*_प्रश्न ३८ - नवरात्रीला अंगात येऊन, बेहोष होऊन बायका नाचतात. यांच्या अंगात खरेच देवतेचा संचार होतो का? वर्षभर इतर वेळी तो कसा होत नाही?* *आमच्या गावच्या यात्रेत अतिशय प्रतिष्ठित, सुशिक्षित बायकांच्याही अंगात येते. इतर केव्हाही येत नाही. यामागे ग्रामदेवतेची दैवी शक्ती असावी काय?_*
*उत्तर* गर्दीत
व्यक्ती धीट बनते. भित्रा माणूस मोर्चामध्ये शूर बनतो. नवरात्रीच्या वेळी अगर यात्रेचे वेळी त्या ठिकाणी गर्दी असते. त्या गर्दीमध्ये घुमत
असलेल्या बायकांना पाहून एरवी न अंगात येणाऱ्या बाईच्या पण अंगात यायला लागते.
यात्रेच्या वेळी संगीत, उदबत्यांचा, धुपाचा वास इत्यादींमुळे अंगात येण्याला पोषक
वातावरण निर्मिती झालेली असते. देवीची मूर्ती सजवलेली असते. त्याचाही परिणाम होतो.
संगीत व जल्लोष यांनी भरलेले वातावरण अंगात येण्याला यात्रेच्या वेळी पूरक ठरते. अंगात
आलेल्या बाया या वेळी धागरी फुंकतात. उच्छवासावाटे सोडलेला कार्बनडाय ऑक्साईड वायू
घागर फुंकताना घागरीत जातो. तोच श्वासावाटे परत ओढला जातो.
हे अनेकवार होत राहिल्याने घागर
फुंकणाऱ्या अंगात आलेल्या बाईंच्या रक्तातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते.
त्यामुळे बेहोषी वाढण्यास मदत होते. प्रतिष्ठित सुशिक्षित बायकांच्याही अंगात येणे
यात अस्वाभाविक काहीच नाही. अशा स्त्रिया सुद्धा मानसिक तणावाखाली असतात. श्रीमंत, सुशिक्षित स्त्रिया लैंगिक बाबतीत अतृप्त असणे
शक्य असते. मूल न होणे, वा मुलगा न होणे
हे त्यांच्या बाबतीतही घडू शकते. प्रतिष्ठेतून आलेला एकलेपणा त्यांना असह्य होणे
शक्य असते. यामुळे गर्दीचे मानसशास्त्र, नादमय
वातावरण यांच्या प्रभावाखाली अशा स्त्रिया घुमू लागणे सहज शक्य असते.
नवरात्रीच्या अथवा गावच्या जत्रेच्या
वेळी अंगात येणे अथवा घुमणे ही बाब अनेक ठिकाणी सांस्कृतिक दृष्ट्या
मान्यताप्राप्त असते. ह्यात गैर तर मानले जात नाहीच, उलट
तो पारंपरिक श्रद्धेचा, पूजेचा प्रकार
समजण्याची शक्यता असते. यावरून हे सिद्ध होते की ग्रामदेवतेच्या शक्तीचा या
प्रकाराशी काही संबंध नाही.
*डॉ.
नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*
*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment