*_प्रश्न ७८- मासिक पाळी असलेल्या स्त्रीने लोणच्याला हात लावला अगर पडछाया पडली तरी लोणचे नासते. ती शिवल्यास द्राक्षमळा, पानमळा खराब होतो हे खरे का?_*
*उत्तर* 👉 *हे खरे नाही.*
*_स्त्रीच्या स्त्रीबीज कोशातून बीज बाहेर पडते. ते बीज नलिकेवाटे गर्भाशयात येते. गर्भात त्याचे मिलन पुरुष बीजाशी झाल्यास गर्भधारणा होते. ही गर्भधारणा होईल या अपेक्षेने स्त्रीबीज बाहेर पडल्यापासूच निसर्गाने गर्भपिशवी गर्भधारणेस अनुकूल करण्यास सुरवात केलेली असते. परंतु गर्भधारणा न झाल्यास ही तयारी वाया जाते व निर्माण झालेली आंतरत्वचा ही मासिक स्रावाद्वारे बाहेर पडते. हीच मासिक पाळी._*
वरील विवेचना वरुन हे लक्षात येईल की *स्त्रीची मासिक पाळी ही एक नैसर्गिक सहज क्रिया आहे. नको असलेला पदार्थ शरीराबाहेर टाकणे ह्या क्रियेला विटाळ अगर अपवित्र का मानायचे.*
स्त्री-पुरुषांची शरीरे ही वेगवेगळे त्याज्य पदार्थ नेहमीच बाहेर टाकत असतात. विनोबांनी मानवी शरीराला मलमूत्राची गटारगंगा म्हटले आहे. जसे मल, मूत्र, घाम तसेच स्त्रीचा मासिक स्त्राव. *मल, मूत्र उत्सर्जनाने स्त्री-पुरुषांना विटाळ होत नाही, तर मग मासिक पाळीने विटाळ कसा होतो? पुरुषांच्या वीर्यपतनाच्या वेळी पुरुषास विटाळसा पुरुष का म्हणू नये?*
*मासिक पाळीच्या वेळी स्त्री विटाळशी असते. म्हणून पानमळा खराब होतो, लोणचे नासते ही स्त्रियांवर अन्याय करणारी अंधश्रद्धा होय.* विटाळशी बाईने नावेत बसू नये, अशी स्त्री नावेत बसली तर नाव उलटते, अशा अनेक भाकड-कल्पना स्त्रीच्या मासिक पाळी संदर्भात रूढ आहेत. वरील विवेचनावरुन त्या हास्यास्पद आहेत, हे सुज्ञांच्या ध्यानात यावे.
*-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment