Monday, 3 February 2025

क्षांति (सहिष्णुता) ची पारमी वाढो

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_क्षांति (सहिष्णुता) ची पारमी वाढो_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/02/blog-post.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_*पारमी किंवा पारमिता म्हणतात परिपूर्णतेला. त्या सद्गुणांची परिपूर्तता की ज्या कोणत्याही बोधिसत्वाला संबोधी प्राप्त करण्यासाठी सामर्थ्य प्रदान करतात; की ज्या कोणत्याही मनुष्याला भव-सागर पार करण्यासाठी सहायक सिद्ध होतात.* दहा पारमितातील क्षांति म्हणजे तितिक्षा, सहिष्णुता, सहनशीलतेला विशिष्ट महत्व आहे. भव-सागराच्या भरतीमधील प्रचंड लाटेला धर्म-धैर्यासह सहन करणे, अप्रियाहून अप्रिय हृदय द्रावक घटनांच्या संयोगाने चित्त विचलित होऊ न देणे, प्रियहून प्रियच्या वियोगाने अंतर्तमातील समता कायम ठेवणे हेच क्षांति पारमीला परिपुष्ट करणे आहे._

_जे बोधिसत्व आपल्या सर्व पारिमितांना सर्वोच्च पातळी पर्यंत परिपूर्ण करुन गौतम नावाने सम्यक संबुद्ध झाले, त्यांनी अनंत पूर्व जन्मात क्षांति पारमी परिपूर्ण करण्याचा सफल प्रयत्न केला._

*_पुत्र-वियोग_*

_भव-संसरणातील एका जीवनात बोधिसत्व वाराणसीच्या ब्राह्मण कुळात जन्मले, मोठे झाले, आपल्या कुटुंबाचे प्रमुख झाले. त्यांच्या बरोबर पत्नी, एक तरुण मुलगा, एक तुरुण मुलगी, एक तरुण सून आणि एक दासी होती. अशाप्रकारे सहा जणांचे सुखी कुटुंब होते. कुटुंबाच्या पालन-पोषणासाठी बोधिसत्व नगराबाहेर शेती-वाडी करीत होते आणि तरुण मुलगा त्यांना मदत करीत होता._

_नेहमीप्रमाणे एके दिवशी ते आपल्या शेतात काम करीत होते. स्वतः नांगर चालविण्यात मग्न होते. तरुण मुलगा शेतातील काडी-कचरा जमा करून जाळण्याचे काम करीत होता, एवढ्यात काडी-कचऱ्याच्या ढीगातून एक क्रुद्ध नाग बाहेर आला आणि त्याने त्या मुलाला दंश केला. थोड्या वेळातच नागाचे विष सर्व शरीरात पसरले आणि शेतकऱ्याचा मुलगा बेशुद्ध होऊन तेथेच खाली पडला. बोधिसत्त्वाने मुलगा खाली पडत असतांना लांबून पाहिले व त्याच्याजवळ धावत आले. परंतु तोपर्यंत मुलाचे प्राण-पाखरू उडून गेले होते. बोधिसत्वाने मृत शरीराला उचलून जवळच एका झाडाच्या सावलीत ठेवले आणि त्याला कापडाने झाकले. व्याकुळ न होता ते पुन्हा नांगरणीचे काम करु लागले._

_थोड्या वेळानंतर पाहिले की शेताजवळील पायवाटेने एक दुसरा शेतकरी नगराकडे जात आहे. बोधिसत्वाने त्याला प्रार्थना केली की तो आपल्या गृहिणीला एक निरोप पोहचविल. निरोप असा होता की जी दासी दररोज दुपारी वडील आणि मुलाचे भोजन घेऊन शेतात येते तिने आज केवळ एकाचेच भोजन घेऊन यावे. भोजन घेऊन एकटी दासी येत असे पण आज कुटुंबातील सर्वजणांनी स्वच्छ कपडे परिधान करून बरोबर सुगंधित फुले घेऊन यावे._

_ही सूचना जेव्हा वाटसरूने ब्राह्मणीला दिली तेव्हा ती तत्काळ समजली की तिचा मुलगा जीवंत नाही परंतु हा दुःखद निरोप मिळाल्यानंतरही ब्राह्मणी विचलित झाली नाही. कुटुंबातील दुसरे चारजणसुद्धा अविचलित राहिले आणि बोधिसत्वाच्या आदेशानुसार शेताकडे निघाले. त्यापैकी कोणीही रूदन-क्रंदन, विलाप-प्रलाप केला नाही._

_बोधिसत्व आपल्या प्रत्येक जीवनात धर्माचे जीवन जगत असतांना कोणती ना कोणती पारमी परिपुष्ट करण्याचे काम करीत असतात. ते केवळ स्वतः धर्माचे जीवन जगून रहात नाहीत तर आपले स्वजन-परिजन, मित्र-बंधूंनासुद्धा धर्ममय जीवन जगण्याचा उपदेश देतात. पुढे जाऊन स्वतः सम्यक संबुद्ध झाल्यानंतर त्यांना अनेकांना शुद्ध धर्माच्या मार्गावर आरूढ करून भव-मुक्तीकडे जाण्यासाठी योग्य मार्गदर्शन करावयाचे असते. त्यासाठी प्रत्येक जीवनात अत्यंत मैत्री चित्ताने धर्मोपदेश देऊ शकण्याचे सामर्थ्यसुद्धा वाढवितात. म्हणून बोधिसत्व आपल्या सगळ्या परिवाराला गृहस्थाची जबाबदारी कुशलतापूर्वक पार पाडीत शुद्ध धर्मात प्रतिष्ठित होण्यासाठी नियमित उपदेश देत होते आणि स्वतःही धर्माचे जीवन जगून सर्वांसाठी प्रेरणादायक आदर्श समोर उभा करीत होते. *त्यांनी आपल्या परिवारातील सदस्यांना हाच उपदेश दिला होता की शील पालन करा. प्रसन्न चित्ताने यथाशक्ती दान करा. साधना करीत असतांना चित्ताला वश करून उदय-व्ययाचा बोध जागृत करून चित्ताला निर्मळ करीत राहा. वेळोवेळी मरणानुस्मृतीची भावना सबळ करीत राहा आणि निसर्गाच्या नियमांची ही सत्यता समजत राहा की ज्याचा जन्म होतो तो आज ना उद्या मृत्यूला प्राप्त होतोच. मृत्यूच्या पंजातून एक सुद्धा प्राणी सुटू शकत नाही. बोधिसत्व स्वतः मरणानुस्मृतीच्या साधनेत पुष्ट झाले होते आणि त्यांनी आपल्या परिवारातील सर्वांना पुष्ट केले होते.*_

_जेव्हा परिवारातील चौघेजण घरुन शेतात आले तेव्हा ज्या गोष्टीची शंका होती तीच समोर पाहिली. परंतु तरुण मुलाचे मृत शरीर पाहून कोणीही रडले नाही, कोणीही छाती बडवून आक्रोश केला नाही. सर्व चितेसाठी आसपास लाकडे जमा करू लागले. थोड्या वेळात चिता तयार झाली. सर्वांनी मिळून मृत शरीराला चितेवर ठेवले. आपल्या बरोबर आणलेली सुगंधीत फुले त्यावर वाहिली आणि ओळीने सर्व चितेजवळ बसले._

_एक व्यक्ती ह्या सगळ्या घटना पहात होती. सर्व कांही पाहून तो आश्चर्यचकित झाला. जवळ येऊन त्याने शेतकऱ्याशी संभाषणास सुरवात केली. त्याने विचारले -_

- "काय कोणा एका जनावराला जाळत आहात?"

"नाही. ते जनावर नाही. ज्याला आम्ही जाळत आहोत ते मृत मनुष्याचे शरीर आहे. बोधिसत्वाने उत्तर दिले.

"तर मग तो तुमचा कोणी शत्रू असेल ?"

"शत्रू नाही, हा माझा एकुलता एक मुलगा होता."

- "तर मग काय मुलाशी तुमचे संबंध बिघडलेले होते ?"

"नाही भाऊ, नाही. हा माझा अत्यंत प्रिय मुलगा होता."

"तेव्हा ह्या एकुलत्या एक प्रिय मुलाला गमावून तुम्ही रडत का नाही ? विलाप का नाही करीत नाही ?"

- "जो गेला तो गेला. ज्या प्रकारे सर्प आपली कात टाकून निघून जातो त्याचप्रकारे हा सुद्धा आपले शरीर सोडून निघून गेला. आता विलाप करून काय मिळेल? विलाप करून तर तो परत येणार नाही."

पाहुण्याने हाच प्रश्न मृत तरूणाच्या आईला केला. तो म्हणाला -वडिलांचे हृदय कठोर असू शकते पण तुम्ही नऊ महिने पोटात पालन करून जन्म देणाऱ्या आहात. स्तन-पान करून त्याचे पालन-पोषण करणारी आई आहात. आईचे हृदय खूप नाजूक असते. एकुलता एक मुलगा गमावून तुम्ही सुद्धा रडत कां नाही?

अशा प्रकारे मृताच्या पत्नीला त्याने प्रश्न केला "तुमचे तर सर्वस्व लुटले गेले. ह्या कमी वयात तुम्ही आपले सौभाग्य गमाविले तरीही तुम्ही का रडत नाही ?"

असाच प्रश्न त्याने मृताच्या बहिणीला केला "बहिणीला आपला भाऊ अत्यंत प्रिय असतो. कशी बहीण आहेस जी अशा भावाला गमावून क्रंदन करीत नाही ?"

त्यानंतर त्याने घरातील दासीला विचारले "मृत झालेली व्यक्ती अवश्य तुझ्याबरोबर अत्यंत कटुतेने कठोर व्यवहार करीत असली पाहिजे म्हणून त्याच्या मृत्यूनंतर व्यथित होत नाहीस."

दासीने सांगितले "तो घरचा लाडका अत्यंत मृदुभाषी होता. सर्वांबरोबर त्याचा व्यवहार अत्यंत मधुर होता. तो सर्वांचा प्रिय होता. मोठा सुलक्षणी होता."

- "तरीही कोणी रडले नाही ?"

सर्वांचे एकच उत्तर होते *"रडण्याने कोणाला काय मिळेल बरे ! तो न बोलविता आला होता. आज्ञा न घेताच निघून गेला. संसारात जीवन अनिश्चित आहे, मृत्यूतर सर्वांचा निश्चितच आहे. आपल्या कर्मानुसार प्राणी येतात आणि आपल्या कर्मानुसार निघून जातात."*

*_यथागतो तथागतो, तत्थ का परिदेवना ?_*

*_जसा आला तसा निघून गेला. यासाठी छाती बडवून आक्रोश कशाला ?_*

जाणारा निघून गेला. हे जे निष्प्राण शरीर चितेवर जळत आहे ते काय जाणेल की आम्ही त्याच्यासाठी रडत आहोत? रडून आम्ही आपले भले करीत नाही आणि दुसऱ्यांचेही नाही. रडून स्वतः दुःखी होऊ आणि दुसऱ्यांनाही दुःखी करू.

*_तस्मा एतं न सोचामि, गतो सो तस्स या गति।_*

                     *_(उरगजातकं ३५४/२१-२२...)_*

_*जाणारा आपल्या कर्मानुसार त्याची जशी गती आहे तेथे निघून गेला. त्यासाठी आम्ही शोक करीत नाही."*_

_अशाप्रकारे बोधिसत्वाने ह्या जीवनात स्वतः आपली क्षांति पारमी वाढविली आणि आपली आपली क्षांति पारमी वाढवू शकण्यात स्वजनांनासुद्धा सहायक झाले._

*_पत्नी-वियोग_*

_बोधिसत्वाच्या कोण्या एका जीवनात त्यांची अत्यंत लावण्यवती तरूण पत्नी रोगग्रस्त होऊन मृत्यू पावली. लोक त्या सुंदर युवतीला मृत झालेली पाहून दुःखी होत होते परंतु बोधिसत्व आपल्या प्रिय पत्नीच्या मृत्यूने थोडेसुद्धा विचलित झाले नाहीत. अशा अवस्थेत सामान्य माणसे पत्नी - शोकात एवढी दुःखी होतात की काही खात-पित नाहीत, स्नान नाही, धुणे नाही. आपला कामधंदाही करीत नाहीत. उलट स्मशांन भूमीत चकरा मारुन छाती बडवून आक्रोश करीत राहतात._

_परंतु बोधिसत्वाने असे काही केले नाही. जेव्हा लोकांनी कारण विचारले तेव्हा त्याचे हेच उत्तर होते की-_

_*"ज्याचा स्वभाव तुटायचा आहे तो आज न उद्या तुटतोच. प्रत्येक प्राणी मरणधर्मा आहे. हाच त्याचा स्वभाव आहे. तो मृत्यू पावतोच. निसर्गाच्या नियमानुसार ही सुद्धा मृत्यूला प्राप्त झाली. या साठी कशाला रडायचे? जोपर्यंत जीवंत होती तोपर्यंत माझी कोणीतरी लागत होती. ती माझी सेवा करीत होती आणि मी तिची देखभाल करीत होतो. मृत्यूनंतर ती तिच्या कर्मानुसार कोण्या अन्य लोकात जन्मली आहे. आता ती माझी कोण लागते? मी तिचा कोण लागतो ? रडण्याने माझा आणि तिचाही लाभ होणार नाही."*_

_अशाप्रकारे बोधिसत्वाने ह्या जीवनातसुद्धा सहिष्णुतेची पारमी पुष्ट केली._

*_अग्रज-वियोग_*

_कोण्या एका जीवनात बोधिसत्व एका धनवान गृहस्थाच्या घरी जन्मले. काही काळानंतर आई-वडिलांचा देहांत झाला. त्यांचा मोठा भाऊ सर्व काम-धंदा पहात होता. बोधिसत्वासहित सर्व परिवार मोठ्या भावावर अवलंबून होता. त्याच्याच साहाय्याने सर्वजण जीवन जगत होते. परंतु लवकरच कोण्या रोगाचा शिकार होऊन तोसुद्धा मृत्यूला प्राप्त झाला. बोधिसत्वाने धर्म धैर्यपूर्वक हा आघात सहन केला. रडून रडून आक्रोश केला असता तर स्वतःची आणि परिवारातील अन्य लोकांची हानी केली असती. आपल्या मृत भावालासुद्धा कोणता ही लाभ पोहचवू शकले नसते म्हणून सहिष्णुता पारमीचे संवर्धन करीत असतांना ते रडणे-आक्रोश करण्यापासून पूर्णपणे विन्मुख राहिले. लोकांनी प्रश्न विचारला तेव्हा त्या सर्वांची धर्म समजावून सांत्वना केली. *"सर्व प्राणी मरणधर्मा आहेत. वेळ आल्यावर शरीर खंडित होतेच. त्यासाठी दुःख करणे निरर्थक आहे. व्यर्थ आहे."*_

*_पितामह-वियोग_*

_कोण्या एका जीवनात बोधिसत्व एका धनी गृहस्थाच्या घरी जन्मले. मोठे झाल्यावर त्यांचे आजोबा मृत्यू पावले, बोधिसत्व आजोबाच्या वियोगाने विचलित झाले नाहीत परंतु त्यांचे वडील धैर्य गमावून बसले. त्यांचे रूदन-क्रंदन करणे थांबता थांबत नव्हते. त्यांनी आपल्या पित्याच्या मृत शरीराचे दाह कर्म करुन त्यांच्या अस्थि-अवशेषावर एक मंडप बनविला आणि दररोज तेथे जाऊन विलाप करीत होते. बोधिसत्वाने आपल्या वडिलांना समजावण्याचे खूप प्रयत्न केले पण ते सर्व निरर्थक ठरले. तेव्हा त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी कोठूनतरी एक मेलेला बैल आणला आणि त्याच्या समोर हिरवे-हिरवे गवत व थंड पाणी ठेवून रडू लागले की त्या बैलाने पुन्हा उठून आहार ग्रहण करावा. लोकांनी खूप समजाविले, पण ते रडतच राहिले. लोक समजले की हा युवक खरोखर वेडा झाला आहे. तो ह्या मृत बैलाला जीवंत करून आहार खाऊ घालू इच्छित आहे._

_वडिलांनी हे सर्व ऐकले आणि ते खूप घाबरले. पितृ-वियोगाचे दुःख विसरुन ते आता मुलाची काळजी करू लागले. की असा समजदार युवक वेडा कसा झाला? ते आपल्या मुलाला समजवू इच्छित होते की रडणे निरर्थक आहे. हा मेलेला बैल पुन्हा जीवंत होऊ शकत नाही. हे ऐकून बोधिसत्व म्हणाले "पिताजी, पहा ह्या बैलाचे डोके, तोंड, पोट, पाय हे सर्व अवयव कायम आहेत आणि आपण ते प्रत्यक्ष पहातच आहोत. माझ्या रडण्याने हा अवश्य उभा राहील. आपण आजोबांसीठी रडत आहात ज्यांचे सर्व शरीर जळून गेले आहे, काही हाडे फक्त शिल्लक आहेत. जर तुमच्या रडण्याने ही हाडे जीवंत होतील तर माझ्या रडण्याने हा मेलेला बैल का नाही जीवंत होणार? हे ऐकून वडील शुद्धीवर आले._

_अशाप्रकारे बोधिसत्वाने आपली सहिष्णुता पारमी वाढविली आणि वडिलांनासुद्धा धर्माचे बळ प्रदान केले._

*_पिता-वियोग_*

_अगणित भव-संसरणातील एका भव-शृंखलेत बोधिसत्व दशरथ-पुत्र राम बनून जन्मले. वडिलांच्या आदेशाने राज्याचा त्याग करुन सीता आणि लक्ष्मणासह वनात गेले. काही काळानंतर वडिलांचा मृत्यू झाला आणि भरत त्यांना आग्रहपूर्वक परत राजधानीत आणण्यासाठी वनात पोहोचला. बोधिसत्व रामाला जेव्हा वडिलांच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा ते क्षणभरसुद्धा विचलित झाले नाहीत. त्यावेळी लक्ष्मण आणि सीता फळे व फुले आणण्यासाठी बाहेर गेले होते. रामाला जाणीव होती की त्या दोघांचे हृदय खूप नाजूक आहे. ही दुःखद बातमी ऐकून ते दुःखी, व्यथित होतील म्हणून ते परत आल्यावर रामाने खूप प्रयत्नपूर्वक असा कटू संवाद ऐकविला की त्यामुळे ते ह्या दुःखाला सहन करू शकतील तरी पण ते दोघे अत्यंत बेचैन झालेच. भरत आणि त्याच्याबरोबर आलेला राजपरिवार रुदन-क्रंदन करीतच होता. सहिष्णुता पारमितेचा धनी बोधिसत्व राम याने धैर्यदायी धर्मोपदेश दिला आणि समजाविले._

_"खूप दुःख केल्याने आम्ही मृत वडिलांना जीवंत करू शकत नाही. *प्रिय-वियोगावेळी रुदन क्रंदन करण्याने जर कोणाचे भले होत असेल तर आपण सर्वांनी अवश्य रडले पाहिजे परंतु त्यामुळे स्वतःची आणि इतरांची हानीच होते. रडणारा स्वतःला कष्ट देतो आणि इतरांचे दुःख वाढवून त्यांनासुद्धा कष्टी करतो. छाती बडवून रडण्याने मृत व्यक्तीला कोणताच लाभ होत नाही म्हणून रडणे निरर्थक आहे. समजदार माणसाने अशावेळी मनात दुःख जागृत होताच त्याला ताबडतोब दूर केले पाहिजे. ठीक अशा प्रकारे की जसे घराला आग लागली तर तिला ताबडतोब विझविली जाते.*_

_बोधिसत्व रामाच्या धर्मोपदेशाने सर्वांचे रूदन-क्रंदन थांबले. अशा प्रकारे बोधिसत्वाने आपल्या सहिष्णुता पारमीचे संवर्धन केले तसेच इतरांनासुद्धा सहिष्णुता धर्म शिकविला. (जातक कथांमधून)_

_साधकांनो जीवनात नावडत्या घटना घडतच राहातात. प्रिय व्यक्ती, वस्तू, स्थितीपासून वियोग होतच राहतो. बोधिसत्वाच्या अनेक जन्मांच्या अनुभवाने आम्ही लाभान्वित होऊ आणि सहिष्णुता पारमीचे संवर्धन करून आपले कल्याण साधू._

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुद्धवर्ष २५५९, कार्तिक पौर्णिमा, २५ नोव्हेंबर, २०१५, वर्ष २ अंक ८_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* ०३/०२/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...