Wednesday, 17 July 2024

कर्म हे मानवी जीवनाच्या नैतिक व्यवस्थेचा आधार आहे यावर विश्वास म्हणजे धम्म

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_धम्म काय आहे?_*

*_कर्म हे मानवी जीवनाच्या नैतिक व्यवस्थेचा आधार आहे यावर विश्वास म्हणजे धम्म_*

*_(भाग ६)_*

*_(समाप्त)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_17.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

            _या पार्थिव जगात एक प्रकारची व्यवस्था आहे. निम्न घटना याच्या साक्षी आहेत. अवकाशात ग्रहताऱ्यांचे चलनवलन, त्यांची गती यात एक प्रकारची सुव्यवस्था आहे. ऋतुचक्रामध्येही व्यवस्था आहे, नित्यनेमी क्रम आहे. बीजापासून वृक्ष, वृक्षापासून फळ आणि फळापासून बीज यातही एक व्यवस्था आहे. नियम आहे._

           _बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेला नियम असे म्हणतात. हे नियम सृष्टीत सुव्यवस्थित क्रमबद्धता स्थापित करतात. जसे ऋतू नियम, बीज नियम आदी._

           _याचप्रमाणे मानव समाजात नैतिक व्यवस्था विद्यमान आहे काय? ही व्यवस्था कशी प्रस्थापित झाली. ही व्यवस्था कशी नियमित केली जाते._ 

          _ज्यांचा ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास आहे त्यांना या प्रश्नाचे उत्तर देण्यात कोणतीही अडचण नाही. त्यांचे उत्तर सोपे आहे. त्यांच्या मते संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वरी इच्छेचा परिणाम होय. ईश्वरानेच सृष्टी निर्मित केली आहे. ईश्वरच या सृष्टीचा नियंता आहे. ईश्वरच या सृष्टीत भौतिक नियमांचा आणि नैतिक नियमांचा रचियता आहे._ 

           _त्यांच्या मते ईश्वरनिर्मित नैतिक नियम हे मानवाच्या कल्याणासाठी आहेत. हे नियम म्हणजे ईश्वरीय आज्ञाच होत. मानवाने ईश्वरीय आज्ञांचे पालन केलेच पाहिजे. कारण ईश्वर त्यांचा रचियता आहे. ईश्वरीय आज्ञांचे पालन केल्यानेच सृष्टीत नैतिक व्यवस्था विद्यमान आहे. जे नैतिक व्यवस्था ही ईश्वरीय इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांची विचारसरणी ही अशी आहे._

           _*परंतु ही व्याख्या, हे स्पष्टीकरण कोणत्याही दृष्टिकोनातून समाधानकारक नाही. कारण हे नैतिक नियम ईश्वर निर्मित असतील तर आणि ईश्वरच या नियमांचा आदी आणि अंत असेल तर आणि जर मनुष्य ईश्वराची आज्ञा पालन करण्यास बाध्य असेल तर मग या सृष्टीत नैतिक अराजकता का विद्यमान आहे?*_

            _*या ईश्वरीय नियमांचे शक्तिस्रोत काय? या ईश्वरीय नियमांचा मनुष्यमात्रांवर काय अधिकार आहे? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. परंतु यापैकी कोणत्याही प्रश्नांचे समाधानकारक उत्तर नाही. जे सृष्टीतील नैतिक व्यवस्थेला ईश्वरीय इच्छेचा परिणाम मानतात, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही.*_

          _ही गैरसोय दूर व्हावी यासाठी या सिद्धांतात थोडी सुधारणा करण्यात आली आहे. असे म्हणण्यात येते की, *"निर्मिती ईश्वरीय इच्छेचा परिणाम आहे यात शंकाच नाही. सृष्टीने ईश्वरीय इच्छेनुसार आणि ईश्वरीय मार्गदर्शनानुसार आपले कार्य आरंभ केले आहे हेही सत्य आहे. हेही सत्य आहे की ईश्वराने सृष्टीला एकदाच शक्ती प्रदान केली आहे. हीच शक्ती सृष्टीच्या समस्त क्रियाशीलतेचे मूळ आहे."*_

           _यानंतर ईश्वराने सृष्टीला स्वतंत्र सोडून दिले. आरंभी दिल्यानुसार *सृष्टीने ईश्वरीय नियमानुसार कार्य करावे हे अपेक्षित होते. याचा अर्थ असा की, ईश्वरीय इच्छेनुसार नैतिक व्यवस्था कार्य करीत नसेल तर, ती अपयशी ठरली असेल तर तो सृष्टीचा दोष आहे, ईश्वराचा नव्हे.*_

             _परंतु या सिद्धांतात करण्यात आलेली ही सुधारणा सुद्धा उपरोक्त गैरसोय दूर करू शकली नाही. फक्त ईश्वराला उत्तरदायित्वातून मुक्ती मात्र मिळाली आहे. तरीही प्रश्न उरतोच की ईश्वराने त्याच्याद्वारा निर्मित सृष्टीला, नैतिक नियमांचे पालन करण्याचे उत्तरदायित्व का दिले? मग अशा प्रकारच्या अनुपस्थित, अकर्मण्य ईश्वराचे - प्रयोजन काय ?_

          _*या प्रश्नांना बुद्धांनी उत्तर दिले आहे. या सृष्टीत नैतिक व्यवस्था कशी विद्यमान आहे. कशी नियमित केली जाते या प्रश्नांना बुद्धाने दिलेले उत्तर पूर्णतः भिन्न आहे.*_

          _*त्याचे उत्तर साधे सरळ आहे. या विश्वात नैतिक व्यवस्थाही कर्मनियमानुसार - विद्यमान आहे. ही व्यवस्था कर्मनियमानुसार नियंत्रित आहे. नियमित आहे. ईश्वरीय इच्छेनुसार नाही. या प्रश्नांना बुद्धांचे उत्तर हे असे आहे.*_ 

_विश्वाची नैतिक व्यवस्था कुशल असेल किंवा अकुशलही असेल. परंतु - बुद्धांनुसार ही व्यवस्था मानवाधारित आहे. अन्य कोणावरही आधारित नाही._

          _*कर्म म्हणजे मानवीय कृती. विपाक म्हणजे या कृतीचा परिणाम.* जर नैतिक व्यवस्था अकुशल असेल तर माणूस - अकुशल कार्य करतो आहे. असा त्याचा - अर्थ होय. जर नैतिक व्यवस्था कुशल असेल तर माणूस कुशल कर्म करतो आहे असा त्याचा अर्थ होय._

_*कर्माविषयी फक्त बोलूनच बुद्धांचे समाधान झाले नाही. ते कर्म नियमाविषयी बोलतात. ते कर्माच्या नियमाविषयी बोलतात. त्याला "कर्म नियम" असे म्हणतात.*_

_*कर्म नियमाचा सिद्धांत प्रतिपादित करून बुद्धांना जे सांगावयाचे होते ते हे की, कर्माचा परिणाम कर्मापाठोपाठ होणे अपरिहार्य आहे. ज्याप्रमाणे दिवसा मागून रात्र येते, त्याचप्रमाणे कर्मापाठोपाठ कर्माचा परिणाम येतो. हाच कायदा आहे. हाच नियम आहे.*_

      _कुशल कर्माच्या कुशल परिणामापासून कोणीही वंचित राहू शकत नाही. आणि अकुशल कर्माच्या अकुशल परिणामापासून कोणाचीही सुटका नाही. *म्हणून बुद्धांचा उपदेश असा की, कुशल कर्म करा. त्यामुळे मानवजातीला कुशल नैतिक व्यवस्थेचे लाभ प्राप्त होतील. ही नैतिक व्यवस्था कुशल कर्माचा परिणाम म्हणून अस्तित्वात येईल. अकुशल कर्म करू नका. कारण मानवजात या अकुशल कर्माच्या परिणामाने, प्रस्थापित अकुशल नैतिक व्यवस्थेने हानी पावेल. ही अकुशल नैतिक व्यवस्था अकुशल कर्माचा परिणाम म्हणून अस्तित्वात येईल आणि अस्तित्वात राहील.*_

        _ज्याक्षणी आपण कर्म करतो आणि ज्याक्षणी विपाक (परिणाम) प्राप्त होतात यात काही काळाचे अंतर असण्याची शक्यता आहे. असे होणे संभवनीय आहे._

 _या दृष्टिकोनानुसार कर्म हे,_ 

१. 'दिष्ठ धम्मवेदनीय कम्म' (तत्काल फलित होणारे कर्म), 

२. 'उपपज्ज वेदनीय कम्म' (दुरान्वयाने फलित कर्म), 

३. 'अपोरापरिय वेदनीय कम्म' (अनिश्चित कालाने फलित होणारे कर्म) असतात.

        _*कर्म हे 'अहोसी कर्म' या वर्गातही येऊ शकेल. अहोसी कर्म म्हणजे ज्याचा काही विपाक नाही असे कर्म होय. यात असे कर्म जे एवढे दुर्बल आहे की ज्याचा काही विपाक (परिणाम) नाही, किंवा असे कर्म की ज्याचा विपाक ज्यावेळी व्हावयास हवा त्यावेळी अन्य सबळ कर्माच्या विपाकांनी बाधित होतो, अशा सर्व कर्मांचा अंतर्भाव होतो.*_

_या सर्व धारणांना थोडी सवलत दिली तरीही बुद्धांचा "कर्माचा नियम अनिवार्य आहे" या सिद्धांताला बाधा येत नाही._

        _कर्म सिद्धांताचा अनिवार्य रूपाने असा अर्थ नाही की, कर्म करणारालाच कर्माचे फळ भोगावे लागेल. बरेचदा एकाच्या कर्माचे फळ दुसऱ्यालाही भोगावे लागते. तरीही हा सर्व कर्म नियमाचाच परिणाम होय. कारण कर्मानेच नैतिक व्यवस्था कुशल अथवा अकुशल रूपाने प्रभावित होते._

          _माणूस येतो आणि माणूस जातो. परंतु विश्वाची नैतिक व्यवस्था मात्र विद्यमान असतेच. तद्वतच कर्माचा नियमही विद्यमान असतोच. हाच नियम या नैतिक व्यवस्थेचा आधार आहे. *याच कारणास्तव बुद्धांच्या धम्मात नैतिकतेला ईश्वराचा पर्याय म्हणून स्थानापत्र करण्यात आले आहे.*_

        _विश्वास नैतिक व्यवस्था काही विद्यमान आहे, कशी नियंत्रित आणि नियमित आहे या प्रश्नाला बुद्धांचे उत्तर असे साधे, सरळ पण वादातीत आहे._

          _*तरीही या सिद्धांताचा खरा अर्थ क्वचितच समजून घेतला जातो. बरेचदा प्रायः नेहमीच या सिद्धांताचा चुकीचा अर्थ लावला जातो. चुकीचा अर्थ सांगितला जातो. किंवा चुकीची व्याख्या तरी केली जाते. "नैतिक व्यवस्था कशी नियंत्रित केली जाते. कशी नियमित केली जाते, ती कशी विद्यमान आहे." या प्रश्नांना कर्म सिद्धांताचे प्रतिपादन करून बुद्धांनी उत्तर दिले आहे याची बहुतांश लोकांना जाणीव आहे असे दिसत नाही.*_

      _परंतु बुद्धांच्या कर्म सिद्धांताचे हेच प्रयोजन आहे. कर्म नियमाच्या सिद्धांताचा संबंध विश्वाच्या सामान्य नैतिक व्यवस्थेशी आहे. कर्म नियमाच्या या सिद्धांताचा संबंध व्यक्तिविशेषाच्या स‌द्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी नाही._

 _या कर्म नियमाच्या सिद्धांताचा संबंध विश्वात नैतिक व्यवस्था विद्यमान राखणे, आणि तिचे नियमन आणि नियंत्रण यांच्याशी आहे. *याच कारणास्तव कर्मनियमाचा सिद्धांत धम्माचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १८/०७/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ३*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...