➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_अकिंचनाला भय कोठुन_*
*_(असंकीय जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एकदा आमचा बोधिसत्त्व ब्राह्मणकुळात जन्मला होता. वयांत आल्यावर प्रापंचिक सुखांचा कंटाळा आल्यामुळे त्याने त्याचा त्याग करून हिमालय पर्वतावर तपश्चर्या सुरू केली. भरपूर दिवस कंदमूळ - फळांवर निर्वाह केल्यावर खारट आणि आंबट खाण्यासाठी तो लोकवस्तीत जाण्याच्या उद्देशाने तो तेथून गेला. वाटेत त्याला कारवानांचा तांडा भेटला. त्यांचासोबत तो ही प्रवास करू लागला. रात्री एका ठिकाणी मुक्काम करण्यासाठी थांबले असता त्यांना लुटण्याच्या उद्देशाने पुष्कळ चोर जमा झाले आणि हे लोक झोपल्यावर आपण त्यांना लुटावे म्हणून ते आजूबाजूला दबा धरून बसले. बोधिसत्त्व एका झाडाखाली इकडून तिकडे फिरत होता. सगळे झोपी गेल्यावर चोर हळूहळू येऊ लागले. त्यांची चाहूल ऐकून बोधिसत्त्व तसाच फेऱ्या घालीत राहिला. चोर तिकडे वाट पाहत राहिले की हा तपस्वी कधी झोपणार आणि आम्ही ह्यांना कधी लुटणार, अशा बेताने चोरांनी ती सारी रात्र घालवली परंतु बोधिसत्त्व झोपी न जाता सारी रात्र फेऱ्या घालीत राहिला. पहाटेला चोर आपली हत्यारे तेथेच टाकून पळत सुटले, व जाता जाता मोठ्याने ओरडून म्हणाले, "हा तपस्वी तुमच्या सोबाय नसता तर आजच तुमचे घडे भरले असते!"_
_तांड्यातील लोक चोरांच्या ओरडन्याने जागे होऊन पाहतात तो त्यांना चोरांनी टाकुन दिलेली शस्त्रास्त्रे आढळून आली. ते बोधिसत्त्वाला म्हणाले, "सारी रात्र चोर तुमच्या आसपास दबा धरून बसले असता, व ते तुमच्यावर हल्ला करतील असा संभव असता तुम्ही भिऊन आरडाओरडा न करता तसेच कसे राहिलात?"_
_बोधिसत्त्व म्हणाला, *"लोकहो, जेथे संपत्ती आहे तेथे भय आहे. माझ्यासारख्याला भय मुळीच नाही, गावांत किंवा अरण्यात कोणत्याही प्राण्यांची मला भीती वाटत नाही. कारण, मैत्री आणि करुणा यांची मी सतत भावना करीत असतो."*_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*१८/११/२०२०*
No comments:
Post a Comment