➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_निवाडा करण्यांत चातुर्यच पाहिजे_*
*_(महासार जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_बोधिसत्त्व एका जन्मीं वाराणसीच्या राजाचा अमात्य झाला होता. एके दिवशीं राजा आपल्या अंतःपुरांतील स्त्रियांसह उद्यानक्रीडेसाठीं गेला होता. तेथें तो व त्याच्या स्त्रिया तलावांत स्नान करण्यास गेल्या. त्या स्त्रियांनीं आपापले दागिने काढून उपवस्त्रांत बांधून दासींच्या स्वाधीन केले; व त्या तलावांत उतरल्या. त्यांतील एक दासी दागिने खालीं ठेवून इकडे तिकडे पहात बसली होती. कांहीं वेळानें ती डुलक्या घेऊं लागली. त्या उद्यानांत पुष्कळ माकडे रहात असत. त्यांतील एका माकडीनीनें त्या दासीच्या जवळ असलेलें दागिण्यांचे गांठाडें पाहिलें व ती दासी बेसावध आहे असें पाहून माकडीनीला गांठोड्यांत काय आहे हें पाहण्याची फार उत्सुकता झालीं. खालीं उतरून हळूंच गांठोडें सोडून त्यांतील एक बहुमोल मोत्यांचा हार घेऊन ती माकडीन तेथून पळून गेली, व एका झाडाच्या वळचणींत तो हार दडवून ठेवून जणूं काय आपणाला कांहीं माहीत नाहीं असें मिष करून तेथेंच बसून राहिली._
_इकडे दासी जागी होऊन पहाते तो गांठोडें सोडलेलें व मुक्ताहार चोरीस गेलेला! आपल्या जिवावरचें संकट आहे असें जाणून तिनें एकच आरडाओरड केली. इतर दासी व राजस्त्रियाहि तेथें जमा झाल्या व तिला त्यांनीं आरडाओरड करण्याचें कारण विचारिलें. तेव्हां भयचकित होऊन ती म्हणाली, ''माझ्या मागोमाग कोणी तरी येऊन या गांठोड्यांतील हार घेऊन पळून गेला. त्याच्यामागें धांवण्याची ताकद नसल्यामुळें मी ओरडलें._
_राजाला हें वर्तमान समजल्याबरोबर त्यानें उद्यानपालांना बोलावून चोराचा पत्ता लावण्यास हुकूम केला. ते इतस्ततः पळत सुटले. एक ग्रामवासी मनुष्य त्या उद्यानाजवळील रस्त्यानें चालला होता. पोलीस धांवत सुटलेले पाहून बिचारा घाबरून गेला, व आडवाटेनें पळूं लागला. पोलिसांनीं त्याला ताबडतोब पकडिलें, व यथेच्छ मार दिला. पोलिसांच्या तावडींतून सुटण्याचा दुसरा मार्ग न दिसल्यामुळें त्यानें मोत्याचाहार चोरण्याचा गुन्हा कबूल केला, व तो म्हणाला, ''मला या मुक्तहाराची किंमत काय ठाऊक. मी तो नेऊन नगरश्रेष्ठीला दिला.''_
_पोलिसांनीं चोराला राजासमोर नेलें, व त्यानें तेथेंहि आपला गुन्हा कबूल करून पूर्ववत् हकीकत सांगितली. तेव्हां राजानें नगरश्रेष्ठीला पकडून आणण्याचा हुकूम फर्माविला; व आपल्यासमोर आल्यावर राजा त्याला म्हणाला, ''माझ्या राजवाड्यांतला हार तूं क्षुद्र माणसाकडून घेतलास कसा ?_
_श्रेष्ठीला राजाच्या या बोलण्याचा अर्थच समजेना. तो घोटाळ्यांत पडला तेव्हां राजानें त्या गांवढळ मनुष्याकडून सर्व गुन्हा पुनः वदविला. श्रेष्ठीला या संकटांतून पार पडण्याची आशा राहिली नाहीं. आपण हार घेतला नाहीं असें म्हणण्यांत कांहीं अर्थ नाहीं, असें वाटून तो म्हणाला, ''महाराज, या माणसापासून मी मोत्याचाहार घेतला खरा. पण तो आपल्या पुरोहिताच्या स्वाधीन तेव्हांच्या तेव्हांच करण्यांत आला.''_
_राजानें आपल्या नोकरांला पाठवून पुरोहिताला तेथें आणिलें. तो पहिल्यानें घोटाळ्यांत पडला खरा. पण आपल्यासमक्ष श्रेष्ठी हार आपल्या स्वाधीन केला असें म्हणतो, तेव्हा गुन्हा नाकबूल करण्यापासून कांहीं फायदा होणार नाहीं असें जाणून तो म्हणाला, ''महाराज श्रेष्ठीनें मला हार दिला खरा पण तो माझ्याजवळ राहिला नाहीं. मी तो आपल्या दरबारच्या गायकाला देऊन टाकिला.''_
_झालें ! बिचार्या गायकावर पाळी आली ! पुरोहितासारखा साक्षीदार असतांना गुन्हा नाकबूल करण्यांत अर्थ काय ? त्यानें सांगितलें कीं, ''मी पुरोहितापासून मोत्याचाहार घेतला खरा पण तो दरबारच्या दासीला देऊन टाकला.'' या चौकशीच्या गडबडीत संध्याकाळ झाली. तेव्हां राजा म्हणाला, ''सध्यां या पांच जणांला अटकेंत ठेवा. उद्यां यांची चौकशी करितां येईल.''_
_बोधिसत्त्व राजाच्या जवळच होता. तो म्हणाला, ''महाराज, आपण या पांच इसमांला माझ्या स्वाधीन करा. मी या खटल्याची चौकशी करतों.'' राजाला बोधिसत्त्वच या कामीं योग्य वाटला, व त्यानें हा खटला निवडण्याचें काम बोधिसत्त्वावर सोंपविलें. बोधिसत्त्वानें या पांचजणांला एका ठिकाणीं अटकेंत ठेविलें व ते काय बोलतात हें ऐकण्यासाठीं त्या स्थानाच्या आसपास आपल्या गुप्त हेरांची योजना केली. रात्रीं सामसूम झाल्यावर श्रेष्ठी या गांवढळ मनुष्याला म्हणाला, ''अरे मूर्खा, तूं मला कधीं पाहिलें होतेंस काय? मग माझ्याजवळ दागिना दिला असें खोटें कां बोललास ?''_
_''माझ्यासारख्या गांवढळ मनुष्यानें चांगला मंचक सुध्दां कधीं पाहिला नाहीं व मग मोत्याचा हार कोठून पाहिला असणार ! परंतु माराच्या भयानें, व कशीतरी माझी सुटका व्हावी या उद्देशानें मी आपलें नांव सांगितलें. मेहेरबानगीकरून माझ्यावर रागावूं नका.'' इतक्यांत पुरोहित श्रेष्ठीला म्हणाला, ''अहो महाश्रेष्ठी? तुम्ही माझ्यावर हा भलताच आळ कां म्हणून घातलात ?'' श्रेष्ठी म्हणाला, ''आम्ही दोघेही वजनदार पडलों तेव्हां एका ठिकाणीं राहिल्यानें दोघांचीहि लवकर सुटका होईल अशा कल्पनेनें मी आपणाला देखील या खटल्यांत ओढलें. याबद्दल क्षमा असावी.''_
_तेव्हां गवई म्हणाला, ''पण हे ब्राह्मणा, तूं माझ्याजवळ दागिना कधीं दिलास ?'' पुरोहित म्हणाला, ''आमच्याजवळ तूं असलास तर आमची करमणूक करूं शकशील व त्यामुळें कैदेंत देखील सुखानें काळ घालवितां येईल म्हणून तुलाहि मीं या माळें गोविलें.'' दासी म्हणाली, ''अहो दुष्ट गवईबुवा, तुमची आणि माझी ओळख तरी आहे काय ? मला तुम्ही दागिना दिलात कधीं ?'' गवई म्हणाला, ''बाई रागावूं नकोस. आम्हा चौघांबरोबर, तूं असलीस म्हणजे आमच्या सेवेंत अंतर पडणार नाहीं. एवढ्याचसाठीं मीं तुझें नांव सांगितलें.''_
_बोधिसत्त्वाच्या गुप्त हेरांनीं हा सर्व ऐकून घेतले, व बोधिसत्त्वाला कळविला. बोधिसत्त्वाची हे लोक निरपराधी असल्याबद्दल आगाऊच खात्री होऊन चुकली होती. कां कीं उद्यानाच्या बाहेर असलेल्या माणसाच्या हातीं पहारेकर्यांच्या तावडींतून सुटून एखादा दागिना जाणें असंभवनीय होतें. त्यांत बोधिसत्त्वाला या संवादाचा बळकट पुरावा सांपडला. परंतु चोरीचा थांग लावल्याशिवाय हें वर्तमान राजाला कळविणें इष्ट नव्हतें. तेव्हां बोधिसत्त्वानें विचाराअंती एखाद्या वानरीनें मोत्याचाहार चोरला असावा असें अनुमान केलें व दुसरें दिवशीं प्रतीति पाहण्यासाठीं खोटे दागिने करवून ते त्या उद्यानांत आपल्या विश्वासू नोकरांकडून पसरविले. प्रत्येक माकडींनी एकेक दागिना उचलून आपल्या गळ्यांत घातला, व त्या इकडून तिकडून मिरवूं लागल्या. ज्या वानरीला मोत्याचाहार सांपडला होता तिनें मात्र त्यांतील दागिना घेतला नाहीं. तेव्हां त्या इतर माकडी तिच्याजवळ जाऊन तिला म्हणाल्या, ''काय तूं येथें आळशासारखी बसली आहेस. हे पहा आमचे दागिने !'_'
_ती माकडीन स्पर्धेनें म्हणाली, ''असले घाणेरडे दागिने घेऊन काय करावयाचे आहेत ? मजपाशीं जो दागिना आहे तो पाहिला तर तुम्हांला असले भिकारडे दागिने घालून मिरविण्यास लाजच वाटेल.'' असें म्हणून तिनें वळचणींतुन मोत्याचाहार बाहेर काढला, व आपल्या गळ्यांत घालून त्या सर्व माकडींनीसमोर मोठ्या डौलानें इकडून तिकडे मिरवूं लागली._
_बोधिसत्त्वानें दागिने घेऊन माकडीन काय करतात हें पाहण्यासाठीं आपले हेर तेथे ठेविलेच होते. त्यांनीं मोत्याचाहार माकडीनीच्या गळ्यांत पाहिल्याबरोबर तिला घेरलें. बिचारी माकडीन त्यांच्या शस्त्रास्त्रांनी आणि आरडाओरडीनें घाबरून गेली, व तिनें तो हार तेथेंच जमिनीवर फेकून देऊन पळ काढिला. त्या हेरांनीं तो हार बोधिसत्त्वाकडे नेला, व त्यानें तो राजाला दिला. राजानें सर्व वृत्तांत ऐकून घेऊन बोधिसत्त्वाची फार तारीफ केली व तो म्हणाला, *''संग्रामात शूराची योजना करावी; मंत्री मंडळांत जो मंत्राचा भेद करणार नाहीं अशाचीच योजना करावी; जेवण्याखाण्यांत आवडत्या माणसांना आमंत्रण करावें; पण अत्यंत कठीण प्रसंगी शहाण्याचीच योजना करावी असें जें लोक म्हणत असतात तें खोटें नाहीं.* आज तुझ्याच पांडित्यानें चोरीचा पत्ता लागून निरपराधी माणसांचा माझ्याकडून छळ झाला नाहीं.''_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२०/११/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
No comments:
Post a Comment