🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_लोभाचा परिणाम_*
*_(सेरिववाणिज जातककथा)_*
*_इध चे चे हिनं निरोधेसि सद्धम्मस्स नियामतं |_*
*_चिरं त्वं अनुतपेस्सासि सेरिवायंव वाणिजो ||_*
_तैलवाह नदीच्या काठी आंध्रपूर नावाचे नगर होते. तेथे एक प्रख्यात श्रेष्टी राहत असे. कालांतराने ह्या श्रेष्टीची धनदौलत नष्ट झाली; आणि घरांतील सर्व पुरुष मंडळी मरून गेली, एक भोळसर बाई आणि तिची नात एवढीच काय त्या दोघी श्रेष्टीच्या कुळांत शिल्लक राहिली. आपल्या वाड्याच्या मोडक्यातोडक्या भागांत त्या दोघी मोलमजुरी करून आपला निर्वाह करीत राहत असत._
_त्या काळी आमचा बोधिसत्त्व एका वण्याच्या कुळांत जन्मला होता. वयात आल्यावर तो दुसऱ्या एका सेरिवा नांवाच्या फेरीवाल्या वाण्याबरोबर फेरीवाल्याचा धंदा करून आपला निर्वाह करीत असे. एकदा फिरत फिरत ते आंध्रपूरला आले. तेथे आपसामध्ये स्पर्धा होऊ नये म्हणून त्यांनी त्या शहरातील गल्ल्या वाटून घेतल्या. ज्याच्या वाट्याला जे रस्ते आले असतील ते त्याने फिरून संपविल्यावाचून दुसऱ्याने त्या रस्त्यात आपलं माल विकण्यासाठी फिरू नये, असा त्यांनी निर्बंध केला. बोधिसत्त्वाने आपल्या वाट्याला आलेल्या रस्त्यातून फेरी करून पाचशे कार्षापणांची विक्री केली._
_सेरिवा आपल्या हिश्श्याला आलेल्या रस्त्यातून फेरी करीत असता त्या श्रेष्टीच्या मोडक्या वाड्यावरून "मणी घ्या, मणी घ्या, नानातऱ्हेचे जिन्नस घ्या," असे मोठ्याने ओरडत चालला होता. ते ऐकून त्या घरांत राहणारी मुलगी धावत जाऊन आपल्या आजीला म्हणाली, "आज्जी आज्जी, हा व्यापारी आपल्या घराजवळून जात आहे, त्याच्याकडून कांचेचे मणी किंवा दुसरा एखादा जिन्नस माझ्यासाठी विकत घे."_
_आजीबाई म्हणाली, "मुली, आपल्याला मिळणाऱ्या मोलमजुरीने आपला निर्वाह देखील नीटपणे होत नाही. मग आपल्याला मणी वगैरे जिन्नस घेणे शक्य आहे काय?"_
_मोडक्यातोडक्या सामानामध्ये एक भले मोठे ताट पडले होते. ते त्या नातीने आपल्या आज्जीजवळ आणून ती म्हणाली, "आज्जी, ह्या ताटाचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही. मी आज किती दिवस पाहतेय, हे ताट त्या मोडक्या सामानांत पडून राहिले आहे. हे देऊन तो व्यापारी काही जिन्नस देत असला तर आपण घेऊ."_
_आज्जीने सेरिवा वाण्याला बोलावून आणून एका आसनावर बसावयास सांगितले, आणि ती त्याला म्हणाली, "आमच्या घरांत हे जुने ताट पडून राहिले आहे, याचा आम्हाला सध्या काहीच उपयोग होत नाही. ह्याच्या मोबदल्यात माझ्या नातीसाठी एखादी मण्याची माळ द्याल तर मी हे ताट तुम्हास देईन."_
_सेरिवा वाण्याने ते ताट हातात घेतले. त्याच्या वजनावरूनच ते सोन्याचे असावे अशी त्याला शंका आली आणि कसोटीला लावून पाहिल्यावर त्याची खात्री झाली. पण त्या आज्जीला काही एक समजू न देता तो म्हणाला, "हे भिकार ताट येथे कश्याला आणले? ह्याची किंमत एक पै देखील होणार नाही. ह्याच्या मोबदल्यात मण्याची माळ मला कशी देता येईल? उगाच मला त्रास दिलात!"_
_असे उद्गार काढून आणि ते ताट तेथेच जमिनीवर फेकून देऊन सेरिवा त्या वाड्यातून चालता झाला. वाटेत तो स्वतःशीच म्हणाला, "त्या ताटाची खरी किंमत म्हटली म्हणजे एक लाख कार्षापण असली पाहिजे आणि माझ्या सगळ्या मालाची किंमत फार झाली तर तीन चार हजार कार्षापण असू शकेल. तेव्हा माझा सर्व माल देऊन ते ताट मिळाले असते तरीदेखील माझा पुष्कळच फायदा झाला असता परंतु ज्या अर्थी त्या म्हातारीला त्या ताटाची किंमत माहीत नाही, त्याअर्थी मण्याची एक माळ तरी का खर्च करा! संध्याकाळच्या वेळी पुनः येऊन अर्धा कार्षापण किंमतीचे काही मोडके कांचेचे मणी देऊन मला ते ताट सहज उपटता येण्यासारखे आहे. आमच्या व्यापारी लोकांचे हेच तत्त्व आहे की, जेथे अर्ध्या कार्षापणाने काम होत असेल, तेथे पाउण कार्षापण देखील खर्च करू नये."_
_अशा विचारतरंगात गर्क होऊन सेरिवा त्या गल्लीतून बाहेर पडला. बोधिसत्त्वाच्या हिश्श्याला आलेले सर्व रस्त्यातून फेरी करून झाल्यावर, तो सेरिवा ज्या गल्ल्यातून फेरी करून निघाला त्या गल्ल्यांत शिरला. अनुक्रमे तो त्या आज्जीच्या वाड्याजवळ आला. तेव्हा त्या आज्जीची नात आज्जीला म्हणाली, "आज्जी, हा दुसरा एक वाणी ह्या रस्त्याने जात आहे, त्याला ते ताट देऊन तो काही देत असल्यास पाहू." आज्जी म्हणाली, "त्या पहिल्या वाण्याने आपली निर्भत्सना केली तेवढी पुरे नाही का झाली? आता पुनः ह्यांच्याकडून फजिती करून घेण्याची तुझी इच्छा आहे का?"_
_नात म्हणाली, "आज्जी, मुखचर्येवरून हा वाणी पूर्वीच्या वाण्यासारखा कर्कश दिसत नाही. आपल्या ताटाची किंमत कवडीची नसली, तरी तो आपल्याबरोबर सभ्यपणाने वागेल असे मला वाटते."_
_आज्जीने नातीच्या आग्रहास्तव बोधिसत्त्वाला हाक मारली आणि ओसरीवर मांडलेल्या एका आसनावर बसावयास सांगितले. तो खाली बसल्यावर ती त्याला म्हणाली "ह्या जुन्या ताटाची काही तरी किंमत असावी असे मला वाटते, कारण एकेकाळी आम्ही फार श्रीमंत होतो, त्या काळाचे हे ताट आहे. पण तुमच्या आधी येथे येऊन गेलेला वाणी याची काहीच किंमत नाही असे म्हणाला. तुम्ही हे एकवार नीट तपासून पहा आणि जर याची काही किंमत होत असेल तर ह्याच्या मोबदल्यात माझ्या नातीसाठी एखादा मण्याचा अलंकार द्या."_
_बोधिसत्त्वाने ते ताट कसोटीला लावून पाहिले, आणि तो त्या आज्जीला म्हणाला, "आज्जी, ह्या ताटाची किंमत एक लाख कार्षापण आहे, माझ्या जवळ अवघे पाचशे कार्षापण आहेत आणि माझ्या मालाची किंमत फार झाली तर तीन साडेतीन हजार कार्षापण भरेल तेव्हा ह्या ताटाच्या मोबदल्यात देण्याजोगे माझ्याजवळ काही नाही."_
_बोधिसत्त्वाचे सचोटीचे वर्तन पाहून त्या आज्जीस फार संतोष झाला. ती म्हणाली, "व्यापारी लोकांत तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस विरळा. आम्ही जर हे ताट बाजारात विकायला नेले तर आमच्या ह्या दारिद्रावस्थेत आमच्यावर चोरीचा आळ येण्याचा संभव आहे. तेव्हा तुला जे काही देणे शक्य असेल तेवढे देऊन हे ताट घेऊन जा. तुझ्या प्रामाणिकपणाच्या वर्तनाबद्दल हे तुला बक्षीस आहे असे आम्ही समजू."_
_बोधिसत्त्व म्हणाला, "माझ्याजवळ असलेला सर्व माल आणि रोख रक्कम ह्या ताटाच्या मोबदल्यात मी तुम्हाला देतो, मात्र मला ह्या रक्कमेपैकी आठ कार्षापण आणि मालांपैकी माझी तराजू मला द्या."_
_आज्जीला हा सौदा पसंत पडला. बोधिसत्त्व ते ताट, आपली तराजू आणि आठ कार्षापण घेऊन नदीच्या काठी आला व ते कार्षापण देऊन त्याने नावाड्याला विलंब न लावता आपणाला परतीरी पोचविण्यास सांगितले._
_इकडे सेरिवा सर्व शहर हिंडल्यावर पुन्हा त्या आज्जीच्या घरी गेला व तिला म्हणाला, "आज्जी, ते ताट आण पाहू. त्या ताटाची जरी किंमत काहीच नाही, तरी तुझ्यासारख्या गरीब म्हाताऱ्या बाईला वाईट वाटू देणे मला योग्य वाटले नाही, म्हणून पुनः येथे येण्याची मी तसदी घेतली."_
_आज्जी म्हणाली, "वा! वा! तू मोठा धूर्त दिसतोस. जणू काय आमच्यावर उपकार करण्यासाठीच येथे आला आहेस. पण हे पहा, आमच्या ताटाची किंमत एक लाख होती आणि त्याच्या मोबदल्यात पाच आठ कार्षापण किंमतीची एखादी मण्याची माळ देखील तुला देणे कठीण पडले. म्हणजे जवळजवळ आमचे ताट तू फुकटच घेऊ पाहत होतास. परंतु तुझ्या धन्याच्या योग्यतेचा दुसरा एक सज्जन वाणी येथे आला, आणि त्याने त्या ताटाची खरी किंमत आम्हास सांगितली व आपणाजवळ होता नव्हता तो सर्व माल आणि पैसा आम्हास देऊन तो ते ताट घेऊन गेला. तू जर त्या वेळी आम्हास एकादी मण्याची माळ दिली असतीस, तर ते ताट तुलाच मिळाले असते! *पण अति शहाण्याचा बैल रिकामा!*"_
_त्या आज्जीचे ऐकताच सेरिवा पिसाळलेल्या कुत्र्यासारखा उन्मत्त झाला. त्याने आपला माल व पैसे त्या आज्जीच्या दरवाज्यात इतस्ततः फेकून दिले व एक भले मोठे दांडके घेऊन तो नदीवर धावला. बोधिसत्त्व नदीच्या मध्यभागी पोचला होता त्याला पाहून सेरिवा अत्यंत संतप्त झाला, व 'नाव परत आणा, नाव मागे आणा' असे मोठमोठ्याने ओरडू लागला. कोणी काही सांगितले तरी नाव न फिरवता आपणाला त्वरेने परतिरी पोचविले पाहिजे, असा बोधिसत्त्वाने आगाऊच करार केला होता तेव्हा नावाड्यांनी सेरिवा वण्याच्या ओरडण्याकडे लक्ष न देता वेगाने नाव पुढे चालविली. सेरिवा ओरडून थकला व घेरी येऊन तेथेच पडला!_
*_अतिलोभे धर्मनया मोहूनिया कष्ट फार भोगाल |_*
*_तो सेरिवा बुडाला, तेवी तुम्ही शोक सागरी व्हाल ||_*
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२७/१०/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment