Thursday, 19 August 2021

मनुष्य, मन आणि मनोमल

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

   *_मनुष्य, मन आणि मनोमल_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

              

                 *_मन घडविते तसा मनुष्य होतो, जो सत् आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे, हा संस्कार पुण्यमार्गातील पहिले पाऊल होय. बौद्ध जीवनमार्गाची ही मुख्य शिकवणूक आहे._*

                  *_मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मनःप्रधान आहेत._*

                  *_मनुष्य जर दुष्ट चित्ताने बोलेल किंवा वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करते, त्याप्रमाणे दुःख अशा दुष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते._*

                    *_मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्या बरोबरच असते त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्या बरोबर राहते._*

                       *_मन हे ओढाळ, चंचल, दुर्निवार व दुर्धर आहे. बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला, एकाग्र व सरळ करतो._*

                   _पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफडते, त्याप्रमाणे माराच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकुळ असते._ _*ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे, जे फार चंचल आहे, जे सदैव सुखासाठी वखवखलेले असते अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे, कारण दमन केलेले मन फार सुखदायक असते.*_ _तू आपल्या स्वतःस एक द्वीप (बेट) बनव. परिश्रमाने चित्तमळ नाहीसा होईल. दोषरहीत झाल्यावर तू दिव्य भूमिला पोहोचशील._

                  _*ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रुप्यातील हिण कणाकणाने जाळून टाकतो त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा नाहीसा करतो. लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचा नाश करतो त्याप्रमाणेच पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतिकडे नेत असते.*_

                   _*सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अज्ञानाचा कलंक. भिक्खुंनो, या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा.*_

                 *_जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे, उचापती करणारा आहे, अपमान करणारा आहे, बेछूट आहे आणि नीच आहे अशा माणसाला जीवन सुकर आहे. परंतु जो विनम्र आहे, पवित्र-अपवित्र यांचा विचार करतो, अनासक्त आहे, शांत आहे, निर्मल आहे अशा बुद्धियुक्त मनुष्याला जीवन कठीण आहे. जो हिंसा करतो, असत्य भाषण करतो, जो न दिलेले हिरावून घेतो, जो परदागमन करतो आणि जो मनुष्य उन्मादक मद्यपानात मग्न राहतो. तो मनुष्य इहलोकी आपले थडगे खणीत असतो._*

              *_माणसा, हे लक्षात ठेव, संयमहिनांची स्थिती चांगली नव्हे; लोभ आणि पापकर्म तुला चिरकाल दुःखात लोटणार नाही याची काळजी घे. जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते, जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्नपाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही. परंतु ज्याच्या मनातून ह्या असल्या विचारांचे निर्मुलन झाले आहे त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती लाभते._*

                 *_कामासारखा अग्नी नाही आणि लोभासारखा लोंढा नाही. परदोष हे सहज दिसतात. परंतु स्वतःचे दोष क्वचितच दिसतात. ज्याप्रमाणे धान्याचा तूस पाखडावा, त्याप्रमाणे माणूस आपल्या शेजाऱ्याचे दोष पाखडीत असतो. परंतु ज्याप्रमाणे कपटी जुगारी, अपेशी फारसा लपवून ठेवतो त्याप्रमाणेच मनुष्य स्वतःचे दोष लपवित असतो. जो मनुष्य परदोषच पाहात राहतो आणि स्वतःचे दोष उघड होताच चिडू लागतो, त्याचे दोषविकार वाढतात आणि तो त्या विकारांच्या विनाशापासून दूर दूर जात राहतो._*

            *_पापापासून दूर राहा, स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा ही भगवान बुद्धाची शिकवण आहे._*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*

*संकलन : महेश कांबळे*

http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...