Sunday, 31 January 2021

ओळखपत्र

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*झेन कथा – ओळखपत्र*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

      

               _*जपानी संस्कृतीतल्या १३व्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजु यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकण्याची ताकद देतात. या गोष्टींना तात्पर्य नसते. अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणार्या या कथांतून आपण काय व कश्याप्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे. अशीच एक झेन कथा.:-*_

 

_गावातल्या एका प्रसिद्ध बोधिसत्त्वांकडे गावाचा महापौर गेला. बोधिसत्त्वांना त्याच्या सहायकाने त्याची ओळख लिहिलेला कागद दाखवला. त्याच्यावर लिहिले होते, “आर्हान, महापौर.”_

_बोधिसत्त्व सहायकाला म्हणाले, “त्याला येथून जायला सांग. माझं या व्यक्तीसोबत काहीच काम नाहीये.”_

_सहायकाने दिलगिरी व्यक्त करत ते ओळखपत्र परत दिलं. आर्हान म्हणाला, “ती माझीच चूक होती.” त्याने ओळखपत्रावरच महापौर अक्षर खोडून टाकलं आणि सहायकाला म्हणाला, “आता परत हे दाखवून बघ,”_

_सहायकाने ते पत्र बोधिसत्त्वांना दाखवले. ते पाहून बोधिसत्त्व म्हणाले, “अरे, आर्हान आलाय का? मला भेटायचंय या व्यक्तीला. पाठवून दे त्याला आत.”_

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*संदर्भ: - झेनकथा*

*संकलन :- महेश कांबळे*

*०१/०२/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अम्बपाली

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*६६ अम्बपाली*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

      

_वैशालीमधील राज उद्यानात आम्रवूक्षाखाली आम्रपालीचा जन्म झाला होता. उद्यान रक्षकाने तिला नगरात नेले, आम्रवूक्षाखाली तिचा जन्म झाल्यामुळे तिचे नाव *”आम्रपाली”* असे नाव पडले. ती अतिशय सुंदर दिसत होती. वैशालीतील राजकुमारांनी तिच्याशी लग्न करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करण्यास सुरुवात केली. आपसातील अशी स्पर्धा पाहून असा निर्णय घेण्यात आला कि, *हि कोणा एकाची पत्नी न बनता ती सर्वांचीच पत्नी म्हणून राहील. या निर्णयानुसार तिला गणिका करण्यात आले.*_

_भगवान बुद्ध जेव्हा वैशालीला आपल्या भिक्खू संघासह आले तेव्हा ते आम्रवनातच राहिले होते. आम्रपालीने तेथे जाऊन भगवान बुद्धांचा चरणांना वंदन करून त्यांना भोजनासाठी आमंत्रण दिले. दुसऱ्या दिवशी भगवंत तिच्याकडे भोजनासाठी गेले. भोजन संपल्यानंतर भगवंतांनी तिला धम्मोपदेश दिला. त्यानंतर आम्रपालीने आम्रवन भिक्खू संघास दान दिले. अशाप्रकारे ती बुद्धांची उपासिका बनली. आपला *प्रव्रजित झालेला पुत्र विमलकौन्डीन्य* याच्याजवळ धम्म ऐकून तिने भिक्खुणी संघात प्रवेश केला. वृद्धावस्थेत झालेले आपल्या शरीरातील परिवर्तन पाहून तिला बुद्धवचनाची सत्यता पटली. सर्व सांसारिक वस्तूंच्या अनित्यतेचे ज्ञान झाले. आपल्या जर्जर शरीराचे वर्णन करताना ती म्हणते :-_

*_भुंग्याच्या रंगासारखे, काळे व कुरळे असे माझे केस होते, ते आज म्हातारपणामुळे अंबाडीच्या तागाप्रमाणे झाले आहेत. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२५२||_*

*_सुगंधी फुलाने भरलेल्या सुवासिक फुलांच्या करंड्याप्रमाणे माझा केशसंभार होता. आज म्हातारपणामुळे माझ्या मूळ केसांचा वासच राहिला आहे. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२५३||_*

*_कंगवा आणि काट्यांनी चांगल्या प्रकारे बसविलेला माझा केशसंभार चांगल्या प्रकारे लावलेल्या व घनदाट अरण्याप्रमाणे सुशोभित होता. तो आज म्हातारपणामुळे ठिकठीकाणी केस गळाल्यामुळे विरळ झालेला आहे. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२५४||_*

*_काळ्या पुंजक्याची, सोन्याने सजविलेली माझी अलंकृत वेणी शोभून दिसत आहे. आज म्हातारपणामुळे माझ्या डोक्याला टक्कल पडत चाललेले आहे. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२५५|_*

*_चित्रकाराने कुशलतेने अंकित केलेल्या रेखांप्रमाणे माझ्या दोन भुवया होत्या. ते आज म्हातारपणामुळे सुरकुत्या पडून खाली लोंबत आहेत. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२५६||_*

*_गडद निळ्या रंगाचे, सुंदर मण्याप्रमाणे, तेजस्वी व विशाल असे माझे डोळे होते. ते आज म्हातारपणामुळे अभिहत झाल्याने सुंदर दिसत नाहीत. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२५७||_*

*_तारुण्यात आल्यावर सुंदर व टोकदार असे माझे नाक शोभून दिसत असे. ते आज म्हातारपणामुळे विशोभित होऊन चपटे झाले आहे. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२५८||_*

*_चांगल्या प्रकारे तयार केलेल्या, सुघटीत कंकणाप्रमाणे माझ्या कानाच्या पाळी पुर्वी शोभून दिसत होते. ते आज म्हातारपणामुळे सुरकुत्या पडून खाली लोंबत आहेत. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२५९||_*

*_कर्दळीच्या कळीप्रमाणे रंग असलेले माझे दात पुर्वी शोभून दिसत होते. ते आज म्हातारपणामुळे पडून जवाप्रमाणे पिवळे झाले आहेत. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२६०||_*

*_वनामध्ये विचरण करणाऱ्या कोकिळेच्या मधुर कुजनाप्रमाणे माझी वाणी मधुर होती. ती आज म्हातारपणामुळे अडखळणारी झाली आहे. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२६१||_*

*_चांगल्याप्रकारे घासून गुळगुळीत केलेल्या शंखाप्रमाणे माझी मान पुर्वी शोभून दिसत होती. परंतु आज म्हातारपणामुळे भग्न झाली व वाकली आहे. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२६२||_*

*_सुंदर गोल अडसराप्रमाणे माझे दोन्ही बाहू शोभून दिसत असत. परंतु आज म्हातारपणामुळे ते पांढऱ्या फटफटीत पाटलीवृक्षाच्या फांदीप्रमाणे झाले आहेत. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२६३||_*

*_सुंदर अंगठी आणि सुवर्णालंकारांनी सजविलेले माझे हात पुर्वी शोभून दिसत असत. ते आज म्हातारपणामुळे मुळ्याप्रमाने पांढरे फटफटीत झाले आहेत. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२६४||_*

*_घट्ट, गोल, एकमेकाला जुळू पाहणारे आणि उन्नत असे माझे दोन्ही स्तन पुर्वी शोभून दिसत होते. ते आज म्हातारपणामुळे पाणी नसलेल्या चामड्याच्या रिकाम्या पखालीप्रमाणे खाली लोंबत आहेत. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२६६||_*

*_चांगल्याप्रकारे चकाकणार्या सोन्याच्या फलकाप्रमाणे माझे शरीर पुर्वी शोभून दिसत असे. ते आज म्हातारपणामुळे सूक्ष्म सुरकुत्यांनी व्यापले आहेत. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२६७||_*

*_हत्तीच्या अन्न सेवन करणाऱ्या सोंडेप्रमाणे माझ्या दोन्ही मांड्या शोभून दिसत होत्या. त्या आज म्हातारपणामुळे पोकळ बांबूच्या नळ्याप्रमाणे झाल्या आहेत. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२६८||_*

*_कापसाप्रमाणे मऊ अशी माझी दोन्ही पावले पुर्वी शोभून दिसत होती. ती आज म्हातारपणामुळे फटा पडलेली व सुरकुत्या पडलेली आहेत. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२६९||_*

*_एके वेळी हे संपूर्ण शरीर अशा प्रकारचे होते. परंतु ते आज म्हातारपणामुळे जर्जर, अनेक दुःखाचे घर झाले आहे. ते पोपडे पडलेल्या घराप्रमाणे जीर्ण झाले आहे. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२७०||_*

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*संदर्भ: - थेरिगाथा*

*संकलन :- महेश कांबळे*

*०१/०२/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

राजपुत्राची युक्ति

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*_राजपुत्राची युक्ति_*

*_(ब्रह्माच्छत्त जातककथा)_*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

                      _एकदां वाराणसीच्या राजानें कोसल देशाच्या राजावर स्वारी करून त्याला रणांगणांत ठार मारिलें, आणि त्याचें सर्व वित्त हरण करून तें वाराणसीला आणून तें मोठमोठ्या भांड्यांत भरून आपल्या बागेंत ठेविलें. या लढाईच्या धामधुमींत कोसल राजाचा तरुण कुमार अज्ञातक वेषानें आपल्या राजधानींतून तक्षशिलेला पळून गेला. तेथें त्यानें एका प्रसिद्ध आचार्यापाशीं वेदशास्त्रांचें अध्ययन केलें. सर्व विद्यांत प्रवीण झाल्यावर गुरूची आज्ञा घेऊन तो स्वदेशी येण्यास निघाला. परंतु वाटेंत त्यास कांहीं परिव्राजक भेटले. त्या लोकांपाशीं कांहीं शिल्पकला असली तर तीहि शिकावी या उद्देशानें तो त्यांच्या पंथांत शिरला आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पांचशें परिव्राजकाचा गुरू होऊन बसला. नंतर तो आपल्या शिष्यांना म्हणाला, ''आपण वाराणसीकडे जाऊन जनपदसंचार करूं.''_

                                         _परंतु ते म्हणाले, ''वाराणसींतील लोक मोठे हुषार आहेत. ते नाना प्रश्न विचारून आपली फजिती करतील.''
राजकुमार म्हणाला, ''त्याबद्दल तुम्ही भिऊं नका. तुमचा पुढारी ह्या नात्यानें सर्व प्रश्नांची उत्तरें मीच देत जाईन.''_
                                       _असें सांगून आपल्या परिवारासह फिरत-फिरत अनुक्रमें तो वाराणसीला येऊन पोहोंचला. तेथें या तरुण परिव्राजकाची सर्व लोकांत कीर्ति पसरण्यास विलंब लागला नाहीं. हळूहळू राजाच्या कानापर्यंत त्याची तारीफ पोहोंचली. तेव्हां राजानें त्याला आपल्या राजवाड्यांत बोलावून नेऊन त्याचा बहुमान केला. पुढें राजाची आणि त्याची विशेष मैत्री जडली. तेव्हां राजाचे सर्व गुणावगुण त्याला चांगले समजले. राजा जरा धनलोभी होता. त्यानें या तरुण परिव्राजकाला मंत्रतंत्राच्या साह्यानें धन उत्पादन करितां येईल कीं काय असा एकांतीं प्रश्न केला. तेव्हां तो राजाला म्हणाला, ''महाराज, नवीन धन उत्पादन करण्याचे सामर्थ्य माझ्या अंगीं नाहीं. तथापि असलेले धन द्विगुणित, चतुर्गुणित करितां येईल अशी मंत्रविद्या मी जाणत आहे.''_

                                   _त्यावर राजा म्हणाला, ''कोसल राजाकडून मी पुष्कळ धन हिसकावून आणलें आहे, गुप्तपणें तें माझ्या बागांत पुरून ठेविले आहे. तें तुम्ही आपल्या मंत्राच्या सामर्थ्यानें जितकें वाढवितां येईल, तितकें वाढवा; म्हणजे प्रसंग आला असतां त्याचा मला फार उपयोग होईल.''_

                                   _असें बोलून राजानें त्याला धन पुरून ठेविलेली जागा दाखविली, त्या ठिकाणीं मंत्रविद्येचा प्रयोग करून धन वाढविण्याची विनंती केली. तेव्हां त्या परिव्राजकानें आपल्या पांचशे शिष्यांसह येऊन त्या ठिकाणी ठाणें दिलें, आणि एका मोठ्या हवनास सुरुवात केली. राजाला होमहवनादी प्रकार पाहून फार आनंद झाला आणि लवकरच आपण अफाट संपत्तीचा मालक होईन असें तो मनांतल्या मनांत मांडे खाऊं लागला._

               _इकडे परिव्राजकानें हवनद्रव्यें घालण्यासाठीं कांहीं चामड्याच्या पिशव्या शिवून घेतल्या, आणि एके दिवशीं राजाला तो म्हणाला, ''महाराज, हवनाची परिसमाप्ती होत आली आहे. आतां एकच काम बाकी राहिले आहे. एथून दूरच्या एका अरण्यांतून कांहीं औषधीची मुळें आणून अभिमंत्रण करून त्यांचा आपण पुरून ठेविलेल्या बरण्यांवर प्रयोग केला पाहिजे. परंतु आम्ही माघारे येईपर्यंत तुम्ही कोणत्याही मनुष्याला बागांत जाण्याची परवानगी देऊं नका. कां कीं, आम्हीं तेथे तयार केलेल्या कुंड्याचा वगैरे विध्वंस झाला असतां आमच्या श्रमांचें साफल्य व्हावयाचें नाहीं. मी माझ्या शिष्यांसह वर्तमान त्या वनस्पतीच्या शोधासाठी जातों आणि दहा दिवसांच्या आंत येथें परत येतों.''_

     _राजानें त्याच्या सांगण्याप्रमाणें उद्यानाबाहेर पहारा ठेऊन सर्व बंदोबस्त केला._

                            _तरुण परिव्राजक आपल्या शिष्यांना घेऊन एके रात्रीं शुभ मुहूर्तावर औषधीच्या शोधास जाण्यास निघाला. आणि तो शिष्यांना म्हणाला, ''मित्र हो, मी कोण आहें, याची आजपर्यंत तुम्हाला जाणीव नव्हती. आतां मी खरी गोष्ट सांगतों. कोसल देशाच्या राजाचा मी पुत्र आहे. माझ्या बापाला ठार मारून या राजानें आमच्या कुलांतील सर्व द्रव्य हरण करून या ठिकाणीं गाडून ठेविलें आहे. या राजाचा त्या धनावर कोणत्याहि प्रकारें हक्क नसून तें सर्व माझें आहे. आणि जातांना तें घेऊन जाण्यास आम्हांला कोणतीच दिक्कत वाटण्याचें कारण नाहीं.''_

                        _असा उपदेश करून जेवढीं सोन्याची नाणी होतीं. तेवढी चामड्याच्या पिशव्यांत भरून त्यानें त्या पिशव्या शिष्यांच्या खांद्यावर दिल्या आणि तेथून प्रयाण केलें, एका आठवड्यात कोसल देशाची राजधानी श्रावस्ती नगरी गांठली. तेथें जाऊन आपल्या बापाला अनुकूल असलेल्या लोकांना त्यानें वश करून घेतलें; आणि त्यांच्या साहाय्यानें काशीच्या राजानें नेमलेल्या अधिकार्यांवर हल्ला करून त्यांचा पाडाव केला. बरोबर आणलेल्या द्रव्याच्या जोरावर त्यानें मोठी सेना उभारली काशीराजाकडून होणार्या हल्ल्याचा प्रतिकार करण्यास तो तयार होऊन राहिला. इकडे काशीराजानें तरुण परिव्राजकाची पुष्कळ दिवस वाट पाहिली, आणि शेंवटीं उद्यानांत जाऊन आपल्या द्रव्याच्या बरण्या उघडून पाहिल्या. परंतु त्या सर्वांत एकही नाणें शिल्लक नसून त्या नुसत्या गवतानें भरलेल्या आढळल्या ! तेव्हां राजाला एकदम धक्का बसून तो वेड्यासारखा ''गवत ! गवत !'' असे बरळत सुटला. त्यावेळीं बोधिसत्त्व त्याचा अमात्य होता. राजाची अशी विपरीत स्थिती झालेली ऐकून तो धांवत उद्यानांत गेला आणि म्हणाला, ''महाराज गवत, गवत असें म्हणून आपण आक्रोश कां करितां ? कोणीं आपलें गवत नेलें आहे, किंवा आपणांस गवत घेऊन काय करावयाचें आहे ?''_

                              _राजा म्हणाला, ''हे पंडिता ! येथें एक तरूण परिव्राजक येऊन राहिला होता, हें तुला माहीत आहेच. त्यानें माझ्या या बरण्यांत गवत भरून ठेऊन त्यांत असलेलें सर्व द्रव्य पळवून नेलें !''_

                            _तें ऐकून बोधिसत्त्व म्हणाले, ''मंत्रतंत्राच्या बळानें कोणाला तरी फायदा होतच असतो ! थोडक्यांत जास्ती मिळावयाचें असलें म्हणजे गवत ठेऊन द्रव्य घेऊन गेलें पाहिजे !''_

                                _राजा आपली लोभी वृत्ति बोधिसत्त्वाला समजली असावी असें वाटून मनांत वरमला, आणि म्हणाला, ''परंतु जे सुशील परिव्राजक असतात ते अशी गोष्ट करीत नाहींत. पण असा दांभिक तपस्वी मला कोठून सांपडला कोण जाणें.''_

                                 _बोधिसत्त्वानें राजाचें समाधान करून त्याला राजवाड्यांत नेलें. पुढें कोसल राजाच्या तरूण पुत्रानें उद्यानांतील द्रव्यबळावर कोसल देशाचें राज्य आपल्यापासून हिरावून घेतलें. असें समजल्यावर राजाला आपल्या लोभी वृत्तीबद्दल किती वाईट वाटलें असेल, आणि कसा पश्चात्ताप झाला असेल. याची नुसती कल्पनाच केली पाहिजे !_

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*संदर्भ : - जातक कथा संग्रह*

*संकलन :- महेश कांबळे*

*०१/०२/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...