Friday, 14 May 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ७७

 *_प्रश्न ७७ - चेटूक हा काय प्रकार आहे? चेटकामुळे वैभव प्राप्त होते हे खरे आहे काय?_* 


 *उत्तर*  👉  लोकांमध्ये अशी वदंता असते की झटपट श्रीमंत झालेल्या कुटुंबाकडे चेटूक असते. विशिष्ट ठिकाणी ही चेटके मिळतात. ज्याच्या घरी चेटूक आहे, तेथे वैभव असते. कारण चेटूक शेजारच्या घरातील वस्तू (पोळ्या, भाकरी इ.) अगर शेजारच्या खळ्यातील राशीमधले धान्य गुप्तपणे आपल्या मालकाच्या घरात अगर खळ्यात घेवून येते. *विदर्भात चेटकाला कुसळी म्हणतात. माण-दहीवडी (सातारा) भागात त्याला पितर असे नाव आहे.*


   *_ज्याचे कारण कळत नाही अशा गूढ घटनांमागे भूत, भानामतीसारख्या अमानवी शक्तींचा हात असतो, अशी समजूत विज्ञानपूर्व काळात निर्माण झाली. विज्ञानाने आता माहित झाले आहे, की भूते नसतात. भानामती म्हणजे मानवी हाताच्या भौतिक, रासायनिक करामती असतात. चेटूक ही अशीच खुळी कल्पना आहे. जमिनीवर ठेवलेलली टाचणी मिलीमीटर इतकी हलवायची असेल तरी तिला भौतिक बल (force) लावावे लागते. कोणतीही वस्तू अदृश्य शक्तीने हालविली जाते असे जे समजतात त्यांना हे माहीत नसते की चेटका सारख्या शक्तींना हे शक्य नाही. वस्तू हलतात हे खरे असेल, तर कोणाचा तरी हात अगर इतर प्रकारचे बल हलविते; चेटूक नव्हे. वस्तू हलतात हा केवळ आभासही असू शकेल._*

   

            खरोखरच चेटके असती तर! धान्य व पोळ्या यांच्याऐवजी ती सोने अगर पैसे का पळवीत नाहीत? हुंड्यासाठी डॉक्टर जावयाला २५ तोळे सोने द्यावयाचे आहे. चेटूक घरात आणा; शेजाऱ्याचे सोने चेटकाला पळवायला सांगा. कष्ट नको. आरामात घरी बसा. श्रीमंत व्हा.

   

         *चेटूक नाही तर खळ्यातले धान्य, घरातील भाकऱ्या कशा नाहीशा होतात?*

   

        खळ्यातील, धान्याच्या राशीतील धान्य नोकर हडप करीत असणार. एकत्र कुटुंबात आपला वेगळा गुप्त साठा करण्याची भावाभावांची सवय असते. एखादा भाऊ गुप्तपणे राशीतील धान्य चोरून लपवून ठेवत असेल व धान्य राशीतून नाहीसे झाल्याचा स्वतः च कांगावा करीत असेल. शेजारच्या खळ्यातील रास मोठी का? तो शेतकरी कष्टाळू, काटकसरी असतो. आळशी कुटुंबाने त्याच्यावर आळ घेणे, त्याने चेटूक केले असे समजणे हा त्या आळशांच्या कमकुवत मनाचा भाग आहे. एकत्र कुटुंबातील सुनांना स्वातंत्र्य नसते. कधी कधी सणाचे जेवण न उरण्याची अगर कमी पडण्याची शक्यता असते. अशा वेळी भुकेली सून पुरणपोळ्यांची चवड लपूवून पाटीतल्या पोळ्या नाहीशा झाल्या असा कांगावा करू शकते.


 *-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार* 


https://mikamblemahesh.blogspot.com/

No comments:

Post a Comment

नवसुत्तं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 "नवसुत्तं" https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_20.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _...