Sunday, 31 January 2021

राजपुत्राची युक्ति

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*_राजपुत्राची युक्ति_*

*_(ब्रह्माच्छत्त जातककथा)_*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

                      _एकदां वाराणसीच्या राजानें कोसल देशाच्या राजावर स्वारी करून त्याला रणांगणांत ठार मारिलें, आणि त्याचें सर्व वित्त हरण करून तें वाराणसीला आणून तें मोठमोठ्या भांड्यांत भरून आपल्या बागेंत ठेविलें. या लढाईच्या धामधुमींत कोसल राजाचा तरुण कुमार अज्ञातक वेषानें आपल्या राजधानींतून तक्षशिलेला पळून गेला. तेथें त्यानें एका प्रसिद्ध आचार्यापाशीं वेदशास्त्रांचें अध्ययन केलें. सर्व विद्यांत प्रवीण झाल्यावर गुरूची आज्ञा घेऊन तो स्वदेशी येण्यास निघाला. परंतु वाटेंत त्यास कांहीं परिव्राजक भेटले. त्या लोकांपाशीं कांहीं शिल्पकला असली तर तीहि शिकावी या उद्देशानें तो त्यांच्या पंथांत शिरला आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पांचशें परिव्राजकाचा गुरू होऊन बसला. नंतर तो आपल्या शिष्यांना म्हणाला, ''आपण वाराणसीकडे जाऊन जनपदसंचार करूं.''_

                                         _परंतु ते म्हणाले, ''वाराणसींतील लोक मोठे हुषार आहेत. ते नाना प्रश्न विचारून आपली फजिती करतील.''
राजकुमार म्हणाला, ''त्याबद्दल तुम्ही भिऊं नका. तुमचा पुढारी ह्या नात्यानें सर्व प्रश्नांची उत्तरें मीच देत जाईन.''_
                                       _असें सांगून आपल्या परिवारासह फिरत-फिरत अनुक्रमें तो वाराणसीला येऊन पोहोंचला. तेथें या तरुण परिव्राजकाची सर्व लोकांत कीर्ति पसरण्यास विलंब लागला नाहीं. हळूहळू राजाच्या कानापर्यंत त्याची तारीफ पोहोंचली. तेव्हां राजानें त्याला आपल्या राजवाड्यांत बोलावून नेऊन त्याचा बहुमान केला. पुढें राजाची आणि त्याची विशेष मैत्री जडली. तेव्हां राजाचे सर्व गुणावगुण त्याला चांगले समजले. राजा जरा धनलोभी होता. त्यानें या तरुण परिव्राजकाला मंत्रतंत्राच्या साह्यानें धन उत्पादन करितां येईल कीं काय असा एकांतीं प्रश्न केला. तेव्हां तो राजाला म्हणाला, ''महाराज, नवीन धन उत्पादन करण्याचे सामर्थ्य माझ्या अंगीं नाहीं. तथापि असलेले धन द्विगुणित, चतुर्गुणित करितां येईल अशी मंत्रविद्या मी जाणत आहे.''_

                                   _त्यावर राजा म्हणाला, ''कोसल राजाकडून मी पुष्कळ धन हिसकावून आणलें आहे, गुप्तपणें तें माझ्या बागांत पुरून ठेविले आहे. तें तुम्ही आपल्या मंत्राच्या सामर्थ्यानें जितकें वाढवितां येईल, तितकें वाढवा; म्हणजे प्रसंग आला असतां त्याचा मला फार उपयोग होईल.''_

                                   _असें बोलून राजानें त्याला धन पुरून ठेविलेली जागा दाखविली, त्या ठिकाणीं मंत्रविद्येचा प्रयोग करून धन वाढविण्याची विनंती केली. तेव्हां त्या परिव्राजकानें आपल्या पांचशे शिष्यांसह येऊन त्या ठिकाणी ठाणें दिलें, आणि एका मोठ्या हवनास सुरुवात केली. राजाला होमहवनादी प्रकार पाहून फार आनंद झाला आणि लवकरच आपण अफाट संपत्तीचा मालक होईन असें तो मनांतल्या मनांत मांडे खाऊं लागला._

               _इकडे परिव्राजकानें हवनद्रव्यें घालण्यासाठीं कांहीं चामड्याच्या पिशव्या शिवून घेतल्या, आणि एके दिवशीं राजाला तो म्हणाला, ''महाराज, हवनाची परिसमाप्ती होत आली आहे. आतां एकच काम बाकी राहिले आहे. एथून दूरच्या एका अरण्यांतून कांहीं औषधीची मुळें आणून अभिमंत्रण करून त्यांचा आपण पुरून ठेविलेल्या बरण्यांवर प्रयोग केला पाहिजे. परंतु आम्ही माघारे येईपर्यंत तुम्ही कोणत्याही मनुष्याला बागांत जाण्याची परवानगी देऊं नका. कां कीं, आम्हीं तेथे तयार केलेल्या कुंड्याचा वगैरे विध्वंस झाला असतां आमच्या श्रमांचें साफल्य व्हावयाचें नाहीं. मी माझ्या शिष्यांसह वर्तमान त्या वनस्पतीच्या शोधासाठी जातों आणि दहा दिवसांच्या आंत येथें परत येतों.''_

     _राजानें त्याच्या सांगण्याप्रमाणें उद्यानाबाहेर पहारा ठेऊन सर्व बंदोबस्त केला._

                            _तरुण परिव्राजक आपल्या शिष्यांना घेऊन एके रात्रीं शुभ मुहूर्तावर औषधीच्या शोधास जाण्यास निघाला. आणि तो शिष्यांना म्हणाला, ''मित्र हो, मी कोण आहें, याची आजपर्यंत तुम्हाला जाणीव नव्हती. आतां मी खरी गोष्ट सांगतों. कोसल देशाच्या राजाचा मी पुत्र आहे. माझ्या बापाला ठार मारून या राजानें आमच्या कुलांतील सर्व द्रव्य हरण करून या ठिकाणीं गाडून ठेविलें आहे. या राजाचा त्या धनावर कोणत्याहि प्रकारें हक्क नसून तें सर्व माझें आहे. आणि जातांना तें घेऊन जाण्यास आम्हांला कोणतीच दिक्कत वाटण्याचें कारण नाहीं.''_

                        _असा उपदेश करून जेवढीं सोन्याची नाणी होतीं. तेवढी चामड्याच्या पिशव्यांत भरून त्यानें त्या पिशव्या शिष्यांच्या खांद्यावर दिल्या आणि तेथून प्रयाण केलें, एका आठवड्यात कोसल देशाची राजधानी श्रावस्ती नगरी गांठली. तेथें जाऊन आपल्या बापाला अनुकूल असलेल्या लोकांना त्यानें वश करून घेतलें; आणि त्यांच्या साहाय्यानें काशीच्या राजानें नेमलेल्या अधिकार्यांवर हल्ला करून त्यांचा पाडाव केला. बरोबर आणलेल्या द्रव्याच्या जोरावर त्यानें मोठी सेना उभारली काशीराजाकडून होणार्या हल्ल्याचा प्रतिकार करण्यास तो तयार होऊन राहिला. इकडे काशीराजानें तरुण परिव्राजकाची पुष्कळ दिवस वाट पाहिली, आणि शेंवटीं उद्यानांत जाऊन आपल्या द्रव्याच्या बरण्या उघडून पाहिल्या. परंतु त्या सर्वांत एकही नाणें शिल्लक नसून त्या नुसत्या गवतानें भरलेल्या आढळल्या ! तेव्हां राजाला एकदम धक्का बसून तो वेड्यासारखा ''गवत ! गवत !'' असे बरळत सुटला. त्यावेळीं बोधिसत्त्व त्याचा अमात्य होता. राजाची अशी विपरीत स्थिती झालेली ऐकून तो धांवत उद्यानांत गेला आणि म्हणाला, ''महाराज गवत, गवत असें म्हणून आपण आक्रोश कां करितां ? कोणीं आपलें गवत नेलें आहे, किंवा आपणांस गवत घेऊन काय करावयाचें आहे ?''_

                              _राजा म्हणाला, ''हे पंडिता ! येथें एक तरूण परिव्राजक येऊन राहिला होता, हें तुला माहीत आहेच. त्यानें माझ्या या बरण्यांत गवत भरून ठेऊन त्यांत असलेलें सर्व द्रव्य पळवून नेलें !''_

                            _तें ऐकून बोधिसत्त्व म्हणाले, ''मंत्रतंत्राच्या बळानें कोणाला तरी फायदा होतच असतो ! थोडक्यांत जास्ती मिळावयाचें असलें म्हणजे गवत ठेऊन द्रव्य घेऊन गेलें पाहिजे !''_

                                _राजा आपली लोभी वृत्ति बोधिसत्त्वाला समजली असावी असें वाटून मनांत वरमला, आणि म्हणाला, ''परंतु जे सुशील परिव्राजक असतात ते अशी गोष्ट करीत नाहींत. पण असा दांभिक तपस्वी मला कोठून सांपडला कोण जाणें.''_

                                 _बोधिसत्त्वानें राजाचें समाधान करून त्याला राजवाड्यांत नेलें. पुढें कोसल राजाच्या तरूण पुत्रानें उद्यानांतील द्रव्यबळावर कोसल देशाचें राज्य आपल्यापासून हिरावून घेतलें. असें समजल्यावर राजाला आपल्या लोभी वृत्तीबद्दल किती वाईट वाटलें असेल, आणि कसा पश्चात्ताप झाला असेल. याची नुसती कल्पनाच केली पाहिजे !_

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*संदर्भ : - जातक कथा संग्रह*

*संकलन :- महेश कांबळे*

*०१/०२/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...