Wednesday, 17 January 2024

बाबाबुवांची खरी रूप तुम्ही उघडी पाडताहात

_*प्रश्न २० -* तुम्ही ही समता - संगराची लढाई अंनिसच्या कार्यकर्त्यांसह जवळपास पंचवीस वर्ष लढवत आहात. परंतु बाहेर चित्र बऱ्याच वेळा असं दिसतं- त्याच्यावर एकमत होईलच असं नाही, पण फार मोठ्या समूहाला असं वाटत- की *एका बाजूला तुमच्या चळवळी वा आंदोलनं चालू आहेत, बाबाबुवांची खरी रूप तुम्ही उघडी पाडताहात. पण दुसऱ्या बाजूला बुवा-बाबांची संख्या वाढतीय, धर्मस्थळांची संख्या वाढतीये, त्यांच्यासमोर मोठ्या मोठ्या रांगा लागतायत. तर ही विसंगती कशी किंवा हा काय प्रकार आहे?*_

_*उत्तर -* मी मगाशीच आपल्याला सांगितलं की, *अंनिसच्या चळवळीचा चौथा महत्त्वाचा घटक आहे - व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणं.* तुम्ही पहिली साधी गोष्ट लक्षात घ्या की, *अंनिसची चळवळ कशीबशी पंचवीस वर्षांची आहे आणि बाबाबुवांना आधार देणारी व्यवस्था पाच हजार वर्षांची आहे! इतक्या वर्षांमध्ये लोकांच्या डोक्यात जे घट्ट खिळे ठोकलेले आहेत, ते पंचवीस वर्षांमध्ये आम्ही काढू शकू आणि तेही सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीमध्ये काढू शकू का? नाही!*_

            _मग आम्ही काय करू इच्छितो? *आम्ही व्यक्ती आणि व्यवस्था या दोहोंमध्ये परिवर्तन करू इच्छितो. व्यवस्था-परिवर्तनाच्या लढाईला 'राजकारण' म्हणतात. त्या राजकारणामध्ये आज अंनिस नाही, पण मी धाडसानं असं म्हणेन की, आम्ही त्या राजकारणाच्या मुळाशी जातोय. म्हणजे आम्ही अधिक चांगल्या अर्थानं राजकारण करतोय.*_

            _लोकशाहीमध्ये राजकारण कशाच्या आधारे होतं? तर प्रत्येक माणसाच्या मताच्या अधिकारानं. *डॉ. आंबेडकर असं म्हणाले होते की, "One man, one vote, one value.' प्रत्येक माणसाला एक मत आहे, कारण त्याला एक मूल्य आहे.* आज माणसं जी मतं देतात, ती व्यक्तिगत जीवनमूल्याच्या आधारे देतात का पैशाच्या, जातीच्या, सत्तेच्या, गुंडगिरीच्या आधारे देतात ? म्हणजे अनेक माणसांचा विवेक आज गहाण पडलेला आहे. म्हणजे *व्यवस्था-परिवर्तनसाठी, लोकशाही यशस्वी होण्यासाठी, व्यापक परिवर्तन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा लढा यशस्वी होण्यासाठी आम्हाला व्यक्तिपरिवर्तन करायला पाहिजे. व्यक्तिपरिवर्तनाचा मार्ग डॉ. आंबेडकरांनी सांगितला आहे, 'गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल.'*_

         _आज नेमकी उलटी चाल चालू आहे, 'गुलामाला गुलामीची जाणीव अजिबात करून देऊ नका.' *जवळजवळ सगळ्या गावांमध्ये महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा लोकोपयोगी कार्यक्रम काय? तर लोकांना स्वतःच्या खर्चानं विविध धर्मस्थळांना भेटी द्यायला पाठवणं. म्हणजे 'लोक हो, तुम्ही विचारू नका की वाॅर्डातील रस्त्याचं काय झालं आणि वॉर्डच्या पाण्याचं काय झालं? तुम्हाला अष्टविनायकाची यात्रा घडवून आणतो.'*_

               _एक फार चांगलं वाक्य आहे- *'विचार जेव्हा जनसमुदायाची पकड घेतात, त्या वेळी ते भौतिक शक्ती बनतात.'* भौतिक शक्ती फक्त विजेच्या ४४० व्होल्टमध्ये नसते. *आज चुकीच्या विचारांनी लोकांच्या मनाची पकड घेतलीये, म्हणून बुवाबाबा वाढतात. उद्या जर विवेकी विचारांनी लोकांच्या मनाची पकड घेतली, तर कदाचित ज्यांना पाच हजार वर्षं मिळाली, त्यांच्याविरुद्धची लढाई आम्ही पाचशे वर्षांत जिंकू शकू.*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-  १८/०१/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_17.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

भिक्खु, भदंत आणि उरगेन

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_भिक्खु, भदंत आणि उरगेन_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_22.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_भि...