Tuesday, 6 October 2020

अहिंसा

 ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


                          *_अहिंसा_*


           _*अहिंसा म्हणजे जीवहिंसा न करणे, हा बुद्धाच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. करुणा आणि मैत्री या दोहोंशी तिचा जिव्हाळ्याचा संबंध आहे.* भिक्खूचा कोणत्याही प्रकारे प्राणिहत्येशी संबंध नसावा. परंतु त्यास मांसाचे दान मिळाले तर ती त्यांचा निरपेक्षभावाने स्वीकार करू शकतो. यज्ञयागामधील पशुबली ही जीवहिंसा करावयाची चेतना आहे, त्यामुळे ती त्याज्य आहे. *बौद्ध धम्मातील अहिंसेचा अर्थ असा की, जेथे जीवहत्या करणे अत्यंत आवश्यक असेल, तेथेच ती करावी. परंतु जेथे जीवहत्या करावयाची चेतना असेल (यज्ञयागात सांगितल्याप्रमाणे) मनाची केवळ इच्छा असेल, ती हिंसा एकदम त्याज्य होय.*_


             _*न्याय्य कारणासाठी केलेले युद्ध किंवा हिंसा यांस तथागतांनी मनाई केलेली नाही आहे.* तथागतांनी सिंह सेनापतीला केलेल्या उपदेशात ह्याचे पूर्णतः स्पष्टीकरण केलेले आहे. *जो शिक्षेस पात्र आहे, त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. तथापि तसे करताना सर्वांप्रति पुर्णपणे प्रेम आणि करुणेने ओतप्रोत राहावे, असे तथागत शिकवितात.* त्या दुष्ट शक्ती, त्या मानवी असोत, दैवी असोत वा नैसर्गिक असोत, तथागत त्यांच्याशी धैर्याने संघर्ष करावयाचा उपदेश देतात. तथागत म्हणाले, 'हे सेनापती सिंह ! तू धैर्याने संघर्ष कर आणि पूर्ण उत्साहाने लढ, परंतु सत्याचा सैनिक हो म्हणजे तथागत तुला आशिर्वाद देतील'._


              _*अहिंसा परमो धर्म: हा आत्यंतिक सिद्धान्त जैन धर्मात आहे; बौद्ध धर्मात नाही.* भिक्खुंना 'त्रिकोटी परिशुद्ध' मांसोळीचे मांस ग्रहण करण्याची अनुज्ञा 'विनय पिटकात' आहे त्यामुळे त्यांच्यासाठी शाकाहार अनिवार्य नाही. *अहिंसा किंवा जीवहिंसा न करणे, हे भगवंतांच्या धम्माचे एक महत्वपूर्ण अंग आहे. अहिंसेचा करुणा व मैत्रीशी अत्यंत जवळचा संबंध आहे.* परंतु प्रश्न असा आहे की, ते केवळ 'शील' होते की तो एक नियम होता? अहिंसेला निरपेक्ष असे बंधन मानल्यास, अहिंसेमुळे वाईटासाठी चांगुलपणाचे बलिदान करावे लागेल, किंवा दुर्गुणासाठी सद्गुणांचे. श्रीलंकेतील बौद्ध भिक्खु विदेशी आक्रमणकर्त्यांवर तुटून पडले व त्यांनी लोकांनाही लढावयास उध्यत केले. दुसरीकडे ब्रह्मदेशातील भिक्खुंनि तसे करावयास मनाई केली व तो देश परतंत्र झाला. ब्रह्मदेशातील लोक अंडी खातात, परंतु मासोळी खात नाहीत. जर्मनीमधील बौद्ध समितीने असा प्रस्ताव केला की, पंचशीलांपैकी ते प्रथम शील सोडून केवळ चार शिलांचेच पालन करतील._

           _परंतु *भगवंतांनी अहिंसेला शील म्हणून ग्रहण केले, नियम म्हणून नाही.* त्यांनी अहिंसेला जीवनाचा एक मार्ग मानले. म्हणून जेथे सद्गुणांचा बचाव करावयाचा असेल व हिंसेशिवाय ते शक्य नसेल, तेथेच नाईलाज म्हणून हिंसा करावी लागेल, असा उपदेश करतांना भगवंतांनी प्रज्ञासंगत फारच उत्तम शिकवण दिलेली आहे._


            _*भगवान बुद्धांनी मांस व मांस भोजन ह्यांतील भेद स्पष्ट केला आहे.*_ 

                 _भगवंतांनी म्हटले आहे की, 'प्राणी हिंसा करणे, मारणे, पिटणे, बांधून ठेवणे, चोरी, मृषावाद, कपट करणे, फसविणे, व्यभिचार ही सर्व मुर्दार-मांस भोजनेच होत ज्यामुळे मनुष्य अपवित्र होतो. काम-भोग, अपवित्र जीवन, निर्दयता, विश्वासघात, गर्वांधता तसेच कृपणता, ही सर्व मुर्दार मांस भोजने आहेत, ज्यामुळे मनुष्य अपवित्र होतो. क्रोध, विद्रोह, ईर्ष्या, फुशारकी, अहंकार, ही सर्व मुर्दार मांस भोजने आहेत,ज्यामुळे मनुष्य अपवित्र होतो. विशिष्ट अन्न सेवन केल्याने मनुष्य पवित्र होत नाही, तद्वतच मांसाचे सेवन केल्याने मनुष्य अपवित्र होत नाही. इंद्रियांवर प्रभुत्व मिळवून, संयम करून, सत्वाची कास धरून करुणामय होऊन, बंधनयुक्त होऊनच मनुष्य पवित्र होतो व दुःखावर विजय मिळवितो._


          _*बौद्ध धम्मात मांसाहार सर्वथा निषिद्ध नाही आहे.* लंकावतार सारख्या महायान बौद्ध धम्मग्रंथामध्ये मांसाहार करणे, सर्वथा निषिद्ध सांगितलेले आहे. परंतु पालि बौद्ध वाङ्मयामध्ये प्राणघात करणे निषिद्ध आहे, मांसाचा व्यापार निषिद्ध आहे. परंतु मांसाहाराचा निषेध नाही. *बौद्धगृहस्थ पशुघात करीत नाही आणि भिक्खूदेखील अशा मांसाचे सेवन करीत नाहीत, जे विशेषकरून व्यक्तिगत रूपाने त्यांच्यासाठीच तयार केले असते.* तिबेटमध्ये अन्नधान्ये व फळे, भाजीपाला इ. फार कमी उत्पन्न होतात. तेथे जैविकेसाठी मांसाहार आवश्यक असल्यामुळे तेथील बौद्ध लोक मांसाहार करतात. *कालमान व परिस्थितीनुसार मांसाहार आवश्यक असल्यास तो निषिद्ध नाही.*_


           *_भगवान बुद्धांची अहिंसा ही त्यांच्या मध्यम मार्गास धरून आहे. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे बुद्धाचे तत्त्व आणि नियम यांत भेद केलेला आहे. त्यांनी अहिंसेला नियमांचे रूप दिलेले नाही. ते एक तत्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून त्यांनी तिचे विवेचन केले आहे. आणि असे करण्यात ते अत्यंत शहाणपणाने वागले यात शंका नाही. तत्त्वामध्ये तुम्हांला तद्नुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य  असते, नियमांत नसते. नियम तुम्हांला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता._*


*संदर्भ :*

*१)* बुद्ध आणि त्यांचा धम्म

*२)* बौद्धधर्म - एक बुद्धिवादी अध्ययन

*३)* बौद्धधम्म जिज्ञासा


*संकलन : महेश कांबळे*

*०६/१०/२०२०*


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...