*_प्रश्न ८७ – श्रद्धा व अंधश्रद्धा यात काहीच फरक नसेल, तर नितीमुल्यांवरची श्रद्धा ही अंधश्रद्धा ठरेल. अंधश्रद्धा निर्मुलन समिती नितीमुल्यांविरुद्ध आंदोलन उभारणार काय? नितीमूल्ये प्रत्यक्ष पुराव्यांनी सिद्ध करता येतात काय? नसतील तर त्यावरील विश्वास म्हणजे श्रद्धा का अंधश्रद्धा?_*
*उत्तर 👉* _अंधश्रद्धा निर्मुलनाची वैचारिक भूमिका समजावनू घेण्याची तसदीही न देता कसे गैरसमज करुन घेतले जातात, याचे हा प्रश्न म्हणजे प्रतिनिधिक नमुना आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचा प्रमुख भागच हा आहे कि व्यक्तीमध्ये, समाजामध्ये विवेकनिष्ठ विचारसरणी रुजवणे. या विवेकातूनच नीती निर्माण होते._
*नितीमुल्ये म्हणजे काय? समाजधारणा ज्यामुळे होते व ज्यांच्या आचरणाबद्दल जनमानसात व्यापक मान्यता असते, असे सर्वसामान्य नियम. समाजधारणेसाठी त्यांचे अस्तित्व अपरिहार्य असते. उदारहणार्थ … खरे बोलावे, व्यभिचार करू नये, शेजार्यांवर दया करावी, बालकांना प्रेम द्यावे या स्वरूपाच्या विचारांनाच आपण नितीमुल्ये म्हणतो. यामागे उदात्तता असतेच, पण प्रामुख्याने समाज चालण्यासाठी लागणारी अपरिहार्यता निदान त्या त्या काळातील असते. उदाहरणार्थ, समाज सुरळीत चालायचा तर एकमेकांशी सत्याने वागले पाहिजे. प्रत्येकजण दुसऱ्याशी खोटेपणाने वागू लागला तर गोंधळ होऊन समाज-जीवनच अशक्य होईल. अनौरस संतती निर्माण होणे नको असेल व मालमत्तेच्या हस्तांतराचा प्रश्न योग्य प्रकारे सुटावयाचा असेल, तर व्यभिचार अनैतिक ठरवावयास हवा. प्रत्येकजणच कुणाचा तरी शेजारी असतोच. तेव्हा सर्वांनीच आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करणे सर्वांनाच सुखकारक व उपयोगी ठरेल. प्रत्येकालाच बाल्य व वृद्धावस्थेतून जावयाचे असते. समाजात त्यांची संख्या मोठी असते. समाज नीट राहावयाचा तर या बालकांना प्रेम व वृद्धांना संरक्षण मिळावयास हवे. या स्वरूपाच्या समाजधारणेसाठी आवश्यक असलेल्या विचारांची नितीमुल्ये बनली आहेत.*
याबरोबरच समाजातील हितसंबंधी वर्गांनी स्वत:चे हितसंबंध कायम राहावेत यासाठी मतलबीपणे काही विचारांना नितीमुल्याचे स्वरूप दिले, तर अज्ञानापायी काही विचारांना न तपासताच नीतिमूल्यांचा दर्जा देण्यात आला. नितीमुल्ये व देव आणि धर्म यांची सांगड घातल्याने या सर्वांची चिकित्सा करणे अवघड होऊन बसले.
मानवी जीवनाची मुल्यात्मकता, समाजधारणेसाठीची अपरिहार्यता व समाज जीवनातील स्थळ –काळ - सापेक्षता यातून जी मुल्ये समाज व व्यक्तीहीताची ठरतात, त्याचा पूर्ण पुरस्कार व आदर अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीची विचारधारा करते. परंतु यासाठी जी चिकित्सा करावी लागेल, तिचा आधार अपरिहार्यपणे बुद्धिप्रामाण्यवाद व विवेकनिष्ठा हाच असतो.
नितीमुल्यांना, धर्मापलीकडे स्वतंत्र, स्वायत्त अशा विचारांचा पाया असतो. नितीमुल्यांच्या नावाखाली होणारे शोषण हे 'धर्माची नीती' या बुरख्याखाली चालुच राहणार नाही, यासाठी डोळसपणाही माणसांना येण्याची गरज असते. आपण उदाहरण घेऊ- खरे बोलणे, स्त्रीयांनी न शिकणे व चूल-मूल सांभाळणे, ब्राह्मणांनी मांसाहार न करणे या तिन्ही बाबी शे-दिडशे वर्षांपूर्वी आपल्या समाजात नैतिक होत्या. आज काय स्थिती आहे.
खरे बोलणे हे एक शाश्वत नितीमुल्य आहे. त्यामुळे ते आजही सुप्रतिष्टीत आहे. (आचारात नाही हा भाग अगदी वेगळा) स्त्रियांनी शिकू नये, ही धारणा पूर्णपणे बदलली आहे. स्त्रियांना शिकावयला बाहेर पडलेल्या सावित्रीबाई फुलेंना समाजाकडून अवघ्या सव्वाशे वर्षांपूर्वी दगड व शेणसड्याचा मारा घ्यावा लागला; त्या महाराष्ट्रात समाजाचे प्रतिनिधित्व करणारे शासनच स्त्री -शिक्षणासाठी आवर्जून प्रयत्न करत आहे. स्त्रियांना शिकण्याची संधी ही नीती झाली आहे. समाज सुधारकांचे प्रयत्न, कुटुंबासाठी अर्थार्जन करण्याकरिता स्त्रीला घराबाहेर पडण्याची निर्माण झालेली अटळ गरज यांतून नितीमुल्ये बदलली आहेत. स्त्रीला धार्मिक कारणाने न शिकवणे हीच अंधश्रद्धा बनली आहे. शाकाहार, मांसाहार यांत श्रेष्ठ-कनिष्ट काय याची चर्चा चालचू राहील, पण मांसाहार करणारा ब्राह्मण अनैतिक आहे, असे म्हणणे आता हास्यास्पद व मूर्खपणाचे ठरेल. समाजजीवनात परिस्थितीबाबतचे असे मंथन विचाराच्या विवेकाच्या आधारे सतत चालू ठेवण्याचे हे काम हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याचा गाभा आहे. अंधश्रद्धांची चिकित्सा यासाठीच केली जाते. त्यामुळे कालसापेक्ष व मानवी प्रतिष्ठेवर आधारलेली नितीमुल्ये समाजापुढे आग्रहाने मांडल्यास सगळ्यांत जास्त मदतच होणार आहे, होत आहे.
नितीमुल्ये पाळावीत हा निर्णय विवेकाने घेता येतो. परंतु त्याची अंमलबजावणी करण्याचे सामर्थ्य भावनेतुनच मिळत असते. सत्य बोलावे हे समजते, पण व्यक्तीशः तोट्याचे असतानाही 'सत्यच बोलावे' यासाठी विवेकाने स्वीकारलेल्या 'सत्य बोलावे' या विचाराला भाविनक गुंतवणूक करावी लागते. हा व्यक्तिमत्वाचा तोल आहे. नुसती भावना अविचारी असू शकते. नुसता विवेकी असूनही विचार निष्क्रिय राहु शकतो. विवेकी विचारांचे कृतिशील आचरण या अर्थाने ‘नितीमुल्यांवरील श्रद्धा’ हा शब्द कोणी वापरल्यास त्याच्याशी वाद नाही. बुद्धीप्रामाण्याने स्वीकारलेल्या विश्वासाचेच ते भावनिक परिणीत रुप आहे, एवढाच त्याचा अर्थ.
*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*
*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com
No comments:
Post a Comment