Thursday, 12 November 2020

भलत्याच मार्गाने उपजीविका करू नये

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



           *_भलत्याच मार्गाने उपजिविका करू नये_*

                       *_(कपोत जातककथा)_*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖  


             


       _एकदा आमचा बोधिसत्त्व पारव्याच्या कुळांत जन्मला होता. *त्याकाळी वाराणशी नगरवासी लोक पुण्यबुद्धीने पुष्कळ ठिकाणी तुसाने भरलेल्या पिशव्या टांगून ठेवीत असत. हेतु एवढाच की त्या पिशव्यांत पक्षांनी आपली घरटी करावी.* वाराणशीच्या महाश्रेष्ठीच्या स्वयंपाक्याने देखील असली एक पिशवी आपल्या पाकशाळेत टांगली होती. आमचा बोधिसत्त्व राहत असे.­_


        _एके दिवशी स्वयंपाक्याने मत्स्यमांसादिक पदार्थ धुवून टाकलेल्या पाण्याच्या गंधाने लुब्ध झालेला एक कावळा आपला प्रवेश त्या पाकशाळेंत कसा होईल या विचारांत पडला व तेथेच जवळ बसून राहिला. बोधिसत्त्व नियमाप्रमाणे चरण्यासाठी जंगलात जात असता त्याला त्या कावळ्याने पाहिले. व तो मनात म्हणाला, “या पारव्याची संगती केली असतं श्रेष्टीच्या महानसांतील मत्स्यमांसादिक पदार्थांचा आस्वाद घेण्यास संधी सापडेल.” दुसर्‍या दिवशी बोधिसत्व बाहेर निघण्यापूर्वीच कावळा तेथे येऊन बसला, व बिधीसत्त्वाच्या मागोमाग जंगलात शिरला. या कावळ्याच्या कृत्याचा अर्थ न समजल्यामुळे त्याला बोधिसत्त्व म्हणाला, ‘कारे बाबा, तू माझ्या मागोमाग का हिंडत आहेस?’ कावळा म्हणाला, ‘तुमचे आचरण इतके चांगले आहे की, आजपासून तूमच्याच सेवेत आयुष्य घालविण्याचा मी निश्चय केला आहे.’ बोधिसत्त्व म्हणाला, ‘पण आपल्या दोघांचे कसे जुळावे, माझे भक्ष्य निराळे तुझे भक्ष्य निराळे.’ कावळा म्हणाला, ‘तुम्ही आपला चारा शोधण्यासाठी ज्यावेळी जाल त्यावेळी मी देखील तुमच्या बरोबर येऊन माझ्या पोटाची व्यवस्था करीन.’ बोधिसत्त्व म्हणाला, ‘ असे असेल तर ठीक आहे. पण माझ्यासारखे तू देखील मोठ्या सावधगिरीने वागले पाहिजे.’_


       _याप्रमाणे कावळ्याला उपदेश करून बोधिसत्त्व गवताच्या बीजावर आपली तृप्ति करू लागला. कावळ्याने देखील गाईच्या शेणातील किड्यांवर आपला निर्वाह केला. संध्याकाळी बोधिसत्त्वाबरोबर तो त्या पाकशाळेत गेला. तेव्हा स्वयंपाक्याने तो पारव्याचा मित्र असावा अशी कल्पना करून त्याच्यासाठी दुसरी एक तुसाची पिशवी टांगून दिली. त्या दिवसापासून ते दोघेजण तेथे राहू लागले._


       _एके दिवशी श्रेष्टीच्या घरी पुष्कळ मास आणि मासे आणले होते. स्वयंपाक्याने ते पाकशाळेत जिकडे तिकडे लोंबकळत ठेविले. संध्याकाळी कावळ्याची दृष्टी जेव्हा त्याच्यावर पडली तेव्हा त्याच्या पोटात दुखू लागले, व त्यावर कसा ताव मारता येईल या विचाराने त्याने सारी रात्र घालविली. दुसर्‍या दिवशी चरावयाला निघण्याच्या वेळेला  बोधिसत्त्व त्याला म्हणाला, ‘कावळेबुवा चला आता, च्ररावयाला निघण्याची वेळ झाली.’ कावळा म्हणाला, ‘माझ्या पोटात दुखत आहे, तेव्हा तुम्हीच जा’ बोधिसत्त्व म्हणाला, ‘पण मित्रा, कावळ्याला पोटदुखीचा रोग झाला असे कोणीच ऐकले नाही आणि कितीही खाल्ले तरी त्याची तृप्ति होते असेही नाही. पण मला वाटते आज तुझी दृष्टी या माशांवर व मांसावार गेल्यामुळे तुझ्या या पोटदुखीला आरंभ झाला असावा. हे मनुष्याचे भक्ष्य आहे, व आपल्यासारख्या आश्रितांचे भक्ष्य नाही हे लक्ष्यात ठेव आणि आशा पदार्थावर कुदृष्टी न ठेविता रोजच्याप्रमाणे माझ्याबरोबर चल.’ कावळा म्हणाला, ‘तुम्ही म्हणता हे मला कबुल आहे परंतु तुमच्याबरोबर जाणे आज अगदीच अशक्य आहे.’ पारवा म्हणाला, ‘असे आहे तर तू येथेच रहा पण निदान *लोभाला वश होऊन घातक कर्म करू नकोस!’*_ 


       _बोधिसत्त्व चरण्यासाठी बाहेर गेल्यावर कावळा स्वयंपाक घरात काय प्रकार चालला आहे हे हळूच मान वर काढून पाहात बसला. स्वयंपाक्याने सर्व पाकाची सिद्धता करून ठेवली व तो विश्रांतीसाठी थोडा वेळ स्वयंपाकघराबाहेर पडला. ही संधि साधून कावळा आपल्या निवासस्थांनातून बाहेर पडला आणि विचार करू लागला की, मांसाचे लहान तुकडे खावे किंवा एकदम एखादा मोठा तुकडा लांबवावा. शेवटी, एखादा मोठा तुकडा घेऊन पिशवीत जाऊन बसण्याचा त्याने निश्चय केला. परंतु स्वयंपाक्याने मांसाचे तुकडे झाकून ठेविले होते त्यावरील झाकण जेव्हा कावळ्याने खाली पाडले तेव्हा स्वयंपाक्याला संशय येऊन तो आत शिरला. त्याने कावळ्याचे दुष्ट कृत्य पाहिले, व तो आपणाशीच म्हणाला, 'माझ्या मालकासाठी तयार केलेलं पक्वान्न हा दुष्ट कावळा खाऊ पाहत आहे! जणू काय हाच माझा मालक, तेव्हा आता या कावळ्याला भरपूर प्रायश्चित दिल्यावाचून राहाता कामा नये!' त्याने दारे आणि खिडक्या बंद करून कावळ्याला पकडले व त्याचे पिसे उपटून आल्याच्या रसात मीठ आणि जिऱ्याची पूड मिसळून त्याच्या अंगाला लेप दिला; आणि त्याला त्या पिशवीत टाकले, कावळा अत्यंत पीडित होऊन तेथे तळमळत पडला!_

        _बोधिसत्त्व बाहेरून संध्याकाळी परत आल्यावर त्याची ती अत्यंत हृदद्रावक दुर्दशा पाहून म्हणाला, "अरे लोभी कावळ्या, तू माझे वचन न ऐकल्यामुळे या संकटात पडला! *जो आपल्या हितमित्रांचे ऐकत नाही आणि लोभाला वश होऊन खोट्या मार्गाने आपली उपजीविका करू पाहतो त्याची गत अशीच होत असते."*_


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*संदर्भ : - जातक कथा संग्रह*

*संकलन :- महेश कांबळे*

*१३/११/२०२०*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...