🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_महाड सत्याग्रह परिषद_*
*_(स्त्रीवर्गास व्याख्यान)_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_(दुपारी ठरल्याप्रमाणे सर्व स्त्रिया भाडभीड सोडून सभामंडपांत येऊन बसल्या होत्या. त्यांच्यासाठी बसण्याकरिता मध्येंच जागा राखून ठेवण्यांत आली होती: त्यांना उद्देशून डॉ.आंबेडकर म्हणाले,)_
_आपण या सभेत आल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे. *घरप्रपंचाच्या अडचणी ज्या प्रमाणें स्त्री व पुरुष मिळून सोडवितात त्याप्रमाणे समाजाच्या संसारातील अडचणी स्त्रीपुरुषांनी मिळून सोडवावयास पाहिजे आहेत. पुरुषांनींच हें काम अंगावर घेतले तर तें पार पाडण्यास त्यांना पुष्कळ अवधी लागेल याबद्दल शंका नाहीं. तेंच काम स्त्रियांनी जर अंगावर घेतलें तर त्या त्या कामांत लवकर यशप्राप्ती करून घेतील असें माझे मत आहे.* परंतु त्यांना एकटयाने जरी हैं काम अंगावरती आले नाही तरी जो पुरुषवर्ग है काम करीत आहे त्याच्याशी सहकार्य केल्याशिवाय राहू नये._
_यासाठी तुम्ही यापुढे नेहमी परिषदेस हजर राहिले पाहिजे असे माझे तुम्हास सांगणे आहे. *खरें म्हटले असता, अस्पृश्यतानिवारणाचा प्रश्न पुरुषांचा नसून तुम्ही स्त्रियांचाच आहे.*_
_*तुम्ही आम्हा पुरुषांना जन्म दिलेला आहे. आम्हाला इतर लोक कसे जनावरांपेक्षांहि कमी लेखतात, हे तुम्हांस ठाऊक आहे. काही ठिकाणी आमची सावलीसुद्धा घेत नाहीत. इतर लोकांस कोर्टकचेर्यांमध्ये माना सन्मानाच्या जागा मिळतात. परंतु तुमच्या पोटी जन्मलेल्या आम्हां मुलांना पोलिस खात्यांतील शिपुडर्याचीहि नोकरी मिळत नाही. इतका आमचा हीन दर्जा आहे. हे सर्व तुम्हास ठाऊक असतांना तुम्ही आम्हांस जन्मास का घातले असा प्रश्न तुम्हास कोणी केला तर त्याचे उत्तर तुम्हीं काय देऊ शकाल ?*_
_*या सभेंत बसलेल्या कायस्थ व इतर स्पृश्य बायांच्या पोटी जन्मलेल्या मुलांत व तुमच्या पोटी जन्मलेल्या आम्हा मुलांत काय अंतर आहे? तुम्ही विचार करावयास पाहिजे की ब्राह्मणांच्या स्त्रियांत जेवढे शील आहे तेवढे शील तुमच्यांतही आहे. ब्राह्मण स्त्रियांत जितके पातिव्रत्य आहे तितकें पातिव्रत्य तुमच्यांतहि आहे. आणि तुमच्यात जितके मनोधैर्य, करारीपणा व धमक आहे, तितकी ब्राह्मण स्त्रियांत देखील नाहीं. असें असतांना ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्मलेले बालक कां सर्वमान्य व्हावे व तुमच्या पोटी जन्मलेले बालक सर्व ठिकाणी का अवमानिलें जावें, त्याला साध्या माणूसकीचा हक्क का असू नये, याचा कधी तुम्हीं विचार केला आहे काय?*_
_मला वाटतें तुम्ही त्याचा मुळींच विचार केला नाहीं. तुम्ही जर विचार केला असता तर पुरुषांच्या आधी तुम्ही स्त्रियांनी सत्याग्रह केला असता. कारण तुमच्या पोटी जन्म घेतला येवढेच पातक आमच्या हातून घडलें आहे. व त्याच पातकामुळे, आम्हास ही अस्पृश्यतेची शिक्षा भोगावी लागत आहे. तेव्हा तुम्ही विचार करावयास पाहिजे की, तुमच्या पोटी जन्म घेण हें पान का ठरले जावें, व इतर स्त्रियांच्या पोटी जन्म घेणे पुण्यप्रद का व्हावे. या प्रश्नाचा जर तुम्ही विचार केला, *तर तुम्हांस एक तर प्रजा उत्पत्ति करणें बंद करावें लागेल किंवा तुमच्यामुळे त्यांना लागत असलेला कलंक तरी तुम्हांस धुवून टाकावा लागेल. या दोहोंपैकी कोणती तरी एक गोष्ट तुम्ही करावयास लागले पाहिजे.*_
*_तुम्ही प्रतिज्ञा करा की, अशा कलंकित स्थितीत आम्ही यापुढे जगणार नाहीं. समाजोन्नति करण्याचा जसा पुरुषांनी निश्चय केला आहे तसा तुम्हीही करा._*
_*दुसरी गोष्ट आपणास जी सांगावयाची आहे ती ही की, तुम्ही सर्वांनी जुन्या व गलिच्छ चालीरीति सोडून दिल्या पाहिजेत. खरें म्हटलें असतां अस्पृश्य माणसांस तो अस्पृश्य आहे अशी ओळख पटविणारा शिक्का त्याच्या कपाळावर मारलेला नाहीं. परंतु अस्पृश्य लोकांच्या ज्या काही चालीरीति आहेत त्या चालीरीतींवरून लोक अमूक एक माणूस अस्पृश्य जातींपैकीं आहे असें चटकन ओळखतात. ह्या चालीरीति एकेकाळी आपल्यावर सक्तीनें लादण्यांत आल्या होत्या असें माझें मत आहे. परंतु इंग्रज सरकारच्या राज्यांत तशा प्रकारची सक्ती होऊं शकत नाहीं. म्हणून ज्या गोष्टींमुळे लोक आपण अस्पृश्य आहोंत असें ओळखतात त्या साऱ्या गोष्टी आतां तुम्ही बंद केल्या पाहिजेत. तुमची लुगडी नेसण्याची पद्धत ही तुमच्या अस्पृश्यतेची साक्ष आहे. ती साक्ष तुम्हीं बुजवली पाहिजे. वरिष्ट वर्गांच्या बाया ज्या पद्धतीने लुगडी नेसतात त्या पद्धतीने तुम्ही लुगडी नेसण्याचा प्रभाव पाडला पाहिजे. तसे करण्यात तुमचे काही खर्चत नाही. त्याचप्रमाणे गळ्यामध्ये भाराभर गळसर्या हातात कोपरभर कथलाचे किंवा चांदिचे गोठ पाटल्या ही देखील तुम्हास ओळखण्याची खूण आहे. एका गळसरीपेक्षां अधिकांची जरूरी नाही. त्याने नवऱ्यांचे आयुष्य वाढते किंवा आपल्या शरीराला शोभा येते अशातला काही भाग नाही. दागिन्यांपेक्षा कपड्यालाच जास्त शोभा आहे. तेव्हा कथलाच्या किंवा चांदीच्या दागिन्यांत पैसे खर्च करण्याऐवजी चांगल्या कपड्यात पैसे खर्च करा. दागिना घालावयाचाच झाला तर तो सोन्याचा करून घालावा. नाहीतर घालू नये. त्याचप्रमाणे स्वच्छतेने वागण्याची खबरदारी घ्या. तुम्ही घरच्या गृहलक्ष्मी आहात, घरांत कोणतीही अमंगल गोष्ट होऊ न देणे याबद्दल तुम्ही काळजी वाहिली पाहिजे. गेल्या मार्च महिन्यापासून सर्व लोकांनी मेलेल्या जनावराचे मांस खाणे बंद केले आहे ही गोष्ट आनंदाची आहे. परंतु एखाद्या घरी तसे झाले नसल्यास ते घडवून जगण्याची जबाबदारी तुम्ही आपल्या अंगावर घेतली पाहिजे. जो नवरा मेलेल्या जनावराचे मांस घरात आणील त्यांस तुम्ही स्पष्ट सांगा की, असला प्रकार माझ्या घरी चालणार नाही. आणि माझी खात्री आहे की, ही गोष्ट जर तुम्ही मनावर घ्याल तर हा अमंगल प्रकार अजिबाद बंद होणार आहे.*_
_*तसेच तुम्ही आपल्या मुलींनाही शिक्षण दिले पाहिजे. ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही पुरुषांसाठीच नाहीत. त्या स्त्रियांनाही आवश्यक आहेत. ही गोष्ट आपल्या पूर्वजांनीहि ओळखिली होती. नाहीतर जे जे लोक पलटणीत राहिले त्या त्या लोकानी आपल्या मुलींना जें शिक्षण दिले ते दिले नसते. खाण तशी माती, ही गोष्ट ध्यानांत ठेवून, आपली पुढील पिढी जर तुम्हांस सुधारावयाची असेल तर तुम्ही मुलीना शिक्षण दिल्याशिवाय राहू नका.*_
_*हा जो उपदेश मी तुम्हाला केला आहे तो तुम्ही वार्यावर सोडणार नाही अशी मला आशा आहे. तो अंमलात आणण्यास दिरंगाई करता कामा नये. म्हणून तुम्ही सकाळी आपल्या घरी जाण्यापूर्वी तुमच्या नेसण्याच्या पद्धतीत बदल करून मला दाखवा आणि मग जा. तरच मी सांगितल्याचे चीज झाले असें मी समजेन.*_
_नंतर *जमलेल्या स्त्रियांतर्फे श्रीमती विठाबाई इनें* सांगितल्याप्रमाणे आम्ही वागू असे आश्वासन दिले._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- २५/०७/२०२३_*
*_संदर्भ :- बहिष्कृत भारत_*
*_०३/०२/१९२८_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2023/07/blog-post_25.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment