➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_साधुत्वाची महती_*
*_(राजोवाद जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एकदां बोधिसत्त्व वाराणसीराजाच्या महिषीच्या घरी जन्माला आला. वहिवाटीप्रमाणें त्याचें ब्रह्मदत्त हेंच नांव ठेवण्यांत आलें. कालांतरानें तक्षशिलेला जाऊन तो सर्व विद्यांमध्यें पारंगत झाला; व वडिलांच्या पश्चात् गादीवर बसला. *छंद, द्वेष, भय आणि मोह या चार गोष्टींमुळें सत्ताधिकारी लोकांकडून भयंकर अपराध किंवा चुका घडत असतात. परंतु बोधिसत्त्व या गोष्टींपासून सर्वथैव परावृत्त झाल्या कारणानें त्याच्या हातून राज्यपद्धतींत कोणतीहि चूक झाली नाहीं.* एवढेंच नव्हे सर्वकाळ आपल्या प्रजेच्या हितांत दक्ष असल्यामुळें बाधिसत्त्वाची कारकीर्द प्रजेला फारच सुखकारक झाली. बोधिसत्त्व अत्यंत कुशाग्र असल्याकारणानें त्याच्यासमोर खोटा खटला आणण्यास कोणीच धजेनासा झाला. न्यायाधीशहि लांच लुचपत घेऊन भलताच निवाडा देण्यास धजेनासे झाले. तेव्हां वाराणसीच्या राज्यांत न्यायासनें ओस पडण्याच्या बेतांत आली. न्यायाधिशांनीं सर्व दिवस न्यायासनावर येऊन बसावें व खटला आणणारा गृहस्थ न सांपडल्यामुळें पुनः घरीं जावें, असा प्रकार सुरू झाला ! दिवसेंदिवस बोधिसत्त्वापाशीं एक देखील तक्रार येईनाशी झाली. तेव्हां तो आपणाशींच म्हणाला, ''माझ्या कारकीर्दीत राष्ट्रांतून खोटे खटले नष्ट झाले आहेत. सर्वत्र लोक सचोटीनें आणि दक्षतेनें वागत आहेत. ज्याच्या त्याच्या तोंडून माझी स्तुतीच मला ऐकुं येते. पण कदाचित् माझ्या जवळच लोक माझे अवगुण दाखवण्यास घाबरत असतील. मी जर येथून दूरच्या गांवीं गेलों तर तेथें कदाचित् माझे दोष ऐकण्याची मला संधि सांपडेल.'' असा विचार करून बोधिसत्त्व अज्ञात वेषानें आपल्या रथांतून काशीराष्ट्राच्या सरहद्दीपर्यंत गेला. वाटेंत गरीब आणि श्रीमंत प्रजेची त्यानें भेट घेतली. त्यांच्याशीं तो मोकळ्या मनानें बोलला. तेहि हा कोण आहे हें ठाऊक नसल्यामुळें याच्याशीं सर्व गोष्टी मोकळ्या मनानें बोलले. परंतु ब्रह्मदत्त राजाची गोष्ट निघाल्याबरोबर सर्वजण त्याजविषयी अत्यंत प्रेम दर्शवीत असत. बोधिसत्त्वानें राजाचे कांहीं दोष असतील अशी शंका घेतली असतां लोक हा कुकल्पना करणारा गृहस्थ आहे, याच्याशीं बोलण्यांत अर्थ नाहीं असें म्हणून उठून जात. किंवा त्याची टवाळी तरी करीत. अर्थात् आपल्या राज्याच्या सरहद्दीपर्यंत बोधिसत्त्वाला आपल्या अंगचा अवगूण दाखविणारा एकहि मनुष्य सांपडला नाहीं._
_त्या कालीं कोसल देशाचा राजा मल्लिक नांवानें फार प्रसिद्ध होता. राजकारणांत तो अत्यंत दक्ष असे. आपल्या आसपासचे लोक आपलीं स्तुती करतात तेव्हां अज्ञात वेषानें आपल्या राष्ट्रांतील लोकांचीं मनें जाणण्याच्या उद्देशानें तोदखील कोसल राष्ट्रांत फिरत होता. आपल्या राष्ट्राच्या सरहद्दीपर्यंत त्यालाहि कोणी दोषदर्शक सांपडला नाहीं. एका अरण्यमय प्रदेशांत ओढ्याच्या कांठीं मल्लिक राजाच्या रथाची आणि बोधिसत्त्वाच्या रथाची समोरासमोर गांठ पडली. ओढयांतून पलीकडे जाण्याचा रस्ता इतका अरुंद होता कीं, एकदम दोघांना जाणें शक्य नव्हतें. तेव्हां मल्लिक राजाचा सारथी म्हणाला, ''भो सारथी तुझा रथ बाजूला घे, म्हणजे मीं माझा रथ पुढें हांकतों.''_
_ब्रह्मदत्ताचा सारथी म्हणाला, ''परंतु पहिल्यानें तूं तुझा रथ बाजूला घे आणि आम्हांला वाट दे.''_
_त्यावर मल्लिकाचा सारथी संतापून म्हणाला, ''तूं मूर्ख दिसतोस, या रथामध्यें कोसलाधिपति मल्लिक राजाची स्वारी बसली आहे. तेव्हां पहिल्यानें पुढें जाण्याचा माझ्या रथाचा हक्क आहे.''_
_ब्रह्मदत्ताचा सारथी म्हणाला, ''पण माझ्या रथांत त्रिभुवनविश्रुतकीर्ती श्रीब्रह्मदत्तमहाराजांची स्वारी आहे. तेव्हां त्याच्या रथानें पुढें व्हावें हें योग्य नव्हे काय ?''_
_दोघां सारथ्यांचा बराच वेळ संवाद झाला, आपल्या धन्याची जाति, कुल, गोत्र, संपत्ति, वय वगैरे सर्व गोष्टींची त्यांनी तुलना करून पाहिली. त्या सर्व बाबतींत दोघेंहि राजे समानच होते. तेव्हां ब्रह्मदत्त राजाचा सारथी म्हणाला, ''आतां आपण आपल्या मालकाच्या शीलाची तुलना करूं. ज्याचें शील श्रेष्ठ दर्जाचें असेल, त्यानें प्रथमतः जावें व इतरानीं त्याला वाट द्यावी. तेव्हां तूं आतां आपल्या मालकाचें शील काय तें सांग.''_
_कोसल राजाचा सारथी म्हणाला, ''आमच्या राजेसाहेबांचे गुण ऐकून तुला मानच खालीं घालावी लागणार आहे; तथापि, तें ऐकण्याची जर तुझी इच्छाच असली तर ऐकून घे. सांगतों. * आमचा राजा जबरदस्ताचा जबरदस्तीनें नरम करतो; मृदूला मृदु उपायांनींच वश करतो; साधूला साधुत्वानेंच वळवतो, व खळाला खोट्या मार्गानेंच जिंकीत असतो. असा हा आमचा धनी आहे. तेव्हां रस्त्यांतून दूर होऊन आमच्या रथाला वाट दे.''_
*मूळ गाथा –*
_दळहं दळहस्स खिपति मल्लिको मुदुना मुदुं ।_
_साधुपि साधुना जेति असाधुंपि असाधुना ।_
_एतादिसो अयं राजा मग्गा उय्याहि सारथी ॥_
_त्यावर ब्रह्मदत्ताचा सारथी म्हणाला, ''वाहवारे गुण! आमच्या राष्ट्रांत अशा गोष्टींना आम्ही गुण समजत नसतों. यांना जर गुण म्हणावें तर दोष कोणते ? आमच्या राजाचे गुण याहून फारच निराळे आहेत. त्यांतले कांहीं ऐकण्याची तुझी इच्छाच असली तर ऐकून घे. * आमचा राजा अक्रोधानें क्रोधास जिंकतो; दुष्टाला साधुत्वानें जिंकतो; कृपणाला दानानें जिंकतो, व खोटें बोलणार्याला सत्यानें जिंकतो. असा हा राजा आहे. तेव्हां आमच्याच रथाला तूं वाट दिली पाहिजे.''_
*मूळ गाथा –*
_अक्कोधेन जिने कोधं असाधुं साधुना जिने ।_
_जिने कदरियं दानेन सच्चेनालीकवादिनं ।_
_एतादिसो अयं राजा मग्गा उय्याहि सारथी ॥_
_हें त्या सारथ्याचें भाषण ऐकल्याबरोबर मल्लिक राजा रथांतून खालीं उतरला, आणि बोधिसत्त्वाच्या जवळ जाऊन नमस्कार करून म्हणाला, ''इतके दिवस माझे दोष दाखवून देणार्या मनुष्याचा मी शोध करीत होतों; परंतु माझ्या राज्यांत एक देखील माणूस माझे दुर्गुण मला दाखवून देऊं शकला नाहीं. आज आपल्या आकस्मित दर्शनानें माझे दोष मला कळून आले. तेव्हां आपण मला गुरूसारखे वंद्य आहां.''_
_बोधिसत्त्व म्हणाला, ''हा तुमचा दोष नसून परिस्थितीचा दोष आहे. व्यवहारांत सामान्य लोक 'जशास तसें' अशा आचरणाला महत्त्व देत असतात. परंतु अशा वर्तनानें जगाच्या सुखांत भर न पडतां दुःख वाढत जाईल, ही गोष्ट त्यांच्या लक्षांत येत नाहीं. *खरें म्हणाल तर दुष्टांना साधु उपायांनीं जिंकावें या सारखा दुसरा राजधर्म नाहीं.''*_
_याप्रमाणें बोधिसत्त्वानें मल्लिकाला उपदेश करून वाराणसीचा रस्ता धरला. मल्लिक राजाहि बोधिसत्त्वाला वंदन करून आपल्या राजधानीला गेला._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*१४/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment