💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮
*_पालि वाङ्मयाच्या संशोधनाची आणि अभ्यासाची उपोयगिता_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/04/blog-post_21.html
💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮
_पालि भाषा आता कालबाह्य झाली आहे, ही भाषा आता बोलली जात नाही, हे विज्ञान युग आहे. आता या भाषेचा अभ्यास का करायचा? अभ्यास करून काय उपयोग आहे? वगैरे वगैरे अनेक सबबी आहेत. त्यामुळे या साहित्याची उपयोगिता आहे की नाही हा प्रश्न निश्चित आपल्या मनात उपस्थित होतो. पण पालिभाषाच काय? कोणत्याही भाषेचे संशोधन वा अभ्यास असो तो मानवाला नवी दिशा देणारा असतो. तसेच संशोधन ही निरंतर प्रक्रिया आहे. मग ही तर पालि भाषा आणि साहित्य आहे. या भाषेला आणि साहित्याला सम्मासंबुध्दाच्या वचनाचा वारसा लाभला आहे. हे आपण कसे विसरुन जातो!_
_पालि वाङ्मयाचे संशोधन आणि अभ्यास, याची केवळ उपयोगिताच आहे असे नाही तर, मानवाचे संपूर्ण जीवन, त्याचे अस्तित्व सर्व पातळ्यांवर बदलण्याचे सामर्थ्य सुध्दा त्यात आहे. तसेच त्याची विविधांगी उपयोगिता असल्याचे आपल्याला संशोधनाने आणि अभ्यासाने दिसून येईल. या अभ्यासाची सुरुवात ही आपल्याला भगवान बुध्दांपासून करावी लागते! कारण *त्यांनी बुध्दत्वप्राप्तीनंतर तेव्हाच्या मध्यमंडलामध्ये निरंतर ४५ वर्षे त्या वेळच्या लोकभाषेत जो उपदेश केला तोच आज तिपिटकाच्या स्वरुपात सुरक्षित आहे.* तिपिटकाच्या भाषेलाच आज 'पालि भाषा' असे म्हणण्यात येते. 'बुद्धवचन' या भाषेत संग्रहीत असल्यामुळे ही भाषा 'धम्माची भाषा झाली आहे. ह्या भाषेतच तिपिटकाची अंतिम निर्मिती *"देवानंपिय पियदस्सि धम्मासोक"* राजाच्या काळापर्यंत झाल्याचे आपल्याला *तिसऱ्या धम्मसंगितीवरुन दिसून येते. यावरून हे लक्षात येते की पालि साहित्याच्या निर्मितीचा काळ अर्थात तिपिटकाचा काळ हा बुद्धकाळापासून सुरू होऊन धम्मासोकाच्या काळापर्यंतचा आहे आणि नंतर हे साहित्य वट्टगामणि अभय राज्याच्या काळात साधारणतः पहिल्या शतकात सिंहल देशात लिपिबध्द झाल्याचे महावंश या ग्रंथावरून दिसून येते.* अशी दीर्घ काळ चालू असलेली पालि साहित्याची ही चळवळ आहे. त्यानंतर सुद्धा ती तशीच पुढे चालू राहिली. पण त्याची स्थित्यंतरे वेगवेगळ्या स्वरूपात झाली._
_भगवंताना असे वाटत होते की, त्यांचा संदेश सर्व लोकांपर्यंत पोहचावा. म्हणून स्वतः त्यांनी तत्कालीन लोकभाषेत उपदेश केला आणि त्याचबरोबर आपल्या भिक्खू संघाला सुद्धा अनुमती देताना असे म्हटले की,_
*_'अनुजानामि, भिक्खवे, सकाय निरुत्तिया बुद्धवचन परियापुणितु न्ति._*
_'भिक्खूंनो, अनुमती देतो आपल्या बोलीभाषेत बुध्दवचन अध्ययन करण्याची. असे सुद्धा होवू शकते की, तत्कालीन अनेक बोली भाषेत बुद्धवचनाचा संग्रह झाला असावा. परंतु आज जे बुद्धवचन आपल्याला उपलब्ध आहे. ते एकाच पालि भाषेत उपलब्ध आहे. कालांतराने याच भाषेत विस्तृत साहित्याची रचना झाली. तिपिटकावर अट्ठकथा आणि (या अट्ठकथांवर टीका, अनुटीका, बघुटीका, योजना, यष्ठीपद इ. अनेक टीका) ग्रंथ वेळो वेळी आचार्यांकडून व भिक्खू संघाकडून निर्माण झाले. या शिवाय अनुपिटक आणि त्यावर अट्ठकथा, टीका यासारखे विपुल साहित्य आपल्याला पालिभाषेत दिसून येते. तसेच कलेचा आणि संस्कृतीचा, वारसा देणाऱ्या लेण्या, स्तूप, विहारे, शिलास्तंभ, शिलालेख व त्यावरील पालि भाषेतील साहित्य, अशी पालि साहित्याची समृद्ध परंपरा ह्यू-एन-त्सँग या चीनी प्रवाशाच्या काळात सुद्धा चांगल्या स्थितीत असल्याचे त्यांच्या प्रवास वर्णनाच्या डायरीवरुन दिसते._
_पण एवढी समृद्ध पालि साहित्याची परंपरा, संस्कृती, कला, तत्त्वज्ञान याचा जेथे उगम झाला, त्या भारतातूनच हे सर्व लुप्त झाले. बौद्धधम्माच्या संस्कृतीचा, कलेचा, समृद्धीचा आणि संपन्नतेचा वारसा सांगणाऱ्या येथील बौद्धलेण्या, स्तुप, विहारे ज्या त्याचे मुर्तीमंत उदाहरण आहेत, त्या सुद्धा मातीच्या ढिगाऱ्यांनी भरून गेल्या. *येथे माणसाचेच धर्मांतर होते असे नाही. तर अनेक लेण्या, विहारांचे दुसऱ्या धर्माच्या श्रद्धास्थानात धर्मांतर झाल्याचे आपल्याला दिसून येते.*_
_तसेच तक्षशिला, नालन्दा, विक्रमशिला, वल्लभी या सारख्या विश्वविद्यालयांमध्येही अनेक वाङ्मयीन ग्रंथांची रचना झाली असावी. पण ही सर्व साहित्यसंपदा आज उपलब्ध नाही. कारण नंतरच्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, साहित्यक, सांस्कृतिक, स्वकीय आणि परकीय आक्रमणामुळे भारतामध्ये बुद्धधम्माला उत्तरती कळा लागल्यावर नष्ट झाली असावी. ज्या पालि साहित्य संपदेचे भिक्खूसंघाने संरक्षण केले, ते त्यांनी आपल्या बरोबर शेजारी देशात, नेऊन त्याचे जतन केले असावे. कारण धम्माशोकाने (अशोकाचा काळ साधारपणपणे खि. पू. २७२-२५ या दरम्यानचा आहे) तिसऱ्या धम्मसंगिती नंतर भारताबाहेर धम्मप्रचार-प्रसार करण्याची, जी योजना आखली, त्यानुसार धम्माशोकाचा पुत्र थेर महिंद्र आणि कन्या थेरी संघमित्ता यांनी सिंहल देशात पालि साहित्याची परंपरा नेली. ही परंपरा स्तविर आणि आचार्य यांच्या माध्यमातून बर्मा (ब्रह्मदेश), श्रीलंका, सयाम (थायलंड), कंबोज इ. देशात गेली. भारताच्या शेजारील या देशांनी, भगवान बुद्धाच्या धम्मदेसनेचे, अनुशासनाचे व संपूर्ण साहित्य परंपरेचे जतन आणि संवर्धन केल्यामुळेच ही संपूर्ण साहित्य परंपरा तेथे अस्तित्वात राहू शकली. त्याचेच फळ आज आपणाला थोडेसे मिळू लागले आहे._
_हे पालि साहित्य त्यांनी ताडपत्रावर लिहून ठेवले. पण हे कोणत्याही तद्देशीय भाषेत नसून पालि भाषेत होते. या बौद्ध देशांमध्ये ही परंपरा आज सुद्धा उपलब्धच नाही, तर जतन करून ठेवली आहे. यावरून असे दिसते की, तेथील लोकांची भगवंताच्या शिकवणीवर अखंड दृढनिष्ठा असल्यामुळे त्यांनी ते ताडपत्रावरील हस्तलिखित ग्रंथ साहित्य फार जपून ठेवले. काही ग्रंथाच्या नवीन नकला केल्या. काहीवर भाष्ये लिहिली व काही निरनिराळ्या ताडपत्रावर विस्तृत रुपाने लिहून ठेवले._
_असे असताना कालांतराने ब्रिटिश राजवटीच्या काळात शेजारील देशांनी ताडपत्रावर जपून ठेवलेल्या त्या जुन्या नकला युरोपियन संशोधकांनी हस्तगत केल्या. याच *ब्रिटिश राजवटीच्या काळात एकीकडे जेम्स प्रिन्सेप यांनी अशोकाच्या शिलालेखांचा उलगडा करण्यास सुरुवात केली. तर ह्यू-एन-त्सँग या चीनी प्रवाशाच्या डायरीवरुन अलेक्झेंन्डर कनिंगहॅम यांनी त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून अनेक ऐतिहासिक पुरातत्व स्थळांचे उत्खनन करुन त्यांचा शोध लावला व त्यावरून अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध होऊ लागला. दुसरीकडे ऱ्हिस डेव्हिड, टर्नर, चाइल्डर्स, गॉजर्ली, ओल्डनबर्ग यांच्या सारख्या पंडितांनी युरोपियन सुसंस्कृत वर्गाला ताडपत्रावरील लिखाणांचा परिचय करून देण्याचे काम सुमारे अर्धशतकावर चालू ठेवले. त्या पूर्वी बुद्धाच्या शिकवणीविषयी काही मध्ययुगीन ग्रंथावरून ज्ञात होत असे तेवढेच. अशाच एका ग्रंथाच्या आधारे एड्विन आर्नोल्ड यांनी आपले Light of Asia हे काव्य लिहिले.*_
_वर निर्देश केलेल्या विद्वानांनी ताडपत्रावरील पालि साहित्याचे संशोधन करुन ते ग्रंथरुपाने छापून काढले व इतर भिक्खूंच्या मदतीने त्याची भाषांतरे केली. म्हणून त्या काळात युरोप व अमेरिकेतील विद्वान जनतेला प्राचीन बौद्धधम्मासंबंधी बरेच ज्ञान मिळाले. यावरुन हे स्पष्ट होते की, *आधुनिक काळात पालि साहित्याच्या संशोधनाला आणि अभ्यासाला गती ही १८ व्या १९ व्या शतकात, इंग्रजाच्या राजवटीत निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि पाश्चात्यांनी पालि साहित्याच्या संशोधनाला आणि अभ्यासाला सुरुवात केली. प्रो. ऱ्हिस डेव्हिडस् यांनी स्थापन केलेल्या एकट्या पालि टेक्स्ट सोसायटी, लंडन या सोसायटीने मूळ ग्रंथ व भाषांतरे मिळून एकंदर पालि साहित्याची ७० पुस्तके प्रकाशित केली आहेत.*_
_*मॅक्स मुल्लर यांच्या The Sacred Books of the East या मालिकेत कित्येक भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत व The Sacred Books of the Buddhist, the Harvard Oriental series आणि जर्मन पालि सोसायटी इ. च्या विद्यमाने कित्येक नवीन नवीन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. तसेच Oxford University Press येथून सुद्धा अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.*_
_*१९ व्या शतकात अनागारिक धम्मपाल यांनी 'महाबोधि सोसायटी' ची स्थापना करुन व इतर मार्गाने भारतामध्ये बौद्ध धम्माच्या अभ्यासाची नवीन प्रेरणा आणली. तर २०व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्याकडे पालि भाषेच्या संशोधनाला आणि अभ्यासाला पुन्हा नव्याने आचार्य धर्मानंद कोसम्बी यांनी सुरुवात केली. त्यांच्या अध्यापनकाळात चिं. वि. राजवाडे, डॉ.पु. वि. बापट, प्रा. चिंतामणराव जोशी, प्रा. ना. के. भागवत यांच्यासारखे बौद्धधम्माचे व पालिभाषेचे पुष्कळ विद्वान त्यांच्या हातून तयार झाले. त्या विद्वानांनी आणि राहुल सांस्कृत्यायन, भन्ते जगदीश काश्यप, भदन्त डॉ. आनन्द कौसल्यायन, भदन्त धर्मरक्षित, धर्मरत्न यांनी पालि भाषेचे देवनागरी लिपीतील अनेक ग्रंथ आणि त्याची भाषांतरे करण्याचे काम केले आहे.*_
_पण हे काम सर्वार्थाने पूर्ण झाले आहे असे नाही. आताच्या अभ्यासकांना आणि संशोधकांना पालि भाषेचा अभ्यास अनेक विषयाच्या अनुषंघाने करता येण्यासारखा आहे. *पालि साहित्य आणि प्राचीन भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक डॉ. मिना तालिम यांनी 'पालि भाषेच्या विकासाची दालने' या लेखात म्हटल्याप्रमाणे पालि भाषेचा अभ्यास अनेक विषयाच्या संबंधाने करता येवू शकतो हे स्पष्टच आहे.* त्याचा आधार घेऊन काही मुद्दे या लेखात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्या संबंधाने त्याची उपयोगिता असल्याचे सुद्धा दिसून येईल. जसे..._
*_१. इतिहास संशोधनाच्या दृष्टीने उपयोगिता_*
_प्राचीन भारतीय इतिहासाचे प्रतिबिंब पालि वाङ्मयात दिसून येते व त्यात येणारा इतिहास हा सत्यावर आधारलेला आहे. कारण तो बहुतांशी श्रमणांनी (भिक्खूंनी) लिहिला असल्यामुळे त्यात कोठल्याही राजाचा व राजवंशाचा द्वेष वा लोभ नाही. दुसरे असे की, पालि साहित्यातून पालि वाङ्मयाच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो. पण पालि वाङ्मयाच्या इतिहासाचा अभ्यास झाला म्हणजे बौद्ध वाङ्मयाचा प्रश्न पुरा झाला. सुटला, असे मात्र नाही. तर बुद्धाची शिकवण ही भारतात तसेच भारताबाहेर गेली. त्यामुळे त्या देशातील कोट्यावधी लोक बुद्धधम्माचे अनुयायी बनले. म्हणून बुद्धधम्माच्या इतिहासात तत्कालीन लोकांची बुद्धी, नीति, विचार, जीवन, राजकारण, कला वगैरे गोष्टीचे चित्र दृष्टीस पडत असल्यामुळे गेल्या अडीच हजार वर्षात बौद्धधम्मामुळे मानव जातीची सुधारणा कशी झाली व त्यामुळे इतर धर्मीयांच्या आचारांत विचारांत बुद्धधम्माची काही बाबतीत छाप कशी पडली, हा इतिहास काही संस्कृत व पालि ग्रंथावरुन, काही शिलालेख, नाणी, ताम्रपट, जयस्तंभावरील लेख, लोकांचा आधार यावरुन समजतो. तसेच राजनैतिक, धार्मिक व सामाजिक इतिहास संशोधनामुळे समजतो. तसेच *बुद्धधम्माचे आगार असलेल्या प्रांतात तीन प्रसिद्ध चिनी यात्रेकरु (फा-हि-यान इ.स.४०० मध्ये इ-त्सिंग इ.स.५१८ मध्ये, ह्यू एन त्संग ६२९-६४८) मध्ये येवून गेले.* त्यांनी आपली अमूल्य प्रवास वर्णने लिहून ठेवली नसती तर बुद्धधम्माचा आता समजतो, तेवढा सुद्धा इतिहास कळला नसता. पुराणवस्तू संसोधनही जेव्हा साजेशा पद्धतीने होऊ लागेल तेव्हा कोठे आपणाला जेमतेम क्रमवार इतिहास जुळवता येईल. त्यासाठी अजूनही अभ्यासाची आणि संशोधनाची आवश्यकता आहेच._
_यासाठी उदाहरणच द्यायचे झाले तर *ऐतिहासिक पुरुष असलेले सम्मासबुद्ध म्हणजेच (भगवान बुद्ध) हे आपल्याच मायभूमीतच अवतारी पुरुष झाले होते. पण वर म्हटल्याप्रमाणे ह्यू-एन त्सँग या चीनी यात्रेकरुच्या डायरीवरून अलेक्झान्डर कनिंगहॅम यांनी त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून अनेक ऐतिहासिक पुरातत्व स्थळे शोधली. त्यामध्ये लुंबिनीचा धम्माशोकाचा लेख असलेला शिलास्तंभसुद्धा आहे. जेम्स प्रिन्सेप यांनी धम्माशोकाच्या या शिलालेखांचा उलगडा करण्यास सुरुवात केली आणि ब्राह्मी लिपी व लेखाची पालि भाषा वाचता येऊ लागली. त्यामुळे धम्माशोकाचा लुम्बिनीतील स्तंभालेख वाचण्यात आला आणि भगवान बुद्धाविषयीचा भारताचा संपूर्ण इतिहास बदलला. भगवान बुद्ध ऐतिहासिक पुरुष असल्याचे या स्तंभलेखाने सिद्ध झाले. हा इतिहास बदलविणारा तो कोणता लेख धम्माशोकाच्या लुम्बिनी (रुम्मिनदेई) च्या स्मारक स्तंभलेखातील होता,*_
तर तो म्हणजे-
_*'देवानपियेन पियदसिन लाजिन वीसती वसाभिसितेन अतन आगाच महीयिते हिद बुधे जाते सक्यमुनी ति सिला विगडभी चा कालपित सिला यभे च उसपापिते हिद भगवं जाते ति, लुमिनि गामे उबलिकेकटे अठभागिये च*_
_*रोमिला थापर लिखित 'अशोक आणि मौर्याचा ऱ्हास या पुस्तकाचा डॉ. शरावती शिरगांवकर यांनी अनुवाद केला.* त्यातील हा, त्यांनी केलेला अनुवाद. 'देवांचा प्रिय प्रियदर्शि राजा, राज्याभिषेकाला वीस वर्षे झाल्यानंतर स्वतः त्या बुद्ध शाक्यमुनिच्या जन्मस्थानी आला आणि त्याने या स्थानाची पूजा केली. त्याने येथे दगडी वेदी बांधण्याची व दगडी स्तंभउभारण्याची व्यवस्था केली. लुंबिनी या खेड्यात भगवान बुद्धाचा जन्म झाला म्हणून त्याला करातून सूट दिली आणि महसूल म्हणून वसूलीचा (धान्याचा) एक अष्टमांश इतका हिस्सा ठरवून देण्यात आला._
_*दुसरा अनुवाद राधाकुमुद मुखर्जी यांनी 'अशोक' या पुस्तकात केलेला* 'देवताओं के प्रिय प्रियदर्शी राजाने अभिषेक के बीसवे वर्ष में यहाँ आकर पूजा की क्योंकि यहाँ बुद्ध शाक्यमुनि का जन्म हुआ था। यहाँ एक शिला-विग्रह बनवाया और एक पत्थर का स्तंभ भी लगवाया कि भगवान यहाँ जन्मे थे। लुमिनी ग्राम को अपवलिक किया और अष्टभागिक किया। (अर्थात इस गाँव से कोई बलि धार्मिक कर नहीं लिया जाएगा और उपज का आठवाँ भाग कर लिया जाएगा।)_
_*तिसरा अनुवाद डॉ. मिना तालिम यांचा 'Edicts of king Asoka a new Vision' या पुस्तकात केलेला,* जो पालि भाषेला अनुसरून आहे. त्यांनी प्रथम धम्माशोकाचा ब्राम्ही लिपितील लेख देवनागरी लिपीत पालि भाषेत लिप्यांतरीत केला व नंतर त्याचे भाषांतर केले. ते खालीलप्रमाणे आहे._
*_देवानंप्पियो पियदस्सि राजिना वीसतिवस्साभिसित्तेन अत्तनो आगतोः महिंया इथ बुद्धो जातो सक्कमुनि 'ति सिलावङ्गुकीमि च कारापिता सिलाथम्मो च उस्सापिता। इध भगवा जातो इति लुम्बिनीगामे उबलिं कता अट्ठभागे च।_*
1. Piyadassi, the beloved of the God, twenty years after the consecration.
2. has come to this land in person as Buddha, the Sakya sage was born here, on this earth.
3. He raised here a stone pillar made by (stone-carpenter) sculptors.
4. Here the Lord was born, therefore the taxes of Lumbini village, Up to eighth (share) has been exempted.
_*देवाचा प्रिय प्रियदर्शि राजा, राज्याभिषेकाला वीस वर्षे झाल्यानंतर तो स्वतः त्या बुद्ध शाक्यमुनिच्या जन्मस्थानी आला. त्याने येथे मुर्तीकाराकडून (सिलाव की स्टोन कारर्पेन्टर) दगडी स्तंभ उभारुन घेतला. येथे भगवान बुद्धाचा जन्म झाला म्हणून लुंबिनी या गावाला करातून सूट दिली आणि महसूल म्हणून वसूलीचा (धान्याचा) एक अष्टामांश इतका हिस्सा ठरवून दिला.*_
_या तीनही उदाहरणावरुन आपल्याला असे दिसेल की, तिसरा अनुवाद पहिल्या दोन अनुवादापेक्षा वेगळा आहे. त्याला कारण म्हणजे त्या काळात अभ्यासकांनी पालि भाषेला प्राकृत भाषा समजून त्या लेखांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाषेच्या दृष्टीने या स्तंभलेखाचा कसा अर्थ लावला गेला या संदर्भात डॉ. मीना तालिम यांनी वेगवेगळ्या विद्वानांच्या मतांचा *Edicts of king Ashoka a new Vision'* या पुस्तकात बराच उहापोह केला आहे. तो आम्ही येथे करीत नाही पण तो ही अभ्यासनीय आहे. *या उदाहरणावरुन आपल्याला दोन गोष्टी समजतात. एक म्हणजे भगवान बुद्ध हे पौराणिक देवता नसून ते एक ऐतिहासिक पुरुष आहेत आणि दुसरे म्हणजे पालिभाषा ही प्राकृत भाषा नसून स्वतंत्र भाषा आहे. यावरून पालि साहित्याच्या संशोधनाची आणि अभ्यासाची अजूनही किती आवश्यकता आणि उपयोगिता आहे याची आपल्याला जाणीव होते.*_
*_२. बुद्धधम्माचा भारतामध्ये आणि इतर देशातील जनतेवर परिणाम :-_*
_बुद्धाच्या धम्माचे यथार्थ ज्ञान करून देणारे सर्वात प्राचीन वाङ्मय जर कोठे उपलब्ध असेल, तर ते पालि भाषेत आणि पालि साहित्यातच आहे. त्यामुळे हे स्पष्टच आहे की, अमूल्य अशा प्राचीन वाङ्मयाची एक मोठी खाण म्हणजेच पालिभाषा आणि साहित्य होय. या संदर्भात *पी. व्ही. बापट यांनी 'पालिभाषा प्रवेश' या व्याकरणाच्या पुस्तकाला लिहिलेल्या 'पुस्तकात' असे म्हटले आहे की, 'बुद्धधम्माचा संपूर्णपणे अभ्यास करु इच्छिणाऱ्यास ह्या भाषेच्या साहित्याच्या अभ्यासाची फार जरुरी आहे. एवढेच नव्हे, तर बुद्धधम्माचा भारताबाहेरील इतर देशातील जनतेवर काय परिणाम झाला हे जाणणाऱ्यांसही पालि साहित्याच्या ज्ञानाची आवश्यकता आणि उपयोगिता आहेच.*_
*_३. पाली भाषा आणि साहित्य :-_*
_भगवान बुद्धांनी आपल्या धम्माच्या उपदेशासाठी पालि भाषेचा उपयोग केला तेव्हा या भाषेला साहित्यक्षेत्रात स्थान प्राप्त झाले आणि तेव्हापासून या भाषेच्या साहित्याची परंपरा सुरु झाली असे म्हणता येते. तसे पाहिल्यास या भाषेचा पिंडच मुळी सुगम, सोप्या, सरळ साधेपणात आहे. तसेच ती लोकप्रिय असल्यामुळे जनसामान्य लोकांमध्ये बोलली जात होती. ती प्रगतिशील मानव समाजाबरोबर आपले रंग-रूप बदलत गेली. तिने मागधीचे रूप धारण केले. *'ज्याला आपण बुदधकालीन मागधी असे म्हणतो, तिच नंतर पालि, मागधी, तन्ति वगैरे नावाने ओळखली जाऊ लागली. या मागधीने भविष्यातील साहित्यात आपले एक विशिष्ट स्थान निर्माण केले. भगवंतांनी आपल्या भिक्खू संघाला तर स्पष्टपणे या आपआपल्या बोलीभाषेत बुद्धवचनाचा उपदेश करण्याची अनुमती दिली होती.*_
_तेव्हापासून क्रमशः पालिभाषा साहित्याचे भंडार वाढतच गेले आहे. धम्मासोकाच्या काळात बौद्धधम्म आणि या भाषेचे साहित्य आपल्या विकासाच्या अतिशय उच्च अशा अवस्थेला पोहचले होते. यावरुन स्पष्ट होते की, साहित्यिक भाषा म्हणून पालि (मागधी) भाषेच्या संपूर्ण साहित्याची निर्मिती भगवान बुद्धांच्या काळापासून सुरु झाली. अतः पालि साहित्याचा काळ सुद्धा बुद्धकाळापासून आरंभ होतो असे म्हटल्यास चूक होणार नाही. भगवान बुद्धानंतर सुद्धा पालि भाषेत बौद्ध विद्वानांनी वेगवेगळ्या विषयावर विपुल साहित्याची रचना करून हे साहित्य अधिक समृद्ध केले. या विषयाची माहिती सुरुवातीलाच घेतली आहे. एवढेच नव्हे तर या भाषेत काव्य निर्माण करून महाकविंनी आपल्या अनुपम प्रतिभेचा उत्तम परिचय करून दिला आहे. संस्कृत भाषेच्या नाटकात सुद्धा या भाषेचा खूप वापर दिसून येतो. तसेच *पालि भाषेतून ज्या वर्तमान भारतीय भाषांची उत्पत्ती झाली आणि त्या भारताच्या वेगवेगळ्या भागात बोलल्या जातात, त्या सर्व भाषांचे साधारण नाव 'प्राकृत' असे आहे.* या सर्व भाषा प्राकृताच्या उपभाषा मानल्या जातात. परंतु प्रदेश किंवा काळाच्या विभिन्नतेच्या कारणाने यामध्ये वेगवेगळे भेद दिसून येतात. म्हणून आजसुद्धा या भाषांबरोबर विद्वानांकडून प्राकृत शब्दाचा वापर केला जातो. (जसे-अर्धमागधी प्राकृत, महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश प्राकृत, हिन्दी प्राकृत इ.) पालि भाषेतून वेगवेगळ्या भाषांची जरी निर्मिती झाली असली, तरी या भाषेत रचलेल्या तिपिटकाचे भारतीय साहित्यामध्ये स्वतःचे विशेष असे महत्त्वाचे स्थान आहे. त्याशिवाय नवाङ्गसासन व त्याचे प्रकारसौंदर्य या सर्वांचा विचार करणे आणि पालि वाङ्मयातील प्रत्येक ग्रंथाचे मूल्यमापन करणे हा सुध्दा संशोधनाचा आणि अभ्यासाचा एक महत्त्वाचा विषय म्हणून पालि भाषेकडे पाहणे अगत्याचे ठरते._
*_४. भाषा विज्ञान आणि भाषा शास्त्र:-_*
_प्राचीन भारतीय साहित्याच्या दृष्टीने पालिभाषेचे ज्ञान, भाषाविज्ञान जगातील प्राचीन भाषांबरोबर तुलनात्मक अध्ययन करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. म्हणून *पालि भाषेच्या अंगाने भाषा विज्ञान व तुलनात्मक भाषा विज्ञान तसेच भाषा विज्ञानाचे अंग जसे (१. ध्वनी Sound २. पद किंवा शब्द Form ३. वाक्य Sentence ४. अर्थ Meaning) यांचा पालि भाषेचा उगम, विकास व त्याचा चार पोटभाषांशी (dialects) असलेला संबंध पहाणेही जरुरीचे आहे. असा अभ्यास प्रा. मेहंदळे नंतर कुठेही केलेला दिसत नाही. म्हणून पालि भाषेच्या अभ्यासकाने या अंगाने विचार केल्यास एक नविन अभ्यासाचे दालन खुले होईल.*_
*_५. पालि भाषेचे व्याकरण :-_*
_पालि भाषेचे स्वतंत्र असे व्याकरण आहे. त्यामुळे पालि भाषेचे व्याकरण हा एक वेगळाच अभ्यासाचा विषय असणे आवश्यक आहे. *पालि भाषेत कच्चायनः मोग्गल्लान, रुपसिध्दि आणि सद्दनीति हे व्याकरण ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत.*_
*_६. अनुवाद आणि लिप्यांतर :-_*
_अनुवाद: पालि भाषेतील वाङ्मयाचा इतर भाषांमध्ये आणि मराठीत अनुवाद करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी पालि भाषेवर प्रभुत्व मिळविणे आवश्यक आहे. हे कार्य पालि टेक्स्ट सोसायटी, लंडनच्या प्रमाणे एक मंडळ स्थापून व निदान चार-पाच विद्वानांनी एकत्र येऊन असा अभ्यास केला पाहिजे व अनुवादित पुस्तके छापली पाहिजेत. जसे धम्मपदाचा जगातल्या अनेक भाषेत अनुवाद दिसून येतो. त्यामुळे पालि भाषेचा अनुवादाच्या अंगाने अभ्यास करणे सुध्दा पालि साहित्याच्या अभ्यासकांस उपयोगी आहेच._
_*लिप्यांतर :- विपस्सना रिसर्च इन्टिट्यूट, धम्मगिरी, इगतपुरी यांनी तिपिटक अट्ठकथा आणि वंश साहित्याचे व काही इतर ग्रंथांचे १४ लिपिंमध्ये लिप्यांतर करुन काही प्रमाणात हे काम केले असले तरी आज सुध्दा पालि भाषेचे जगातल्या वेगवेगळ्या लिपिमध्ये लिप्यांतर करण्याचे काम बाकी आहे.* त्यासाठी अनेक ग्रंथ अजूनही लिप्यांतराच्या प्रतीक्षेत आहेत. ते संशोधकांना आणि अभ्यासकांना खुणावत आहेत._
*_७. बौध्दधम्माचा सखोल अभ्यास :-_*
_याचे दोन भाग पाडता येतील.
*_अ) श्रमणांसाठीचा धम्म व ब) उपासकांसाठीचा धम्म_*
_त्यांचे नियम, ध्येये, उपासना, आचार इ. सर्व गोष्टीचा अभ्यास ध्यान, समय व विपस्सना यांचा विचार या दृष्टीने देखील आपणाला त्याचा अभ्यास करता येईल._
*_८. बुद्धांचे तत्वज्ञान :-_*
_जगात माणसाला सांसारिक गोष्टीचा विचार करणे जेवढे आवश्यक आहे. त्याहीपेक्षा पारमार्थिक गोष्टीचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. शरीराला झालेल्या जखमा औषधाने बऱ्या करता येतात, परंतु मनुष्याच्या मनाला झालेल्या जखमा मात्र तत्त्वज्ञानरुपी औषधाशिवाय इतर औषधांनी बऱ्या करता येत नाहीत. म्हणून तत्त्वज्ञानाचा नेहमी जगात उदो उदो होतो. म्हणूनच बुद्धांचे तत्वज्ञान विषयक धोरण पालि भाषेतून अवगत करणे. *पञ्चसिल, अट्टङ्गिकोमग्गो, पटिच्चसमुप्पाद, दुक्ख, अनत्त, अनिच्चता, कम्म, पुनभव या वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाधिष्ठित प्रणालीचा अभ्यास करणे जरुरीचे आहे.*_
_दुसरे म्हणजे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा बौद्ध तत्वज्ञानावर झालेला परिणाम व बौद्धधम्माचा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानातील प्रणालीवर झालेला परिणाम या सर्वांचा विस्तृतपणे अभ्यास करणे हे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हितावह आहे._
*_९. पुरातत्व व प्राचीन वस्तुंचा अभ्यास :-_*
_पुरातत्त्वशास्त्राचा पायाभूत आधार म्हणजे उत्खनन होय. हे शास्त्र अलीकडेच विकसित झाले असले तरी यामधून प्राचीन सांस्कृतिक इतिहासाची फार मोठ्या प्रमाणात उकल होण्यास मदत झाली आहे. *पुरातत्त्वाचा सर्वात मोठा भाग हा बौद्धकालीनच आहे.* उत्खननामधून या संदर्भात अनेक उद्बोधक पुरावे हाती लागतात. तथापि भौतिक विकासाचे आरेखन अद्याप शास्त्रशुद्ध नाही आणि *इतिहासलेखन व ऐतिहासिक पुरातत्त्व यात म्हणावा तसा सुसंवाद अद्याप प्रस्थापित झालेला नाही.*_
_तो प्रस्थापित व्हावा व प्राचीन भारतातील सापडणाऱ्या लेण्या, विहार, स्तूप, चैत्य, धम्माशोकाचे शिलालेख आदी सर्वांची नोंद या विषयांतर्गत येत असते. त्यामुळे पालि भाषेत लिहिले गेलेले भाष्य यासाठी फार मोलाचे ठरते._
*_१०. सांकेतिक चिन्ह योजना :-_*
_बौद्धकला आणि स्थापत्यामध्ये सांकेतिक चिन्हांचा वापर फार मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. त्यावरून त्यांचे महत्त्वही अधोरेखित होतेच. पण ही सांकेतिक चिन्हे बौद्धकला आणि स्थापत्यामध्ये आली कोठून, याचा जर आपण विचार केला. तर आपल्याला त्यासाठी पालि साहित्याकडेच वळावे लागते. कारण की, भगवंताच्या जीवनात ज्या अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या त्या घटनांचे वर्णन पालि साहित्यातच पाहायला मिळते. त्या घटनांवरुनच नंतर महत्त्वाची सांकेतिक चिन्हे निर्माण झाल्याचे दिसूत येते. त्या चिन्हाचा नेमका अर्थ जाणून घेण्यासाठी पालि भाषेचे ज्ञान महत्वाचे ठरते. यावरुन आपण असे म्हणू शकतो की, सांकेतिक चिन्हांची उत्पत्ती सुद्धा पालि वाङ्मयातूनच झाली असावी व त्यावरुन नंतर शिलालेख, मूर्तीशास्त्र व नाणेशास्त्र या सारख्या शास्त्रांचा विकास झाला असावा._
_पालि वाङ्मयात *वक्कलीसुत्त आणि महापरिनिब्बान सुत्तामध्ये* या सांकेतिक चिन्हाच्या उत्त्पतीचे संकेत भगावान बुद्ध आणि वक्कली थेर यांच्या संवादात मिळतात. वक्कली थेर अत्यंत आजारी होते. ते चालू शकत नव्हते. त्यांना भगवान बुद्धांना बघण्याची इच्छा झाली होती. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या एका भिक्खूजवळ भगवंताला निरोप पाठविला. भगवंत त्यांच्या भेटीसाठी गेले. तेव्हा वक्कली थेरांनी भगवंतना म्हटले, 'भन्ते आपणाला बघण्याची खूप दिवसांची इच्छा होती. पण अतिशय आजारी असल्यामुळे आणि शरीरात शक्ती नसल्यामुळे भेटीला येऊ शकलो नाही. तेव्हा भगवंतानी वक्कली थेराला म्हटले_
*'अयं, वक्कली, कि ते इमिना पूतिकायेन दिट्ठेन? यो म पस्सति सो धम्मं पस्सति धम्मञ्हि, वक्कली, पस्सन्तो मं पस्सति, मं पस्सन्तो धम्मं पस्सति ।*
_'पूरे वक्कली? काय या घाणेरड्या शरीराला पाहतोस? जो मला पाहतो, तो धम्माला पाहतो, वक्कली जो धम्माला पाहतो तोच मला पाहतो. मला पाहतानाच धम्माला पाहतो.' अशाप्रकारे बुद्ध म्हणजे सांकेतिक अर्थाने धम्म होय._
_तर दुसरे उदा. *महापरिनिब्बान सुतामध्ये भगवान बुध्द आणि आनंद थेर यांच्या संवादात मिळते.*_
_भगवंताच्या महापरिनिब्बानाच्या वेळी आनंद थेर त्यांना विचारतात, तथागताच्या शरीरासंबंधी आम्ही काय करावे ? तेव्हा तथागताने आनंदाला म्हटले *'हे, आनंद, चक्रवर्ती राजाच्या शरीराचे जे करतात, तेच तथागताच्या शरीरासंबंधी करावे. 'चातुमहापथे तथागतस्स थूपो कातब्बो ?' चौरस्त्यावर (चौकात) तथागताचा स्तूप करावा.* त्यामुळे त्याकाळी गावाच्या बाहेर असलेले चैत्य हे बुद्धांच्या महापरिनिब्बानानंतर चौकात निर्माण करायला सुरुवात झाली. *बुध्द म्हणजे सांकेतिक अर्थाने स्तूप होय. अशा अनेक सांकेतिक चिन्हांचा वापर धम्मासोकाच्या काळात आणि त्या नंतरही मोठ्या प्रमाणात करण्यात आला. बुद्धांचे सांकेतिक चिन्ह म्हणून सिंह, बोधिवृक्ष, पादचिन्ह, स्तूप इ. पालि वाङ्मयात, स्तंभावर, नाण्यावर आणि लेण्यांमध्ये दिसून येतात. अशा अनेक सांकेतिक चिन्हांचा अजूनही उलगडा झाला नाही तो ही संशोधकांना आकर्षित करणारा आहे.*_
_*शिलालेख :- शिलालेख, मूर्तीशास्त्र व नाणेशास्त्र* या तिन्ही विषयांसाठी पालि वाङ्मयाचा फारच उपयोग होत असतो. अशोकाचे शिलालेख तर पालि भाषेच्या अत्यंत जवळचे आहेत. इतर शिलालेखातील भाषा संस्कृत-पोटभाषा व पालि यावर आधारित आहेत._
_*मूर्तीशास्त्र :-* मूर्ती, मग त्या दगडातून कोरलेल्या असोत वा धातू निर्मित असोत वा मातीच्या, त्यांचा अभ्यास करतानाही पालि भाषेची मदत लागते. कारण गांधार, मथुरा आणि सारनाथ, मूर्तीकला ही त्या काळी बौध्द मूर्तीकलेची केन्द्रे होती. या केन्द्रांमधून मूर्तीकलेचा प्रसार झाला. आजही मूर्तीकारांसाठी या मूर्ती प्रेरणास्थान आहेत. त्यापासून खूप शिकावे असे त्यात भरपूर आहे._
_*नाणेशास्त्र :-* नाणेशास्त्राचा अभ्यास करतानाही पालिभाषेची फार मदत होत असते. कारण *नाण्यावर बैल, हत्ती, सिंह, मानव, वृक्ष, अश्व, चक्र इ. चिन्हे आहेत यांचा योग्य अर्थ लावणे आवश्यक आहे. नाही तर आज नाणेशास्त्राचे योग्य ज्ञान नसल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे बुध्दांच्या पाचचिन्हाचा (नंदीपद) व महामायादेवीचा गर्भ मंगल समारंभ ज्याला (गजलक्ष्मी) असे म्हणण्यात येते, अशी अनेक चिन्हे असणारी नाणी आहेत की ज्याचा अभ्यास पालि वाङ्मयाच्या दृष्टीने प्रकाशित करण्याची आवश्यकता आहे.*_
*_११. भिंत्तीचित्रे व चित्रकला :-_*
_तत्कालीन उत्कृष्ट भिंतीचित्रे ही मुख्यतः अजंठा, बाग इ. लेण्यांमध्ये सापडतात. ही सर्व चित्रे जातक कथा. महावग्ग किंवा निकायांवरील घटनात्मक गोष्टीवर चित्रित केली गेली आहेत. त्यामुळे पालि भाषेच्या आधारे आपण त्यांचे अचूक निदान करु शकतो. आजच्या चित्रकारांनी सुध्दा खूप शिकावे असे त्यात भरपूर आहे._
*_१२. स्थापत्य व शिल्पकला :-_*
_प्राचीन भारतातील ही कला सर्व देशभर पसरलेली आहे व ती कानाकोपऱ्यात पसरलेली आहे. ती बहुतांशी बौद्ध स्थापत्य शिल्पकला आहे. *स्तूप, चैत्य वा विहार यांची योजना कशी करावी हे सुद्धा आपल्याला विनय पिटकात आढळते.* अभ्यासकांना याचे सुद्धा आकर्षण आहेच._
*_१३. तत्कालीन सामाजिक जीवन आणि बौद्ध धम्म :-_*
_प्राचीन भारतीय समाज कसा होता, त्याची रचना कशी होती, त्यात राहणारे लोक, त्यांच्या सामाजिक समस्या, जात, धर्म, स्त्रियांचे स्थान वगैरे अनेक गोष्टींचा उहापोह आपल्याला विशेष करून निकायामध्ये आढळतो. त्याचा अभ्यास व्हायला हवा. कारण प्राचीन भारतातील समाजाच्या संदर्भात बौद्धधम्म हा केवळ दुसरा एखादा धर्म नव्हता. तर वैयक्तिक श्रद्धेपासून, सामाजिक कल्पनांपर्यंत जीवनाच्या विविध अंगामध्ये बदल घडवून आणू पाहणाऱ्या एका व्यापक चळवळीचा तो एक परिणाम होता. मोठ्या प्रमाणावर आविष्कृत झालेले ते एक सामाजिक बौद्धिक आंदोलन होते. समकालीन विचार व जीवन यांत ते प्रतीत होत होते. आज आपल्याला ते दिसत नाही. त्यामुळे त्याचा कशामध्ये लोप झाला किंवा ते कशामध्ये लुप्त झाले, याचाही शोध घेणे पालि साहित्याच्या अभ्यासकाला आवश्यक आहे. कारण त्यामुळे काळाच्या आड गेलेले तत्कालीन सामाजिक जीवन आणि बौद्धधम्म याची खऱ्या अर्थाने वर्तमानाशी सांगड घालणे अभ्यासकास शक्य होईल._
*_१४. दागिन्यांची रचना :-_*
_*संपूर्ण भारतात एकंदर १२००च्या वर लेण्या आहेत. पैकी एकट्या सह्याद्रीमध्ये ९०० च्या वर लेण्या आहेत. यावरून महाराष्ट्रातील लोकांची संपन्नता, त्यांची कलाभिरुची व त्यांची खोदण्याची पद्धती, शिल्परचना या संबंधीचा सौंदर्यविषयक दृष्टिकोन दिसून येतो. तसेच शिल्पालंकरण, मग ते शिल्पावरील असो वा भिंतीचित्रावरील, त्यावरील दागिने अतिशय नाजूक सौंदर्यसंपूर्ण, मनमोहक व रेखीव असेच आहेत. ही सर्व शिल्परचना व चित्रे जातक कथा, महावग्ग किंवा निकायावरील घटनात्मक गोष्टीवर चित्रित केली गेली आहेत. सध्याच्या काळात Jewellery De-sign ला जगभरात महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी शिल्पावर वा भिंतीचित्रावर चित्रित दागिण्यावर अभ्यासाचा सुद्धा उपयोग होऊ शकतो.*_
*_१५. ध्यान (समाधिमार्ग) :-_*
_*समाधिमार्ग फार प्राचीन आहे. तो भगवंताच्या पूर्वी देखील अस्तित्वात होता. आलार कालाम आमि उद्दक रामपुत्त हे दोघे समाधिमार्गाचे पुरस्कर्ते होते व त्यांचा पंथ कोसल देशात बुद्धसमकालीन अस्तित्वात होता. बोधिसत्वाने कालामाच्या आणि उद्दक रामपुत्ताच्या आश्रमात जाऊन समाधीचा अभ्यास केल्याचे आपल्याला पासराशी सुत्तावरूनच दिसून येते. पण हा जुना समाधिमार्ग कशा प्रकारचा होता? याचे विस्तृत वर्णन कोठेहि सापडत नाही. कालामादिक योगी केवळ ध्यानाला महत्व देत असत. त्या ध्यानमार्गाच्यावतीने चित्ताची एकाग्रता स्थापित करणे हेच त्यांचे ध्येय होते. भगवंतानी समाधीच्यायोगे आपल्या कुशल मनोवृत्ति वृद्धिंगत करुन व तृष्णेचा नाश करुन सामान्य जनसमूहाचे हित साधण्यास आपण समर्थ होतो ती समाधी होय. याच समाधीचा भगवंताने अरियो अट्ठङ्गिगकोमग्गोमध्ये समावेश केला आहे. प्राणायामाची पद्धती भगवंतानी कायम ठेवली खरी. पण त्यात आपल्या तत्वज्ञानाला अनुकूल असे पुष्कळ फेरफार केले आहेत. मेत्ता, करुणा, मुदिता, उपेक्खा यांना तर भगवंतानी महत्त्व आणले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. अभिभायतनाच्यायोगे (कसिणे) सृष्टिसौंदर्यावर ध्यान करण्याचा प्रकारही बुद्धांनीच प्रचलित केला आणि समाधिमार्गात विविधता आणली. या शिवाय जगाच्या अनित्यतेवर ध्यान करण्याचा व त्याद्वारे समाधि साधण्याचा प्रकार केवळ बौद्ध वाङ्मयातच सापडतो.* इतर समाधि क्षणभर विश्रांती मिळण्यासाठी आहेत. आज देखील जगभर भारतदेश समाधीमार्गा विषयी फार प्रसिद्ध आहे व सध्या या देशात त्याचे पुनर्जीवन होऊ पाहत आहे. तसेच पाश्चात्य देशांत सुद्धा विशेष महत्व मिळत आहे. त्यामुळे या विषयाकडे लोकांचा कल अधिकाधिक वाढत आहे. पालि भाषेत लिहिले गेलेले साहित्य यासाठी फार उपयोगाचे ठरते._
*_१६. पर्यावरण :-_*
_आजच्या परिस्थितीत पर्यावरणाला व त्याचा समतोल राखण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. *पालि वाङ्मयात विशेषतः विनयपिटक आणि पाचही निकायात तसेच जातक कथामध्ये पर्यावरणाच्या संबंधाने अनेक बाबींचा उहापोह आढळतो.* एवढेच नाही तर भगवान बुद्धाचे गृहत्यागानंतरचे संपूर्ण आयुष्य हे निसर्गाच्या सान्निध्यात गेले आहे. तसेच थेर आणि थेरी हे देखील नगरापासून जवळच असलेल्या अरण्यात राहत असत त्याला *'नगरस्मा नाती दूर नाति संन्तिके विहरन्ति' म्हणजेच 'नगरापासून जास्त दूरही नाही आणि जवळही नाही असे ते राहत असत.* त्या काळी भगवंताचा खूप मोठा भिक्खूसंघ होता. तेव्हा त्यांनी पर्यावरणाचा समतोल कसा राखला असावा त्याचा ही अभ्यास होणे गरजेचे आहे._
*_१७. बौद्धसंस्कृती :-_*
_*बुद्धधम्म एकेकाळी सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाचा असून त्याच्या छत्राखाली तत्कालीन विद्या आणि शास्त्र, तत्वज्ञान आणि वाङ्मय, नीतिशास्त्र आणि समाजधारणा, ही सर्व एकत्र नांदत होती असे आपल्याला दिसते. त्यामुळे बुद्धधम्म केवळ त्याचा संप्रदाय आणि त्याचे अनुयायी एवढ्यापुरताच संकुचित होता असे नव्हे. त्या काळी बुद्धधम्माने स्वतःचा विचार व संस्कृती यांची कायमची छाप मारल्यावाचून त्या धम्माचा एकदम इतका विस्तार होणे संभवत नाही. म्हणून 'बौद्धभारत' असा शब्दप्रयोग करणे किंवा बौद्धविचार व संस्कृती हीच भारतीय विचार व संस्कृती होय असे विधान करणे उचित ठरणार नाही. कारण बुद्धोत्तर भारतीय वाङ्मयावर बौद्धधम्म व तत्त्वज्ञान याचा अतिशय पगडा बसलेला स्पष्ट दिसतो. यादृष्टीने सुद्धा बुद्ध काळापासून इ.स. १००० ते १५०० वर्षे संपूर्ण जम्बुद्धिपावर बौद्ध धम्माचा मोठा प्रभाव असल्याचे स्तुप, लेण्या, मोठ मोठी विहारे, बुद्धाच्या मोठमोठ्या मूर्ती अवशेषाच्या रुपाने संपूर्ण भारतभर आजही पहायला मिळतात. म्हणूनच ऱ्हिस डेव्हिड यांना Buddhist India हे पुस्तक लिहावे लागले. परंतु धम्मशोकाच्या साम्राज्याची अवनती व विनाश, राजा कनिष्काच्या आश्रयाने काश्मीरात झालेला बुद्धधम्माचा प्रसार, किंवा धम्माशोकाच्या राज्याचे नाव असो जो मगधप्रांत त्यापर्यंत किंवा सभोवार झालेली बुद्धधम्माची पिछेहाट यासंबंधी आपल्याला फारच बेताची माहिती आहे. बुद्धधम्माला उतरती कळा लागल्यावर त्या काळात निर्माण झालेली बौद्ध संस्कृती भारतामध्ये आज कोठे आहे? याचा थांगपत्ता लागत नाही. याचा शोध घेणे अभ्यासकांसाठी गरजेची बाब आहे. कारण भारतात उत्पन्न झालेला बौद्धधम्म भारतातूनच नामशेष झाला. त्याचे पुनर्जीवन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात पुन्हा येथील जनतेला तो दिला व त्याचे पुनर्जीवन केले. तसेच आचार्य गोयंका गुरुजीनी विपस्सनेच्या माध्यमातून परत या देशात ध्यान साधना आणली आणि या दोन्हीचे पुनर्जीवन केले. आता बौध्द संस्कृतीचे पुनर्जीवन करावयाचे आहे. कारण आज येथील बौद्धाचे सण किंवा संस्कृती कोणती? तर १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म दिवस, १४ ऑक्टोबर- विजयादशमी, धम्मचक्क प्रवत्तन दिन हे तर सोहळे म्हणून बाबासाहेबांच्या सन्मानार्थ व्हायलाच पाहिजेत. पण बौद्धांचे सण किंवा संस्कृती म्हणजे केवळ बुद्ध जयंती. वर्षावास समारोह एवढीच बौद्ध संस्कृती आहे काय? तर सांगायचा मुद्दा हा की एवढी उज्वल परंपरा असलेली आपली बौद्ध संस्कृती गेली कुठे? याचे संशोधन आणि अभ्यास करुन पूर्वीची उज्वल परंपरा परत निर्माण करण्याचे आव्हान निश्चितच आहे.*_
*_१८. वैदिक भाषा आणि पालि भाषा तौलनिक अभ्यास :-_*
_*'वैदिक भाषेला सर्वात जवळ असलेली अशी कोणती भाषा असेल तर ती पालिभाषा होय.' असे पी. व्ही. बापट यांनी 'पालिभाषा प्रवेश' या व्याकरणाच्या पुस्तकाला लिहिलेल्या 'पुरस्कारात' म्हटले आहे.* तेव्हा वैदिक भाषा आणि पालि भाषा तौलनिक अभ्यास करून पालि भाषा ही स्वातंत्र्य भाषा कशी आहे हे सिद्ध करण्याचे आव्हानसुद्धा आहेच._
*_निष्कर्ष :_*
_- अशा अनेक विषयांच्या दृष्टीने पालि साहित्याचे संशोधन आणि अभ्यास केल्याने तो पालि साहित्याच्या विकासासाठी महत्त्वाचा आधार ठरेल._
_- इतिहासाच्या दृष्टीने अनेक सत्य घटनांवर प्रकाश पडेल. कारण हे साहित्य श्रमणांनी लिहिलेले आहे. त्यामुळे पालि साहित्यात कल्पना विलास नसून ते सत्यावर आधारित आहे._
_- पालि वाङमयातील प्रत्येक ग्रंथाचे मूल्यमापन करणे हा सुध्दा संशोधनाचा आणि अभ्यासाचा एक महत्त्वाचा विषय म्हणून पालि भाषेकडे पाहणे अगत्याचे ठरते._
_- बुद्धधम्माने स्वतःचे विचार व संस्कृती याची कायमची छाप मारल्यावाचून, त्या धम्माचा एकदम इतका विस्तार भारतात आणि भारताबाहेर होणे संभवत नाही. म्हणून बुद्धोत्तर भारतीय वाङ्मयावर बौद्धधम्म व तत्त्वज्ञानाचा अतिशय पगडा बसलेला स्पष्ट दिसतो. त्याची उकल करता येईल._
_- भारतामध्ये लुप्त झालेली बौद्ध संस्कृती पुन्हा विकास पावू शकेल._
_- लिप्यांतर आणि भाषांतराच्या कामाला गती येईल. पर्यावरणाचा अभ्यास करता येईल._
_- पाली भाषेचा इतर भाषांशी तौलनिक अभ्यास करता येईल._
_अशा अनेक विषयांच्या दृष्टीने पालि साहित्याचे संशोधन आणि अभ्यास केल्याने पालि साहित्य आपल्याला व सर्व जगाला हितावह आणि सुखावह आहे. म्हणूनच पालि साहित्य सुधारलेल्या देशात आश्चर्यकारक वाटल्यामुळे अमेरिका व युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी वगैरे देशातील नामांकित विद्यापीठातून पालि साहित्याचा अभ्यास मोठ्या आस्थेने केला जातो. तर श्रीलंका, ब्रह्मदेश, सयाम, कंम्बोज, तिबेट, चीन, जपान या ठिकाणच्या लोकांनी त्याच्या उपयोगितेमुळे संशोधन, अध्ययन, अध्यापन मोठ्या भक्तीने सुरु केले आहे._
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_लेखक :- *_प्रा. विनोद भेले_*
*_सिध्दार्थ महाविद्यालय, मुंबई_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* २२/०४/२०२५
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment