_*प्रश्न २४ -* अलीकडच्या काळात एक फार पॉप्युलर विधान कानावर येतं. ते विधान करणाऱ्यांमध्ये तुम्ही आत्ता ज्या सावरकरांचा उल्लेख केलाय, त्यांचे अनुयायीही मोठ्या प्रमाणात आहेत आणि ज्या लोकांनी व्यक्तिगत जीवनात अंधश्रद्धेची जोपासना केलेली नाही, असेही लोक आहेत. ते विधान असे आहे की, *'जिथे विज्ञान संपतं किंवा विज्ञानाचा प्रांत संपतो, तिथून पुढे अध्यात्माचा प्रांत सुरू होतो.'* याबद्दल थोडं सांगता ?_
_*उत्तर -* काय आहे की, तुम्ही अध्यात्माची व्याख्या केलेली नाही, तिच्यात मी आता जात नाही. पण *'अध्यात्म' या शब्दाचा अर्थ आहे, 'अधि आत्मन् इति अध्यात्मः' आधी आत्म्याचा विचार करणं म्हणजे अध्यात्माचा विचार. आत्मा नसतोच. त्यामुळे खरं म्हटलं, तर अध्यात्म नावाच्या गोष्टीची मी चर्चा करण्याची गरज नाही.* परंतु मला आणि कार्यकर्त्यांना हा प्रश्न विचारला जातो आणि उत्तर द्यावं लागतं म्हणून सांगतो. मी जर असं म्हटलं की, जिथं पुण्याची हद्द संपते तिथं मुंबईची हद्द सुरू होते, तर उलटं वाक्य असंही म्हणता येतं की, जिथं मुंबईची हद्द संपते तिथं पुण्याची हद्द सुरू होते. मगाशी *आपण कोपर्निकसपासूनचा म्हणजे सहाशे वर्षांपूर्वीपासूनचा विज्ञानाचा प्रवास बघितला. त्यापूर्वी विज्ञान नव्हतं. त्याच्याआधी फक्त अध्यात्मच होतं आणि पाच-दहा हजार वर्षं असलेल्या त्या अध्यात्माने माणसाच्या आरोग्याचा प्रश्न मिटवला नाही, माणसाच्या भुकेचा प्रश्न सोडवला नाही, माणसांना एकमेकांना भेटण्याचा प्रश्न घालवला नाही... त्या अध्यात्माला चार-साडेचार हजार वर्ष फार काही करता आलं नाही. म्हणून मग विज्ञान आलं आणि त्याने चारशे-साडेचारशे वर्षांमध्ये हे सगळं केलं. म्हणजे वस्तुस्थिती बरोबर उलटी आहे, जिथं अध्यात्म संपतं तिथं विज्ञान सुरू होतं.*_
_यासंदर्भात अगदी सूत्ररूपाने एका मिनिटामध्ये सांगतो. *वास्तविक, 'विज्ञान' हा बुद्धीचा व्यायाम आहे आणि 'अध्यात्म' हा नैतिकतेचा व्यायाम आहे. त्यामुळे माणसाला नीतिमान करणारी धारणा म्हणून अध्यात्माबद्दल तुमचं काय मत आहे ? असं जर कोणी विचारणार असेल, तर मला काही म्हणायचं नाही. पण असं नसतं, ही खरी अडचण आहे.*_
_*दोन बाबा होते- एक सत्यसाईबाबा, दुसरे गाडगेबाबा. एकाचं उत्पन्न होतं, चाळीस हजार कोटी रुपये. अंगठे बहाद्दर असलेल्या गाडगेबाबांनी पै न् पैचा हिशोब चोख ठेवला आणि आयुष्यभर कोट्यवधी रुपये जमवून खर्च केले. पण शेवटपर्यंत त्यांची मालमत्ता होती, डोक्यावरचा भीक मागायचा खापराचा तुकडा, हातामधला दांडा आणि अंगावरच्या चिंध्या! मग जास्त आध्यात्मिक कोण होतं? सत्यसाईबाबा की गाडगेबाबा ?*_
_म्हणजे लौकिक सुखाच्या पलीकडे जीवनाचं एक श्रेयस आहे आणि लौकिक सुखापेक्षा ते अनंत पटीनं मोलाचं आहे, असं ज्याला जाणवतं आणि आचरणात आणता येतं, ते अध्यात्म श्रेष्ठ आहे, हे लक्षात ठेवा. त्याप्रमाणे *जी माणसं संयमी, संतोषी, सदाचारी, साधी, अपरिग्रही असतात, करुणेनं मानवसन्मुख कृती करतात आणि ज्यांच्या जीवनात शुचिता व चारित्र्य असतं, अशा लोकांना आध्यात्मिक म्हणायचं असेल, तर त्याला माझा विरोध नाही. परंतु ज्या अध्यात्माची भलावण केली जाते, ते या स्वरूपाचं अध्यात्म नाही. त्याने माणसाचे कुठलेच प्रश्न सोडवलेले नाहीत, हे वास्तव आहे. म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाला जन्म घ्यावा लागला.*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- २२/०१/२०२४_*
*_संदर्भ :-_*
*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_21.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment