Thursday, 3 December 2020

दुर्जनाचे प्रत्युपकार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
*_दुर्जनाचे प्रत्युपकार!_* 
*_(असंपदान जातककथा)_* 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 

                                     _प्राचीन काळीं राजगृह नगरींत मगध नांवाचा राजा राज्य करीत होता. त्यावेळीं आमचा बोधिसत्त्व त्याच राजधानींत महाश्रेष्ठीच्या पदाला पावला होता. त्याला शंखश्रेष्ठी म्हणत असत. वाराणसी नगरींत त्याचा बालमित्र पिलियश्रेष्ठी नांवाचा एक श्रीमंत व्यापारी रहात असे. कांहीं कारणानें त्या पिलियश्रेष्ठीवर मोठी आपत्ति येऊन तो कर्जबाजारी झाला. तेव्हां तो आपल्या बायकोला बरोबर घेऊन पायीं राजगृहाला आला व शंखश्रेष्ठीला भेटला. शंखश्रेष्ठीनें त्याचा बहुमान केला, आणि आपल्या घरात त्याची सर्व प्रकारें बरदास्त ठेविली. अशा स्थितींत वाराणसीहून येथवर चालत येण्याचें कारण काय असा शंखश्रेष्ठीनें प्रश्न केला तेव्हां पिलिय म्हणाला, ''मी कर्जबाजारी झालो आहे आणि अशा संकटकाळी मला तुझ्याशिवाय दूसरा कोणी आठवला नसल्याने मी माझ्या कुटुंबासह मी येथवर पायीं चालत आलों.''_ 

                         _शंखश्रेष्ठी म्हणाला, ''तुम्ही येथवर येण्याची मेहेरबानी केली हें फार चांगलें झालें. आमच्या बालमैत्रीची कसोटी पाहण्यास तुम्ही मला चांगली संधि दिली.''_ 

                     _याप्रमाणें बोलणे झाल्यावर शंखश्रेष्ठीनें आपली तिजोरी उघडून आंतील संपत्तीचे बरोबर दोन भाग केले व एक भाग पिलियश्रेष्ठीला दिला, व त्याचप्रमाणें आपले दासीदास हत्ती घोडे वगैरे सर्व मालमत्तेचे दोन विभाग करून त्यांतील एक पिलियश्रेष्ठीला दिला, व मोठ्या गौरवानें त्याला वाराणसीला रवाना केलें._ 

                 _कांहीं वर्षे लोटल्यावर शंखश्रेष्ठीचा व्यापार बुडालात्याची सर्व संपत्ति नाश पावली. राजगृहांत राहण्याला देखील त्याला लाज वाटूं लागली. तेव्हां अर्थातच पिलियश्रेष्ठीची त्याला आठवण झाली. आपल्या बायकोला बरोबर घेऊन पिलियश्रेष्ठीला भेटण्यासाठीं तो वाराणसीला गेला. रात्रीं शहराबाहेरील धर्मशाळेंत उतरून सकाळीं शहरांत प्रवेश करण्यापूर्वी तो आपल्या पत्‍नीला म्हणाला, ''भद्रे, तूं माझ्याबरोबर न येतां येथेंच रहा. तुला रस्त्यांतून पायीं आणल्याबद्दल पिलियश्रेष्ठी माझ्यावर फार रागावणार. पुरुष अनवाणी चालले तरी त्यांना कोणी नांवे ठेवणार नाहीं. परंतु तुझ्यासारख्या कुलीन स्त्रीला भर रस्त्यांतून अनवाणी चालत नेलें असतां लोक नांवें ठेवतील.''_ 

                 _तिला ही गोष्ट पसंत पडली. शंखश्रेष्ठी एकटाच आपल्या मित्राजवळ गेला. पिलियश्रेष्ठीच्या वाड्याच्या दरवाजावर खडा पहारा होता. त्यांनी त्याला आत सोडले नाही. त्याने बाहेरूनच तो आला आहे असा निरोप आत पाठवला. त्याचा निरोप भेटल्यावर मित्र धावत येऊन आपल्याला कडकडून मिठी मारेल असे त्याला वाटेल. पण आतून त्याला निरोप आला की आत ये. आत जाऊन पाहतो तो पिलिय लोडाला टेकून बसलेला, तो तेथूनच शंखश्रेष्ठीला म्हणाला, “काय! कसा आलास?” एवढ्या दिवसांनी मित्र भेटला तर आपल्याला आलिंगन देईल बसायला आसन देईल असे शंखश्रेष्ठीला वाटले होते पण न बसायला आसन ना आलिंगन हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले! तथापि तो म्हणाला, “मित्रा, माझा सगळा व्यापार बुडाला, माझी सर्व संपत्ती नष्ट झाली, आज मी कवडीला महाग होऊन हिते चालत आलो आहे, मी माझ्या बायकोला ही माझ्यासोबत आणले आहे, परंतु तुला वाईट वाटेल म्हणून मी तिला धर्मशाळेतच ठेऊन आलो आहे.”_ 

                             _पिलिय म्हणाला, ''पण तुम्हाला उतरण्याला जागा मिळाली कीं नाहीं? जेवण वगैरे झालें आहे कीं नाहीं? आमच्या येथें सध्यां फार अडचण आहे. तेव्हां मला तुमची सोय करतां यावयाची नाहीं आणि तुम्हाला हेंहि समजलें पाहिजे कीं येथें कोणी तुम्हाला आश्रय देईल असें मला वाटत नाहीं.''_ 

                         _बिचारा शंखश्रेष्ठी इतका ओशाळला कीं, त्याच्या तोंडांतून शब्द फुटेना. ज्याच्यावर एवढा मोठा उपकार करून फार वर्षे लोटलीं नाहींत त्याच्याच तोंडून असे उद्‍गार निघावेत हें पाहून तो अगदींच गोंधळून गेला, तथापि, भुकेची पीडा फार कठीण आहे असें म्हणतात तें कांहीं खोटें नाहीं. त्याला भूक लागली होतीच पण तेवढ्यानें कदाचित् त्यानें याचना केली नसती परंतु त्याची साध्वी स्त्री उपाशी होती, व तिची आठवण झाल्याबरोबर त्याचें चित्त थार्‍यावर येऊन तो पिलियाला म्हणाला, ''आम्हाला आपल्या घरी आश्रय मिळत नसला तरी हरकत नाहीं. पण आम्ही दोघींजणें आज सारा दिवस उपाशी आहों तेव्हां आमची दुसरी कांहीं सोय लागेपर्यंत शिधासामग्रीची व्यवस्था होईल तर बरें.''_ 

                         _पिलियाच्या घरीं त्याच दिवशीं हजारों गाड्या भरून भात आलें होतें. भातांतील फोल निराळें काढून तें पेवांत भरून ठेवण्याचें काम चाललें होतें. तो आपल्या एका नोकराला हांक मारून म्हणाला, ''या माणसाला त्या फोलांतून एक पायली भरून द्या.''_ 

                         _नोकरानें त्याच्या आज्ञेप्रमाणें एक पायली फोल शंखश्रेष्ठीच्या पदरांत टाकलें. शंखश्रेष्ठी तें घेऊन मुकाट्यानें धर्मशाळेकडे चालता झाला. त्याची बायको आपला पति मोठ्या थाटमाटानें परत येईल अशा मनोराज्यानें वाट पहात राहिली होती. पण शंखश्रेष्ठीला पायींच परत आलेला पाहून तिला फार विषाद झाला. तरी त्याच्या पाठीवर गाठोडें पाहून तिला थोडेसें बरें वाटलें. आज जेवणाचें साहित्य मिळण्याची पंचाईत राहिली नाहीं; बर्‍याच दिवसांनीं सुग्रास अन्न खाऊं असें वाटून तिला बरीच हुषारी आली. ती शंखश्रेष्ठीला म्हणाली, ''तुम्हीं पायींच परत आलां तेव्हां तुमच्या मित्रानें तुमचा योग्य सन्मान केला नसावा; किंवा त्याची तुमची भेट तरी झाली नसावी. कांहीं असो आपणाला आज शिधासामग्री तरी यथास्थित मिळाली पाहिजे असें या तुमच्या गाठोड्यावरून सहज अनुमान करितां येतें.''_ 

                     _शंखश्रेष्ठी म्हणाला, ''भद्रे, हें गांठोडें फोलाचें आहे ! पिलियानें माझें प्रत्युपकार चार शेर फोल देऊन फेडले आहेत ! त्याने पुनः आपल्या घरीं येऊं नये असें बजावून सांगितलें आहे. आतां आम्हाला या शहरांत मजुरीवर निर्वाह करावा लागेल असें वाटतें.''_ 

                 _ती म्हणाली, ''मजुरी करण्याला मला लाज किंवा भीति वाटत नाहीं. परंतु त्या कृतघ्न माणसाकडून तुम्ही एक पायली फोल घेऊन आला याची मला फार चीड येते. हें फोल नेऊन पुनः त्याच्या स्वाधीन करा.'' असें बोलून तिनें तें गाठोडें नवर्‍याच्या अंगावर टाकलें._ 

                     _तेव्हां शंखश्रेष्ठी शांतपणें म्हणाला, ''भद्रे अशी रागावूं नकोस. तुझ्या इतकीच मला त्या दुष्ट पिलियाचा राग आला आहे; परंतु त्यानें दिलेल्या फोलाचा मी स्वीकार केला नसता तर माझें वर्तन सभ्यपणाचें ठरलें नसतें, व त्या योगें त्याच्याकडून जसा मैत्रीचा भेद झाला तसाच तो माझ्याकडूनहि झाला असता. म्हणून निरुपायास्तव हें फोलाचें गाठोडें मला येथवर आणावें लागलें.''_ 
            
                     _नीच पिलियाच्या अत्यंत कृतघ्नपणानेंहि आपल्या नवर्‍याच्या शांतीचा भंग झाला नाहीं हें पाहून त्या साध्वी स्त्रीला रडूं आलें. तिचा शोक इतका अनावर झाला कीं, तिचा रुदनस्वर धर्मशाळेंवरून जाणार्‍या लोकांना सहज ऐकुं येऊं लागला. शंखश्रेष्ठीनें पिलियाला दिलेल्या दासांपैकी एकजण त्या मार्गानें चालला असतां त्यानें धर्मशाळेंत कोणी स्त्री रडत आहे हें ऐकून काय प्रकार आहे हें पाहण्यासाठीं आंत प्रवेश केला आणि पहातो तों आपली पूर्वीची मालकीण रडत असून मालक तिचें समाधान करीत आहे ! हें पाहून तो म्हणाला, ''मालक हा काय प्रकार आहे ? हें मला समजत नाहीं. आपण या ठिकाणीं कसें आला व या उतारूंच्या धर्मशाळेंत कां उतरला ?''_ 

                            _शंखश्रेष्ठीच्या पत्‍नीनें त्याला इत्थंभूत वर्तमान सांगितलें तेव्हां त्या दासाला आपल्या जुन्या मालकाची फार दया आली, व नव्या मालकाचा राग आला. त्यानें आपल्या ओळखीच्या कांहीं गृहस्थांकडे जाऊन आपल्या जुन्या मालकावर आलेल्या प्रसंगाचें यथाभूत वर्णन करून त्यासाठीं त्यानें थोडीबहुत मदत मिळविली व त्याच धर्मशाळेंत कांहीं दिवस त्याची व त्याच्या पत्‍नीची जेवणाखाण्याची कशी बशी व्यवस्था लावून दिली. पुढें घरीं जाऊन शंखश्रेष्ठीनें पिलियाला दिलेल्या सर्व दासांना त्यानें हें वर्तमान कळविलें व त्यांच्या साहाय्यानें एक मोठा कट उभारला. पिलियश्रेष्ठीचे फार उपयोगी नोकर म्हटले म्हणजे शंखश्रेष्ठीकडून मिळालेले हे दासच होते. त्यांच्या स्वामीभक्तीनेंच पिलियाची सर्व कर्मे यथासांग चाललीं होतीं हें त्या दासांना माहीत होतें. त्यांनीं त्या दिवसांपासून पिलियश्रेष्ठीचें काम करण्याचें सोडून दिलें, व इतरांनाहि काम करण्याची मनाई केली. पिलियानें हें वर्तमान ऐकून त्यांच्यावर काठीने मारण्यास सुरुवात केली. तेव्हां त्या सर्वांनीं एकदम वाराणसीच्या राजाकडे जाऊन आपली फिर्याद दाखल केली. या फिर्यादींत पिलियाचा कृतघ्नपणा राजाला पूर्णपणें दिसून आला. शंखश्रेष्ठीची व त्याच्या पत्‍नीची साक्ष घेण्यांत आली. त्याप्रमाणें इतर नोकरांचीहि या बाबतींत साक्ष झाली._ 

                                _राजा सर्व प्रकार ऐकून घेऊन पिलियाला म्हणाला, ''आजपर्यंत मी तुला मोठा प्रामाणिक माणूस समजत होतों; परंतु तुझा प्रामाणिकपणा वरपांगीं आहे असें या खटल्यामुळें दिसून येत आहे. आतां तुला विचारतों कीं, तुझ्यावर प्रसंग आला तेव्हां तूं या शंखश्रेष्ठीकडून त्याची अर्धी संपत्ती घेऊन आलास कीं, नाहींस ?''_ 

                             _पिलियानें ही गोष्ट कबूल केली. तेव्हां राजा म्हणाला, ''मग त्याची प्रत्युपकृती एक पायली फोलानें होईल असें तुला वाटलें काय? तूं आमच्याकडून मिळालेल्या मानाला सर्वथैव अपात्र आहेस. तेव्हां तुझी सर्व संपत्ति शंखश्रेष्ठीला देण्याचा हुकूम देतों.''_ 

                                                    _त्यावर शंखश्रेष्ठी म्हणाला, ''महाराज, यानें जरी मला अत्यंत वाईट रीतीनें वागविलें तथापि, त्याच्या संपत्तीचा मी लोभ धरीत नाहीं. केवळ मी दिलेली धनदौलत आणि दासी दास त्यानें परत करावें म्हणजे झालें.''_ 
.
                 _राजानें ताबडतोब शंखश्रेष्ठीची मागणी अमलांत आणण्यास लाविली. ती सर्व दौलत घेऊन शंखश्रेष्ठी राजगृहाला गेला. पिलियश्रेष्ठीजवळ अद्यापि पुष्कळ धनदौलत शिल्लक होती. पण कीर्ति मात्र समूळ नष्ट झाली होती. आणि *"मरण कां लोकींच दुष्कीर्ति जें''* या कविवचनाप्रमाणें त्याला मरणापेक्षां जीवितच अधिक कंटाळवाणें वाटत होतें._ 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
*संदर्भ : - जातक कथा संग्रह* 
*संकलन :- महेश कांबळे* 
*०३/१२/२०२०* 
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...