🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_शाठ्य सदांचं साधत नसते_*
*_(बक जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_प्राचीनकाळी बोधिसत्त्व एका सुंदर तलावाच्या काठी वृक्षावर वृक्षदेवता होऊन राहत होता. त्या तळ्यात पुष्कळ मासे राहत असत. उन्हाळ्याच्या दिवसात त्या तळ्यातील पाणी आटत चालले होते; तेव्हा बगळा त्या तळ्याच्या काठी चिंताग्रस्त होऊन बसला असता तळ्यातील मासे त्याला म्हणाले, "हे आर्य, तू कशाचा विचार करीत आहेस."_
_बगळा म्हणाला, "दुसरा कसला? मी तुमच्यासाठीच विचार करीत आहे. ह्या तळ्यातील पाणी उन्हाळ्यामुळे आटत चालले आहे त्यामुळे तुम्हाला खायाला काय मिळणार. तुम्ही आत्ता काय करणार ह्या विचारांत मी पडलो आहे." मासे म्हणाले, "मग ह्यातून सुटण्याला आम्हाला कोणता उपाय?" बगळा म्हणाला, "माझं ऐकत असाल तर तुम्हांपैकी एकेकाला माझ्या चोचीत धरून दुसऱ्या मोठ्या सरोवरात नेऊन सोडीन."_
_पण माशांना ही गोष्ट पटेना. ते म्हणाले, "असे कधी झालंय काय? माशांवर प्रेम करणारा बगळा कोणी पाहिला आहे काय? आपल्याला एकेकाला लांब नेऊन मारून खाण्याचा तुझा हेतू असला पाहिजे."_
_बगळा म्हणाला, "माशांना बगळे मारून खातात हे खरे, परंतु विश्वासघात करण्यासारखे पातक मी कसे करणार. माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवून तरी पहा. दुसरा उत्तम तलाव नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यापैकी एकाने माझ्यासोबत चला मी तो तुम्हाला तलाव दाखवतो मग तर तुमची खात्री पटेल?"_
_माशांनी खात्री करून घेण्यासाठी एकाला बगळ्यासोबत पाठविले. त्याने त्या माशाला मोठा तलाव दाखवून आणले. त्या माशाने आपल्या इतर माशांसमोर नवीन तलावाचे रसभरीत वर्णन केले. ते ऐकून सर्व माशे त्या नवीन तलावात जाण्यास उत्सुक झाले आणि बगल्यास म्हणाले, "आर्य, आम्हाला त्या नवीन तलावात पोहोचविण्याची कृपा करावी."_
_बगळ्याने ज्या पहिल्या माशाला तलाव दाखवून आणले होते त्यालाच प्रथम तिकडे नेले आणि एका झाडाच्या फांदीवर बसून त्याला मारून खाल्ले आणि त्याचे कांटे झाडाच्या मुळात टाकले. आणि असे त्याने प्रत्येक माश्यासोबत केले. एक खेकडा तेवढा त्या तलावात शिल्लक राहिला. तेव्हा तो बगळा त्या खेकड्याला म्हणाला, "बा खेकड्या, तू तरी येथे कश्याला राहतोस? बाकी सर्व मासे सुखाने त्या तलावात राहाय आहेत व तू एकटाच ह्या आटत जाणाऱ्या डबक्यात बसला आहेस. तेव्हा चल माझ्या बरोबर मी तुला त्या सुंदर तलावात नेऊन सोडतो."_
_खेकड्याने विचार केला की, "ह्याने माशांना नेऊन मारून खाल्ले की जिवंत सोडले हे कोणी सांगावे? पण ह्याच्या बरोबर जाऊन त्यांची स्थिती काय झाली हे पाहण्यास काय हरकत आहे? जर ह्याने मला सुखरूप नेऊन सोडले तर ठीकच आहे; न पेक्षा माझ्या तावडीतून हा जिवंतपणे निघून जाणार नाही ह्याची खबरदारी घेतली पाहिजे." तो बगळ्यास म्हणाला, "माशांना नेऊन तुम्ही ठीक केले. परंतु मला कसे न्याल? बगळा म्हणाला, "कसे म्हणजे? चोचीत धरून!" खेकडा म्हणाला, "एकतर तुमच्या चोचीत मी मावणार नाही व दुसरे असे की मी गुळगुळीत असून घट्ट आहे, तेव्हा तुम्हाला मला नीट पकडता येणार नाही. पण माझे हे आंकडे फार सुदृढ आहेत. ह्यांनी जर मी आपल्या मानेला धरून लोंबकळत राहिलो, तर खाली पडण्याची भीती नाही आणि त्या योगे तुम्ही मला सुरक्षितपणे तिकडे घेऊन जाल."_
_बगळ्याला ही गोष्ट पसंत पडली. खेकड्याला आपल्या मानेत लटकावून तो तलावाजवळ गेला व त्याला ते तलाव दाखवून नेहमीप्रमाणे आपल्या नेहमीच्या झाडाजवळ वळला. तेव्हा खेकडा म्हणाला, "तलाव तर त्या बाजूला राहिले, आणि तुम्ही मला येथे कोठे नेता?"_
_बगळा रागावून म्हणाला, "तु माझ्या गळ्यावर लटकून फिरत आहेस मला तू तुझा नोकर समजतोस काय? इकडे ह्या माशांच्या काटयांचा केवढा ढीग पढला आहे! तुझी ही हाडे ह्याच राशीवर पडणार हे पक्के लक्षात ठेव."_
_खेकडा म्हणाला, "त्या माशांच्या मुर्खपणामुळे त्यांना मारून खाणे तुला सोप्पे गेले. पण आता तुझी गाठ माझ्याशी आहे हे तू विसरू नकोस. माझ्या आकड्यांनी तुझी जी मान पकडली आहे ती उगाच नव्हे. एवि तेवी मला जर मारावयाचे आहे तर आपण दोघे बरोबरच मरू हे पहा, तुझे डोके कापून कसे खाली पाडतो ते!" असं म्हणून त्याने आपल्या आकड्यांनी बगळ्याची मानगुटी दाबली. बगळ्याची बोबडी वल्ली व डोळे पांढरे होण्याची पाळी आली. तो म्हणाला, "मेहेरबानी करावी, मला जीवदान द्यावे. तुला सुरक्षितपणे तलावात पोहोचवून देतो."_
_खेकड्याने "ठीक आहे" असे उत्तर दिल्यावर बगळ्याने त्याला तलावाच्या काठी हळूच चिखलावर नेऊन ठेवले. तेव्हा खेकड्याने कमळाच्या देठाप्रमाणे त्याचा गळा कापून टाकला आणि पाण्यात प्रवेश केला. तेव्हा बोधिसत्त्व म्हणाला, "शठ आपल्या शाठ्याने सदोदित सुखी होतो असे नाही. बकाला जसा खेकडा भेटला तसा शठाला कोणीतरी भेटतोच."_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*१०/११/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment