✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_पाली तिपिटक साहित्यामध्ये बुध्दवंसाचे स्थान व महत्त्व_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_70.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
_प्राचीन भारतीय साहित्यामध्ये पाली साहित्य हे अतिशय महत्त्वाचे साहित्य आहे. *पाली साहित्य हे केवळ तिपिटकापुरतेच मर्यादित नसून यात पाली तिपिटका व्यतिरिक्त स्वतंत्र पाली साहित्य आहे. ज्यात पेटकोपदेश, नेत्तिप्पकरण, मिलिंदपञ्हो, विसुध्दिमग्गो व अभिधम्मत्थसंगहो सारखे स्वतंत्र पाली ग्रंथही आहेत. त्याचबरोबर पाली अट्ठकथा साहित्य, पाली वंस साहित्य आणि पाली व्याकरण साहित्य आहे. याशिवाय पाली टीका साहित्य, पाली अनुटिका साहित्य तसेच सिलोन, बरमा, थाईलंड, लाओस, कंबोडीया. व्हियेतनाम इत्यादी देशांमध्ये लिहिले गेलेले पाली सहित्य आहे.*_
_पाली तिपिटक साहित्यामध्ये सुत्तपिटक विनयपिटक आणि अभिधम्मपिटक हे तीन पिटक आहेत. प्रत्येक पिटकाचे स्वतंत्र महत्त्व आहे. या तिन्ही पाली तिपिटकांना बौध्द परंपरा बुध्दवचन मानते. बौध्द परंपरेमध्ये संपूर्ण पाली तिपिटका प्रती अतिशय सन्मानाची व आदराची भावना आहे. पाली तिपिटकामधील सुत्तपिटक हे इतर पिटकापेक्षा एका वेगळ्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचे आहे. सुत्त- पिटकामध्ये एकूण पाच निकाय आहेत. दीघनिकाय, मज्झिमनिकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तरनिकाय आणि खुद्दकनिकाय. खुद्दकनिकायामध्ये एकूण पंधरा ग्रंथ आहेत. त्यात खुद्दकपाठ, धम्मपद, उदान, इतिवुत्तक, सुत्तनिपात, विमानवत्यु, पेतवत्यु, थेरगाथा, थेरीगाथा, जातक, निद्देस, पटिसम्भिदामग्ग, अपदान, बुध्दवंस, चरियापिटक हे एकूण पंधरा ग्रंथ आहेत. *यातील एक ग्रंथ आहे 'बुध्दवंस' बुध्दवंसामध्ये एकूण एकोणतीस प्रकरणे आहेत.* त्यांत_
१. रतनचंकमनकण्डं,
२. सुमेध पत्थनाकथा,
३. दीपंकरबुध्दवंसो,
४. मंगलबुध्दवंसो,
५. सुमनबुध्दवंसो,
६. रेवतबुध्दवंसो,
७. सोभितबुध्दवंसो,
८. अनोमदस्सीबुध्दवंसो,
९. पदुमबुध्दवंसो,
१०. नारदबुध्दवंसो,
११. पदुमुत्तरबुध्दवंसो,
१२. सुमेधबुध्दवंसो,
१३. सुजातबुध्दवंसो,
१४. पियदस्सीबुध्दवंसो,
१५. अत्थदस्सीबुध्दवंसो ,
१६. धम्म दस्सीबुध्दवंसो,
१७. तिस्सबुध्दवंसो,
१८. फुस्सबुध्दवंसो,
१९. विपस्सीबुध्दवंसो,
२०. सिखीबुध्दवंसो,
२१. वेस्सभूबुध्दवंसो,
२२. ककुसन्धबुध्दवंसो,
२३. कोणागमनबुध्दवंसो,
२४. कस्सप बुध्दवंसो,
२५. गोतमबुध्दवंसो,
२६. बुध्दपकिण्णककण्डं,
२७. धातुभाजनीयकथा
_इत्यादी प्रकरणांचा समावेश होतो. *बुध्दवंस ग्रंथामधील रतनचंकमनकण्डं सुमेध-पत्थनाकथा, बुध्दपकिण्णककण्डे व धातुभाजनीय कथा या चार प्रकरणांना सोडून बाकीच्या प्रकरणांमध्ये एकूण पंचवीस बुध्दांचे जीवनचरित्र वर्णन करण्यात आले आहे. बुध्दवंस हा ग्रंथ मूळ पालि तिपिटकामधील असून हा पूर्णपणे गाथा स्वरूपामध्ये आहे. या ग्रंथामध्ये एकूण एक हजार सत्तर गाथा आहेत.*_
*_बुध्दवंसाचा अर्थ :-_*
_बुध्दवंस हा शब्द बुध्द आणि वंस या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. बुध्द' या शब्दाचा अर्थ बुध्दीमान, ज्ञानी, प्रज्ञावंत असा होतो. बुध्द हे एक पद सुध्दा आहे. सिध्दार्थ गौतमाने बुध्दत्व या पदाला प्राप्त केल्यामुळे त्यांना बुध्द म्हटले गेलेले आहे. बुध्द हे एक विशेषण सुध्दा आहे. 'वंस' या शब्दाचा अर्थ इतिहास, वंशावळ, वृत्तांत असा होतो. बौध्द परंपरेनुसार अनेक बुध्द होऊन गेलेत अशी मान्यता आहे. *बुध्दवंस याचा अर्थ बुध्दाचा इतिहास वर्णन करणाऱ्या ग्रंथाला बुध्दवंस म्हटले गेलेले आहे.*_
*_बुध्दवंसाचा काळ :-_*
_बुद्धवंस हा ग्रंथ सुत्तपिटकाच्या खुद्दक- निकायामधील चौदावा ग्रंथ आहे. संपूर्ण बौध्द परंपरा पालि तिपिटकाला बुद्धवचन मानते. याचा अर्थ असा की, तिपिटकामधील संपूर्ण ग्रंथ हे बुद्धवचन अर्थात बुध्दाने दिलेले उपदेश आहेत. म्हणजेच या संपूर्ण तिपिटकाचे संगायन हे पहिल्या संगीतिमध्ये झाले._
_म्हणजे बुध्दवंस या ग्रंथाचे संगायन सुध्दा पहिल्या संगीतिमध्ये झाले. दुसऱ्या व तिसऱ्या संगीतीमध्ये या ग्रंथाला अंतिम स्वरूप देण्यात आले. परंतु बुध्दवंस या ग्रंथाच्या रचनाकाळासंबंधी सुध्दा विद्वानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मान्यता आहेत. या ग्रंथाच्या एकंदर स्वरूपावरून असे म्हणता येईल की, हा ग्रंथ सुरूवातीला अतिशय लघु आकाराचा होता. नंतर काही भाग या ग्रंथामध्ये जोडण्यात आला *डॉ. भिक्खु धर्मरक्षित यांनी आपल्या 'पाली साहित्य का इतिहास' या ग्रंथात बुद्धवंसासंबंधी म्हटलेले आहे की, 'भगवान बुद्धाने या ग्रंथाचा उपदेश त्यावेळी दिलेला होता ज्यावेळी ते महाराज शुद्धोद्धनाच्या निमंत्रणावरून आपल्या २०,००० अरहंत भिक्खूंच्या सोबत कपिलवत्थुला गेले होते आणि रमणीय न्यग्रोधाराम नामक विहारामध्ये रत्नमय चंक्रमणामध्ये विहार करीत असताना आपल्या ८२,००० जातीबंधुच्या अभिमानाला तोडण्याकरिता त्यांनी आयुष्यमान सारिपुत्ताने विचारल्यानंतर पूर्व बुद्धांच्या इतिहासाला सांगितले होते.*_
_त्याचप्रमाणे या ग्रंथातील प्रत्येक बुध्दांच्या जीवन चरित्रावरून प्रत्येक व्यक्तीला दान करण्याची प्रेरणा, गरजू लोकांना मदत करण्याची प्रेरणा, लोकांच्या कल्याणाकरिता प्रयत्नशील राहण्याची प्रेरणा, लोकांच्या रोगाला नष्ट करण्यासाठी चिकित्सकीय प्रेरणा, जगातील लोकांचे दुःख दूर करण्याची प्रेरणा इत्यादींच्या प्रेरणा निश्चितपणे प्राप्त होतात._
*_बोधिसत्वाची संकल्पना :-_*
_बुध्दवंस हा ग्रंथ बुध्दधम्मातील बोधिसत्वाची संकल्पना स्पष्ट करणारा आहे. थेरवादी बौध्द धम्म असो की महायान बौध्द धम्म असो दोन्हीमध्ये तत्त्वज्ञानामध्ये बोधिसत्वाच्या संकल्पनेला फार महत्व आहे. दोन्हीचा अंतिम आदर्श व उद्देश बुध्दत्वाची प्राप्ती करणे आहे. बुध्दपद प्राप्त करणे आहे. बुध्दपद प्राप्त करणे, बुध्दत्वाला प्राप्त करणे हे थेरवादी बौध्द धम्माचे व महायानी बौध्द धम्माचे अंतिम उद्दिष्ट आहे. दोन्हीमध्ये बोधिसत्व, बुध्दत्व व बुध्द हे अंतिम आदर्श आहेत. बुध्दवंस या ग्रंथाच्या माध्यमाने बोधिसत्व आदर्शाचे व बुद्धत्व प्राप्तीचे महत्त्व वर्णन करण्यात आलेले आहे. *थेरवादी बुद्धधम्मातील बोधिसत्वाची संकल्पना, बुद्धाची संकल्पना समजून घेण्याकरिता बुद्धवंस हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे.* त्याचप्रमाणे बुध्दत्व प्राप्तीसाठी दहा पारमिता पूर्ण करणे अतिशय महत्वाचे आहे. बौध्द तत्वज्ञानामध्ये व प्रामुख्याने थेरवादी बौध्द तत्वज्ञानामध्ये या दहा पारमितांना अनन्य साधारण महत्व आहे. या दहा पारमिता म्हणजे दान, सील, नेक्खम्म (नैष्क्रम्य), पञ्ञा, विरिय, खन्ति (क्षान्ती), सच्च, अधिठ्ठान, मेत्ता व उपेक्खा (उपेक्षा) होत. प्रत्येक बुध्दाला बुध्द होण्याआधी किंवा बुध्दत्व प्राप्त करण्याच्या आधी बोधिसत्वाचे जीवन जगावे लागते आणि बोधिसत्व जीवनामध्ये दहा पारमिता पूर्ण केल्यानंतरच बोधिसत्व हा बुध्दत्वाला प्राप्त होतो._
_बुद्धवंस हा ग्रंथ भाषा, शैली, बौद्ध संस्कृती, बौद्ध मान्यता व प्रामुख्याने थेरवादी मान्यता इत्यादी दृष्टीने महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे बुद्धाच्या काळातील वेगवेगळ्या मान्यता, भौगोलिक स्थिती, सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती, तत्कालीन वैदिक मान्यता, वैदिक मिथक, पौराणिक नाव इत्यादींच्या दृष्टीने सुद्धा या ग्रंथाला फार महत्त्व आहे. बुद्धाच्या काळातील अनेक ऐतिहासिक संदर्भ या ग्रंथामध्ये आढळून येतात. म्हणून या ग्रंथाला सामाजिक, सांस्कृतिक, तात्विक अध्ययनाच्या दृष्टीने जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व या ग्रंथाला ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा आहे. या ग्रंथामध्ये पौराणिक बुद्धांचे जीवन चरित्र व ऐतिहासिक बुद्धांचेही जीवन चरित्र आलेले आहे. पौराणिक बुद्ध व ऐतिहासिक बुद्धांच्या जीवन चरित्रावरुन हे स्पष्ट होते की, पौराणिक बुद्धांची कथा ही ऐतिहासिक बुद्धाचे महत्व त्यांच्या विचारांचे महत्व स्पष्ट करण्याकरिता वर्णन करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पौराणिक बुद्धांची कथा व ऐतिहासिक बुद्धांची कथा यात मुलभूत स्वरूपाचा फरक आहे. यात प्रत्येक बुद्धांचे जीवन व कार्य हे प्रत्येकांसाठी प्रेरणादायी आहे. या ग्रंथाचा मुख्य उद्देश बोधिसत्व आणि बुद्धत्वाच्या आदर्शाचे महत्व प्रतिपादन करणे असा आहे. त्याचप्रमाणे *हा ग्रंथ ज्ञानाची परंपरा, त्यागाची परंपरा, सेवेची परंपरा, शील, समाधी व प्रज्ञेची परंपरा, अखंड परंपरा आहे. ती सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या आधीही होती, त्यांच्या काळामध्येही होती व त्यानंतरही राहणार आहे असे या ग्रंथाच्या अध्ययनावरून निश्चितपणे म्हणता येईल.* बुद्धवंस हा ग्रंथ जरी प्राचीन ग्रंथ असला, तरीही हा ग्रंथ आजसुद्धा मानवी कल्याणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे हा ग्रंथ आधुनिक समाजामध्ये ज्ञानाची परंपरा, लोक कल्याणाची परंपरा, अहिंसेची परंपरा व शांतीची परंपरा समाजामध्ये निर्माण करण्याकरिता निश्चितपणे प्रेरक असा ग्रंथ आहे._
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_लेखन :- डॉ. सविता कांबळे_*
(पोष्ट डॉक्टोरल फेलो, यु.जी.सी. न्यु दिल्ली) गव्हरमेंट पी.जी. कॉलेज, सोवनी, मध्यप्रदेश
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_संदर्भ :- प्रबुद्ध समाज मासिक, वर्ष ४/अंक २० ऑगस्ट - सावणो २०२४_*
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment