🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_धर्माचे सद्गुण_*
*_डॉ. के. श्री. धम्मानंद_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/02/blog-post_91.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*सामान्यपणे भगवान बुद्धांच्या उपदेशांना धम्म (धर्म) असे म्हणतात.* धम्म काही दंतकथा, पुराणकथा, प्रकटन, अटकळ किंवा धार्मिक वळण नव्हे, 'धम्म', जगात सदा सर्वदा विद्यमान असणारे 'सत्य' असून ते एका संबोधिप्राप्त आचार्यांनी शोधले. *भगवान बुद्ध हे त्या धम्माचे एकमेव शोधकर्ता असल्याने 'धम्माला, 'बौद्ध धर्म' असे नाव पडले.* सिद्धार्थ गौतमांनी स्वतः त्याचा साक्षात्कार केला आणि ते जगासाठी उघड केले. त्यांनी शोधलेल्या धम्माला योग्यप्रकारे समजणे साधारण लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. कारण साधारण जनांचे मन भ्रमाच्या ढगांनी सदा झाकोळलेले असते._
_धम्माचे अनेक सद्गुण आहेत ते त्याला 'लोकोत्तर' किंवा 'उदात्त' आणि परिपूर्ण बनवितात. तरी त्यांच्या तीन पैलूंची नोंद घ्यावी लागते._
_*प्रथम पैलू* धर्माचे सिद्धांत त्याच्या मूळ शुद्धतेत शिकावे लागतात._
_*दुसरा पैलू* भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे - सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा, सचित्त परियोदपणं अर्थात कोणतेही पापकर्म न करणे, कुशल कर्म करणे आणि चित्त शुद्धी करणे ह्या उपदेशाला प्रायोगिक अंग बनवून त्याप्रमाणे जीवन जगणे._
_*तिसरा पैलू* सर्व घटनांचे परिपूर्ण सत्य जाणण्यासाठी प्रज्ञेचा विकास करणे._
_धम्माच्या अनेक गुणांपैकी सहा वैशिष्ट्यांचा उल्लेख अधिकृत ग्रंथांत आढळतो बौद्धांच्या दैनंदिन पूजेत ह्या गुणांचे उच्चारण केले जाते. पाली भाषेत प्रकाशित झालेले हे सहा गुण असे आहेत- १) स्वाक्खातो भगवता धम्मो (२) सन्दीट्ठिको (३) अकालिको (४) एहिपस्सिको (५) ओपनायिको (६) पच्चतं वेदितब्बो विञ्ञुहि. उपरोक्त सहा वैशिष्टये विस्तृतपणे खाली दिली आहेत._
_*(१) स्वाक्खातो भगवता धम्मो-*_
_भगवान बुद्धांनी हा धम्म शोधला आणि जनहितार्थ तो प्रकट केला. (सर्वांना तो सहज समजावा म्हणून) उत्तम रितीने सांगितला. सिद्धांत, व्यवहारात उपयोगात (प्रात्यक्षिक) आणि उपलब्धी (थिअरी, प्रॅक्टिस, रिअलाइझेशन) ह्यांना एकत्र गुंफणारे समान मूल्य 'स्वाक्खातो' होय असे म्हटले जाते. लोकोत्तर विशुद्धींकडे, निब्बाणाकडे नेणारा अष्टांगिक मार्ग उत्तम रितीने सांगितला आहे. हेच बौद्ध धम्माचे 'सार' होय._
_शास्त्यांनी (भगवान बुद्धांनी) 'धम्म' उत्तम रितीने प्रतिपादिला आहे. हा धम्म सुरूवातीला उत्कृष्ट, मध्यमवाणी उत्कृष्ट आणि शेवटी सुद्धा उत्कृष्ट आहे. कल्याणकारी आहे. त्यात परस्पर विरोध, संदिग्धता नसून तो सरळ व सुस्पष्ट असा आहे. समुद्रातील पाण्याच्या प्रत्येक थेंबाला जशी एकच चव असते, मीठाची चव असते तद्वतच धम्माला कोणत्याही काळात निब्बाणाची, परमसुखाची चव असते. धम्माची सुरूवात शीलापासून होते. शील धम्माची आधारशिला आहे. त्यावर 'मनाची शांतता' रूपी इमारत उभी केली जाते. ह्यालाच समाधि म्हणतात. समाधी परिपक्व झाल्यावर प्रज्ञेचा उगम होतो._
_धम्माचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षकांकडून ऐकून, जटिल भगाची त्यांचेकडून उकल करून घेऊन प्रात्यक्षिक करण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर समजून घ्यावा. त्यानंतर निरंतर सरावाने मनातील अडथडे (निवरणे) दूर होऊन, मन शांत, स्पष्ट आणि प्रसन्न बनते. अशी अवस्था 'अंतदृष्टी' (विपस्सना) साठी आवश्यक असते. ह्या अंतदृष्टीचा सातत्याने विकास करीत गेल्यास ह्याच जन्मी सर्वोच्च अवस्था गाठण्याची संधी मिळू शकते. जग आणि जिवित मात्र ह्यांचे विषयी बुद्धांचे स्पष्टीकरण अंतिम मानले जाते. तत्कालीन परंपरा, मान्यता, ग्रंथप्रामाण्य झुगारून बुद्धांनी आपले सिद्धांत, धम्माच्या खोल अंतरंगात शिरून अनुभवाच्या आधारावर प्रतिपादित केले, *'केवळ मी ह्यांचा शोधकर्ता हा अभिमान न धरता त्यांनी धम्म प्रकट केला धम्मोपदेश केला आणि त्यांच्या उपदेशांनी इतर सर्व उपदेशांना मागे टाकले.*_
_कोणत्याही तथाकथित सर्वोच्च शक्तीच्या पायावर निष्ठा अर्पण न करता बुद्धांनी प्रत्येक व्यक्तीला विचार, चिंतन स्वातंत्र्य देऊन स्वतःचा मोक्ष स्वतःच गाठण्यासाठी प्रोत्साहित केले. जगाच्या कोणत्याही भागात, कोणत्याही काळी 'धम्म' सार्वजनित आहे आणि मानवजातीच्या आत्यंतिक हिताचा आहे._
_धम्मोपदेश करण्यापूर्वी तात्वीक व्याख्या, त्यातील शब्दांचे अर्थ वैज्ञानिक पद्धतीने स्वतः तयार केले. उदा. कर्म ह्याचा प्रचलित अर्थ 'कृति' असा होता, त्याला बुद्धांनी 'कृती' करण्यामागील प्रेरणा असा केला. जातीव्यवस्था, गुलामगिरी, स्त्रियांचा हिन दर्जा हयाला धम्माने सातत्याने विरोध केला. बुद्ध हे 'हुकमशहा' नव्हते तर ते आध्यात्मिक लोकशाहीचे शिक्षक होते._
भगवान बुद्धांचा अनुयायी त्रिरत्नानचे अनुसरण करून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून उत्तम रितीने प्रतिपादिलेल्या (स्वाक्खातो) धम्माच्या मार्गदर्शनाखाली, सुरक्षित राहून निर्वाणाच्या परमसुखाचा आनंद उपभोगतो._
_*२) सन्दिट्ठिको -*_
_*'धम्म' व्यवस्थित समजून त्यानुसार गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे 'भावित' केला तर त्याची उपकारक फळे 'याचि देही' याचि डोळा' येथे आणि आता उपभोगता येतात असा 'सन्दिट्ठिको' ह्या शब्दाचा अर्थ आहे.* उदाहरणार्थ 'चंड' स्वभावाची व्यक्ती जी स्वतःकरिता आणि समाजाकरिता अभिशाप असते. त्याने जर बुद्धांची आणि धम्माची कास धरली (धम्माचे अनुसरण) तर ती एका नवीन जीवनाची सुरूवात करेल. त्याला संत्रस्त करणारे क्लेष नाहीसे होऊन ती चांगली व्यक्ती बनेल. सम्राट अशोकाचे जीवन पाहिल्यास बौद्ध धम्माचे अनुसरण करण्यापूर्वी त्याला 'चंड अशोक' असे नाव होते. मात्र धम्माच्या अनुसरणाने चंड अशोकाचे रूपांतर होऊन 'धम्म अशोक' म्हणून त्याची ख्याति झाली._
_*३) अकालिको -*_
_धम्माच्या प्रकटनापासून दिर्घ कालावधी लोटला तरी धम्म पूर्वीइतकाच ताजातवाना, टवटवीत आव्हानापलीकडे राहिला आहे. धम्माचे उपयुक्त परिणाम लगेच पाहावयास मिळतात. अत्याधुनिक वैज्ञानिक प्रगतिनंतरही धम्माचा प्रभाव तेवढाच (पूर्वी इतकाच) जाणवतो 'सत्य' जुने होत नाही. संसारातील जीवनाच्या अस्तित्वाचे सत्य धम्म प्रकट करतो त्यामुळे धम्म 'जुना' होऊ शकत नाही. जग हे अनित्य आहे, असमाधानकारक आहे आणि त्याचे कारण आहे 'तृष्णा' ह्या असमाधानाचे, दुक्खाचे कारण तृष्णा जोवर समूळ नष्ट केली जात नाही तोवर दु:क्ख, असमाधान राहील, आर्य अष्टांगिक मार्गाचे आचरण करून तृष्णा नष्ट करता येते._
_*४. एहिपस्सिको -*_
_*ह्याचा अर्थ कोणालाही धम्माचे निरिक्षण, परिक्षण करण्याचे, कसोटीवर घासून पाहण्याचे स्वातंत्र्य आहे.* ज्यांना हा धम्म स्वीकारायचा आहे त्यांना देखील असे स्वातंत्र्य आहे. कारण धम्मात गुढ, रहस्यमय, लपविण्यासारखे काही नाही. धम्म शुद्ध आणि पारदर्शक आहे. शुद्ध सोन्याप्रमाणे आहे. बुद्ध स्वतः सांगतात-_
_*"माझ्याप्रति असलेल्या आदरामुळे मी सांगतो म्हणून स्वीकारू नका. सोणार ज्याप्रमाणे सोने तापवून खात्री करतो त्याप्रमाणे धम्माला कसोटीवर घासून पाहा आणि नंतरच स्वीकार करा." धम्माचे 'परिक्षण करा' हे बुद्धांचे निर्भिड वक्तव्य बुद्धांचे आणि धम्माचे अचल श्रेष्ठत्व दर्शविते.*_
_*५. ओपनेयिको-*_
_धम्म मार्गावर आरूढ झालेले गंभीर आणि प्रामाणिक साधक पुढे- पुढे जात राहतील. अर्थात धम्म त्यांना पुढे-पुढे नेत राहील. शुद्धीकरणाच्या आणि फलप्राप्तीच्या चार अवस्था धम्मात सांगितल्या आहेत. धम्ममार्गावर चालणाऱ्या साधकाला धम्मच एका अवस्थेतून परिपक्व झाल्यावर दुसऱ्या उच्च अवस्थेकडे नेत असतो. मुक्त अवस्था गाठेपर्यंत हा प्रवास सुरू असतो._
_*६. पच्चतं वेदितब्बो विञ्ञुहि-*_
_विद्वान साधकांनी प्रत्यक्ष (स्वतः) वेदित (अनुभवून) करून खात्री केली आहे असा वरील वाक्याचा अर्थ आहे. दुसऱ्याकरिता धम्माचा अनुभव घेता येत नाही. *तहानलेल्या माणसाची तहान स्वतः पाणी प्यायल्याशिवाय भागत नाही त्याप्रमाणे धम्माचा अनुभव स्वतः घ्यावा लागतो. संबोधिप्राप्ती वैयक्ति असते आणि प्रज्ञावंत, विद्वानच धम्माचा अनुभव घेवू शकतात.*_
_*बुद्ध हे मोक्षदाता नसून मार्गदाता आहे. शिक्षक, आचार्य आहे. इतरांना दिशा दाखविणारे आहे. शील, सम्यक जीवन आणि सम्यक समाधीचा अभ्यास (सराव) साधकाने करून प्रज्ञा जागृत करायची असते आणि स्वप्रयत्नाने आपली मुक्ती साधायची असते.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- २३/०२/२०२४_*
*_संदर्भ :-_*
*_१) विजित संग्राम, मासिक जानेवारी २०१४ अंक ६६, वर्ष सहावे_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment