🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन_*
*_डॉ. नरेंद्र दाभोलकर_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_49.html
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_भाग ९_*
*_बुद्धीचे बोन्सॉय_*
_म्हणजे आपल्याकडे स्त्रिया वटसावित्रीचं व्रत करतात. हे व्रत त्या दोन गोष्टींसाठी करतात. एक गोष्ट म्हणजे, नवऱ्याला दीर्घ आयुरारोग्य मिळावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जन्मोजन्मी सात जन्मी तोच पती मिळावा. *खरं म्हटलं तर ज्याप्रमाणे सावित्रीने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले, ही गोष्ट जर हे व्रत करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत होत असती, तर आम्हा डॉक्टरांची फार सोय झाली असती. आम्ही रुग्णालयाच्या दारामध्ये वडाचं एक झाड लावलं असतं आणि ज्या वेळेला पेशंटला शस्त्रक्रियेसाठी घेतलं असतं, त्या वेळी त्याच्या बायकोच्या हातामध्ये सुताची एक गुंडी दिली असती आणि तिला सांगितलं असतं, 'तू झाडाभोवती सूत गुंडाळ. तू हे व्रत कर. कारण त्याच्यामुळे दुहेरी फायदा आहे. एका बाजूला आमची शस्त्रक्रिया, दुसऱ्या बाजूला तुझं व्रत; डबल इंजीन लावू या. कशाने का होईना, पण निश्चित प्रकारे गुण येईल'. परंतु या सगळ्यातला फोलपणा कळत असतानादेखील आजही सुशिक्षित स्त्री अशी सगळ्या प्रकारची व्रतं विशेषतः वटसावित्रीचं व्रत करते. आणि कसं करते? - म्हणजे वडाची झाडं आता कुठेतरी गावाच्या बाहेर असणार; मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये तर तीही सोय नाही. मग सर्रास वडाच्या फांद्या तोडल्या जातात, त्या विक्रीला आणल्या जातात आणि वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होते. कशाकरता? तर वटसावित्रीचं वट पुजायचंय म्हणून.*_
_म्हणजे बॉन्साय हा प्रकार आपल्याला माहीत असेल. मोठी मोठी झाडं छोटी छोटी करून ठेवण्याची ती एक जपानी कला आहे. त्यामुळे वडाचं झाड २० वर्षांचं असतं, तरी छोट्या कुंडीतच असतं. *मुंबईच्या उच्चविद्याविभूषित विदुषी मला एकदा त्यांच्या घरातलं वडाचं बॉन्साय दाखवत होत्या. ते दाखवताना त्या म्हणाल्या, "डॉक्टर, या वडाच्या झाडाचं वय २२ वर्ष आहे, पण त्याचा एक मोठा फायदा होतो. तो म्हणजे, आमच्या इमारतीमधल्या बायका वटसावित्रीच्या दिवशी दुसरीकडे कुठेही न जाता माझ्या घरी येतात आणि या वडाच्या झाडाची पूजा करतात. मी त्यांना म्हणालो, "याचा अर्थ एवढाच की, तुमच्या झाडाचं बॉन्साय तर आहेच, पण तुमच्या कॉलनीमधल्या किंवा इमारतीमधल्या महिलांच्या बुद्धीचदेखील बॉन्साय झालेल आहे. असं बोललेलं लोकांना आवडत नाही. याचं कारण, आपल्या रूढीपरंपरा आपण ज्ञानाच्या प्रकाशामध्ये तपासाव्यात, असं लोकांना वाटतच नाही.*_
_*वटसावित्रीची कथा किती जणांना माहिती आहे, असा प्रश्न मी ज्या वेळी विचारतो, त्या वेळी महिला समुदायामध्येदेखील कोणीही ती कथा नीट सांगू शकत नाही, असा माझा अनुभव आहे.* कथा काय आहे? अश्वपती नावाचा एक राजा निःसंतान असतो. मूल व्हावं म्हणून तो देवीची पूजा करतो. १८ वर्ष तप आणि व्रत केल्यानंतर त्याला एक सुरेख मुलगी होते. तिचं नाव असतं सावित्री. ही सावित्री म्हणणे इतकी रूपवान असते, इतकी देखणी असते की, तिला वरायला, तिच्याशी लग्न करायला कुणी धजावत नसतं. शेवटी सावित्रीने स्वतःचा वर स्वतःच निवडावा म्हणून एका वृद्ध अमात्याला बरोबर देऊन राजा तिला पाठवतो. सावित्री या राज्यातनं त्या राज्यात, या जंगलातनं त्या जंगलाकडे जात असते. कारण दोन राज्यांना जोडणारी जंगलंच त्या वेळेला असायची._
_आणि एका जंगलामध्ये तिला सत्यवान दिसतो. सत्यवान हा राज्य गेल्याने परागंदा झालेला राजा असतो. त्याचे वडील महाराज असतात. तेही त्या वेळी जंगलातच राहत असतात. ते आंधळे झालेले असतात; आणि राज्य गेल्यामुळे जंगलात राहण्याची वेळ, म्हणजे हा विजनवास त्यांच्या पदरी आलेला असतो. अशा वेळी मातीचे हत्ती आणि घोडे करून सत्यवान त्यांच्याशी खेळत असतो. त्याला बघितल्यानंतर सावित्री म्हणते, "मी याच्याशीच लग्न करणार". ज्या वेळेला तिच्या वडलांना हे कळतं, त्या वेळी तिच्या वडलांना आनंद होतो की, 'चला, आपल्या मुलीने आपला वर निवडला' त्याच्यानंतर प्रत्यक्षात लग्न होण्याच्या आधी नारद येतो आणि नारद सावित्रीच्या वडलांना सांगतो की, "बाबा रे, तुझ्या मुलीने जो वर निवडलेला आहे, तो एक वर्षानंतर निश्चितपणे मरणार आहे. एक वर्षानंतर तुझी मुलगी विधवा होणार आहे. तेव्हा हे लग्न तू करू नकोस"; परंतु तरीदेखील जंगलामध्ये जाऊन अत्यंत आनंदाने, थाटामाटात अश्वपती आपल्या मुलीचं लग्न लावून देतो. त्याच्यानंतर एक वर्ष होतं. एक वर्ष झाल्यानंतर यम येतो. यम सत्यवानाला घेऊन जायला लागतो. त्याच्या मागोमाग सावित्री जाते. यम तिला परोपरीने परत पाठवण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही बधत नाही. शेवटी, यम तिला तीन वर मागायला सांगतो. पहिला वर ती मागते, "माझ्या सासऱ्यांना त्यांचं गेलेलं राज्य परत मिळण्याचं आणि परत मिळालेलं राज्य पाहाण्याच भाग्य लाभू दे"; दुसरा वर मागते, "माझ्या निःसंतान पित्याला शंभर पुत्र होऊ दें। तिसरा वर मागते, "आम्हा उभयतांना दीर्घ आयुरारोग्य लाभून माझा संसार सुखाचा होऊ दे", आणि मग यम "तथास्तु" म्हणतो._
_आता ही सगळी कल्पना काय आहे, असा प्रश्न तुम्ही कधी विचारला का? समजा, आजच्या आधुनिक कालखंडामध्ये आपल्याला एक अत्यंत देखणी मुलगी आहे आणि तिच्या लग्नाला जर चटकन सांगून मुलं येत नाहीयेत, तर वडील स्वतः आणखी व्यापक प्रयत्न करतील की एका वृद्ध अमात्याला घेऊन तिलाच देशोदेशी स्वतःच्या स्वयंवरासाठी पाठवतील? त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की, एक वर्षान तिचा नवरा मरणार असल्याचं निश्चितपणे कळलं - ते आज कळू शकतं. उदाहरणार्थ, कुणी जर येऊन सांगितलं की, 'अहो, तुमच्या मुलीचं लग्न ठरलंय, पण तुम्हांला माहीत आहे का की, नवऱ्या मुलाच्या लिव्हरचं अमुक अमुक डॅमेज आहे. त्याला लिव्हरचा अमुक अमुक आजार आहे. तो एक वर्षाच्या वर जगणार नाहीये तर ते लग्न ती मुलगी करेल का? आणि तिचे आईवडील ते करू देतील का? किंवा आजच्या काळाच्या संदर्भात बोलायचं, तर धंद्यामध्ये पूर्ण संपत्ती गेलेली असल्याने एका झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आणि त्याच्या आंधळ्या बापालाही भविष्यात सांभाळावं लागणार असणाऱ्या मुलाशी आजच्या काळातली एखादी मुलगी लग्न करेल का? आणि ती 'लग्न करते' म्हणाली, तरी तिचे आईबाप त्या लग्नाला होकार देतील का?_
_अश्वपती राजानेही आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न जंगलात का लावून दिलं ? त्याने ते लग्न राजधानीमध्ये का नाही लावलं ? आणि ते लावल्यानंतर त्याने आपल्या मुलीच्या सासरकडच्यांना मदत का केली नाही? त्याने आपल्या जावयाला आणि आपल्या व्याह्यांना आणून राजधानीमध्ये का ठेवलं नाही? हे प्रश्नदेखील हे व्रत करणाऱ्या लोकांना पडत नाहीत. या कथेत जे सगळं घडलं, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, *ज्या मुलीला भाऊ नसे, तिचं लग्न त्या काळात होत नसे.* त्यामुळे 'एवीतेवी हिचं लग्न होणारच नव्हतं, पण कसं का असेना, आता एकदा हिचं लग्न तरी होतंय', या भावनेने अश्वपती सावित्रीचं लग्न लावून द्यायला उत्सुक होता. लग्न करायला कदाचित परंपरेच्या दडपणाने ती उत्सुक होती. परंपरेचं हे दडपण इतकं जास्त होतं की, तिने यमाला काय मागितलं ? पहिला वर, स्वतःच्या सासऱ्यासाठी मागितला. दुसरा वर, स्वतःच्या वडलांसाठी मागितला आणि तिसरा वर स्वतःच्या नवऱ्यासाठी मागितला म्हणजे तिने तीनही गोष्टी पुरुषांसाठी मागितल्या. त्यामुळे हे सबंध व्रत तुम्ही ज्या वेळी करता, त्या वेळी त्यातला गर्भितार्थ असा की, बाईने आपल्या सगळ्या सुखाचं समर्पण पुरुष वर्गाशी संबंधित असलेल्या बाबींसाठी मग कदाचित वडील असतील, कदाचित सासरे असतील किंवा नवरा असेल - केलं पाहिजे. हे सगळंच्या सगळं आजच्या आधुनिक विचाराशी पूर्णपणे विसंगत आहे!_
_आता ही विसंगती अनेक वेळा किती हास्यास्पद ठरते। म्हणजे कोल्हापूरकडच एक उदाहरण आहे. एका गावामध्ये वटसावित्रीच्या दिवशी गावातल्या बायका जमून वटसावित्रीची पूजा करत होत्या; वडाला सूत गुंडाळत होत्या; हळदीकुंकू वाहून वडाची पूजा करत होत्या. लग्न होऊन दोन वर्ष झालेली एक बाई हे सगळं करत असताना अचानकपणे एक जीप आली. त्या जीपमधनं एक माणूस उतरला. त्याने या बाईचा हात धरला; ओढला; तिला जीपमध्ये बसवलं आणि जीप भरधाव वेगाने निघून गेली._
_याने गावात एकच हलकल्लोळ माजला. सगळे म्हणायला लागले, 'हा काय प्रकार आहे! आमच्या गावामध्ये देवाची पूजा करणाऱ्या, वडाची पूजा करून वटसावित्रीचं व्रत करणाऱ्या बाईला दिवसाढवळ्या कुणीतरी माणूस या पद्धतीने घेऊन जातो! पळवून नेतो! मग या जीपचा पाठलाग करण्यात आला. गाडी काही भरधाव वेगाने चाललेली नव्हती. मग गाडी अडवण्यात आली; त्या माणसाला उतरवण्यात आलं. त्याला दमात घेऊन 'हा सगळा काय प्रकार आहे! तू स्वतःला कोण समजतोस! आमच्या गावातली मुलगी तू अशी पळवून का नेलीस?' असं विचारण्यात आलं. *त्यावर तो माणूस अत्यंत शांतपणे म्हणाला, "ती बाई कोण आहे, हे तुम्हांला माहिती आहे का?" त्यावर गावकरी म्हणाले, 'कोण आहे ती ? आमच्या गावची मुलगी आहे!' तो म्हणाला, "बरोबर आहे, पण ती माझी बायको आहे. आमचं लग्नं होऊन दोन वर्षं झाली आहेत". आता आश्चर्यचकित होण्याची वेळ गावकऱ्यांवर आली होती. ते म्हणाले, 'अरे भल्या गृहस्था, मग ती चांगली वटसावित्रीची पूजा करत होती; 'जन्मोजन्मी सात जन्मी हाच पती पाहिजे' असं म्हणत होती; मग तुला तिला पळवून नेण्याची काय गरज होती? तिची पूजा झाल्यानंतर तू तिला घेऊन जाऊ शकला असतास, तो म्हणाला, "अहो, लग्र होऊन दोन वर्ष झाली. ही बाई सात दिवसदेखील नांदली नाही. आता ही म्हणतीये की, 'सात जन्मी हाच पती पाहिजे. मी दोन वर्ष असाच राहिलो. आता सात जन्मपण असाच राहू का?"*_
_आता ज्या बाईला माहेरीच राहावंसं वाटत होतं; सासरी संसार करावासा वाटत नव्हता, ती विनाकारण कशाकरता ते वटसावित्रीचं वट करत होती? लक्षात घ्या, या सगळ्या प्रकारात एक प्रकारची सक्ती निर्माण होते. *वटसावित्रीचं व्रत करणाऱ्या दीड हजार सुशिक्षित बायकांचं ज्या वेळेला आम्ही सर्वेक्षण केलं, त्या वेळेला त्यांच्यातल्या ७० टक्के बायका हे व्रत करणाऱ्या होत्या. आम्ही त्यांना विचारलं, 'तुम्ही हे व्रत का करता? याच्यावर तुमचा विश्वास आहे का?' त्या म्हणाल्या, 'नाही, आमचा काही तसा विश्वास नाही'. आम्ही म्हणालो, 'मग का करता?' त्या म्हणाल्या, 'पण समजा, जर आम्ही एखाद्या वर्षी व्रत केलं नाही आणि नेमक्या त्याच वर्षी यांना काही गंभीर आजार झाला, तर घरचे लोक म्हणतील, 'केलं असतं व्रत, तर काही बिघडलं असतं का?' त्याच्यामुळे व्रत केलेलं बरं, म्हणून आम्ही व्रत करतो'. रूढीपरंपरांची ही गुलामी किती खोलवर आपल्या मनामध्ये रुजलेली असते, हे कळण्यासाठी म्हणून मी आपल्याला हा सगळा तपशील सांगितला.*_
_*लक्षात घ्या, याचबरोबर या सगळ्यातून स्वतःचीच फसवणूक करण्याची एक प्रवृत्ती निर्माण होते. म्हणजे मी मागच्या वर्षी एका ठिकाणी गेलो होतो. ज्या घरी होतो, त्या ठिकाणची सुशिक्षित बाई वडाची व्यवस्थित पूजा करून आलेली होती. तिला तो सगळा प्रकार फारसा आवडलेला नसल्याचं मला कळत होतं, पण घरच्या दबावामुळे तिच्यापुढे काही पर्याय नव्हता. म्हणून मी थोडं गमतीने तिला म्हणालो, "काय वहिनी, वडाची पूजा केलीत की नाही? सात फेऱ्या घातल्यात की नाही? 'जन्मोजन्मी सात जन्मी हाच पती मिळावा', असं म्हणालात की नाही?" मी कुठल्या अर्थाने हे म्हणत होतो, ते त्या बाईला कळत होतं. ती म्हणाली, "होऽ वडाची यथास्तित पूजा केली; हळदकुंकू वाहिलं ; वडाला सात फेऱ्या घातल्या; त्याला सूत गुंडाळलं आणि म्हणाले, 'जन्मोजन्मी सात जन्मी हाच पती मिळावा, पण हा त्याचा सातवा जन्म असावा' ".*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :-३१/०३/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - लेखक डॉ नरेंद्र दाभोळकर*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment