Wednesday, 28 October 2020

सुखी संन्याशी

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

                          *_सुखी संन्याशी_*

                  *_(सुखविहारी जातककथा)_*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖  

_एक तटस्थ मानसी | एक सहजची आळशी ||१||_

_दोन्ही दिसती सारखी | वर्म जाणें तो पारखी ||२||_

_एक ध्यानी करिती जप | एक बैसुनी घेती झोप ||३||_

_एका सर्वस्वाचा त्याग | एका पोटासाठी जग ||४||_

_एका भक्ती पोटासाठी | एका देवासाठी गांठी ||५||_

_वर्म पोटीं एका | फळें दोन म्हणे तुका ||६||_

                           *_संत तुकाराम_*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

                _एका काळी बोधिसत्त्व औदिच्य ब्राह्मण कुळामध्ये जन्मला होता. तो वयांत आल्यावर गृहस्थाश्रमाला कंटाळून परिव्राजक झाला व हिमालय पर्वतावर राहू लागला. त्याच्याजवळ तेथे बरीच शिष्यशाखा जमली. एका वर्षाऋतुत तो फिरत फिरत काशीला आला व तेथील राजाच्या उद्यानांत त्याने राजाच्या आग्रहास्तव पावसाळ्याचे चार महिने घालविले. पावसाळा संपल्यावर तो आपल्या शिष्यासह पुनः हिमालयावर जाण्यास सिद्ध झाला._

               _तेव्हा राजा त्याला म्हणाला, "आत्ता तुम्ही वृद्ध झाला आहात, हिमालय पर्वताच्या टेकड्यांवरून चढण्या उतरण्यास तुम्हाला अतिशय क्लेश होतील. तेव्हा तुम्ही येथेच रहा व आपल्या शिष्यांना हिमालयावरील आश्रमात पाठवा."_

           _बोधिसत्त्वाला राजाचे म्हणणे पसंत पडले आणि आपल्या एका प्रमुख शिष्याबरोबर सर्व परिव्राजकांना हिमालयावरील आश्रमात पाठवून तो एकटाच त्या उद्यानांत राहू लागला. काशीच्या राजाने त्याची व्यवस्था चांगली ठेवली._

            _बोधिसत्त्वाचा तो जेष्ठ शिष्य काही काळ सर्व परिव्राजकांसह हिमालयावरील आश्रमात राहिल्यावर आपल्या सतीर्थ्यांना म्हणाला, "गुरूला पाहून पुष्कळ दिवस झाले. आता मी एकटाच जाऊन त्यांचा समाचार घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही एकमताने वागून आपल्या तपश्चर्येची अभिवृद्धी करा."_

            _तो अनुक्रमे काशीला येऊन गुरूला भेटला, व संध्याकाळच्या वेळी आश्रमाच्या ओसरीवर चटई टाकून विश्रांतीसाठी पडून राहिला. इतक्यात काशीराजा बोधिसत्त्वाच्या दर्शनासाठी तेथे आला. तो आश्रमात आला असता त्याला पाहून हा आगंतुक तापस उठला तर नाहीच पण *'अहो सुखं, अहो सुखम्'* असे उद्गारला. राजाला या तापसाने आपला योग्य मान न ठेविल्याबद्दल फार वाईट वाटले. पण बोधिसत्त्वाच्या मर्यादेस्तव आपला राग आवरून तो आश्रमात शिरला आणि बोधिसत्त्वाला नमस्कार करून एका बाजूस बसला व म्हणाला, "भदंत, आज आपल्या आश्रमात रक आगंतुक तापस आला आहे असे वाटते. पण तो खरा तापस नसावा अशी माझी समजूत झाली आहे. हा मनुष्य मी आश्रमापाशी पोहोचलो तरी न उठता खुशाल चटईवर लोळत होता व मी जवळ आल्यावर *'अहो सुखं, अहो सुखम्'* असे ओरडला. मला वाटते तो फार आळशी असल्यामुळे आकंत जेवून निजला असावा व त्यातच त्याला स्वर्गसुख वाटत असावे."_

               _बोधिसत्त्व म्हणाला, "महाराज, आपली गैरसमजुत झाली आहे. हा तापस यथेच्छ खाऊन अजगरासारखा इतस्ततः लोळण्यात सुख मानणारा मनुष्य नव्हे. पूर्वी तो आपल्यासाख्याच उत्तरेकडील एका प्रदेशाचा राजा होता. हिमालयावर माझे जे शिष्य आहेत त्यांत हाच प्रमुख होय. आजच तो येथे येऊन पोहोचला. मार्गात फार श्रम झाल्यामुळे विश्रांतीसाठी तो जरा ओसरीवर पडला आहे. आता त्याने जे उद्गार काढिले त्याचे कारण आपल्या लक्षांत आले नाही. जेव्हा तो आपल्या राजवाड्यात राहत होता  तेव्हा आपल्याप्रमाणेच त्याचे शिपाई त्याचे रक्षण करीत असत आणि तो आपल्या जीवाला धोका न पोहोचावा म्हणून दुसऱ्या लोकांवर सक्त नजर ठेवीत असत.  हांजी हांजी करणाऱ्या आणि लांगूनचालन करणाऱ्या लबाड धूर्त लोकांनी त्याला घेरले होते. आपल्या अंतःपुरातील स्त्रियांवरदेखील विश्वास ठेवणे त्याला इष्ट वाटत नसे. अर्थात राजवाड्यातील सुखाला कंटाळून त्याने त्या बंधनागाराचा त्याग केला; आणि तो हिमालयावर माझ्या आश्रमांत येऊन राहिला. आता जेव्हा त्याने तुम्हाला पाहिले, तेव्हा आपण अशा राज संपत्तीरूप विपत्तीतुन पार पडलो, याची पुनःएकवार आठवण झाली असावी व त्याने *'अहो सुखं, अहो सुखम्'* उद्गार काढले असावे."_

                _राजाला बोधिसत्त्वाचे भाषण ऐकून फार आश्चर्य वाटले, व आपण तापसाविषयी भलतीच कल्पना केली याबद्दल तो खजील झाला. बाहेर जाऊन त्याने तापसाला वंदन केले आणि त्याला त्याचे वृत्त विचारले. तापसाने आपण राजवाड्यातील सुखांना कसे कंटाळत गेलो; पण त्यांची सवय झाल्यामुळे त्यांचा पुढे हिमालय पर्वतावरील आपल्या गुरूच्या मोकळ्या आश्रमात राहू लागल्यापासून आपणाला किती सुख वाटले इत्यादी सर्व वृत्त राजाला सांगितले, आणि तो म्हणाला, "महाराज, आज जेव्हा मी हा तुमचा मोठा लवाजमा पाहिला तेव्हा माझ्या राजवाड्यातील विपत्तीची मला आठवण झाली, व सहजासहजी *'अहो सुखं, अहो सुखम्'* हे उद्गार माझ्या तोंडातून निघाले."_

             _राजा म्हणाला, "भो तापस, आपण मला क्षमा करा. मी राज्यसुखांत दंग झाल्यामुळे आपल्यासारख्या सत्पुरुषांची मला पारख करता येत नाही. ज्याने त्याने मला मान द्यावा असे मला वाटते, व जर काही एखाद्या माणसाकडून स्वतंत्रतेचे वर्तन घडले तर त्याचा मला ताबडतोब तिटकारा येतो. मघाशी आपण मला पाहून उठला नाही याबद्दल मला राग आला आणि त्यामुळे आपल्या उद्गारांचा मी भलताच अर्थ केला. आपल्या उदारचरिताचा यापुढे माझ्या आचरणावर इष्ट परिणाम होईल अशी मला आशा आहे."_

           _*तापसाने राजाला धर्मन्यायाने राज्य चालविण्याविषयी उपदेश केला, तेव्हा राजा त्याला वंदन करून निघून गेला.*_

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*संदर्भ : - जातक कथा संग्रह*


*संकलन :- महेश कांबळे*

*२९/१०/२०२०*


https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...