Friday, 31 January 2025

पाली वाङ्‌मयातील तत्त्वज्ञान : आजच्या सामाजिक समस्यांवरील उत्तर

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_पाली वाङ्मयातील तत्त्वज्ञान : आजच्या सामाजिक समस्यांवरील उत्तर_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_33.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_मानवाच्या प्रगतीचा आलेख एकसारखा उंचावत जाताना दिसतो. अलिकडच्या काळातील विज्ञान-तंत्रज्ञानाने तर त्याची गती अधिकच तीव्र केली आहे. एकीकडे प्रगत तंत्रज्ञान, तर त्याच्या विरुद्ध दिशेने तितक्याच गतीने निर्माण होणाऱ्या समस्या, असे विचित्र वास्तव आज जगभरात दिसते आहे. केवळ भौतिक सुविधांनी माणूस पूर्णतः सुखी होऊ शकत नाही हा पुरातन काळापासून चालत आलेला सिद्धान्त आजच्या अतिप्रगत वैज्ञानिक सुविधांच्या रेलचेलीतही पुनः पुन्हा अधोरेखित होताना दिसतो. सुखाच्या शोधाकरिता माणूस आपोआपच धर्म आणि तत्वज्ञानाकडे वळतो. कारण सुख-समाधान ही मानवी मनाशी संबंधित असलेली प्रवृत्ती आहे. *जेव्हा मानवी मनाच्या विश्लेषणाचा, चिकित्सेचा, समस्यानिवारणाचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा बुद्धांची भूमिका अग्रगण्य ठरते. बुद्ध मानवी मनाचे श्रेष्ठ विश्लेषक होते. त्यामुळेच जग बुद्धांना केवळ एक धर्मप्रवर्तक न मानता मानवी मनाचे 'सुपर-सायंटिस्ट' म्हणून गौरविताना दिसते.*_

_बुद्धांनी मनाला सर्व प्रवृत्तीचे उगमस्थान असे म्हटले आहे. धम्मपद या बहुचर्चित ग्रंथातील यमकवग्गातील पहिलीच गाथा मनाच्या श्रेष्ठत्वाची ग्वाही देते._

*_मनोपुब्बङ्गमा धम्मा, मनोसेट्ठा मनोमया।_*

*_मनसा चे पदुट्ठेन, भासति वा करोति वा।_*

*_ततो नं दुक्खमन्वेति, चक्कं व वहतो पदं ।।_*

_(मन सर्व प्रवृत्तीचे उगमस्थान आहे. मन श्रेष्ठ आहे. जो कुणी कलुषित मनाने बोलतो किंवा वागतो तर ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्याच्या मागे गाडीची चाके धावतात त्याप्रमाणे दुःख त्याच्या मागे लागते.)_

किंवा

*_अक्कोच्छि में अवधि में अजिनि में अहासि मे ।_*

*_ये तं न उपनय्हन्ति वेरं तेस सम्मति ।।_*

_(त्याने मला शिव्या दिल्या... मला मारिले, मला जिंकिले... लुटले रे. मनात बांधी गाठ अशी जो वैर न त्याचे फिटले रे)_

_बुद्धवाणीत असंख्य ठिकाणी मनोविश्लेषणाशी संबंधित उपदेश सापडतात. प्रत्येक गोष्ट मनाशी संबंधित असल्यामुळे बव्हंशी समस्यांची उकल करण्याकरिता आपल्याला बुद्धवाणीचा आधार देणे अपरिहार्य ठरते._

_समग्र बुद्धवाणी पाली भाषेत आढळते. पाली भाषेतील तिपिटकामध्ये बुद्धोपदेश संग्रहित केलेले आहेत. है तिपिटक म्हणजेच पाली वाङ्मय होय. तिपिटकाचे तीन प्रमुख भाग आहेत. सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक. विनयपिटकात भिक्षुच्या आचरणाचे नियम आहेत. अभिधम्मपिटकात मनोविश्लेषणाशी संबंधित उपदेश आहेत. सुत्तपिटकाचे दीघनिकाय, मज्झिमनिकाय, अंगुत्तरनिकाय, संयुत्तनिकाय आणि खुद्दकनिकाय हे पाच विभाग आहेत त्यांना निकाय असे म्हटले जाते. या प्रत्येक निकायाचे उपविभाग आहेत. सर्वाधिक उपविभाग खुद्दकनिकायाचे असून त्यात धम्मपद, उदान इतिवुत्तक, सुत्तनिपात, थेरगाथा, थेरीगाथा, चरियापिटक इत्यादी ग्रंथ आहेत. समग्र बुद्धवाणी मानवाच्या सर्वांगीण उन्नतीचे मार्गदर्शन करते. *आजच्या समस्यांवरील उत्तर शोधण्याकरिता या पालि वाङ्‌मयाचा निश्चितच उपयोग होतो.*_

_भारत देश आज असंख्य समस्यांनी ग्रासलेला दिसतो. शिक्षणाचे खाजगीकरण, रोजगाराचा अभाव, दारिद्र्य, अनारोग्य, शेतीउद्योगाची वाताहात, बोकाळलेला भ्रष्टाचार, व्यापारातील अनीती, गळेकापू जीवघेणी स्पर्धा, अमर्याद हव्यास, सामाजिक विषमता, पर्यावरणाचा हास... अगणित समस्या आणि याहून चिंतेचा विषय म्हणजे या समस्यांचे निराकारण करणाऱ्या यंत्रणेचा अभाव, सर्वत्र एक भीषणता उम्र रूप धारण करते आहे आणि सामान्य माणूस हतबल होऊन अगतिकतेने तिचा शिकार होतो आहे. या स्वरुपाच्या समस्यांवर बुद्धांनी वेळोवेळी भाष्य केल्याचे आपल्याला पाली वाडमयात दिसते._

_आज शिक्षणाचे खाजगीकरण झाले आहे. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांची मुलं भरमसाठ फी असलेल्या महागड्या खाजगी शाळांमध्ये शिकतात आणि मध्यमवर्गीय सामान्य लोकांची मुलं शासकीय शाळांमध्ये पाठवली जातात. शासकीय शाळांमध्ये कोणत्याही शालेय सुविधा नाहीत. शिक्षणाला दर्जा नाही. मूल्यमापनाचे निकष नाही. शिक्षकांना पुरेसे वेतन नाही. सर्वार्थाने दुर्लक्षित असलेल्या या शासकीय शाळा आणि सर्व सुविधांनी युक्त अशा महागड्या खाजगी शाळा शैक्षणिक विषमतेबरोबरच सामाजिक विषमताही निर्माण करीत आहेत. ज्यांच्याकडे पैसे नाही ते आपोआपच शिक्षणापासून वंचित राहत आहेत. *शिक्षणव्यवस्थेसमोर ही मोठीच समस्या आहे. बुद्धपूर्वकाळातही थोड्याशा फरकाने अशीच शिक्षणव्यवस्था होती. शिक्षण केवळ उच्चवर्णीयांनाच उपलब्ध होते. गुरुकुल शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्याला गुरुच्या घरी राहून शिक्षण घ्यावे लागत असे. हीनवर्णाची व्यक्ती गुरुकुलात राहण्यास अपात्र असल्याने केवळ उच्चवर्णीयांनाच शिक्षणाची संधी उपलब्ध होती. तसेच मुलीला दुसऱ्याच्या घरी ठेवणे सुरक्षित नसल्याने स्त्रीशिक्षण आपोआपच संपुष्टात ओले होते. अशा पार्श्वभूमीवर बुद्धांनी भिक्षु आणि भिक्षुणीसंघाची स्थापना केली. सर्व जातीच्या सर्व वर्णांच्या, सर्व थरातील लोकांना या भिक्षुसंघात प्रवेश दिला. सर्वाकरिता समान नियम, समान दर्जा आणि समान शिक्षणाचा प्रारंभ केला. तथागत बुद्धांनी शिक्षणव्यवस्थेत बदल करुन सार्वत्रिक, सामुहिक आणि समान शिक्षणाची सुरुवात केली. हे शिक्षणही संस्कृतसारख्या प्रमाणभाषेत न देता लोकभाषेत देण्याचा आग्रह धरला.*_

_*त्याकाळी संस्कृत भाषा प्रचलित असली तरी ती लोकभाषा कधीच नव्हती.* त्यामुळे संस्कृत ग्रंथातील ज्ञान बहुजन समाजापर्यंत पोहचू शकले नाही आणि संस्कृत जाणणाऱ्या पंडित पुरोहितांचा वर्ग तयार झाला व त्यांनी धर्माच्या नावावर लोकांना भ्रमात ठेवून स्वार्थासाठी त्याचा वापर केला. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना प्रत्यक्ष धर्मग्रंथाचे अध्ययन अशक्य कोटीतील गोष्ट ठरली. ही अडचण आणि कुचंबणा लक्षात घेऊन भगवंताने संस्कृत भाषेच्या वर्चस्वाला झुगारून देऊन, तत्कालीन लोकभाषा पालीचा पुरस्कार आणि वापर केला. *भिक्षुनी छान्दस् (वैदिक) भाषेत बुद्धवचन शिकण्याची परवानगी मागितली असता भगवान बुद्धाने त्यांना नकार दिला आणि म्हटले, भिक्षुनो! बुद्धवचनाला छान्दस् भाषेत परिवर्तीत करू नये. जो करील त्याला दुष्कृत्य दोष लागेल. भिक्षुनो, आपल्याच भाषेत बुद्धवचन शिकण्याची मी परवानगी देतो. यामागे बुद्धाच्या मनात संस्कृतचा तिरस्कार नव्हता, तर सामान्य जनतेला धर्मज्ञान उपलब्ध व्हावे, हा सद्‌हेतू होता. स्त्रियांनाही आपल्या प्रगतीची संधी मिळावी म्हणून भिक्षुणींचा वेगळा संघ करून स्त्रीशिक्षणाचा पाया घातला. अनेक शतके दुर्लक्षित असलेला स्त्रीवर्ग शिक्षण घेण्यास पात्र ठरला.*_

_बुद्धांनी केवळ शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली नाही, तर शिक्षणाचे महत्त्व वेळोवेळी पटवून दिले. *तिपिटकातील खुद्दकनिकायच्या धम्मपदात नागवग्गातील गाथेत तथागतांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे.*_

*_दन्तं नयन्ति समितिं दन्तं राजाभिरुहति ।_*

*_दन्तो सेट्ठो मनुस्सेसु योतिवाक्यं तितिक्खति ।।_*

_(प्रशिक्षित हत्तीलाच युद्धासारख्या महत्त्वाच्या कामात घेवून जातात. राजासुद्धा प्रशिक्षित हत्तीवर विराजमान होतो. माणसांमध्ये शिक्षित माणूसच श्रेष्ठ आहे/शिक्षणाने माणसाची प्रगती होते, माणसाला प्रतिष्ठा प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घेतलेच पाहिजे असा उपदेश तथागतांनी दिला.)_

_शिक्षण असेल तर कौशल्य प्राप्त होईल. कौशल्य असेल तर समृद्धी मिळेल. त्यामुळे विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविण्याचा उपदेश तथागतांनी दिला. *तिपिटकातील खुद्दकनिकायच्या सुत्तनिपात या ग्रंथाच्या चूल्लवग्गच्या द्वितीय भागातील महामंगलसुत्तात तथागतांनी गृहस्थयांकरिता उपदेश देताना सांगितले.*_

*_बाहुसच्चं च सिप्पं च, विनयो च सुसिक्खितो।_*

*_सुभासिता च या वाचा, एतं मङ्ग‌लमुत्तमं ।।_*

_(अनेक प्रकारच्या कला आणि शिल्पकौशल्य आत्मसात करणे, सुशिक्षित असणे, वाचा सुभाषित असणे हे उत्तम मंगल आहे.) जर अंगी कौशल्य असेल तर रोजगार प्राप्ती होऊन अर्थार्जनाचा प्रश्न सुटू शकेल असे बुद्धवाणीतून दिसते._

_रोजगाराचा अभाव जसा बाह्य परिस्थितीशी उपस्थितीशी संबंधित आहे तसाच तो माणसाच्या स्वभावाशीही संबंधित आहे. एखादी व्यक्ती जर आळशी असेल तर रोजगार उपलब्ध असूनही ती त्या संधीचा फायदा घेऊ शकणार नाही. परिणामी तिला दारिद्रयाला सामोरे जावे लागेल. त्याकरिता माणसाने आळस झटकून कार्यमग्न होणे गरजेचे आहे. निष्फळ गप्पागोष्टीमधून काहीही साध्य होत नाही तर वेळ वाया जातो. *तिपिटकातील खुद्दकनिकायच्या सुत्तनिपात या ग्रंथाच्या उरगवग्ग या प्रथम पराभवसुत्तात तथागतांनी माणसाच्या अवनतीची कारणमीमांसा केली आहे.*_

*_निद्दासीली सभासीली, अनुट्ठाता च यो नरो ।_* 

*_अलसो कोधपञाणो, तं पराभवतो मुखं ।।_*

_(जी व्यक्ती निद्राळु आहे, निष्फळ गप्पागोष्टी करण्यात मशगूल आहे, परिश्रम करायला तयार नाही, आळशी आणि क्रोधी आहे अशी व्यक्ती स्वतःच्या अवनतीला कारणीभूत आहे)_

_त्याउलट जर एखादी परिश्रम करणारी, धैर्यवान असेल, तर त्यास धनसंपदा आणि यश प्राप्त होते असा विश्वास तथागतांनी *खुद्दकनिकायच्या सुत्तनिपात या ग्रंथामधील आळवकसुत्तात कथन केला आहे.*_

*_पतिरुपकारी धुरवा, उध्दाता विन्दते धनं ।_*

*_सच्चेन कित्तिं पप्पोति, ददं मित्तानि गन्धति ।।_*

_(योग्य काम करणाऱ्या धैर्यवान आणि परिश्रमी व्यक्तीस धन आणि संपत्ती प्राप्त होते. अशी व्यक्ती सत्य मार्गाने यश प्राप्त करते) बेरोजगारी आणि दारिद्रयासारख्या समस्यांवरील उपाय आपल्याला पाली वाङ्‌म‌यात आढळतो)_

_सत्य मार्गाने यश मिळेल की नाही याची शंका असल्याने लोक भ्रष्टाचाराकडे वळतात. झटपट श्रीमंत होण्यासाठी लोक गैरमार्गाचा अवलंब करतात. लोकांची फसवणूक करून संपत्ती मिळविण्याचा प्रयत्न करतात. व्यापारी आपल्या व्यापारात अनीतीने वागतो. पदार्थामध्ये भेसळ करतो. वजन मापात फसवणूक करतो. त्यातून त्याची मानसिकता तर बिघडतेच परंतु सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनेही गंभीर प्रश्न निर्माण होतात. *व्यापारासंबंधी तथागतांनी अगुंत्तरनिकायच्या दशम निपातमधील उपालिवग्ग या भागातील उपालिसुत्तात सांगितले आहे,*_

*_कय विक्कया पटिविरतो होति, तुला कूटकं सकुट मानकूटा पटिविरतो होति ।_*

*_उक्कोटन वत्वन निकतिसा चियोगा पटिविरतो होति।_* 

*_छेदन वध बन्धन विपरामोस अलोप सहसाकारा पटिविरतो होति ।।_*

_(वजनमापांची फसवणूक, धातु किंवा वस्तुंची फसवणूक, लाच घेणे-देणे, धोखा देणे, फसवणूक करणे यापासून अलिप्त राहावे) सामाजिक स्वास्थ्याचा विचार करता योग्य व्यापार उदीम अतिशय आवश्यक आहे असे स्पष्ट प्रतिपादन तथागतांनी केले आहे._

_व्यापारातील अनीती किंवा सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार या समस्यांमागे राजकीय यंत्रणेचा मोठा हात असतो. भ्रष्टाचार का बोकाळतो? याचे कारण शोधताना असे लक्षात येते की भ्रष्टाचार करणाऱ्यांना मिळणारा राजाश्रय हे त्यामागचे खरे कारण आहे. *अगुंत्तरनिकायच्या तिक-निपातमधील चूल्लवग्ग या भागातील महाचोरसुत्तात सांगितले आहे,*_

*_कथञ्च, भिक्खवे, महाचोरो बलवनिस्सितो होति? इध, भिक्खवे, महाचोरो राजानं वा राजमहामत्तानं वा निस्सितेत होति । सचे में कोचि किञ्चि वक्खति, इमे मे राजानो वा राजमहामत्ता वा परियोधाय अत्थं भणिस्सन्ती ति । एवं खो, भिक्खवे, महाचोरो बलवनिस्सितो होति।_*

_(भिक्षुंनो, चोर अधिक बलवान कशाने होतात? जेव्हा चोर राजासोबत किंवा त्याच्या सरदारासोबत वावरताना दिसतात, तेव्हा त्या चोरांच्या मनात विचार येतो की, मी काहीही केले तरी राजा माझे संरक्षण करील मला शिक्षा करणार नाही. त्यामुळे चोर अधिक बलवान होतात)_

_आजच्या परिस्थितीत जे मोठमोठे घोटाळे अथवा भ्रष्टाचार दिसतात, ते बव्हंशी राजकीय पाठबळ असलेल्या लोकांनी केलेले दिसतात. राजकीय पुढारी व त्यांचे अनुयायी अशा भ्रष्टाचारात अग्रणी असतात. कारण पकडले गेलो तरी आपला नेता आपल्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करील अथवा संपूर्ण प्रकरणच दाबून टाकील याची खात्री राजकीय पुढाऱ्यांच्या अनुयायांना असते. त्यामुळे भ्रष्ट लोकही मुद्दाम राजकीय पुढाऱ्यांशी सलगी ठेवून असतात. पाली वाङ्मयात यासंबंधी अनेक संदर्भ सापडतात._

_जातवास्तव हे भारतीय समाजजीवनाचे कटुसत्य आहे. संपूर्ण समाज वेगवेगळ्या पद्धतीने विभागला गेला आहे. जातपात आणि शिवाशीव पाळण्यावर कायद्याने बंदी आहे. भारतीय राज्यघटनेने समाजपरिवर्तनाचे अतिशय मोठे काम यानिमित्ताने केले आहे. कायद्याच्या पाठबळामुळे अस्पृश्यतानिवारणाचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे. पाली वाङ्‌म‌यातही जातपात व अस्पृश्यतेचा निषेध अनेक ठिकाणी आढळतो. एखादी व्यक्ती खालच्या जातीची असली म्हणजे ती पापी, दुष्ट असलीच पाहिजेः असा समज त्याकाळी प्रचलित होता. खालच्या जातीचा म्हणजे नीच असे मानले जाई. बुद्धकाळात अशा व्यक्तीचा उल्लेख वसल (वृषल) असा केला जात असे. *खुद्दकनिकायच्या सुत्तनिपात या ग्रंथामधील वसलसुत्तात यासंबंधी माहिती मिळते.*_

*_न जच्चा वसलो होति, न जच्चा होति ब्राह्मणो।_*

*_कम्मुना वसलो होति, कम्मुना होति ब्राह्मणो ।।_* 

*_तचिनापि जानाय, यथामेदं निदस्सनं ।_*

*_चण्डालपुत्तो सोपाको, मातङो इति विस्सुतो।।_*

_(केवळ जन्मावरून कुणी वृषल होत नाही अथवा केवळ जन्माने ब्राह्मण होत नाही. माणसाच्या कर्तृत्वावरून त्याचे वृषलपण किंवा ब्राह्मणपण ठरते. तुम्हाला उदाहरणच द्यायचे झाले तर मी चांडाळपुत्र सोपाकाचे देईन. जो मातङ्ग या नावानेही प्रसिद्ध आहे.)_ 

_तथागत बुद्धांनी जातीप्रथा व अस्पृश्यता निवारणासंबंधी दिलेले अनेक उपदेश पाली वाङ्‌म‌यात आढळतात._

_पाली वाङ्‌मयात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक बाबींबरोबरच प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक उन्नतीचे मार्गदर्शनही आढळते. आजच्या बदलत्या जीवनशैलीत माणूस आपल्या आरोग्याविषयी अधिकाधिक निष्काळजी होत चालला आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या रोगांना तो बळी पडतो आहे. *आरोग्य हा श्रेष्ठतम लाभ असल्याने आरोग्याचे महत्त्व विशद केल्याचे आपल्याला पाली वाङ्‌मयातून दिसते. खुद्दकनिकायच्या धम्मपद या उपविभागातील सुखवग्गात तथागतांनी सांगितले आहे,*_

*_आरोग्य परमा लाभा, सन्तुट्ठी परमं धनं ।_*

*_विस्सास परमा जाति, निब्बानं परमं सुखं ।।_*

_(आरोग्य श्रेष्ठ लाभ आहे, संतुष्टी श्रेष्ठ धन आहे, विश्वास मोठा भाऊ आहे आणि निब्बाण श्रेष्ठ सुख आहे)_

*_संतुष्टी मनाशी संबंधित असल्याने मनाची मशागत करण्यावर तथागतांनी विशेष भर दिला आहे. मनातील लोभ, द्वेष आणि मूढता नष्ट करण्यासाठी तथागतांनी अष्टांगमार्ग हा मध्यममार्ग सांगितला आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजिविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी हा बुद्धांनी प्रतिपादित केलेला अष्टांगमार्ग आहे. तोच मानवी दुःखाच्या निवारणाचा मध्यममार्ग आहेः जो मार्ग काळाच्या कसोटीवर खरा ठरला आहे. स्थळ काळाच्या मर्यादेपलिकडे हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. मानवी जीवनाशी संबंधित प्रश्नांवर उत्तर केवळ याच मध्यममार्गात सापडते. या अष्टांगमार्गाचे विश्लेषण म्हणजेच पाली वाङ्‌मयातील तत्वज्ञान आहे. या मार्गाच्या विश्लेषणातून पाली वाङ्‌मय आकारास आले आहे. त्यामुळे पालि वाङमय हे आजच्या समस्यांवरील उत्तर आहे यात शंका नाही._*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखन :- देवेंद्र उबाळे, इगतपुरी_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_संपर्क :-_*

संपादक - बुद्धघोष एस. के. खैरे (9867836548) प्रबुद्ध समाज मासिक, वर्ष ४/अंक २० ऑगस्ट - सावणो २०२४_*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...