*_प्रश्न ७०- मंत्रसामर्थ्याने कोणते चमत्कार घडू शकतात?_*
*उत्तर* 👉 मंत्रबळाने सर्पाचे विष उतरते, कावीळ उतरते, विंचू अगर पिसाळलेला कुत्रा यांचे विष उतरवले जाते असा समज आहे. मंत्राने अग्नी पेटवणारे काही तथाकथित दैवी पुरुष असल्याचे सांगितले जाते. हे समज चुकीचे व धोकादायक आहेत. *मंत्रबळाने अगर प्रार्थनेने शरीरावरील कापलेला अवयव शरीरावर एक इंच वाढवून देणाऱ्यास अंधश्रद्धा निर्मूलन चलवळीचे प्रणेते डॉ.अब्राहम कोवूर यांनी एक लाखाचे आव्हान १९६३ सालीच जाहीर केलेले आहे. हे आव्हान आजतागायत कोणीही स्वीकारलेले नाही.* सर्प विषारी असेल व त्याचा दंश पुरेसा प्रभावी असेल, तर माणूस मंत्राच्या वापराने जगू शकत नाही हा अनुभव आहे. बिनविषारी सर्प चावला तर माणूस मरत नाही. *महाराष्ट्रात विषारी सर्प प्रामुख्याने फक्त चार जातींचे आहेत. नाग, घोणस, मण्यार व फुरसे. बिनविषारी सर्पाच्या पुष्कळ जाती आहेत. चावलेला साप हा बऱ्याचदा बिनविषारी असतो. अशा वेळी मंत्रसामर्थ्याने सर्पविष उतरवल्याचे क्रेडिट मांत्रिकाला मिळून जाते. भारतातील विंचवाच्या दंशाने बहुदा माणूस मरत नाही. दंश झालेल्या व्यक्तीस भीतीमुळे वेदनांची तीव्रता अधिक जाणवते. मांत्रिक ही तीव्रता कमी करण्यास सहायक होऊ शकेल. पण त्याच्यामुळे विंचवाचे विष उतरते, हे खरे नाही. फक्त भीती कमी झाल्याने वेदना थांबू शकतात.*
चोपडी, ता.पाटण, जि.सातारा येथील गोविंदा चव्हाणला पिसाळलेला कुत्रा चावला. मांत्रिकाकडून त्याने मंत्र घेतला व तो निर्धास्त बनला. ३ महिन्यांनी बिचारा तडफडून मेला. मात्र याच मुलाने प्रतिबंधक इंजेक्शने घेतली असती, तर तो नक्की जगला असता. *मंत्राने अग्नी पेटवणारे भोंदू रासायनिक प्रक्रिया वापरतात. लाकडाचा भुसा व पोटॅशिअम परमँगनेट यांच्या मिश्रणावर ग्लिसरीन ओतले, की भुसा पेटतो. ग्लिसरीन व पोटॅशिअम यांच्यातील रासायनिक प्रक्रियेने उष्णता निर्माण होऊन भुसा पेटतो; मंत्राने नव्हे.*
*_थोडक्यात, मंत्राने कोणताच चमत्कार घडत नाही. मंत्राने साधा पापडदेखील मोडता येत नाही._*
*-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment