➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_लोभीपणा_*
*_(सिगाल जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_वारणसींतील लोक उसत्वांत यक्षांना मत्स्यमासांदिकांचा बळी देत असत; व यक्षांना प्रसन्न करण्यासाठी मातीच्या भांड्यातून ठिकठिकाणी दारू ठेवीत असत. अशा एका उत्सवाच्या प्रसंगी वारणासीबाहेरील स्मशानात राहणारा एक कोल्हा मध्यरात्र उलटल्यानंतर गटाराच्या रस्त्याने आत शिरला व बलीकर्मासाठी ठेवलेल्या मत्स्यमांसादिकांवर यथेच्छ ताव मारून त्याने मातीच्या भांड्यातील सुरेचे आकंठ पान केले. त्यामुळे पुन्हा गटाराद्वारे बाहेर पडण्याची ताकद त्याच्यात राहिली नाही. तो एका पुन्नाग झाडाच्या झाडीत जाऊन पडला आणि सकाळ झाली तरी तो नशेत असल्याने तसाच झोपून राहिला. एक ब्राह्मण त्या रस्त्याने प्रातः स्नानासाठी चालला होता. त्याला पाहून कोल्हा म्हणाला, "अहो! तुमच्यापाशी माझे काही काम आहे. जरा एका बाजूला याला तर ते तुम्हाला सांगेन. तुमच्याच फायद्याचे आहे, तेव्हा वेळ गेल्यावर तुम्हाला वाईट वाटणार नाही." ब्राह्मण त्याच्या जवळ गेल्यावर तो त्याला म्हणाला, "तुमची वस्त्रे पाहून तुम्ही दारीद्रावस्थेत गांजले आहात असे वाटते. तुमची ही परिस्थिती पाहून मला तुमची फार दया आली आणि माझ्याजवळ असलेले दोनशे कार्षापण तुम्हाला दान करावे असा मी निश्चय केला आहे. पण दिवसा ढवळ्या मला तुमच्या बरोबर शहरांतील रस्त्यावरून जाता येणार नाही. तुम्ही जर तुमच्या उपरण्यात गुंडाळून मी सांगितलेली ठिकाणी घेऊन जाल, तर आजच्या आज ते कार्षापण तुमच्या हवाली करतो."_
_त्या लोभी ब्राह्मणाला दारुड्या कोल्ह्याचे म्हणणे खरे वाटले. त्याने आपल्या उपरण्यातुन त्याला गावाबाहेर स्मशानात नेले. तेथे खाली ठेविल्याबरोबर उपरण्यात देहधर्म करून कोल्ह्याने जंगलांत पळ काढला._
_त्याठिकाणी बोधिसत्त्व राहत होता. तो त्या ब्राह्मणाला म्हणाला, "हे कोल्ह्यावर विश्वास ठेवून तू आपली फजिती करून घेतलीस. त्याच्यापाशी शंभर कवड्याही मिळावयाच्या नाहीत मग दोनशे कार्षापण कोठून असणार? आत्ता तुझे उपरणे धुऊन मुकाट्याने चालता हो आणि द्रव्यलोभामुळे पुनः असा फसू नकोस."_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२३/११/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
No comments:
Post a Comment