➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_निर्वाण / निब्बान_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_मनाचे परिवर्तन अकुसलांसाठी पुर्णपणे थांबण्याची अवस्था, मनाच्या पूर्ण विश्रांतीची अवस्था, इच्छा, लालसा व दुःखाच्या अभावाची अवस्था, निर्वाणप्रत
पोहोचण्यापूर्वी मनुष्याचा सतत पुंनर्जन्म होतो; जेव्हा तो
निर्वाणप्रत पोहोचतो, तेव्हा त्याचा पुन्हा जन्म होत नाही. (कारण
मनाच्या अवस्थेचे परिवर्तन होणे थांबलेले असते.)_
_*आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजेच मध्यम मार्ग. आर्य अष्टांगिक मार्गाचे अंतिम
ध्येय म्हणजेच निर्वाण होय. निर्वाणाचा
अर्थ – रोगाद्वेषापासून मुक्ति.* राध नावाचे स्थवीर भगवंताकडे गेले, तेव्हा निर्वाणाचा उद्देश स्पष्ट करताना भगवंतांनी सांगितले, *श्रेष्ठ जीवन निर्वाणाश्रीत आहे. निर्वाण हेच लक्ष्य होय आणि निर्वाण
हाच उद्देश होय. “निर्वाण” म्हणजे मनाच्या विकारांपासून मुक्ति, निर्वाण स्थितीत राहून पुण्यशील असे सर्वश्रेष्ट जीवन जगता येते. निर्वाण
हे आर्य अष्टांगिक मार्गावरील अंतिम लक्ष्य होय. मनाचे विकार नष्ट झाले म्हणजे उरलेले
जीवन निर्वाणाच्या स्थितीमध्ये सुखाने जगता येते.*_
_केवळ “योगाभ्यासाने” निर्वाणप्राप्ती होऊ शकत नाही. योगाभ्यास करण्यात
तत्पर असलेल्या आयुष्यमान मेघियच्या मनात तीन प्रकारचे संकल्प – विकल्प वारंवार
येऊ लागले होते.-_
१.कामभोगासंबंधी संकल्प – विकल्प
२.व्यापाद
(क्रोधा) संबंधी संकल्प – विकल्प
३.विहिंसे
(हिंसे) संबंधी संकल्प – विकल्प
_आयुष्यमान मेघियने संध्याकाळी भगवंतांकडे जाऊन ही गोष्ट सांगितली. भगवंत
म्हणाले, “मेघिय! योगाभ्यासाला आरंभ करण्यापूर्वि अपिरपक्व
मनाच्या व्यक्तीने आपल्या मनाला परिपक्व बनविले पाहिजे. याची साधने अशी –_
१.सत्संगती
२.सदाचार
(धम्म)
३.सदुपदेश
४.सदाचरण
५.प्रज्ञावान
होणे
_“मेघिय!
ह्या पाच गोष्टीत प्रवीण झाल्यावर भिकखुला -_
१.आसक्तीचा
नाश करण्याकरिता अशुभ भावना (शरीराच्या घृणास्पद स्वरूपाची कल्पना) केली पाहिजे.
२.वितर्काचा
नाश करण्याकरिता आना-पान स्मृतिची (श्वासोच्छवास करताना जागृत राहण्याची) भावना
केली पाहिजे.
३.क्रोधाचा
नाश करण्याकरिता मैत्रीची भावना केली पाहिजे.
४.अहंकाराच्या
नाशाकरीता अनित्यतेची भावना केली पाहिजे.
५.अनात्मसंज्ञी
होण्याकरिता सुद्धा अनित्यतेची भावना करणे अनिवार्य आहे.
_*जेव्हा अहंकाराचा समूळ नाश
होतो तेव्हा ह्याच जन्मी तो निर्वाणास प्राप्त होतो.*_
_*चितन पाच प्रकारचे आहे –*_
१)
प्रथम ध्यान हे प्रेममय
मैत्रीध्यान होय. त्यात ध्यानकर्त्याने आपल्या अंतःकरणात असे भरवून घ्यायला पाहिजे
की, तो संपूर्ण प्राणिमात्रांच्या सुखाकरिता व त्याचप्रमाणे त्याच्या
शत्रूंच्या सुखाकरिता देखील त्याने उत्कट ईच्छा करावी
२)
द्वितीय ध्यान हे करूणामय ध्यान
होय. त्यांत त्याने असा विचार करावयास पाहिजे की, सर्वच
प्राणिमात्रांचे जीवन दुःखाने भलेले आहे. त्यांच्या दुःखाची व चिंतेची हुबेहूब
कल्पना करुन त्यांच्याविषयी अतीव करुणा जागृत करावी
३)
तृतीय ध्यान म्हणजे हर्षमय ध्यान
म्हणजेच मुदिता होय. दुसर्यांच्या उत्कर्षाचा विचार करावा. त्यांच्या आनंदाने
स्वतः आनंदी व्हावे.
४)
चतुर्थ ध्यान म्हणजे
अपवित्रतेवरील ध्यान म्हणजेच उपेक्षा होय. अप्रामाणिकपणाचे गल व अकुशल कर्माचे
दुष्परिणाम ह्यांचा विचार करावा. क्षणिक सुख नेहमीच कसे क्षुद्र असते व त्याचे
परिणाम कसे प्राणघातक असतात, याचा विचार करावा.
५)
पाचवे ध्यान प्रसन्नतेवरील ध्यान
होय. त्यात आपल्या मनाला प्रेम व द्वेष, जुलूम व दास्य, समृद्धी व न्युनता या भावनांच्या मर्यादेबाहेर येऊन स्वतःच्या
प्रारब्धाचा निःपक्षपातपणे व अतिशय धिरगंभीरपणे विचार करायला हवा.
मनुष्य या ध्यानांद्वारे अभिज्ञेत
पोहोचतो.
_*अभिज्ञा सहा प्रकारच्या आहेत –*_
१. दिव्यचक्षु
२. दिव्यश्रवण शक्ति
३. दिव्य रूपशक्ती – कोणतेही रूप
धारण करण्याचे सामर्थ्य
४. पूर्व निवासामृती – पूर्व जन्माच्या
(म्हणजे जेवढी मानसिक परिवर्तने झाली त्यांच्या स्मृति)
५. परचित्तविजानन – दुसर्यांचे विचार
समजण्याचे सामर्थ्य
६. आसवक्षयज्ञान – जीवनाच्या प्रवाहाची
परिपूर्णता उमजण्याचे ज्ञान
*_ह्या आश्चर्यकारक गोष्टी आहेत. परंतु प्रत्येक मनुष्य त्यांना प्राप्त करू
शकतो. अभिज्ञेत पोहोचावायची पाच ध्याने आहेत._*
_जिच्याद्वारे एखादा मनुष्य मनोविकारांना शांत करून ज्ञान प्राप्त करू शकतो
आशा ध्यानाच्या दोन मुख्य क्रिया – समथ आणि विदस्सना –_
१. पवित्र जीवन जगून आणि तृष्णेला जिंकण्याचे
सतत प्रयत्न करून मनोविकारांवर विजय मिळविणे
२.
मनन व चिंतंनाद्वारे अलौकिक प्रज्ञेची
प्राप्ती करून घेणे
ह्या दोहोंपैकी प्रत्येकीच्या वेगवेगळ्या
वीस मुद्रा आहेत.
_*ज्ञानाच्या अंतिम अवस्थेत आणि समाधीच्या स्थितीत मन कोरे असते आणि विचार थांबलेला
असतो असे नाही आहे. तिच्या अगदी विरुद्ध स्थिति असते.* त्या अवस्थेत अंतर्मनाच्या दक्षतेची
पराकाष्ठा होते आणि ज्ञान आत्मसात करावयाचे सामर्थ्य त्यानुसारच विस्तीर्ण झालेले असते.
ज्याप्रमाणे उंच टेकड्यांमधील अरुंद पाऊलवाटेवरून चालणार्या मनुष्याचा दृष्टीकोण संकीर्ण
होतो, त्याचप्रमाणे सामान्य जागृत अवस्थेत असताना माणसाचा दृष्टीकोण
संकीर्ण असतो. गरुडाने उंच आकाशात भरारी मारून स्थिरपणे असताना उंचावरून त्याला ज्याप्रमाणे
संपूर्ण प्रदेशावर नजर टाकता येते, त्याचप्रमाणे माणसाला ज्ञानाच्या
व समाधीच्या सर्वोच्च अवस्थेत असताना, त्याच्या भव्य दृष्टिपथात
येणार्या संपूर्ण ज्ञानाचे तत्क्षणीच आकलन होते. विचार थांबलेला नसतो, तो अतिशय तीव्र स्वरुपात प्रखर असतो. परंतु स्वतःविषयी नसून बहुजनहिताय बहुजनसुखाय
असतो._
_*निरोध आणि निर्वाण*_
_*तृष्णेचा निरोध होणे म्हणजेच निर्वाण होय.* संसारीक अज्ञात पुरुष इंद्रियांच्या
विषयोपभोगात डुंबून आनंद मानतात. ते वारंवार जन्म घेतात, त्यांच्या
मनात तृष्णामय विचारांची उथळ पुथळ सुरू असते जरा, मरण ह्यांचे
वारंवार दुःख भोगतात. परंतु ज्ञानी आर्यश्रावक इंद्रियांच्या सुखोपभोगापासून अलिप्त
राहतात. त्यामुळे त्यांच्या “तृष्णेचा निरोध” होतो आणि तृष्णेचा
निरोध की, “उपादानाचा निरोध” होतो. उपादानाचा निरोध झाला की, “भवचा निरोध होतो. भवचा निरोध झाला की, “जन्म घेणे”
बंद होते आणि पुनर्जन्माच्या निरोधाने जन्म, जरा, मरण, शोक इ. दुःखांचा निरोध होतो, अशा तर्हेने तृष्णेचा निरोध म्हणजेच निर्वाण प्राप्त होणे होय._
_*पुण्य करणारे, स्वीकारण्यास योग्य अशा धम्मालाच मानणारे, जाणून घेण्यास योग्य अशा धम्मालाच जाणणारे, अनुचित धर्माचा
त्याग करणारे, योग्य धम्माचा अभ्यास करणारे व साक्षात्कार करण्याजोगा धम्माचा
प्रत्यक्ष साक्षात्कार करणारेच “निर्वाण” प्राप्त करतात. थोडक्यात आर्य-अष्टांगिक मार्गाचे
अनुसरण करणार्यांना निर्वाण प्राप्त होते.*_
_*निर्वाणानंतर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा लोप होत नाही. निर्वाणानंतर मनुष्य जन्ममृत्युच्या फेर्यापासून (म्हणजे तृष्णामय वैचारिक
चक्रापासून) मुक्त होतो. त्याचा तृष्णामय जिवनप्रवाह नेहमीकरता बंद होतो व कुशल जीवनप्रवाह
सुरू होतो आणि उपादानाचा एकदम अंत झालेला असतो.*_
*_निर्वाण काहीसे स्वर्गीय स्थळासमान किंवा स्वर्गासमान आहे असे बौद्धधम्म शिकवीत
नाही. जेव्हा कुटदंताने भगवंतांना विचारले, “निर्वाण कोठे आहे?’ तेव्हा त्यांनी उत्तर दिले कि, “जेथे जेथे नीतीपर उपदेशांचे
म्हणजे आर्य – अष्टांगिक मार्गाचे पालन केले जाते तेथे तेथे निर्वाण असते.”_*
_निर्वाणाप्रत पोहोचण्याच्या हेतूने आपण कुशल कर्म केले पाहिजे, असे बौद्धधम्म शिकवितो. निर्वाणप्राप्तीचा उद्देश समोर ठेवून कुशल कर्मे करीत
राहिल्याने कालांतराने तृष्णा हळूहळू नष्ट होत जाऊन मनुष्यास निर्वाणाची प्राप्ती होऊ
शकते. पूर्णतः निःस्वार्थीपणाचाच प्रतिशब्द म्हणजे निर्वाण. “मी”, “अहं” याचे सत्याला पुर्णपणे शरण जाणे, म्हणजेच निर्वाण.
ह्या पृथ्वीवर जिवंतपणीच प्रत्येकाला निर्वाणाची अवस्था प्राप्त होऊ
शकते._
*_निर्वाणाची
अवस्था_*
_निर्वाण केवळ सुखाची अवस्था असून तिच्यात दुःखाचा लवलेशही नसतो. खरे पाहता
निर्वाण प्राप्त करण्याकरिता, निर्वाणाचा शोध घेण्याकरिता, दुःख भोगावे लागते. शरीराला व मनाला अंकित करून सर्व इंद्रियांवर ताबा मिळवावा
लागतो. शारीरिक व मानसिक बंधने तोडवी लागतात. त्यामुळे निर्वाणापूर्वीच्या अवस्थेत
दुःख भोगावे लागले तरी, निर्वाणानंतर सुखच मिळते. शिलावर प्रतिष्ठित
होऊन, मनाला अंकित केल्यावर मनुष्य कुठेही असो तो निर्वाणाचा
साक्षात्कार करू शकतो, म्हणून “शील” हे निर्वाणाचे मूळ आहे. शिलाशीवाय
निर्वाणाचा साक्षात्कार होऊच शकत नाही._
*संकलन : महेश कांबळे*
*संदर्भ :*
१) मिलिंद प्रश्न
२) बौद्ध प्रश्नोत्तरी
३) तथागताची सत्यगाथा
४) बौद्धधर्म – एक बुद्धिवादी अध्ययन
५) बौद्धधम्म जिज्ञासा
दिनांक : २०/११/२०२०
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment