमाणे एका शांत ठिकाणी पोहचले. तेव्हा राजा म्हणाला, *" भंते, धर्माच्या गूढ अशा रहस्यमय तत्त्वावर चर्चा करणारांनी आठ प्रकारच्या स्थळांना टाळणेच बरे. या आठ ठिकाणी कोणताही बुद्धिमान मनुष्य अशा धर्मचर्चा करणार नाही. कारण चर्चा करून सुद्धा काहीच निर्णय लागत नाही आणि मुद्दा तसाच पडून राहतो."*_         

 *ही आठ स्थाने अशी आहेत*

*१)* चढउताराचे स्थान

*२)* असुरक्षित भयावह असे स्थान

*३)* वादळी वारे वहात असलेले स्थान

*४)* अत्यंत गुप्त असे स्थान

*५)* पवित्र असे देवस्थान

*६)* जेथे अधिक रहदारी आहे असे स्थान

*७)* पूल

*८)* घाट

         _स्थविर म्हणाले, "महाराज या स्थळांमधील दोष कोणते? की, जेणेकरून ही स्थाने त्याज्य मानावी?"_

           राजा म्हणाला, 

*_"भंते चढउतार असलेल्या स्थानावर मन लागत नाही, त्यामुळे चर्चा विस्कटल्या जाऊन कोणताच निष्कर्ष निघत नाही."_*

*_" असुरक्षित ठिकाणी काळजीने चित्ताची तारांबळ उडते असते, त्यामुळे चर्चेत मन लागत नाही."_*

*_"अधिक वादळी वारे वाहत असलेल्या ठिकाणी परस्परांचे शब्द नीट ऐकू येत नाहीत."_*

*_"अत्यंत गुप्त अशा स्थानी चर्चा करीत असता कोणी दुसरा ती लपून ऐकण्याची शक्यता असते."_*

*_"पवित्र देवस्थानी चर्चेचा विषय विनाकारण गंभीर होण्याची शक्यता असते."_*

*_"अधिक रहदारी असलेल्या रस्त्यावर चर्चेचे स्वरूप उद्धटपणाचे होण्याची शक्यता असते."_*

*_"पुलावर बसून चर्चा करीत असता त्यात चंचलता येऊन संभाषण उथळ होण्याची शक्यता असते."_*

*_"सार्वजनिक घाटावरील चर्चा सर्वस्वी जाहीर होतात."_*

         *_यासाठीच असे म्हटले आहे की, धार्मिक विषयावर सल्लामसलत करण्याकरिता ही आठ स्थाने त्याज्य मानली पाहिजेत._*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*          

*संकलन : महेश कांबळे*

http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Friday, 27 August 2021

सद्धर्म आणि असद्धर्म यांचा संकर करू नका

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सद्धर्म आणि असद्धर्म यांचा संकर करू नका_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                  *_जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहचू शकत नाहीत. जे खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहचू शकत नाहीत._*

            *_जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून ओळखतात त्यांच्या ठिकाणी सम्यकदृष्टी आहे, त्यांना सत्य लाभते._*

           *_घर नीट शाकरलेले नसले तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी गळू लागते त्याप्रमाणेच असंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करते._*

          *_घर नीट शाकरलेले असले की  त्यात पावसाचे पाणी शिरू शकत त्याप्रमाणेच सुसंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करू शकत नाही._*

           *_उठा! प्रमादी राहू नका. धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागत रहा. जो त्या प्रमाणे वागतो तो इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतो. सन्मार्गाचा अवलंब करा. कुमार्गाचा अवलंब करू नका. सन्मार्गाने जाणारे लोक इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतात._*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ:*

*बुद्ध आणि त्यांचा धम्म*

*धम्मपद*            

*संकलन : महेश कांबळे*

http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Thursday, 26 August 2021

सम्यक मार्गानुसरण

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                  *_सम्यक मार्गानुसरण_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

              *_सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका. मार्ग विपुल आहेत. परंतु सर्वच काही सम्यक मार्गाकडे नेत नसतात. सम्यक मार्ग हा केवळ थोडक्यांच्या सुखासाठी नाही. तो बहुजन सुखासाठी आहे. तो प्रारंभी, मध्ये आणि शेवटीही कल्याणप्रद असला पाहिजे. सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवनमार्गाचे अनुसरण होय._*

              *_अष्टांगमार्ग हा श्रेष्टमार्ग आहे. सर्वश्रेष्ठ सत्यांमध्ये सत्यचतुष्ट्य आहे; श्रेष्ठ वैषयीक अनासक्ती हा सर्वश्रेष्ठ गुण आहे आणि ज्याला हे पाहण्याची दृष्टी आहे तो श्रेष्ठ पुरुष होय. प्रज्ञाशुद्धीचा हा एकमेव मार्ग आहे. दुसरा नाही, याच मार्गाने जा. जर तुम्ही या मार्गाचे अनुकरण केले तर तुमच्या दुःखाचा निरास होईल. दुःखकंटक कसे काढून टाकता येतील हे कळल्यावर, मी या मार्गाचा उपदेश केला._*

        *_तथागत हे केवळ पथ-दर्शक आहेत. (स्वोन्नतीचा) प्रयत्न ज्याचा त्याने स्वतः करावयाचा असतो._* 

           *_सर्व स्पष्ट पदार्थ हे विनाशाधीन आहेत, हे जो ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही. सर्व रूपे अनित्य आहेत. जो हे ओळखतो त्याला दुःख स्पर्श करीत नाही._*

          *_जेव्हा जागे व्हायला पाहिजे तेव्हा तो जागा होत नाही, जो तरुण आणि बळकट असूनही सुस्तपणाच्या आहारी गेलेला असतो, ज्याची इच्छा आणि विचार झोपी गेलेले असतात, त्या आळशी मनुष्याला कधीही ज्ञान होणार नाही._*

          *_भाषणात सावध असणे, विचारात संयम राखणे, कायेने कोणतेही पाप न करणे, हे काया-वाचा-मनसा आचरावयांचे तीन मार्ग अवलंबिल्यावर प्रज्ञावंतांनी निर्देशिलेल्या मार्गाने माणसाला जाता येते._*

            *_वास्तविक ज्ञानाने लाभ होतो आणि त्याच्या अभावाने नाश होतो. लाभाचे आणि नाशाचे हे दुहेरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा. शरदऋतुतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रीती खुडुन काढावी. शांतीचा मार्ग जवळ करावा. सुगताने निर्वाणाचा मार्ग निर्दिष्ट केला आहे. अधर्माने वागू नका. अविचाराने जगू नका. दुष्ट सिद्धांताचे अनुकरण करू नका.जागे व्हा. सुस्त पडू नका. सद्गुणांची कास धरा. जो पूर्वी अविचारी होता आणि नंतर सुविचारी झाला तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जग तेजस्वी करतो. जो दुष्कृत्ये सोडून सत्कृत्ये करू लागला आहे तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो._*

           *_एका धर्मनियमाचे उल्लंघन करून जो असत्य बोलतो तो कोणते दुसरे दुष्कृत्य करणार नाही, हे सांगवत नाही. जे सदैव सावधान असतात, जे रात्रंदिवस अभ्यास करतात जे निर्वाणासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतात, त्यांचे दुर्विकार (आसव) शेवटी लोप पावतात._*

          *_अशी एक जुनी म्हण आहे की, जो स्तब्ध बसतो, त्याला लोक दूषण लावतात. जो फार बोलतो त्याला लोक दूषण लावतात आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही दूषण लावतात. खरोखर, ज्याला दूषणच लावले जात नाही असा या जगात कोणीच नाही. ज्याला सदैव दूषण देतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता, आता नाही आणि पुढेही कधी होणार नाही._*

           *_वाणीच्या क्रोधापासून सावध रहा आणि जिभेचा संयम करा. मानसिक पापांचा त्याग करा आणि आपल्या मनानेही सद्गुणांचा आचार करा. अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे. प्रमाद मृत्यूचा मार्ग आहे. जे अप्रमादी आहेत ते अमर आहेत आणि जे प्रमादी आहेत ते मृतवत आहेत._*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ:*

*बुद्ध आणि त्यांचा धम्म*

*धम्मपद*         

*संकलन : महेश कांबळे*

http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Wednesday, 25 August 2021

ढोंग

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                      *_ढोंग_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


              *_खोटे बोलू नये. खोटे बोलण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करू नये. खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये. सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे._* 

             *_तथागत जसे बोलतात तसे वागतात, तथागत जसे वागतात तसे बोलतात. ते यथाभाषी तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळे त्यांना तथागत म्हणतात._*

           *_हा बौद्ध जिवनमार्ग आहे._*


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ:*

*बुद्ध आणि त्यांचा धम्म*

*संकलन : महेश कांबळे*

http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Tuesday, 24 August 2021

जागरूकता, कळकळ आणि धैर्य (अप्रमाद आणि वीर्य)

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  *_जागरूकता, कळकळ आणि धैर्य (अप्रमाद आणि वीर्य)_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

          

                  *_शहाणा मनुष्य आपल्या जागरूकतेने निष्काळजीपणा बाजूला सारून प्रज्ञेच्या शिखरावर चढतो आणि दुःख विमुक्त होऊन तो तेथून दुःखात सापडलेल्या मानव जातींकडे पाहात असतो. शहाण्या माणसाच्या दृष्टीस मूर्ख हा पर्वतशिखरावरून दरीतील दिसणाऱ्या माणसासारखा आहे._*

       *_निष्काळजी लोकांमध्ये जागरूक, निद्रितांमध्ये जागृत असा तो शहाणा मनुष्य उमदा घोडा जसा अडेलतट्टूला मागे टाकून पुढे जात असतो तशी प्रगती करीत असतो._*

           *_निष्काळजीपणाच्या आधीन होऊ नका, कामभोगापासून दूर राहा, जागरूक मनुष्य चिंतनशील असतो. दक्षता (अप्रमाद) अमर आहे. अविचार (प्रमाद) मृत्यूचे पद आहे. अप्रमादी हे कधीच मरत नाहीत. उलट प्रमादी हे मृतवतच आहेत_*

         *_दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या ठरविलेल्या हेतुपासून विचलित होऊ नये. एकदा ध्येय हाताशी लागले की निग्रहाने ते धरून ठेवा. सावधान-चित्त राहा. आळस सोडा. सम्यक मार्गाचा अवलंब करा, जो या जगात सम्यक मार्गाचा अवलंब करतो तो खरोखरच सुखी असतो._*

          *_आळशीपणा म्हणजे अपयश, सुस्तपणा म्हणजे अपवित्रता. सतत प्रयत्न आणि सम्यक दृष्टी ह्यांच्या साहाय्याने शरीरात घुसलेला आळशीपणा - हा विषारी बाण उपटून काढा._*

          *_प्रमादात फसू नका. विषयोपभोगात आसक्त राहू नका. अप्रमत्त बना व ध्यानात मग्न राहून विपुल सुख संपादन करा._*

        *_जो अप्रमत्त आणि जागरूक आहे, स्मृतिमान आहे, सुविचारपूर्वक काम करणारा आहे; जो संयमी आहे, जो विचारपूर्वक आचरण करणारा आहे व अप्रमत्त आहे - अशा पुरुषाचे यश सारखे वाढत असते._*


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ:*

*बुद्ध आणि त्यांचा धम्म*

*धम्मपद* 

*संकलन : महेश कांबळे*

http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Sunday, 22 August 2021

विवेकशीलता आणि एकाग्रता

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

         *_विवेकशीलता आणि एकाग्रता_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


          *_प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा. सावधान राहात जा. आस्थायुक्त आणि धैर्यशील राहात जा, हा बौद्ध जीवनमार्ग होय._*

          *_आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचा परिणाम आहे. ते सर्व आपल्या विचारांवर अधिष्टित आहे आणि आपल्या विचाराचेच बनलेले आहे. जर मनुष्य दुर्विचाराने बोलु लागेल, कृती करू लागेल तर दुःख त्याचा पाठलाग करीत राहते. शुद्ध विचाराने बोलले आणि चालले तर सौख्य चालून येते. म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्व आहे._*

        *_अविचारी बनू नका. आपल्या विचारांवर लक्ष असू द्या. कर्दमात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळीक करण्यासाठी झटतो त्याप्रमाणे असत् मार्गापासून आपली मुक्तता करा._*

        *_शहाण्या माणसांनी आपल्या विचारांची राखण करावी. कारण ते कळायला कठीण, अतिशय धूर्त, असून, जिकडे वाट मिळेल तिकडे ते सैराटासारखे धावत राहातात. सुरक्षित विचार हे सौख्यदाते आहेत._*

          *_कशा तरी शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहते त्याप्रमाणे चिंतनरहित मनात विकार प्रवेश करतात. ज्याप्रमाणे व्यवस्थित शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही त्याप्रमाणे चिंतनयुक्त मनात विकाराला प्रवेश लाभत नाही._*

        *_माझें मन एका काळी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भरकटत होते; परंतु ज्याप्रमाणे माहूत अंकुशाने क्षुब्ध गजाला वळवीत असतो त्याप्रमाणे मी आता आपल्या मनावर स्वामित्व गाजवीत आहे._*

         *_दुर्निवार आणि सैराट अशा मनाला काबूत ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे. काबूत ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे._*

          *_दूरवर भटकणाऱ्या मनाला लगाम घालणारे काम-बंधनापासून विमुक्त होतात._*

        *_जर माणसाची श्रद्धा अचल नसली, तर सद्धर्म त्यास अज्ञात असेल, आणि जर त्याची मनःक्षांती बिघडलेली असेल तर त्याची प्रज्ञा दोषरहीत असू शकत नाही._*

         *_एक द्वेष्टा दुसऱ्या द्वेष्ट्याला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो त्यापेक्षा वाईट मार्गाकडे वळलेले माणसाचे मन अधिक उपद्रव निर्मिते._*

      *_आईबाप, आप्तेष्टांपेक्षाही चांगल्या मार्गाकडे वळलेले मन आपले अधिक हित करते._*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ:*

*(१) बुद्ध आणि त्यांचा धम्म*

*(२) धम्मपद*           

*संकलन : महेश कांबळे*

http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Saturday, 21 August 2021

प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼        

           _*प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

               *_बुद्धिमान व्हा, न्यायी व्हा आणि सत्संगती करा. हा बौद्ध जीवनमार्ग आहे._*

          *जो मनुष्य काय वर्ज्य करावे हे तुम्हाला दाखवितो, जो तुमच्या दोषांबद्दल तुम्हाला वाक्ताडन करतो आणि जो बुद्धिमान आहे अशा माणसाच्या हातून, ज्याप्रमाणे गुप्त धन दाखविणार्या माणसामागून तुम्ही जाता त्याप्रमाणे तुम्ही जात रहा. अशा सत्पुरुषांचे अनुयायित्व हे तुमचे वाईट करणार नाही. भले करील.*

       *जो चुकल्यास रागे भरतो; जो शिकवितो; अनुचित करण्याचा प्रतिबंध करतो तो सुजनांचा प्रिय आणि दुर्जनांना अप्रिय वाटतो. पापी आणि नीच मनुष्याची संगत करू नका. सदाचारी पुरुषांची मैत्री करा. श्रेष्ठ पुरुषांची मैत्री करा. जो धर्मामृताचे सेवन करतो त्याचे मन गंभीर असते आणि जीवन सुखी असते. सज्जन हे श्रेष्ठ पुरुषाने उपदेशिलेल्या धर्माने आनंद पावतात.*

       *_पाटकार माळी कालव्यातून आपल्या इच्छेप्रमाणे पाण्याला वळण देतो, बाणाकार बाणाला नीट वळवितो, सुतार लाकडाच्या ओंडक्याला वळण देतो, त्याप्रमाणे शहाणे लोक स्वतःला नियमानुसार वागण्याचे वळण देतात._*

        *_सत्पुरुष कोणत्याही परिस्थितीत दक्षतेने चालतात. ते इच्छातृप्तीच्या निमित्ताने बोलत नसतात. सुखाचा स्पर्श होवो अथवा दुःखाचा स्पर्श होवो ते कधीही आनंदाने उन्नत झालेले किंवा निराशेने पछाडलेले दिसत नाहीत._*

         *_जीवनप्रवाशाला स्वतःहून श्रेष्ठ किंवा स्वतःच्या योग्यतेचा पुरुष भेटला नाही तर त्याने निग्रहाने एकलेपणानेच प्रवास करावा. परंतु मुरळाचा सहवास मात्र कधीही करू नये._*

          *मूर्ख ज्या प्रमाणात स्वतःचा मूर्खपणा ओळखतो, त्या प्रमाणात तो शहाणा असतो; परंतु जो मूर्ख स्वतःला शहाणा समजतो तो खरोखर पुरा मूर्ख होय. मूर्ख मनुष्याला आयुष्यभर सत्संगती लाभली तरी ज्याप्रमाणे पळीला आमटीची चव कळत नाही त्याप्रमाणे त्याला लाभलेल्या सत्संगतीचे सत्य समजत नाही. अल्पबुद्धीचे मूर्ख हे स्वतःचेच शत्रू असतात; कारण ते दुष्कृत्ये करतात आणि त्याची कटू फळे त्यांना चाखावी लागतात. मूर्खाला खुशाल खोटी प्रसिद्धी, भिक्षुमध्ये अग्रमान, विहारात स्वामित्व, लोकांमध्ये सन्मान यांची खुशाल हाव धरू ध्या. कितीही बहुभाषी असला, वर्णाने कितीही सुंदर असला तरीही जो मत्सरी, कृपण, अप्रामाणिक आहे तो सन्मानास पात्र ठरत नाही.*

       *ज्याच्या ठिकाणी हे सर्व दुर्गुण नाहीत, ज्याचे दुर्गुणाचे आमूलाग्र उच्चाटन झालेले असते, तो दोषयुक्त आणि शहाणा असतो तो सन्माननीय होय. जो मनुष्य एखादी गोष्ट हिंसेने तडीस नेतो, जो न्यायी नव्हे, उलट जो सत् आणि असत् यात भेद करतो, जो स्वतः पंडित असून इतरांना मार्ग दर्शवितो, जो स्वतः धर्मरक्षक असून हिंसेऐवजी बुद्धीने आणि धर्माने मार्गदर्शन करतो त्यालाच न्यायी पुरुष म्हणतात. फार बोलतो एव्हढ्यावरूनच कोणीही पंडित ठरत नाही. जो क्षमाशील आहे, जो द्वेष आणि भय यांच्यापासून मुक्त झाला आहे तोच पंडित होय. फार बोलतो एव्हढ्यावरून कोणी धम्माचा आधारस्तंभ ठरत नाही. जती माणसाचे ज्ञान अल्प असले तरी जो धम्माला साक्षात पाहतो, जो धम्माची कधीही हेळसांड करीत नाही तोच धम्माचा आधारस्तंभ असतो.*

       *माणसाला दूरदर्शी, शाहणा, संयमी सहचारी भेटला तर त्याने त्याचा सहवास करावा. त्याच्याबरोबर आल्या संकटावर मात करावी, आनंदाने परंतु विचारीपणाने त्याची संगत धरावी. जर माणसाला दुरदृष्टिचा, शहाणा, संयमी सोबती लाभला नाही तर त्याने जसा एखादा राजा जिंकलेला प्रदेश मागे सोडून गजराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो, त्याप्रमाणे त्याने आपला जीवनपथ एकट्यानेच आक्रमावा.*

      *_जगात मातेची - पित्याची - श्रमणाची अवस्था सुखकर आहे. वार्धक्यातही टिकणारा सद्गुण सुखदायक, खोलवर मुळे जाऊन दृढ झालेली श्रद्धा सुखकर, ज्ञानार्जन सुखकर, पापत्याग सुखदायक. माणसाने शहाण्या, बुद्धिमान, पंडित, क्षमाक्षील, कर्तव्यदक्ष श्रेष्टच्या मार्गाने जावे. ज्याप्रमाणे चंद्र नक्षत्रांच्या मार्गाने जातो त्याप्रमाणे अशा प्रज्ञावान सुजनांचे अनुयायी व्हावे. डामडौल, प्रीती आणि आसक्ती ह्यांच्या उपभोगांची कास धरू नका. ज्याच्या ठिकाणी कळकळ आहे त्याच्या वाट्याला पुरेसा आनंद येतो_*

         *_आंतरिक तळमळीने पंडित जेव्हा अंगच्या गर्वाचा निराश करतो तेव्हा तो शहणपणाच्या एकाहून उंच अशा शिखरावर चढून मूर्खांकडे तुच्छतेने पाहात असतो. दुःखापासून विमुक्त झालेल्या माणसांना पाहात असतो, त्याप्रमाणेच दुःखात मग्न असलेल्या लोकांकडे पाहात असतो. अविचारी माणसात विवेकशील, निद्रिस्तात जागृत असा तो शाहणा मनुष्य दुबळ्यांना मागे सारून पुढे जात असतो._*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*

*संकलन : महेश कांबळे*

http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Friday, 20 August 2021

आपण आणि आत्मविजय

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

               *_आपण आणि आत्मविजय_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


             *_जर स्वतःला स्वत्व असेल तर त्या स्वत्वावर विजय मिळविण्याचा (आत्मविजय) परिपाठ ठेवावा. हा बौद्ध जीवनमार्ग आहे._*

         *_मनुष्य हा स्वतःचाच स्वामी आहे. दुसऱ्या कोणाचा स्वामी असू शकणार? मनुष्य जेव्हा स्वतःचा संयम करू शकतो तेव्हा त्याच्यासारखा स्वामी मिळणे कठीण. जो मूर्ख मनुष्य अर्हत, शीलवान माणसाचे शासन उल्लंघितो आणि खोट्या धर्म सिद्धांतांच्या मागे लागतो, त्याचे ते दुष्कृत्य कथ्थक बोरूच्या फळासारखे त्याच्या स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत होते._*

       *_आपणच पाप करतो आणि आपणच त्यामुळे मलिन होतो. आपणच पापाचा त्याग करतो, आपणच आपणाला शुद्ध करू शकतो; शुद्धी आणि अशुद्धी ह्या स्वतःवरच अवलंबुन असतात. कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही._*

        _*जो केवळ सुखोपभोगांसाठी हपापलेला आहे, जो असंयमित, खादाड, आळशी आणि दुबळा आहे, तो आपल्याच आतताईपणाने नाश पावेल. ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळे झाड नाश पावते त्याप्रमाणे.*_

        *_ज्याच्या ठिकाणी भोगलालसा नाही, ज्याने इंद्रियदमन केलेले आहे, जो खाण्यात नेमस्त असतो, जो विश्वासार्ह व बळकट असतो तो ज्याप्रमाणे वज्रकायपर्वत वाऱ्याने उलथून पडत नाही त्याप्रमाणे तो पतन पावत नाही._*

         *जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे.*

       *_प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी. मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये. स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो._*

        *_स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भुर्दंड भरावा लागतो. माणूस स्वतःला स्वतःच शुद्ध करू शकतो. तेथे दुसरा कोणी शुद्ध करण्याला येत नाही. युद्धात शेकडो वीरांना जिंकणारा परमवीर नसून, जो आत्मविजय मिळवितो टोकंग परमवीर होय_*

          *_मनुष्य हा स्वतःच स्वतःचा संरक्षक असतो. त्याला दुसरा कोण संरक्षक असणार? जो स्वतःच स्वतःचे रक्षण करू शकतो त्याला स्वतःसारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे. जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे._*


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*

*संकलन : महेश कांबळे*

http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Thursday, 19 August 2021

मनुष्य, मन आणि मनोमल

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

   *_मनुष्य, मन आणि मनोमल_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

              

                 *_मन घडविते तसा मनुष्य होतो, जो सत् आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे, हा संस्कार पुण्यमार्गातील पहिले पाऊल होय. बौद्ध जीवनमार्गाची ही मुख्य शिकवणूक आहे._*

                  *_मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मनःप्रधान आहेत._*

                  *_मनुष्य जर दुष्ट चित्ताने बोलेल किंवा वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करते, त्याप्रमाणे दुःख अशा दुष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते._*

                    *_मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्या बरोबरच असते त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्या बरोबर राहते._*

                       *_मन हे ओढाळ, चंचल, दुर्निवार व दुर्धर आहे. बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला, एकाग्र व सरळ करतो._*

                   _पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफडते, त्याप्रमाणे माराच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकुळ असते._ _*ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे, जे फार चंचल आहे, जे सदैव सुखासाठी वखवखलेले असते अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे, कारण दमन केलेले मन फार सुखदायक असते.*_ _तू आपल्या स्वतःस एक द्वीप (बेट) बनव. परिश्रमाने चित्तमळ नाहीसा होईल. दोषरहीत झाल्यावर तू दिव्य भूमिला पोहोचशील._

                  _*ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रुप्यातील हिण कणाकणाने जाळून टाकतो त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा नाहीसा करतो. लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचा नाश करतो त्याप्रमाणेच पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतिकडे नेत असते.*_

                   _*सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अज्ञानाचा कलंक. भिक्खुंनो, या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा.*_

                 *_जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे, उचापती करणारा आहे, अपमान करणारा आहे, बेछूट आहे आणि नीच आहे अशा माणसाला जीवन सुकर आहे. परंतु जो विनम्र आहे, पवित्र-अपवित्र यांचा विचार करतो, अनासक्त आहे, शांत आहे, निर्मल आहे अशा बुद्धियुक्त मनुष्याला जीवन कठीण आहे. जो हिंसा करतो, असत्य भाषण करतो, जो न दिलेले हिरावून घेतो, जो परदागमन करतो आणि जो मनुष्य उन्मादक मद्यपानात मग्न राहतो. तो मनुष्य इहलोकी आपले थडगे खणीत असतो._*

              *_माणसा, हे लक्षात ठेव, संयमहिनांची स्थिती चांगली नव्हे; लोभ आणि पापकर्म तुला चिरकाल दुःखात लोटणार नाही याची काळजी घे. जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते, जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्नपाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही. परंतु ज्याच्या मनातून ह्या असल्या विचारांचे निर्मुलन झाले आहे त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती लाभते._*

                 *_कामासारखा अग्नी नाही आणि लोभासारखा लोंढा नाही. परदोष हे सहज दिसतात. परंतु स्वतःचे दोष क्वचितच दिसतात. ज्याप्रमाणे धान्याचा तूस पाखडावा, त्याप्रमाणे माणूस आपल्या शेजाऱ्याचे दोष पाखडीत असतो. परंतु ज्याप्रमाणे कपटी जुगारी, अपेशी फारसा लपवून ठेवतो त्याप्रमाणेच मनुष्य स्वतःचे दोष लपवित असतो. जो मनुष्य परदोषच पाहात राहतो आणि स्वतःचे दोष उघड होताच चिडू लागतो, त्याचे दोषविकार वाढतात आणि तो त्या विकारांच्या विनाशापासून दूर दूर जात राहतो._*

            *_पापापासून दूर राहा, स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा ही भगवान बुद्धाची शिकवण आहे._*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*

*संकलन : महेश कांबळे*

http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Wednesday, 18 August 2021

क्रोध आणि वैर

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                *_क्रोध आणि वैर_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

           *_मनात क्रोधभावना ठेवू नका, वैरभाव विसरा व आपल्या शत्रुलाही प्रेमाने जिंका हा बौद्ध जीवनमार्ग आहे._*

        *क्रोधाग्नी शमन करा.*  _तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागविले, त्याने माझ्यावर कुरघोडी केली, मला लुबाडले असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात, त्याचा क्रोधविकार कधीही शमत नाही._ *_ज्याच्या मनात असे विचार उठत नाहीत, त्याचा क्रोध शांत झालेला असतो._*

      *_शत्रू शत्रूच्या वाईटावर, द्वेष्टा द्वेष्टाच्या वाईटावर टपलेला असतो._* _माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे, असाधुत्वावर साधुत्वाने जिंकावे._

          _खरे बोलावे, रागावू नये, मागीतल्यानंतर थोडे तरी द्यावे. क्रोध सोडावा, अभिमानाचा त्याग करावा. सर्व बंधनांवर जय मिळवावा येणेप्रमाणे जो *नामरूपाविषयी अनासक्त असतो असा* अपरिग्रही दुःख भोगत नाही._

        *_वाढत्या क्रोधाला तो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबवून धरतो, त्यालाच मी खरा सारथी म्हणतो. बाकीचे नुसते लगाम धरणारेच आहेत._*

        *_ज्यामुळे वैर वाढते, पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसते; परंतु ज्याने जयपराजयाच्या कल्पनेचा त्याग केला आहे असा शांत पुरुष सुखाने झोप घेतो._*

      *_कामाग्नीसारखा अग्नी नाही आणि द्वेषासारखा दुर्दैव नाही. उपादान स्कंधासारखे दुःख नाही. निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही._*

      *_वैराने वैर कधीच शांत होत नाही. प्रेमानेच ते शांत होते_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*

*संकलन : महेश कांबळे*

http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Tuesday, 17 August 2021

क्लेश आणि द्वेष

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

   *_क्लेश आणि द्वेष_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

            *_कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्यासंबंधी द्वेषभावना बाळगू नका, हा बौद्ध जीवनमार्ग आहे._*

          *_ज्याप्रमाणे जातिवंत घोडा हा चाबकाचा फटकारा अंगावर पडण्याला संधी देत नाही, त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही असा या जगात दोषरहीत पुरुष कोण आहे?_*

         *_श्रद्धा, शील, वीर्य, समाधी, सत्यशोध, विद्या आणि आचरण यांची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने महान दुःखाचा अंत करा. क्षमा परमतप आहे. निर्वाण परमपद आहे असे बुद्ध सांगतात. दुसऱ्याची हिंसा करणारा व दुसर्यांना त्रास देणारा प्रवजित खरा श्रमण होऊ शकत नाही._*

          *_कोणाचीही निंदा न करणे, कोणालाही क्लेश न देणे व प्रतिमोक्षांच्या नियमांचे पालन करणे हा बुद्धाचा उपदेश आहे. स्वतः हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांना साहाय्यही करू नका._*

       *_जो स्वतः सुखाच्या शोधात आहे, त्याप्रमाणेच जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्यांची हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट करू देत नाही त्याला सुख प्राप्त होईल. विभग्न झालेल्या घंटेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मूक आहे त्याला निब्बाणपद लाभलेलेच आहे._*

        *जो निष्पाप निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते.*

       *_जो क्षमारुप वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध, शांत, संयत आणि शुद्धाचरणी आहे, जो दुसऱ्याचे दोष काढत बसत नाही तो खरोखर श्रमण अथवा भिक्खु होय._*

*_ज्याप्रमाणे जातिवंत घोडा हा चाबकाचा फटकारा अंगावर पडण्याला संधी देत नाही त्यासाठी काळजी घेतो, त्याप्रमाणे या जगात आपल्याला दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाचा, लज्जेने संयम करणारा असा या जगात एक तरी मनुष्य आहे काय?_*

           *_जर माणसाने निरुपद्रवी, शुद्धाचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावरच येऊन पडते त्याप्रमाणेच त्या माणसाला त्या उपद्रवाचा दुष्पपरिणाम भोगावा लागतो._*


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ : बुद्ध आणि त्यांचा धम्म*

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

लोभ आणि तृष्णा

 


*_लोभ आणि तृष्णा_*

*_लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवन मार्ग आहे._*
_धनाचा सारखा वर्षाव होत राहिला तरी कामना शमत नाही. *सुज्ञ लोक जाणतात की, कामना ही अशक्य व दुःखकर आहे.*_
*_जो स्वर्लोकीच्या कामभोगातही आनंद मानीत नाही, जो तुष्णेचा क्षय करण्यात सदैव रत असतो तो सम्यक सम्बुद्धाचा शिष्य होय._*
*_लोभातून - तृष्णेतून दुःख उत्पन्न होते, लोभातून - तृष्णेतून भय निर्माण होते, लोभापासून - तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांपासून मुक्तता लाभते._*
*_जो जीवनाचे खरे ध्येय विसरून कामभोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो तो ध्यानचिंतनात काळ व्यतीत करणाऱ्याचा द्वेष करू लागतो._* _जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते म्हणून माणसाने कशासंबंधीही आसक्ती ठेवू नये. *ज्यांना कोणतेही अति प्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही त्यांना कोणतीच बंधने नसतात.*_
*_कामभोगापासून - आसक्तीमुळे - कामुकतेपासून - लोभापासून दुःख - भय उत्पन्न होते, जो कामभोगासक्त नाही, आसक्तीच्या - कामुकतेच्या बंधनापासून मुक्त आहे, लोभमुक्त आहे त्याला दुःख - भय नाही._*
*_जो शीलवान व प्रज्ञावान आहे, तो न्यायी आणि सत्यवादी आहे. जो आपले कर्तव्य करणारा आहे अशा पुरुषावर लोक प्रेम करतात._*


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*
*संकलन : महेश कांबळे*

सत्, असत्, आणि पाप

 


*_सत्, असत्, आणि पाप_*



*_शुभ कार्य करीत राहा, अशुभ कर्मात सहयोगी बनू नका. पापकर्म करू नका हा बौद्ध जीवन मार्ग आहे._*
_माणसाने एकदा शुभ कर्म केले की, परत परत शुभ कर्म करीत राहिले पाहिजे. शुभ कर्म इतके अविरत करीत राहावे की, त्यायोगे अंतःकरणातील सर्व इच्छाही शुभ कर्माकडे लागाव्यात. *शुभ कर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे.*_
_शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका. *थेंबाथेंबाने पात्र भरते थोड्याथोड्या शुभ कर्माने शुभकर्म वाढत राहते.*_
_जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही, पश्चात्तापाची पाळी येत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे._
_जोपर्यंत शुभ कर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात; परंतु त्याचे शुभ कार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात. 'ते मला बरोबर साधणार नाही' असे माणसाने शुभ कर्मासंबंधी कधीच बोलू नये, *थेंब पडून पात्र भरते. सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे शुभ कर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो.*_
*_चंदन, धूप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शीलाचा (सदाचरणाचा) सुगंध अधिक असतो. धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो, परंतु शिलाचा सुवास उच्चपदी दरवळत जातो._*
_अशुभ हे शूद्र समजू नका. ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका. थेंबाथेंबाने भांडे भरते. थोडे अशुभ घडता ते वाढत राहते._
_ज्याच्या योगाने / कृत्याने मागाहून खेद किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो असे काम करणे बरे नव्हे._
*_जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किंवा वागु लागला तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरामागून गाडीचे चाक धावत असते त्याप्रमाणेच अशा माणसाच्या मागून दुःख धावत राहते._*
_पापाला अनुसरू नका. या बाबतीत अनवधानी राहू नका. मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका. दुर्विचारांचे दमन करून परिपुर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. जो शुभ कर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये रममाण होते._
*_पापकर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत सुख दिसत राहते. परंतु ज्या वेळी त्याची पापे परिपक्व होतात त्या वेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही. अशुभ मजपर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलत माणसाने अशुभाला कमी लेखू नये. थेंबाथेंबाने भांडे भरते. अगदी अल्प दुष्कृत्ये करता करता, मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो._*
_माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून परावृत्त करून शुभ कर्मासंबंधी प्रवृत्ती वाढविण्याची त्वरा करावी. जर माणूस शुभ कर्म आचरण्यात आळस करू लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रममाण होते._
_माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत पाप करू नये आणि पापाने आनंद मानू नये. पापाची वाढ ही दुःखकारक होते_
*_कुशल कर्म करीत जा, अकुशल कर्म करू नका. कुशल कर्म करणारे इहलोकी धन्यता मानतात._*
_कामुकतेने दुःख - भय निपजते. कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यांपासून विमुक्त होतो._
*_भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वांत मोठे दुःख आहे, हे सत्य उमगले की, निब्बान हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते._*
_ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मीत, स्वपोषित पाप कृत्याचा नाश करते._
*_ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते, त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो, तो त्याच्या शत्रुलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोहचवितो._*
*_दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात. परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्ये असतात ती मात्र करायला कठीण असतात._*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*
*संकलन : महेश कांबळे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
Like
Comment

0

Sunday, 15 August 2021

बालवग्गो

                                                      --------------------------------------------

 *_धम्मपद_*

*_५ बालवग्गो_*

--------------------------------------------

*_दीघा जागरतो रत्ति दीघं सन्तस्स योजनं ।_*

*_दीघो बालानं संसारो सद्धम्मं अविजानातं ।।१।।_*

*_जागणाऱ्याची रात्र लांबत जाते, थकलेल्याचा मैल / रस्ता लांबत जातो,_*

*_सदाचार न जाणणाऱ्या अज्ञानीचा संसार / जीवन प्रवाह लांबत जातो ।।१।।_*

 

*_चरञ्चे नाधिगच्छेय्य सेय्यं सदिसमत्तनो ।_*

*_एकचरियं दळ्हं कयिरा नत्थि बाले सहायता ।।२।।_*

*_चालताना स्वतःसारखा किंवा स्वतःहून श्रेष्ठ सोबती न लाभल्यास,_*

*_खंबीरपणे एकाकी चालावे, अज्ञानाची सोबत करू नये. ।।२।।_*

 

*_पुत्ताम'त्थि धनमत्थि इति बालो विहञ्ञति ।_*

*_अत्ताहि अत्तनो नत्थि कुतो पुत्ता कुतो धनं।।३।।_*

*_माझा पुत्र, माझी संपत्ती, असे अज्ञानी दुःखी होतात,_*

*_स्वतःच स्वतःचे नसतो, तर कसा पुत्र, कशी संपत्ती. ।।३।।_*

 

*_यो बालो मञ्त्रति बाल्यं पण्डितो वापि तेन सो ।_*

*_बालो च पण्डित-मानी स वे बालो ति वुच्चति ।।४।।_*

*_जो मूर्ख आपला मूर्खपणा मान्य करतो, तेवढ्यानेच तो पंडित होतो,_*

*_पण मूर्ख असून जो आपणांस पंडित मानतो त्याला खरा मूर्ख म्हणतात. ।।४।।_*

 

*_यावजीवंपि चे बालो पण्डितं पयिरुपासति ।।_*

*_न सो धम्मं विजानाति दब्बी सूपरसं यथा ।।५।।_*

*_मूर्खाने जरी पंडितांची यावज्जीव पर्युसासना केली तरी त्याला धर्माचे ज्ञान होत नाही,_*

*_जसे पळीला आमटीच्या स्वादाचे ज्ञान होत नाही. ।।५।।_*

 

*_मुहूत्तमपि चे विञ्ञू पण्डितं पायिरुपासति ।।_*

*_खिप्पं धम्मं विजानाति जिव्हा सुपरसं यथा ।।६।।_*

*_सुजाण माणूस क्षणभरही बुद्धिमतांच्या सोबत राहिला तरी...._*

*_त्याला सुसिद्धांत / धम्म समजतो, जसे जिभेला वरणाचा स्वाद. ।।६।।_*

 

*_चरन्ति बाला दुम्मेधा अमित्तेनेव अत्तना ।।_*

*_करोन्ता पापकं कम्मं यं होति कटुकप्फलं ।।७।।_*

*_अज्ञानी, दूर्बूद्ध स्वतःच स्वतःचा शत्रू होतो,_*

*_दुष्कृत्य करून, ज्याची फळे कडू असतात. ।।७।।_*

 

*_न तं कम्मं कतं साधु यं कत्वा अनुतप्पति ।_*

*_यस्स अस्सुनुखो रोदं विपाकं पटिसेवति ।।८।।_*

*_ते कृत्य करणे चांगले नाही, ज्याने पश्चाताप करावा लागतो,_*

*_आणि ज्याचे परिणाम अश्रूपूर्ण चेहेऱ्याने रडत भोगावे लागतात. ।।८।।_*

 

*_तञ्च कम्मं कतं साधु यं कत्वा नानुतप्पति ।_*

*_यस्स पतीतो सुमनो विपाकं पटिसेवति ।।९।।_*

*_ते कृत्य करणे चांगले, ज्याने पश्चाताप करावा लागत नाही,_*

*_आणि ज्याचे परिणाम प्रसन्न चित्ताने, चांगल्या मनाने भोगता येतात.।।९।।_*

 

*_मधुवा मञ्ञति बालो याव पापं न पच्चति ।_*

*_यदा च पच्चति पापं अथ बालो दुक्खं निगच्छति ।।१०।।_*

*_जोवर दुष्कृत्य पक्व होत नाही तोवर अज्ञानी त्याला गोड समजतात,_*

*_जेंव्हा दुष्कृत्य परिपक्व होत्र, तेंव्हा ते दुःखी होतात. (१०)_*

 

*_मासे मासे कुसग्गेन बालो भुग्गेथ भोजनं ।_*

*_न सो संखतधम्मानं कलं अग्धति सोळसिं ।।११।।_*

*_अज्ञानी माणसाने महिनो-महिने गवताच्या टोकाने अन्न खाल्ले,_*

*_तरी तो सुसिद्धांत जाणणाऱ्याच्या सोळाव्या भागाच्या समतुल्य होत नाही. (११)_*

 

*_न हि पापं कतं कम्मं सज्जु खीरंव मुच्चति ।_*

*_डहन्तं बालमन्वेति भस्मच्छन्नोव पावको ।।१२।।_*

*_वाईट केलेली कृत्य ताज्या दुधासारखी त्वरित नासत / परीणामित होत नाहीत,_*

*_ती राखेने अच्छादित निखाऱ्यांसारखी, अज्ञानी मानवाचा पाठलाग करतात. (१२)_*

 

*_यावदेव अनत्थाय ञतं बालस्स जायति ।_*

*_हन्ति बालस्स सुक्कंसं मुद्धमस्स विपातयं ।।१३।।_*

*_अज्ञानीच्या जाणिवांचा आभाळापर्यंत अनर्थ होतो,_*

*_अज्ञानीच्या शुभकृत्यांचा नाश होतो, शिराचा / बुद्धीचा नाश होतो. (१३)_*

 

*_असन्तं भावनमिच्छेय्य पुरेक्खारञ्च भिक्खुसु ।_*

*_अवासेसु च इस्सरायं पुजा परकुलेसु च ।।१४।।_*

*_भिक्खुंमध्ये आदर प्राप्तीची इच्छा, हे दुष्टतेचे, चुकीचे आहे,_*

*_मठ-मंदिराचा उपभोग, परक्या कुळाच्या लोकांकडून पूजिले जाणे...... (१४)_*

    

*_ममेव कतमञ्ञन्तु गिही पब्बजिता उभो ।_*

*_ममेवातिवसा अस्सु किच्चाकिच्चेसु किस्मिच ।_*

*_इति बालस्स सङकप्पो इच्छा मानो च वड्ढति ।।१५।।_*

*_गृहस्थ व प्रवज्जित या दोहोत माझ्यासारखा कोण?_*

*_योग्य-अयोग्य कार्यांवर माझेच स्वामित्व असावे,_*

*_अशी संकल्पना करणाऱ्या अज्ञानीच्या आकांक्षा, गर्व वाढतो. (१५)_*

 

*_अञ्ञा हि लाभुपनिसा अञ्ञा निब्बान गामिनी ।_*

*_एवमेत्तं अभिञ्ञाय भिक्खु बुद्धस्स सावको ।_*

*_सक्कारं नाभिनन्देय्य विवेकमनुब्रूहये ।।१६।।_*

*_लाभाचा मार्ग वेगळा, निर्वाणाचा मार्ग वेगळा_*

*_हे असे जाणून बुद्धाच्या शिष्य भिक्खुने,_*

*_सत्काराने आनंदु नये, विवेकाची वृद्धी करावी. (१६)_*

 --------------------------------------------

*प्रतिज्ञा आपण करूया*

*१) जीवसृष्टी आहे असीम; ती भवसागरपार नेण्याची*

*२) आपणांत दोष असंख्य; ते नष्ट करण्याची*

*३) आहेत सत्य अनंत, पूर्ण आकलण्याची*

*४) भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची*

*डॉ बाबासाहेब आंबेडकर*

*बुद्ध आणि त्याचा धम्म*

-------------------------------------------- 

*_सर्व प्राणी सुखी होवोत, सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न होवो, सर्वांचे मंङ्गल हो!!_*

*_साधु साधु साधु_*

*महेश कांबळे*

--------------------------------------------

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...