*बौद्ध
धम्मातील पंथांचा परीचय*
https://mikamblemahesh.blogspot.com/2021/06/blog-post_24.html
ज्या नियमांवरुन मतभेद झाले, ते
नविन नियम पुढीलप्रमाणे,
१.
आत भोजन शिजवणे (विहारात)
२.
स्वेच्छेने शिजवणे
३.
भोजन आत (विहारात) खाणे
४.
स्वेच्छेने खाणे
५.
प्रातःकाळी उठल्याबरोबर अन्नाचा स्वीकार करणे
६.
दानकर्त्याच्या इच्छेनुसार अन्न घरी घेऊन जाणे
७.
विविध फळे खाणे
८.
जलाशयात उत्पन्न वस्तुंना खाणे. इत्यादी
बौद्ध धम्मात प्रामुख्याने दोन मुख्य संप्रदाय
आहेत.
*१. महायान*
*२. हीनयान.*
_बौद्ध
धर्मामध्ये बुद्धाच्या महानिर्वाणानंतर सु. १०० वर्षांनी वैशाली येथे द्वितीय
संगीती भरली, त्यावेळी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. बुद्ध विनयाच्या काटेकोर
पालनाच्या जाचाला लोक कंटाळले व त्यातून सुटका झाली तर बरे, असे
म्हणणारे बरेच लोक निघाले. उलट सनातनी पक्षाचे लोक विनयाच्या नियमांचे योग्य पालन
व्हावे म्हणून परिषद भरवून, चुकार लोकांबद्दल नापसंती दाखवून, बुद्धाच्या
आचार-नियमांना पुन्हा उजाळा देऊ लागले. मूळ संघातून फुटून बाहेर पडलेल्या लोकांना ‘महासंघिक’ असे
नाव पडले व जुन्या सनातनी लोकांना स्थविरवादी किंवा थेरवादी असे नाव पडले. ह्या
महासांघिकातून पुढे कालांतराने आणखी पाच संप्रदाय निघून ह्या फुटिरांचे सहा
संप्रदाय बनले व जुन्या सनातनी लोकांचे बारा संप्रदाय बनले. अशोकाच्या काली हे
अठरा संप्रदाय अस्तित्वात आलेले होते._
🔸➖➖ *महायान*
➖➖🔸
_बौद्ध धर्माचे जे दोन मुख्य पंथ म्हणून प्रस्थापित झाले, त्यांतील ‘महायान’ पंथ हा फुटीर संप्रदायातील लोकांचा होता, महायान म्हणजे मोठे यान. यान म्हणजे रथ
कींवा मार्ग. त्यांचे म्हणणे असे की भगवंतांच्या शिकवणुकीचे उद्दिष्ट केवळ
स्थविरांनाच धम्मलाभ व्हावा व विनयाचे काटेकोरपणे पालन केलेच पाहीजे असा नव्हता.
नियमांना शिथिल करुन त्यात सर्वांना समाविष्ट केले पाहीजे, असा ज्यांनी हेका धरला ते स्वतःच 'अधिक लोकांच्या उद्धाराकारिता' म्हणजे मोठे यान असे म्हणून स्वत:स ते
महायानी म्हणवु लागले. त्यावेळी धम्माबद्दल कसलेही मतभेद नव्हते. महासंघिकांचा
प्रभाव भारतात आंध्र वगैरेसारख्या पूर्वेकडील भागांत विशेष होता. ह्यांच्या मते
बुद्धाला मानुषी अस्तित्तच नव्हते. तो लोकोत्तर होता व लोकोत्तर गुण त्याच्या ठायी
होते. ह्यांच्या मते ‘अव्याकृत’ असा धर्माचा प्रकार नाही. हे मत तर
स्थविरवाद्यांच्या मूळ तात्त्विक विचारसरणीच्या विरूद्ध आहे. कुशल, अकुशल आणि अव्याकृत अशी धर्मांची
त्रिविध विभागणी हा तर स्थविरवादी अभिधम्माचा मूळ सिद्धांत. ह्या संप्रदायाच्या
मते असंस्कृत धर्म नऊ प्रकारचे आहेत पण हे धर्म महीशासकांच्या नऊ असंस्कृत
धर्मांशी सर्वस्वी जुळणारे नाहीत. सर्वास्तिवादी मानतात त्या प्रकारचा दोन
जन्मांमधील अंतरभवही नाही._
_ह्या
महासंघिकांपासून ‘गोकुलिक’ हाही संप्रदाय निघाला. ह्यांच्या मते
सर्व जग ‘कुक्कुळ’ किंवा जळजळीत अंगाराप्रमाणे दुःखदायक
आहे. पंचस्कंधांपैकी रूपस्कंधच विपरिणामधर्मी आहे. चित्तामध्ये विस्तार पावण्याची
व संकोच पावण्याची शक्ती आहे, असे मानणाराही एक गट होता. बहुश्रुतीय
किंवा बहुलिय व बाहुलिक ह्यांच्या मते अनित्य, दुःख, अनात्म, शून्य
व निर्वाण ह्या पाचा संबंधीची बुद्धाची शिकवण लोकोत्तर आहे. बाकीची शिकवण लौकिक
आहे. भगवंतांच्या अवशेषांची, फुलांची पूजा करणे, चैत्य
कींवा स्तुपाची पूजा करणे, भगवंतांच्या मुर्तीची पूजा करणे, बोधीवृक्षाची
पिंपळाची पूजा करणे सुरु केले._
_महासंघिक
संप्रदायाच्या मते ज्याला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणून म्हटलेले आहे, तो
खरोखर पंचांगिकच आहे. कारण सम्यक वाक्, सम्यक् कर्मान्त व
सम्यक् आजीव हे मनाशी संबद्ध नसल्याकारणाने त्यांचा अंतर्भाव करण्याची जरूरी नाही.
ह्या संप्रदायामध्ये दोन प्रकार आहेत. त्यातील उत्तरकालीन संप्रदाय
हा सर्वास्तिवाद्यांप्रमाणे भूत व भविष्यकारही अस्तित्वात असल्याचे मानतो. हैमवत
संप्रदाय हा हिमवंत प्रदेशात प्रचलित होता. ह्या संप्रदायाच्या मतांपैकी काही मते
श्रावकयानाला जवळ आहेत कारण हा संप्रदाय बोधिसत्त्वाला विशेष महत्त्व देत नाही पण
भव्य आणि विनीतदेव ह्यांच्या मताप्रमाणे हा संप्रदाय महासंधिकांचीच एक शाखा आहे.
कारण ज्या महादेव नावाच्या भिक्षूच्या पाच मतांमुळे बौद्ध संघात फूट पडली, ती
मते ह्या संप्रदायाला मान्य आहेत. प्रज्ञप्तिवादी
लोकांच्या मताप्रमाणे व्यक्तीतील पंचस्कंधांखेरीज बाह्य जगातील स्कंधांना खरे
अस्तित्व नाही. आयतन, धातू वगैरेंना खरे अस्तित्व नाही. मरण अकस्मात आले असे म्हणता
येणार नाही. ते केवळ स्वतःच्या कर्माचेच फळ म्हणून आहे. आर्यमार्ग हा स्वतःच्या
कर्मानेच प्राप्त होतो आणि तो एकदा प्राप्त झाला म्हणजे, तो
पुढे नाहीसाही होत नाही. आंध्र देशातील पूर्व-शैल व अपर-शैल ह्या पर्वतांवर किंवा
त्यांच्या परिसरात राहणारे चैत्यपूजक होते. स्तूपपूजेने विशेष पुण्य मिळते अशी
त्यांची श्रद्धा नव्हती. पण स्वतः मिळविलेल्या पुण्याचे दान दुसऱ्यास करता येते व
दुसऱ्याच्या पुण्यात स्वतःला वाटा घेता येतो, अशी महायानी पंथाची
विचारसरणी ह्या संप्रदायामध्ये दिसून येते._
_त्यांनी भगवंतांना
अनेक प्रकारची नावे दिली व ईश्वरस्वरुप पूजा केली. अमिताभ, मैत्रेय, अवलोकितेश्वर, वैरोचन, अक्षोभ्य, रत्नसंभव, अमोघसिद्धी, मंजुश्रीबुद्ध, वज्रपाणी, सामंतभद्र, आकाशगर्भ, महास्थानप्राप्त, भैषज्यराजा, इत्यादी
नावे दिली. त्यामुळे सामान्य जणांस महायान फार आवडु लागला. ते बोधिसत्वालाही
लोकोत्तर मानतात. भगवंताच्या भौतिक देहाला ते अनाश्रव म्हणजे विशुद्ध मानतात.
सर्वज्ञता इत्यादी गुण अहर्तामध्ये दिसत नाहीत. म्हणून त्यांच्यात दोष असतातच.
परंतु भगवंतांमध्ये कसलेही दोष नव्हते असे ते मानतात. ते बहुसंखिक असल्यामुळे
त्यांना महायानी म्हणतात. स्थविरवादी भिक्खु भगवंताच्या कायेस मनुष्यकाय मानतात._
*महायानाचे मुख्य ग्रंथ: -*
महायान ग्रंथात हजारो सूत्रे आहेत.
त्यांचे ९ ग्रंथ प्रमुख आहेत. ते येणेप्रमाणे -
१. प्रज्ञापारमिता
२. अष्टसाहस्त्रीका
३. सद्धर्मपुण्डरीक
४. ललितविस्तार
५. लंकावतार
६. सुवर्णप्रभास गंडव्यूह
७. तथागतगुह्यक
८. समाधिराज
९. दशभूमिश्वर
महायानी पंथातील नऊ प्रमुख ग्रंथांचा
अत्यल्प सारांश:-
*१.
प्रज्ञापारमिता* - हा सर्वात प्राचीन आहे. यात शून्यतेचे अनेकविध प्रतिपादन केलेले
आहे. कोणत्याही पदार्थाचा आपला स्वतःचा स्वभाव नाही असे मत असून, त्यात
नैराम्य ( आत्मा नसणे ) ही धारणा प्रमुख आहे.
*२.
अष्टसाहस्त्रिका* - सर्वसंहारी मायावाद आणि अद्वयवाद म्हणजे परमार्थत: चित्त स्वयं
अचित्त आहे. स्वभावदेखील नि:स्वभाव आहे. अविद्यामान धम्माची विद्यमानतया प्रतीती (
ज्ञान ) हीच अविद्या होय.
*३.
सद्धर्मपुण्डरीक* - यांत बुद्धांची म्हणजे अवलोकितेश्वराची महिमा वर्णिली आहे.
त्यात म्हंटले आहे की भगवान बुद्ध नाना रूपांनी वेळोवेळी प्रकट होऊन लोकहितासाठी
उपदेश करतात. ते अमर आहेत. त्यांना ईश्वरस्वरुप मानलेले आहे.
*४.
ललितविस्तार* - ही सर्वस्तिवाद्यांनी लिहिलेली बुद्धसंजीविनी आहे. यात सिद्धार्थला
तो पुढे धार्मिक चक्रवर्ती होईल असे अनुलक्षित केलेले आहे. मातेच्या गर्भात
असतानादेखील बोधिसत्वरूपाने त्यांनी उपदेश केला होता असे वर्णन आहे.
*५.
लंकावतार सूत्र* - ही सूत्रे योगाचारासाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी मानलेली आहे. ई.
स. नंतर दुसऱ्या ते पाचव्या शताब्दीमध्ये यांची रचना झाली. यांत योगावचार व
विज्ञानवाद आहे. यांत असे म्हंटले आहे की सर्वच जग भ्रांतिमय आहे. केवळ निराभास व
निर्विकल्प चित्त हेच सत्य होय.
*६.
सुवर्णप्रभास सूत्र* - यांत बुद्ध धातुला असंभवनीय असे म्हंटले असून तथागतांची
धम्मकाया अमर असल्याचे सांगितले आहे. जगात त्यांच्या फक्त निर्मित कायेचे ( देहाचे
) महापरिनिर्वाण पाहीले जाऊ शकते असे म्हंटले आहे.
*७.
तथागतगुह्यक* - महायानी पंथाचे म्हणणे असे की, भगवंतांनी स्वोपलब्ध
धम्माला अत्यंत गंभीर आणि दुर्बोध असल्याने जाणून सर्वसाधारण जनतेला तो समजू शकणार
नाही असे वाटले म्हणून त्यांनी त्या गंभीरतम धम्माची देशना केवळ विशिष्ट
भिक्खूंनाच दिली.
*८.
समाधिराज* - यालाच चंद्रप्रदीपसुत्रदेखील म्हणतात. याचा आशय असा आहे की सर्वच धर्म
( Religion
नव्हे ) समान आहेत. धर्म म्हणजे
उत्पत्ती व नाशाची कारणे कींवा वस्तुंचे गुणधर्म.
*९.
दशभूमीश्वर* - बोधिसत्वाला बुद्धत्वप्राप्तीसाठी ज्या दहा अवस्थांमधून जावे लागते
त्यांचे वर्णन केलेले आहे.
🔸➖➖ *वज्रयान*
➖➖🔸
_वज्रयान कींवा मंत्रयानाची उत्पत्ती ई. सनाच्या आठव्या
शतकामध्ये झाली. त्यामुळे तांत्रिक बौद्धधम्मास चालना मिळाली. वज्रयानाने
यौनसंबंधी गूढशास्त्र, जादूटोना, संस्कार रहस्यवाद इत्यादि गूढ
तंत्रमंत्राला चालना दिली. त्यामुळे धम्माचे जुने शुद्ध रूप जाऊन त्यास लवकरच
ग्लानी आली. *'ओम मणिपद्मे ह'* वैगरे मंत्र
वज्रयानात आहेत. ते वैदिक ( आत्ताचा हिंदु ) धर्माच्या धर्तीवर असल्यामुळे
धम्माच्या मुळ सात्विक स्वरूपास बाधा निर्माण झाली. अशा प्रकारच्या विचारसरणीस
भगवान बुद्धांचा सक्त विरोध असल्यामुळे वज्रयानास काहीच स्थान नाही._
🔸➖➖ *हीनयान
/ स्थविरवाद* ➖➖🔸
_‘श्रावकयान’ (ज्याला
महायानी लोकांनी अन्यायाने तुच्छतादर्शक ‘हीनयान’ असे
नाव दिले) हा जुन्या स्थविरवादी लोकांचा होता, हीनयान म्हणजे लहान
यान (कींवा रथ, मार्ग). विनयाचे नियम पूर्णतः पाळणारे स्थविर अल्पसंख्याक होते
व नविन शिथिल नियमांस उत्तेजन देणारे तरुण भिक्खु बहुसंख्यक, यामुळे
अल्पसंख्याकांना हिनयानी म्हणुन संबोधु जाऊ लागले. भगवंतांनी स्वशरीरास
मनुष्यमात्राचे शरीर मानूनच सर्वांस उपदेश केला त्यानुसार स्थविरदेखील भगवंतांच्या
शरीरास नैसर्गिक मानित. हीनयानामध्ये स्वतः केलेल्या कर्मावरच प्रगतीचा भर दिलेला
आहे. महायानामध्ये भगवंतास व बोधीसत्वास देवतुल्य मानून केवळ नामस्मरणाने संकटे
दूर होतात, असे मानू लागले. हीनयान म्हणजे पूर्वीचा स्थविरवाद. आधुनिक
विज्ञानाशी हीनयानाचे धर्मतत्व तंतोतंत जुळते. निर्वाणाची व्याख्या, तसेच
दुःख, अनित्य व अनात्म ही मुलतत्वे दोन्ही यानात सारखीच आहेत. स्थविरवाद्यांपासून
निघालेला महीशासक संप्रदाय हाही कौशांबी, अवंती व वनवासी
(कर्नाटकातील) ह्या मार्गे श्रीलंकेपर्यंत पोहोचला होता, असे जातकट्ठ कथेच्या आरंभीच्या गाथांवरून स्पष्ट होते. हा संप्रदाय
असंस्कृत धर्म नऊ प्रकारचे आहेत असे मानतो, तर स्थविरवादी
संप्रदायाप्रमाणे एक, सर्वास्तिवाद्यांच्या मते तीन व योगाचारंच्या मते ते सहा आहेत._
*हिनयानी ग्रंथ*
बौद्धधम्माचे
सर्वच ग्रंथ हीनयान व महायानात सारखेच आहेत. लेखाच्या वरील मुद्यामध्ये दिलेले
महायानी ग्रंथ फक्त भिन्न आहेत. महायानात शून्यवाद आणि भगवंताच्या कायेबद्दल
लोकोत्तरवाद एवढाच काय तो दोन यानातील फरक आहे.
_ईत्सिंग हा चीनी प्रवासी ई. स. ६७१ ते
६७५ मध्ये भारतात होता. त्याने बौद्धधम्माचे पंथ आणि त्यांचे ग्रंथ यांचे केलेले
संक्षिप्त वर्णन येणेप्रमाणे -_
_*१. * आर्य महासांघिक निकाय (महायानी)_
अ.) ७ उपपंथ
ब.) त्रिपिटक : ३ लक्ष गाथांमध्ये
क.) मगध राज्यात विशेषकरून काहीजण
लाटप्रदेश, सिंधप्रदेश व उत्तर-दक्षिणेसही.
_*२.* आर्यस्थविर निकाय (हिनयानी)_
अ) ३ उपपंथ
ब) त्रिपिटक : ३ लक्ष गाथांमध्ये
क) दक्षिण भारतात आणि मगध साम्राज्यात, काही
जण लाटप्रदेश, सिंधप्रदेश, पूर्वभारत, परंतु
उत्तरप्रदेशात नव्हते.
_*३. * आर्यमुल सर्वास्तिवाद निकाय (हिनयानी)_
अ) ४ उपपंथ - मूलसर्वस्तिवाद, धर्मगुप्त, महीशासक
व काश्यपिय
ब) त्रिपिटक : ३ लक्ष गाथांमधे
क) मुख्यतः मगध साम्राज्यात, उत्तर
आणि पूर्व भारतात
ड) धर्मगुप्त, महिशासक
आणि काश्यपिय फारच कमी, काही जण चंपामधे
_*४.* आर्य सम्मितीय निकाय - (हिनयानी)_
अ) ४ उपपंथ
ब) त्रिपिटकाच्या फक्त २ लक्ष गाथा, विनयपिटकाच्या
३०००० गाथा
क) मुख्यतः लाटप्रदेश, सिंधप्रदेश, दक्षिण
भारत, उत्तरप्रदेशात अजीबात नव्हते.
_वात्सीपुत्रीय किंवा साग्मितीय संप्रदाय हा मात्र बौद्धांच्या
मध्ये बंडखोर म्हणून समजला गेलेला आहे. बुद्धाने अनेक ग्रंथांतून ‘पुद्गवल’ ह्या
शब्दाचा उपयोग केवळ ‘व्यक्ती’ ह्या अर्थी केलेला आहे. एवढ्या
आधारावरून ‘पुदगल’ हा अस्तित्वात आहे व तो ‘आत्म्या’ पासून
काही भिन्न नाही व तोच माणसाचा जेव्हा एका जन्मातून दुसऱ्यात जन्म होतो त्यावेळी
संक्रमण करतो, असे ह्या संप्रदायाचे मत आहे. महीशाकसापासून धर्मगुप्त
संप्रदाय निघाला. हा संप्रदाय मध्य आशिया व चीनमध्ये विशेष रीतीने प्रचलित होता.
ह्या संप्रदायाचे त्रिपिटकही अस्तित्वात होते. स्तूपांची पूजा व स्तूपांना दान
देणे असल्या कुशलकृत्यांना त्यांची पूर्ण संमती होती._
_काश्यपीय संप्रदाय
हाही स्थविरवाद्यांना अती जवळचा म्हणून त्याला ‘स्थावरीय’ असेही
नाव आहे. ह्या संप्रदायाचेही स्वतंत्र धर्मग्रंथ होते. ह्यांच्या मताप्रमाणे ज्या
भूतकालाचा विपाक होऊन तो नष्टही झाला आहे, तो भूतकाल अस्तित्वात
नाही. पण ज्या भूतकालाचा विपाक अद्याप झाला नाही किंवा जो अद्याप नष्ट झाला नाही
तो अस्तित्वाद आहे. वैभाषिकांच्या ग्रंथांतून हेच मत ‘विभज्जवादी’ संप्रदायाचे
होते, असे म्हटलेले आढळते._
_सौत्रांतिक
संप्रदायांच्या मताप्रमाणे पुनर्जन्म होताना एका सूक्ष्म स्कंधाचे संक्रमण होते
म्हणून त्याला ‘संक्रांतिवाद’ असेही म्हटले आहे._
_मध्य भारतात
हरिवर्मन नावाचा एक विद्वान होऊन गेला. चिनी ग्रंथाच्या आधारे बुद्धाच्या
परिनिर्वाणानंतर ८९० वर्षांनी तो होऊन गेला. त्याने तत्त्वसिद्धि (काही
विद्वान त्याला सत्यसिद्धि असेही म्हणतात) नावाचा ग्रंथ लिहिला.
ह्या ग्रंथात श्रावकयानाकडून महायानाकडे जाण्याचाही प्रवृत्ति मोठ्या प्रमाणावर
दिसते. पुदगल-नैरात्म्याच्या जोडीला धर्म-नैरात्म्यही तो मान्य करतो तसेच दोन
सत्येही मान्य करतो व आत्म्याला सांवृत्तिक दृष्ट्या अस्तित्व असून परमार्थ
सत्याच्या दृष्टीने मात्र अस्तित्व नाही हे मान्य करतो. तसेच जगाच्या बुडाशी ८४
तत्वे किंवा धर्म आहेत पण तीही, योगाचार संप्रदायाच्या मताप्रमाणे
सांवृत्तिक दृष्ट्या, पारमार्थिक दृष्ट्या नव्हे. ह्या संप्रदायाच्या मते
वर्तमानकाळच अस्तित्त्वात आहे. भूत व भविष्याला अस्तित्तव नाही. सौत्रांतिकवाद व
तत्त्वसिद्धिवाद हो दोन्ही वाद श्रावकयान व महायान ह्यांना जोडणाऱ्या
दुव्यांसारखेच वाटतात._
_श्रीलंकेमध्ये दोन
गट प्रामुख्याने प्रचलित होते. महाविहारवासी व अभयगिरिवासी. अभयगिरिवासी हा
गट विशेषतः बाहेरच्या देशातून (भारतातून) आलेल्या लोकांचा होता व त्यात महायान
पंथी, वैतुल्यवादी वगैरेंचाही समावेश होता. कित्येक शतकेपर्यंत ह्या
दोन गटांमध्ये स्पर्धा लागून राहिली होती. ज्या गटाला राजसत्तेचे पाठबळ मिळे तो गट
त्या वेळेपर्यंत बलिष्ठ राही. ह्या दोन गटांतील द्वंद्वातून शेवटी महाविहारवासी गट
अभयगिरिवासी गटावर मात करून यशस्वी रीतीने बाहेर पडला व आता केवळ महाविहार
संप्रदाय तेथे अस्तित्वात राहिला आहे. ब्रह्मदेशातही जे काही संप्रदाय अस्तित्तावत
आहेत ते निव्वळ बाह्य वागण्याच्या प्रकारांवरून. चीवर दोन खांद्यांवरून घ्यावे, छत्री
किंवा वहाणा (पादत्राण) वापराव्या की वापरू नये वगैरे मुद्यांवर हे भेद झाले.
सध्या संख्याबलाने मोठा असलेला ‘सुधम्म’ संप्रदाय हा छत्री व
वहाणा वापऱण्याला, पानसुपारी खाण्यास किंवा धूम्रपान करण्यास किंवा ‘पस्ति’ पाठ
करताना पंखे वापरण्यास परवानगी देतो. पण ‘श्वेगिन’ संप्रदाय
मध्यान्हानंतर पानसुपारी खाण्याला किंवा धूम्रपान केव्हाही करण्याला संमती देत
नाही. ‘द्वार-निकाय’ नावाचा तिसरा संप्रदाय आहे. हा केवळ
काय-कर्म, वाककर्म व मनो-कर्म ह्या शब्दांऐवजी कायद्वार, वाक्-द्वार
व मनोद्वार हे शब्द वापरतो म्हणून तो वेगळा संप्रदाय मानला जातो._
_थायलंड व
कंबोडियामध्ये महानिकाय आणि धम्मयुत्तिकनिकाय असे दोन संप्रदाय आहेत.
धम्मयुत्तिकनिकाय हा विनय-नियमांचे जास्त कडक रीतीने पालन करतो. तिबैटमध्ये बौद्ध
धर्माचा प्रवेश होण्यापूर्वी भूत-पिशात व मंत्र-तंत्र, जादूटोणा
ह्यांच्यावरच भर देणारे ‘बोन’ नावाचा धर्म होता. त्यामुळे शांतरक्षित आठव्या शतकाच्या
उत्तरार्धात तेथे गेला तेव्हा त्याची तेथे डाळ शिजेना. म्हणून त्यानेच प्रथम स्वात
नदीच्या खोऱ्यातील उरग्यान प्रांतातून पद्मसंभवाला बोलावण्याची शिफारस केली.
त्याप्रमाणे पद्मसंभवाच्या आगमनामुळे तिबेटमध्ये तांत्रिक बौद्ध
धर्माचीच भरभराट झाली व पद्मसंभवाला फार मोठे मानाचे स्थान मिळाले. पण पुढे
अकराव्या शतकात विक्रमशील विद्यापीठातून आचार्य अतीश (९८२-१०५४) तेथे आल्यानंतर
तेथे धर्मसुधारणेचे नवीन युग सुरू झाले. पद्मसंभवाचे अनुयायी असलेल्या
लोकांनान्यिङ्-मा-पा (त्रिङ्-म-प) असे नाव पडले व त्यांची ओळख त्यांच्या तांबड्या
रंगाच्या टौप्यांवरून होऊ लागली._
_अतीशाच्या सुधारणवादी लोकांना का-दम-पा (बकह्-ग्दमस्-प) असे
नाव मिळाले. ह्या लोकांचा ब्रह्मचर्याच्या पालनावर कटाक्ष असून जादूटोण्याला
त्यांच्या जवळ स्थान नव्हते. अकराव्या शतकाच्या उत्तरार्धात क-ग्यु-पा
(बकह्-र्ग्युद्-प) व सा-क्यपा (स-स्वय-प) ह्या नावचे दोन संप्रदाय अस्तित्तावत
आले. तिबेटातील गूढवादी योगी व कवी मिल-र-प (मिल-रस्-प) हा पहिल्या वर्गाचा
प्रतिनिधी म्हणून समजला जातो. हा अनेक दैवी शक्तींचा उपासक म्हणून समजला जात असे.
तिबेटसारख्या अत्यंत कडक थंडीच्या मुलखात तो साध्या कपाशीपासून तयार झालेले कपडे
वापरून पहाडांच्या गुहांतून, दऱ्याखोऱ्यांतून हिंडत असे. दुसरा
सा-क्य-प संप्रदाय हा जुन्या न्यिङ् मा-पा संप्रदायाचा वारसदार म्हणून समजला जाई.
ह्या संप्रदायाचे भिक्षू ब्रह्मचर्याचे पालन वगैरे करावयास तयार नसत.⇨नागार्जुनाच्या शून्यता
तत्त्वाचा आधार घेऊन ते तांत्रिक धर्म पाळीत. त्यांच्यात बौद्ध धर्माचा इतिहास
लिहिणारे फ्युतोन (बु-स्तोन्, तेरावे-चौदावे शतक), तारनाथ
(ज. सोळाव्या शतकाचा उत्तरार्ध) वगैरेंसारखे विद्वान निघाले. चौदाव्या शतकात
त्सोङ्-खा-पा नावाच्या भिक्षूने अत्यंत यशस्वीपणाने का-दम-पा ह्या संप्रदायात आणखी
सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्ना केले. नैतिक नियमांचे कठोरपणे पालन
करून, अनेक गुंतागुंतीचे तांत्रिक विधी नाकारून ब्रह्मचर्यपालनावर
त्याने जोर दिला. ह्या संप्रदायालाच गेलुग्पा (दगे-लुगस्-पा) असे नाव पडले. हे
त्यांच्या पिवळ्या रंगाच्या टोपीवरून ओळखले जातात. ह्याच संप्रदायांतून दलाई
लामासारखे धार्मिक व त्या अनुषंगानेच राजकीय प्रशासक निवडले जाऊ लागले. ह्याच
संप्रदायाने चिनी लोकांचा अमल तिबेटात सुरू होईपर्यंत धार्मिक पुढारीपणा व राजकीय
प्रशासन सांभाळले._
_भारतातून अनेक पंडित चीन देशात गेले व त्या देशातील तेथील
विद्वान पंडितांच्या साहाय्याने तसेच चिनी पंडित भारतात येऊन येथील भाषा शिकून परत
गेले व त्यांनीही स्वतंत्रपणे किंवा भारतीय पंडितांच्या साहाय्याने मूळ भारतीय
ग्रंथांची चिनी भाषांतरे केली. तेथेही महायान व तांत्रिकांचाच प्रभाव होता.
कित्येक वेळा एखाददुसऱ्याच महायान ग्रंथाला प्राधान्य देऊन त्याचेच सांप्रदायिक
अनुयायी बनले. उदा., थ्येन-थाय संप्रदाय सद्धर्मपुंडरीकसूत्राला किंवा ‘छान’ म्हणजे
ध्यान संप्रदाय लंकावतारसूत्राला मानतो किंवा सुखावतीव्यूह सूत्रावरून एक संप्रदाय झालेला आहे.
नागार्जुन किंवा ⇨असंग (पाचवे शतक उत्तरार्ध) ह्याच्याही तत्त्वाचे अनुयायी होते. पण
सध्या थ्येन-थाय संप्रदाय हाच तेथे विशेष प्रचलित आहे. ह्या सर्व संप्रदायांचे मूळ
ग्रंथ जरी भारतातील असले, तरी चिनी पंडितांनीही त्यावर भाष्ये लिहिली आहेत व त्यांतून
चिनी परंपरेला अनुसरून त्यांनी विचारांची मांडणी केली._
_चीनमधून कोरियामार्फत बौद्ध धर्म जपानमध्ये गेला व तेथे
अजूनही तेथील जनतेचा एक प्रमुख धर्म तो प्रचलित आहे. जपानातील बौद्ध धर्माचे तेरा
संप्रदाय आहेत. ह्यातील ‘थ्येन-दाय’ संप्रदाय हा चीनमधील ‘थ्येन-थाय’ संप्रदायापासूनच
निघाला असला, तरी ह्या बौद्धतंत्र व ध्यान आणि विनयालाही वाव दिला गेलेला
आहे. हिए पर्वतावर ह्या संप्रदायाचे पीठ असून ते बौद्ध धर्माच्या अभ्यासाचे
जपानमधील एक महत्त्वाचे केंद्र आहे. ‘शिन्गोन’ संप्रदाय
हा तांत्रिकांचा आहे व ‘धारणी’च्या पठनाने बोधी प्राप्त होते असे त्यांचे मत आहे. ‘अमिताभ’ ह्या
नावाच्या केवळ संकीर्तनाने सुखावतीच्या स्वर्गात आपल्याला प्रवेश मिळतो, अशी
श्रद्धा बाळगणाऱ्या सामान्य जनांचाही एक संप्रदाय आहे. ‘शिन्रान’ नावाच्या
संप्रदायाने सामाजिक वर्गावर्गांतील भेद अमान्य करून बुद्धाच्या दृष्टीने सर्व
सामाजिक वर्ग समान असल्याचे प्रतिपादन केले. ‘झेन’ (ध्यान)
संप्रदाय हा ध्यानावर विशेष भर देतो आणि बजावतो, की ‘अंतर्मुख
व्हा म्हणजे बुद्धत्व तुमच्याच अंतःकरणात आहे, हे आढळून येईल’. सुशिक्षित
समाजात ह्या संप३दायाला मोठी मान्यता आहे व जपानी संस्कृतीला ह्या संप्रदायाला फार
मोठी मान्यता आहे व जपानी संस्कृतीला ह्या संप्रदायाची फार मोठी देण आहे [→ झेन
पंथ]. ‘निचिरेन’ संप्रदायाने सद्धर्मपुंडरीकसूत्राला अत्यंत महत्त्व
दिले. त्या सूत्राच्या पठनाने एवढेच नव्हे, तर त्या सूत्राचे नाव
घेण्याने देखील बुद्धत्व मिळू शकते. ‘नेमु म्योहो रेन्गे
क्यो’ (नमो सद्धर्मपुण्डरीकसूत्राय) हे ह्या संप्रदायाचे बीद्रवाक्य
आहे. [→निचिरन पंथ]._
_*बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला हीनयान कींवा थेरवाद हाच मुळचा
बुद्धधम्म होय. तोच सध्याचा बुद्धधम्म होय.* त्यात महायानामुळे बुद्धपूजा, बोधिसत्वपूजा, चैत्यपूजा, बोधिपूजा
ईत्यादी काळमानानुसार सर्वच ठिकाणी अंतर्भूत झाली. ती सर्वसामान्य जनतेस आवडु
लागल्यामुळे हिनयानी लोकांनीही तीला आत्मसात केले. परंतु आपण ईश्वरपूजा
म्हणून कींवा अंधश्रद्धेने नव्हे तर त्यांच्या शिकवणीला आणि तत्वांना वंदन करत
असतो, शरण जात असतो, स्मृती जागृत ठेवत असतो. मुळ धम्मग्रंथ
जसे त्रिपिटक, महावस्तु ईत्यादी सारखेच आहेत._
☄ *महायान
आणि हीनयान यातील भेद*
_महायान पंथाच्या खालील गोष्टी प्रमुख आहेत, _
१. बोधिसत्वाची संकल्पना
२. पारमितांना पाळावयाची प्रथा
३. बोधिचित्ताच्या संकल्पनेचा विकास
४. दशभूमीद्वारे आध्यात्मिक उन्नती
५. बुद्धत्वाची प्राप्ती हेच ध्येय
६. त्रिकायची संकल्पना
७. धम्मशून्यतेची संकल्पना कींवा
धम्मसमता कींवा महायानी यांनी वेगळीच दाखविली ति अशी,
अ. क्लेशावरणाला काढून टाकणे.
ब. ज्ञेयवरणाला काढून टाकणे.
_जे परमार्थ सत्याला झाकुन टाकित असते. त्या आवरणाला ते काढून
टाकतात व त्यामुळे पुद्गलशून्यता (आत्मा नसणे) आणि धर्मशून्यता (सर्व वस्तु आणि
प्राणी यांचे अस्तित्व नसणे) याची प्रचिती येते. हिनयानी
फक्त क्लेशावरणाला दूर सारतात, परंतु ते ज्ञेयावरणाला काढून टाकित
नसल्यामुळे त्यांना पूर्ण ज्ञान होत नाही असे महायान्यांचे म्हणणे आहे. परंतु
हिनयानी म्हणतात की अविद्येचा नाश हाच निर्वाणाचा मार्ग होय. ते म्हणतात की
अहर्ताला संबोधि प्राप्त होते, परंतु बुद्धत्वाची प्राप्ती होत नाही
कारण त्यासाठी बराच काळ कुशल कर्मे करावी लागतात व जिच्यामुळे बुद्धांना सर्वज्ञता
प्राप्त होते जी अहर्तांना होत नाही. यात ईश्वर, आत्मा कींवा चमत्कार
यांना अजीबात स्थान नाही. परंतु निसर्गातील तसेच मनुष्यातील Superhuman Natural Powers मान्य व सिद्ध आहेत._
*संदर्भ :-*
१) बौद्ध धर्म के विकास व इतिहास
२) बोद्धधर्म
*_संकलन :- महेश कांबळे _*
No comments:
Post a Comment