🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_वाणी कल्याणी_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
_*जशी महाराणी खेमा, तसाच राजकुमार अभय तिस्स !* महाराज बिम्बिसारांची लाख इच्छा असूनही तो दीर्घ कालपर्यंत भगवान बुद्धांच्या संपर्कात येण्यास तयार झाला नाही. *खेमाप्रमाणे त्याच्या मनात बुद्धाविषयी विरोधी भावना नव्हती. परंतु त्याला त्याच्या पूर्वाचार्याविषयी इतकी प्रगाढ श्रद्धा होती की, त्यांच्या संमतीशिवाय तो भगवान बुद्धांच्या दर्शनालाही येऊ शकत नव्हता.* परंतु योगायोग असा आला की स्वतः पूर्वाचार्यानीच अभयला बुद्धांजवळ पाठविले. पण त्यामागील उद्दिष्ट मात्र वेगळे होते._
_*त्या काळांत देवदत्ताने भगवान बुद्धांबाबत काही धर्मविरोधी कृत्ये केली. भिक्षुसंघात फूट पाडण्याचा असफल प्रयत्न केला.* राजकुमार अजातशत्रूशी संगनमत करून त्यांची हत्या करण्याचेही असफल प्रयत्न केले. *अनेक वेळा समजावूनही त्याने आपली दुष्ट प्रवृत्ती सोडली नाही. तेव्हा भगवानांनी देवदत्ताच्या विषयी काही कठोर शब्दांचा प्रयोग केला.*_
_तोपर्यंत भगवान बुद्धांची ख्याती देशप्रदेशात फार पसरली होती. अनेक मत-मतांतरे असणारे लोक त्यांनी सांगितलेल्या चित्तशुद्धीच्या मार्गाचा अवलंब करू लागले होते. संप्रदायवाद्यांना ही स्थिती असह्यच होती. भगवानांची प्रतिष्ठा कलंकित करणे त्यांच्यासाठी अत्यावश्यक बाब होती. देवदत्ताविषयी केलेल्या कठोर शब्दप्रयोगाचा भगवान बुद्धांच्या चारित्र्यहननासाठी उपयोग करण्याचा एक उपाय त्यांना सुचला. अभय राजकुमाराच्या पूर्वाचार्यांनीही त्याचा लाभ घेण्याचे ठरविले._
_त्याने अभय राजकुमाराला समजाविले की ही एक फार चांगली संधी आहे. तुझी सर्वत्र चांगली प्रसिद्धी होईल. तू श्रमण गौतमासारख्या प्रतिष्ठा लाभलेल्या व्यक्तीशी वादविवाद करून त्याला अगदी सहजतेने पराभूत करू शकशील. तू त्याच्याजवळ जा. आणि त्याला हा प्रश्न विचार 'आपण कधी एखाद्या व्यक्तीला असे कठोर शब्द बोलू शकता कां की ज्यामुळे त्या व्यक्तीच्या मनाला पीडा होतील ?” आणि त्याने उत्तर दिले, 'होय. कधी कधी मी अशा शब्दांचा प्रयोग करतो.' तर तू त्याला सहजतेने खाली पाह्यला लावशील, विचारशील की तुमच्यात व अडाणी अज्ञानी लोकात फरक काय? कारण अडाणी व्यक्ती देखील अशा अनुचित शब्दांचा प्रयोग करत असते. आणि लोकांना दु:खी करते. अशा प्रकारे त्याच्या प्रतिष्ठेला कलंक लागून ती धुळीला मिळेल._
_परंतु जर श्रमण गौतमाने मोठ्या चलाखीने तुझ्या प्रश्नाचे असे उत्तर दि की मी कधीच अशा कठोर वाणीचा उपयोग करीत नाही की एखाद्याच्या मनाला दुःख होईल, तेव्हा तू म्हणू शकतोस की, 'आपण देवदत्ताविषयी अशा प्रकारचे कठोर शब्द वापरले आहेत आणि ते त्याच्या दुःखाला कारण बनले आहेत !' अशा प्रकारे श्रमण गौतमाचा खोटेपणा सिद्ध होईल व त्याची अप्रतिष्ठा होईल. मानहानी होईल._
_त्याने पहिले उत्तर दिले वा दुसरे उत्तर दिले तरी तुझा विजय निश्चितच आहे. कारण हा प्रश्नच असा आहे की याचे उत्तर फक्त 'होय' किवा 'नाही या व्यतिरिक्त कोणतेही होऊ शकत नाही. या प्रश्नाने त्याची अवस्था फार कठीण होईल. ज्याप्रमाणे घश्यात एकादा लोखंडी खिळा अडकावा, जो धड गिळताही येत नाही वा धड बाहेरही काढता येत नाही. 'हो' म्हटले तरी मेला 'नाही' म्हटले तरी मेला._
_*आपल्या गुरुच्या दडपणाखाली अभय राजकुमार वेणुवनाच्या कलंदक निवाप विहारात गेला.* तेथे भगवान आपल्या भिक्षुसंघासमवेत विहार करीत होते. हे रमणीय राजउद्यान त्याच्या वडिलांनी भगवान बुद्धांना त्यांच्या भिक्षुसंघासाठी दान दिले होते. इतकी वर्षे हे स्थान शुद्ध धर्माच्या तरंगांनी व्याप्त झाले होते. भरून गेले होते आता स्वतः भगवानांच्या उपस्थितीमुळे साऱ्या वातावरणाला मंगल मैत्रीच्या पवित्र तरंगांनी तरंगित केले होते. अभयवर त्या मंगल वातावरणाचा चांगलाच प्रभाव पडला. त्याने भगवानांना पंचांग प्रणाम केला व अत्यंत विनम्र भावाने हात जोडून त्यांच्याजवळ बसला. आपल्या गुरुच्या दडपणाखाली अभय वादविवाद करायला आला होता. परंतु असं दिसतं की मनापासून त्याला तसं वाटत नव्हतं. म्हणून तो वाद विवाद करू शकला नाही. त्याने पाहिलं सूर्यदेखील अस्ताला चालला आहे. हा देश आणि हा काळ - संध्यासमय - वादविवाद करायला योग्य नाही. म्हणून वादविवाद करण्याऐवजी त्याने विनम्र भावाने भगवानांना दुसऱ्या दिवशी आपल्या निवासस्थानी भोजनाचे निमंत्रण दिले. भगवानांनी मौन राहून स्वीकृती दिली. अभयने मनाशी निर्णय घेतला की, त्याच्या आचार्यानी जे प्रश्न निर्माण केले आहेत ते आपल्या घरीच त्यांना विचारावे. आदरपूर्वक प्रणाम करून तो घरी परतला._
_दुसऱ्या दिवशी भगवान अभय राजकुमाराचे घरी भिक्षेसाठी पोहोचले. राजकुमाराने त्यांना मोठ्या आदराने उच्चासनावर बसविले. श्रद्धापूर्वक आपल्या हातांनी बनविलेले भोजन वाढले आणि भगवानांचे भोजन पूर्ण झाल्यावर, भोजन पात्रापासून त्यांनी हात काढून घेतल्यावर, तो स्वतः एका आसनावर खाली बसला. त्याला आपल्या गुरुची आज्ञा आठवली. म्हणून गुरुने जसे समजावून दिले होते तसेच प्रश्न विचारले._
*_"भन्ते भगवान! आपण कधी असे कठोर शब्दयुक्त भाषण करता का की, ज्यामुळे दुसऱ्याचे मन दु:खी होईल ?"_*
_भगवानांनी स्मित हास्य करीत उत्तर दिले, “या प्रश्नांचे उत्तर होय किंवा नाही असे एक प्रकारे देता येत नाही. परंतु अनेकांगी द्यावे लागेल."_
_बिचारा अभयकुमार हतप्रभ झाला. त्याच्या गुरुने तर निश्चयपूर्वक सांगितले होते 'होय' किंवा 'नाही' याव्यतिरिक्त तिसरे उत्तर असूच शकत नाही. या दोहोंपैकी कोणतेही उत्तर दिले तर श्रमण गौतमाचा निश्चित पराजय होईल. परंतु आता तर तिसरेच उत्तर पुढे आले आहे. भगवानांकडून त्या प्रश्नांचे उत्तर अनेक प्रकारांनी दिले जाण्यापूर्वीच अभयने तर्काच्या दृष्टीने आपली हार स्वीकारली आणि आपल्या गुरुद्वारे फेकल्या गेलेल्या फाशांचे उद्घाटन केले म्हणजे प्रश्न विचारला व तो फार अधीर होऊन उत्तराची वाट पाहू लागला. भगवानांनी उत्तर देण्यापूर्वी अभयलाच एक प्रतिप्रश्न विचारला. योगायोगाने त्यावेळी त्याचे छोटे बाळ त्याच्या मांडीवर होते. त्याकडे संकेत करीत भगवानांनी विचारले, "राजकुमार! जर तुमच्या अगर दाईच्या असावधानतेमुळे या लहान मुलाच्या गळ्यात लहानसा खडा किंवा लाकडाच्या खेळण्याचा तुकडा अडकला तर तो बाहेर काढण्यासाठी तुम्ही काय कराल ?"_
_“भन्ते भगवान! असा तुकडा मुलाच्या गळ्यात अडकून त्याचे प्राणही जाऊ शकतील म्हणून त्याच्या तोंडातून तो तुकडा काढण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करीन. आवश्यक असेल तर डाव्या हाताने त्याचे डोके धरून उजव्या हाताचे बोट वाकडे करून त्याच्या कंठातून तो बाहेर काढीन. असं करतांना त्याच्या गळ्यातून थोडेसे रक्त आले तरी चालेल. थोडी पीडा झाली तरी हरकत नाही."_
_"तुम्ही असे का कराल ?_
_"कारण मुलाविषयी मला अतीव प्रेम आहे. त्याच्यावर असीम अनुकंपा आहे, दया आहे."_
*_अगदी अशीच राजकुमार, तथागतांना प्राणीमात्राविषयी असीम दयाभावना आहे. म्हणून ते अशीच वाणी बोलतात, भाषा उपयोगात आणतो जी त्यांच्यासाठी कल्याणकारी आहे._*
*_जे असत्य आहे, अहितकारी आहे व त्याचप्रमाणे ऐकणान्याला अप्रिय व अनिच्छेची आहे अशी भाषा तथागत बोलत नाहीत._*
*_जे सत्य आहे पण अहितकारी आहे तसेच ऐकणाऱ्याला अप्रिय- प्रतिकूल देखील आहे अशी वाणी तथागत बोलत नाही._*
*_जे असत्य आहे. अहितकारी आहे. ते ऐकणाऱ्याला भले प्रिय व आवडणारे असेल अशी वाणी तथागत बोलत नाही._*
_*जे सत्य आहे पण अहिताचे आहे, मग ते ऐकणाऱ्याला प्रिय व मनासारखे वाटले तरी तशी भाषा तथागत बोलत नाही.*_
*_जे सत्य आहे पण हितकारी आहे, ऐकणाऱ्याला प्रिय आहे. मनासारखे आहे अशी वाणी तथागत समयानुसार अवश्य बोलतात._*
*_जे सत्य आणि हितकर आहे, मग ऐकणाऱ्याला भले ते अप्रिय आणि अयोग्य का वाटेना अशी वाणी समयानुसार तथागत अवश्य बोलतात._*
_सम्यक् वाणीचे असे कल्याणकारी विश्लेषण ऐकूण राजकुमार अभय अवाक् झाला. प्रश्न विचारला होता या विश्वासाने की भगवान निरुत्तर होतील, ते संकोचतील, प्रश्नोत्तरांची टाळाटाळ करतील. त्यांची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी होईल. 'होय' म्हटले तरी मान खाली. 'नाही' म्हटले तरी मान खाली. परंतु झाले मात्र अगदी नेमके विपरित भगवानांनी असे धर्ममय उत्तर दिले की ते ऐकून अभय राजकुमाराचे मन सुखद आश्चर्याने तुडुंब भरून गेले. आपले वडील बिम्बिसार व इतर नातेवाईकांकडून तथागत भगवान बुद्ध यांचे गुणगान - प्रशंसा ऐकली होती. भगवानांच्या विषयी हलक्या दर्जाची टीकाही ऐकली होती. ती विरोधकांकडून. परंतु आज जे काही त्याने प्रत्यक्ष पाहिले ऐकले त्यामुळे वास्तवता अधिक स्पष्ट झाली. भगवानांच्या करुणा भरल्या प्रज्ञेने अभयच्या मनातील सारी कलुषितता निघून गेली. भगवानांच्याविषयी असीम श्रद्धा जागली. धर्माचा व्यावहारिक पक्ष स्पष्टपणे लक्षात आला._
*_नेहमी सत्य आणि कल्याणकारी वाणीच बोलली पाहिजे, मग ती कोमल असो वा कठोर मनोनुकूल असो वा प्रतिकूल असो. वाणीचा हाच धर्म आहे. जी. शुद्ध आहे. सर्वजनकल्याणकारी आहे, सर्वमांगल्य करीत आहे. अशी कल्याणी वाणी सगळ्या देशकाळात एक सारखीच शिव असते, शुभ व मांगलिक असते._*
_विपश्यी साधक जेव्हा साधनेमध्ये परिपक्व होऊ लागतो तेव्हा त्याच्या ही गोष्ट चांगलीच लक्षात येते की *जेव्हा जेव्हा दुसऱ्याचे अनहित करण्याची भाषा बोलावी लागते तेव्हा प्रथम आपले मन मलीन करावे लागते ज्यामुळे प्रथम आपलेच अहित, अकल्याण होत असते. तात्काळ परिणाम होतो. अशीच जेव्हा जेव्हा दुसऱ्यांसाठी हितकारक बोलावे लागते तेव्हा आपले मन करुणेने भरावे लागते. त्यामुळे आपले स्वतःचे हित तर प्रत्यक्षात होतेच, तात्काळ होते. अशा सम्यक् वाणीने इतरांसमवेत आपलेही कल्याण होते.*_
*_गंभीर विपश्वी साधक ही गोष्ट चांगल्या रीतीने समजतो की वाणी नेहमी कल्याणकारी असावी. मंगलमय, कुशलकारिणी व परोपकारीणी असावी. धर्ममयी असावी. अधमर्यमयी नसावी. सत्यमयी असावी. असत्यमयी नसावी. प्रिय बोलावे, अप्रिय बोलू नये. वाणीचा हाच सदुपयोग आहे. अशी वाणीच सुभाषित असते._*
_*परंतु जर कुणी असमंजस व्यक्ती मृदुभाषा समजू शकली नाही. कठोर भाषेचीच त्याला सवय असेल, तर त्याच्यासाठी कधी कधी कठोर भाषेचा उपयोग करावा लागतो. तेव्हा प्रथम आपण विपश्यनेद्वारे आपले अंतरंग तपासून पहावे की, या व्यक्तीविषयी आपल्या मनात क्रोध किंवा द्वेष तर जागृत झाला नाही ना? मनाचा समतोल तर टळला नाही ना? समता गेली नाही ना? हे ही पहावे की या व्यक्तिविषयी मनात प्रेमच आहे ना ? करुणा आहे ना? आणि हे आढळले तरच कठोर शब्दांचा वापर करावा. हे जाणून की या व्यक्तीला फक्त कठोर भाषाच समजते. पण त्या कठोर शब्दात नावालासुद्धा कटुता नसावी. दुर्भावनेचा लवलेशही नसावा. ज्याप्रमाणे अनुभवी डॉक्टर फोडावर शस्त्र चालवून शस्त्रक्रिया करतो पण त्याच्या मनात कटुता असत नाही. रोग्याच्या आरोग्याची मंगल कामनाच असते. तद्वतच शब्द भले कठोर असोत पण मनात कल्याणभावनाच असावी. तेव्हा तो वाणीचा सदुपयोगच असतो. वाणीचा सदुपयोग ही कल्याणाची चावी असते.*_
*_कल्याणमय वाणीने आपले व सर्वांचे कल्याण साधू या!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- १३/१०/२०२२
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_13.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment