*_प्रश्न ७१ - दैवी सामर्थ्याचे अस्तित्व शास्त्रज्ञदेखील मानतात. चंद्रावर उतरल्यानंतर पहिला चांद्रवीर 'Thank God, God is great!' असे म्हणाला. याबद्दल आपले मत काय?_*
*उत्तर* 👉 चंद्रावर उतरलेला अमेरिकन चांद्रवीर 'Thank God,God is great!' असे म्हणाला. कर्ता करविता परमेश्वर आहे, असे मानणे हा पूर्व संस्काराचा भाग आहे. लहानपणीच भगवंताच्या कृपेने यश मिळते, असा संस्कार वैज्ञानिकावर झाला असेल, तर विजयाच्या क्षणी वर उल्लेख केलेला उद्गार चांद्रवीराच्या तोंडून निघणे यात अस्वाभाविक काहीच नाही. आगगाडीचा शोध लागला त्या काळात आगगाडी सुरक्षितपणे स्टेशनवर यावी म्हणून त्या काळी लोकांनी नियतीची करुणा भाकली असणार. कोलंबसची बोट अमेरिकेच्या किनाऱ्याला लागली असेल तेव्हा 'ही तर देवाची कृपा' असे उद्गार कोलंबसने काढले असतील, तर ते स्वाभाविकच होय. *आज आगगाडीत प्रवेश करताना अगर बोटीत चढताना आपण नारळ फोडून देवाची करुणा भाकतो का? आपणास हे माहित आहे, की मानवी बुद्धिसामर्थ्याने विज्ञान तंत्रज्ञान आत्मसात करून आगगाडीची निर्मिती केली. यामध्ये दैवी कृपेचा संबंध काय?* ज्याच्यावर धार्मिक पूर्वसंस्काराचा प्रभाव नाही तो रशियन चांद्रवीर चंद्रावर पाऊल टाकताना म्हणाला, 'माझे चंद्रावरचे पाऊल हे मानवी प्रज्ञेने निसर्गावर मिळवलेला विजय आहे.' रशियन चांद्रवीराचे पुरुषार्थी उत्तर हे अधिक संयुक्तिक नाही काय?
*-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment