*_प्रश्न ३५- बायकांच्या अंगात जास्त का येते?_*
*उत्तर* बायकांच्याच अंगात जास्त येते हे खरे. पण विशेषतः गरीब व मागासवर्गीय स्त्रियांच्याच अंगात
येण्याचे प्रमाण जास्त आढळते. मनाचा कोंडमारा व त्यातून ढळणारे मनाचे संतुलन हे
अंगात येण्याचे कारण. आपल्या देशात स्त्रियांचे कुटुंबातील स्थान दुय्यम असते.
त्यामुळे स्त्रिया सतत तणावाखाली वावरत असतात. मूल न होण्याचे खापर स्त्रीच्या
माथी मारले जाते. विधवापण येण्यास स्त्रीला जबाबदार धरले जाते. मागासवर्गीय व
गरिबाघरच्या स्त्रिया तर सर्वस्वी पराबलंबी असतात. शिक्षण नसतेच. स्त्रियांना
लैंगिक दडपणाखाली जगावे लागते. विधुर परस्त्रीशी संबंध ठेवू शकतो. विधवेला ते
स्वातंत्र्य नसते. सगळ्यांच्या तीक्ष्ण नजरा तिला काबूत ठेवू पाहतात. यामुळे
अतृप्त लैंगिक वासनेचा मनावर येणारा ताण पुरुषांपेक्षा स्त्रियांवर अधिक असतो.
निसर्गाने पुरुषापेक्षा स्त्रीवर मातृत्वाची अधिक जबाबदारी टाकलेली आहे. गरोदरपणात
स्त्रियांच्या शारीरिक व मानसिक अवस्थेत बदल होतात. सातत्याने येणाऱ्या
बाळंतपणामुळे ह्या अवस्था पूर्ववत होत नाहीत. दुर्बल मनोवस्थेमध्ये मानसिक धवका
देणारी घटना घडली, की अंगात
येण्याला योग्य परिस्थिती तयार होते व अंगात येण्याचा प्रकार चालू होतो. अंगात
आलेल्या स्त्रियांना पाहून स्त्रियांच्याच अंगात येऊ शकते,
असा बघणाऱ्या स्त्रियांचा समज होतो. त्यामुळे पुरुषांपेक्षा
स्त्रियांच्या अंगात येण्याच्या घटना जास्त आढळतात. स्त्रियांच्या अंगात येणे, हा प्रकार सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या
मान्यताप्राप्त आहे.स्त्रियांच्या अंगात येणे हे अशिष्ट वा गैरवर्तन मानले जात
नाही. या सामाजिक मान्यतेमुळेच व आजूबाजूच्या वातावरणाच्या प्रभावामुळे स्त्री
संमोहन अवस्थेत जाते.मात्र त्यांच्या अंगात येते, असे
बघणारे लोक मानतात.
*डॉ.
नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*
*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment