Wednesday, 12 October 2022

रूप गर्विता खेमा

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_रूप गर्विता खेमा_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

              _*त्या काळात मद्र देशांतील लोक फार सौंदर्यवान असत. आज ज्यादा सियालकोट म्हणतात ती त्यावेळी सागल नावाची त्या देशाची राजधानी होती सागलची राजकन्या खेमा ही अत्यंत देखणी होती.* सुवर्णरंगी रूपसी. मगध सम्राट बिम्बिसार याच्याशी विवाह करून राजगृही आली. तेव्हा कोशलदेवी ही पहिली महाराणी होती. परंतु मद्र देशासारख्या छोट्याशा प्रदेशाची राजकुमारी असूनही बिम्बिसारने तिलाच पट्टराणी बनविले कारण खेमाचे रूप सौंदर्य साऱ्या राणीवंशात तिच्यासारखी दुसरी कोणीही रूपसंपन्न स्त्री नव्हती. त्या दिवसांतील सौदर्योपभोक्ता रसिक सौंदर्योपासक सम्राट बिम्बिसार अंत:पुरात नेहमी एकाद्या भ्रमरासारखा तिच्याच आसपास घिरट्या घालत रेंगाळत असे. त्यामुळे तर तिला आपल्या रूपसौंदर्याचा अधिकच अहंकार, गर्व, अभिमान वाटत होता. या कारणामुळेच ती भगवान बुद्धांना कधी सामोरी गेली नाही. त्यांच्यापासून सदैव दूर राहात असे. कारण त्यांना बाह्यरूपाचे आकर्षण नव्हते. ते सौंदर्याची निंदाच करीत असत. त्यातील दोष दाखवीत. त्यांतील उणीवा दाखवीत. त्यांच्या या *उपदेशाचा बिम्बिसारवही परिणाम होत असे. आता तो पूर्वीचा कामलोलुप बिम्बिसार राहिला नव्हता. आणि नेमकं हेच त्या सौंदर्यवतीला असह्य झालं होतं.*_

            *_बिम्बिसारमध्ये आता खरंखुरं परिवर्तन झालं होतं. जीवनातील वयाच्या एकतिसाव्या वर्षी तो भगवान बुद्धाच्या सान्निध्यात आला. त्या सम्यक् सम्बुद्धांच्या मार्गदर्शनाखाली स्रोतापन्न अवस्थेपर्यंत पोहोचला. तेव्हा त्याचं सारं जीवन बदलून गेले. सद्गृहस्थाप्रमाणे साऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या तो चांगल्या प्रकारे पार पाडीत होता, तद्वतच शासकीय व्यवस्थाही तो चोखपणे करीत होता. तरीही त्याच्या स्वभावात परिवर्तन घडून आले होते. आता पहिल्याप्रमाणे निरंकुश शासकाचा उद्धटपणा नव्हता. पहिल्याप्रमाणे दूरदेशांतील सौदर्यवतीची लोलुपता व त्यांच्यामागे धावण्याची कामुकवृत्ती असलेला विम्बिसार राहिला नव्हता. या बदललेल्या स्वभावामुळे तो मनोमन प्रसन्नच होता. त्याला अत्यंत संतुष्टी होती._*

             _शासनकर्त्यांकडून कळत नकळत होणाऱ्या अनेक दुष्कृत्यांना नरकयोनीच मिळते अशी त्यावेळी सर्वसामान्य जनतेची पक्की धारणा होती. परंतु आता वासना-विकारांपासून विमुक्ती देणारी साधना त्याला [बिम्बिसारला] मिळाल्यामुळे स्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली होती. अधःपतनाकडे नेणारि सारे भवसंस्कार उन्मूलन करणारा विपश्यना साधक असे कोणतेच दुष्कर्म करीत नाही की ज्यामुळे त्याला पुढल्या जन्मात नरकात जावे लागेल. जरी अजूनपर्यंत त्याला साऱ्या भवकर्मातून नितांत मुक्ती मिळाली नव्हती तरी नयकयोनी, अधोगतीकडे नेणाऱ्या सर्व संस्कारापासून तो नितांत विमुक्त झाला होता.._

             _इतर अनेक धर्माचार्यांनी विकारविमुक्तीवर अनेक प्रवचने दिली. उपदेश केला. पण या महापुरुषाने तर विकारविमुक्तीची सक्रिय साधनाच दिली. आपल्या आतील विकारांकडे तटस्थ भावनेने पहाण्यास शिकविले त्यामुळे वासनांचे निराकरण होऊ लागले. विकार क्षीण होऊ लागले. ही अत्यंत प्रभावशाली साधना पद्धती होती व त्याचा निरंतर अभ्यास केल्यामुळे प्रत्यक्ष फळ पदरात पडत होते. त्याचा चांगला स्वानुभव येत होता._

               *_बिम्बिसारला आपल्या परिवारांतील कुटुंबीय माणसे फार प्रिय होती. म्हणून त्याला नेहमी असे वाटे की त्यांनी देखील ही मनःशांती देणारी विद्या शिकून घ्यावी. त्यामुळे त्यांचे कल्याण होईल. त्याला त्याची प्रजाही फार प्रिय होत म्हणून त्याला वाटे की त्याच्या प्रजेनेही भगवान बुद्धांचा उपदेश आचरणांत आणावा व आपले कल्याण करून घ्यावे. पण म्हणून तो त्याबाबत कोणावरही दबाव आणीत नसे. अध्यात्माची ज्याला आवड आहे. त्याने स्वेच्छेने से स्वीकारावे, असे त्याला वाटे. तरीही तो त्या मार्गाकडे जाण्याची प्रेरणा देई. प्रेमाने-आपुलकीने समजुतदारपणे हे काम करी. त्यामुळे कोणालाही असे वाटत नसे की सम्राट आपल्यावर बलप्रयोग करीत आहे._*

                  _त्याला पट्टराणी खेमा फारच आवडत असे. त्याला नेहमी वाटे की तिने भगवान बुद्धांकडे जावे. धर्मज्ञान घ्यावे. पण त्याला हेही माहीत होते. तिला त्यांच्याविषयी वितृष्णा आहे त्यांच्या द्वारा केल्या गेलेल्या रूप भर्त्सतेशी वितृष्णा आहे. त्यांना भेटावेसे वाटत नाही. भगवान नेहमी रूपभर्त्सना करता तेही तिला आवडत नाही. म्हणून ही रूपमानिनी अहंमान्यतेमुळे एकदाहि त्यांच्या दर्शनासाठी, त्यांचा उपदेश ऐकण्यासाठी आली नाही. जेव्हा त्याने प्रथम भगवान बुद्धांना याच उद्देशाने भोजनाचे निमंत्रण दिले, तेव्हा राजकुटुंबातील सारी मंडळी भगवानांच्या दर्शनासाठी, त्यांच्या प्रवचनासाठी मोठ्या उल्हासित वृत्तीने, आनंदाने उपस्थित राहिली, पण तेव्हा देखील रूपसुंदरी खेमाने त्यांचे दर्शन कटाक्षाने टाळले होते. राजधानीशेजारीच 'वेणुवन' उद्यान दान देऊन भगवानांना काही काल राजगृहात राहण्याचा शुभसंकल्पदेखील याचसाठी केला होता की, त्याचे कुटुंबीय, राज्यातील लोक भगवानांच्या संपर्कात येतील आणि शुद्ध धर्म शिकून त्यांना शांतिलाभ होईल. पण खेमा कधीही वेणुवनाकडे फिरकली नाही._

           _वर्षामागून वर्षे लोटली. भगवान तसेच त्यांचे साथी आणि आर्य संत यांच्या तपश्चर्येने वेणुवनाची तपोभूमी परम पवित्र झाली. संसार तापाने त्रस्त झालेल्या दुःखीकष्टी लोकांपैकी जो कोणी त्या वनात येई तो शांतीचाच लाभी होई. लोक भगवानांचा उपदेश ऐकत असत. त्यांनी सांगितलेल्या विपश्यना विधीप्रमाणे ध्यान करीत आणि दुःख विमुक्त होत असत. राजघराण्यातील अनेक जणांनी भगवानांच्या सान्निध्याचा लाभ घेतला पण मानिनी खेमा मात्र या लाभापासून वंचित राहिली._

             _खेमाच्या या वर्तनामुळे बिम्बिसारला अपार दुःख होई. त्याला मनापासून वाटत असे की, खेमाने भगवानांचा उपदेश ऐकावा. त्यांच्याकडून साधना शिकावी व आपले मंगल करून घ्यावे. परंतु त्याने याबाबत कोणावरही दबाव आणला नाही. तसाच त्याने खेमावरही कसलाच दबाव आणला नाही. तशी त्याची इच्छाही नव्हती. शेवटी त्याने एक युक्ती योजली._

              _खेमाला गायनकलेवर नितांत प्रेम होते. उत्तमोत्तम संगीतकार, गायक, वादक, नर्तक मनोरंजनासाठी अंतःपुरात बोलविले जात असत. बिम्बिसारने वेणुवनाच्या मनोहारी रमणीयतेवर काही काव्ये लिहवून घेतली आणि काही चांगल्या मधुर आवाजाच्या गायकांना ती गीते खेमाला ऐकविण्यासाठी पाठविले. 'वेणुवन' नंदनवनासारखे रमणीय, मनोहर, सुंदर असल्याचे ऐकून तिच्या मनांत वेणुवनांत सहज सहल करून येण्याची तीव्र इच्छा बळावली. पण जेव्हा भगवान बुद्ध भिक्षाटनासाठी बाहेर जातील तेव्हाच तिथे जाण्याचे तिने ठरविले. सम्राट बिम्बिसारने तशीही व्यवस्था करविली आणि राजपरिवारांतील काही लोक आणि सेवकांसह राजराणी खेमाला वेणुवनांत पाठवून दिले._

                 _खेमा वेणुवनात पोहोचली. तेथील नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण पाहून अतिशय प्रभावित झाली. तिने ऐकले होत त्यापेक्षाही प्रत्यक्षात ते वेणुवन कितीतरी पटीने सुंदर होते. सारं तपोवन हिरव्यागार वृक्षवेलीनी विविध रंगीबेरंगी फुलांनी भरून गेलं होतं. कोकीळेचा कुहुं कुहुं पंचम स्वर रंगीबेरंगी पक्ष्यांची मधुर किलबिल, पिसारा फुलवून आनंदाने नाचणारे मयुर, त्यांचा षड्ज स्वर, भ्रमरांचे गुंजारव अशा विविध नादमधुर स्वरविलासांनी नटलेल्या नैसर्गिक वाद्यवृंदाच्या मधुर स्वरसौदर्याने तिचे मन अतिशय प्रसन्न झाले. सहज फिरण्यासाठी मनोहर स्वच्छ सुशोभित पायवाटा, ठिकठिकाणी तपस्व्यांना रहाण्यासाठी केलेली सुंदर निवासस्थाने, साधनेसाठी योग्य बैठका, सगळीकडे नितांत सुंदर प्रशांतीचाच आभास निवांत एकांत, शांतता. तपोवनातील उद्यानातील सहल करता करता तिला वेळेचे भानच राहिले नाही. कुठे राजमहालातील कोंदट घुसमटून टाकणारे वातावरण, ईर्षा-मत्सर द्वेषभावनानी भरलेली अशांत मने, आणि कुठे ही अप्रतिम प्राकृतिक सौदर्याची उन्मुक्त मधुरिमा. तपोवनाची प्रगाढ गांभीर्यपूर्ण शांती. फिरता फिरता बराच वेळ निघून गेला. भगवान व भिक्षुसंघ परतला होता. तिने पाहिले की अनेक ठिकाणी वृक्षाखाली व गवताच्या छपराखाली, मांडववेलीखाली अनेक विपश्यना साधक साधना करीत आहेत. त्यांतील काहीजण तरुण युवक आहेत. 'हे वय काय ध्यान साधनेचे आहे ?' या वयांत तर सांसारिक सुखांचा मनसोक्त आस्वाद घ्यावयाचा असतो. वय झाल्यावर वृद्धावस्था आल्यावर ध्यान-तपसाधना करायची. हे लोक आपलं तारुण्य फुकट घालवीत आहेत हे असं का वागत आहेत ?"_

              _असा विचार करीतच ती भगवान बुद्धांच्या गंधकुटीजवळ पोहोचली. त्या कुटीजवळच एका विशाल वृक्षाखाली स्वयं भगवानच बसले होते. ज्यांना ती टाळू इच्छित होती नेमके तेच समोर आले. भगवानांनी फक्त एकदाच तिच्याकडे पाहून उपेक्षेने नजर दुसरीकडे वळविली. रूपगर्विता खेमाला हे फारच अपमानास्पद वाटले. तिच्या अहंकारावर हा प्रचंड आघात होता. जो कोणी तिला पाही तो तिच्याकडे एकटक पहातच राही. तिच्या रूपलावण्याचे असे अतीव आकर्षण होतं. आजच तिने तिच्या जीवनात पहिलाच असा पुरुष पाहिला की ज्याने तिला फक्त एकदाच पाहिले नी नंतर तिच्याकडे पुन्हा नजर वळविली नाही. तिला ते सहन झाले नाही._

                    _भगवानांनी बघितले की खेमाजवळ अनेक जन्मांची अर्जित पुण्यपारमी आहे. परंतु या वेळी त्या पुण्यसंग्रहात व तिच्यात फार मोठा दुरावा निर्माण झाला आहे. तिच्या मनोभावना त्यांनी तात्काळ जाणल्या आणि त्यांना हेही समजते. की ही वेळ तिला शब्दांच्याद्वारा धर्ममहात्म्य समजविण्याची नाही. *ही ऐकणारही नाही व ऐकले तरी समजणार नाही. तिला समजेल अशा पद्धतीने धर्म समजावून दिला पाहिजे. म्हणून महाकारुणिक भगवानांनी ऋद्धीवलाचा उपयोग केला. खेमाने पाहिलं की भगवानांच्या जवळच एक अत्यंत रूपवान देवांगना उभी आहे. ती त्यांची सेवा करीत आहे. त्यांना पंख्याने वारा घालीत आहेत.*_

               _खेमा तिचं रूपसौंदर्य पाहून आश्चर्यचकित झाली. देवलोकीच्या अप्सरेसारखी, असं लावण्य तिनं पूर्वी कधी पाहिलंच नव्हतं. अनुपम स्त्री सौंदर्याची सजीव प्रतिमा, अंगप्रत्यंगातून लावण्य ओसंडत होतं. 'अरे मी तर हिची दासी बनण्याच्याही योग्यतेची नाही. अप्सरा ज्याची सेवा करतात तो कशाला माझ्याकडे पाहील? सौंदर्याचा असा समुच्चय, खेमा विस्मयचकित होऊन तिच्याकडे पहातच राहिली, पहातच राहिली._

                  _काही वेळाने तिनं पाहिलं तर ती रूपमती हळुहळु प्रौढ दिसू लागली. सौंदर्याचा दिमाख ढासळत चालला आणि पाहता पाहता अरे हे काय? ही तर म्हातारीच झाली. काळ्याभोर केससंभाराची मुलायमता लोप पावली आणि पांढऱ्या शुभ्र जटांचा संभार दिसू लागला. विखुरलेले-विरळ झालेले रुक्ष-कोरडे केस एखाद्या पक्ष्याच्या घरट्यासारखे दिसू लागले. आणि तो ओजस्वी तजेलदार चेहरा त्याचे काय झालेय ? कसा तेजोहीन भेसूर ! कानाच्या शिंपल्या - लोंबू लागल्या. डोळ्याच्या खांचा दिसू लागल्या. कमलनयनांचे हे भीषण भयाण रूप! ते मोत्यांसारखे चमकदार पांढरे शुभ्र दांत कुठे गायब झाले? तोंडाचे बोळकेच झालेय. एकही दांत तोंडात दिसत नाहिये. तोंडाच्या बोळक्यातून गळणारी लाळही हिला आवरता येत नाही. आणि हे चेहऱ्याचे काय झाले ? चेहराच नव्हे, सारे शरीरच सुरकुत्यांनी भरून गेले. हाडांचा सांगाडा, इथून तिथून जखडलेल्या नाड्या त्यावर पडलेल्या सुकट्या सरपट सुरकुत्या. आणि पहा तर या अस्थिपंजर नारीची कंबर झुकत आहे. झुकतच चालली आहे. काठीच्या मदतीने कशीबशी उभी आहे. दुर्बलतेमुळे हातपायांना कापरे भरले आहे. सारं शरीर थरथरत आहे. नी आता तर तिला काठीचाही काही उपयोग नाही. काठी हाती असूनही कोसळत आहे. वाकडी तिकडी होऊन पडते आहे. हातातला पंखाही सांभाळता येत नाहिये. तो देखील हातातून गळून पडलाय. अन् हे काय? ही तर कोलमडून पडलीय. विलक्षण दम लागला आहे. श्वास खालीवर होत आहे आणि हा पहा अखेरचा निःश्वास सोडला. हा फक्त हाडांचा ढिगारा ! सुरुकुत्यांनी सुकटलेली लोंबणारी चामडी, चामडी व हाडे यांचा ढीग. निष्प्राण शरीर. प्रेत पडलयं. खरंच मरण पावलीय._

                   _अरे बापरे! या सौंदर्यसम्राज्ञीची ही अंतिम अवस्था! खेमाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. माझीदेखील हीच दशा होणार काय? माझं रूपलावण्य, त्याचीही अशीच राख होणार? अशीच भयाण वृद्धावस्था! असंच मरण ? मोठाच धर्मसंवेग उसळी मारून वर आला. मन व्याकुळ झालं. असं है जराधर्मा, मरणधर्मा, अशुद्ध, अपवित्र शरीर त्याच्या विषयी किती ममत्व! किती तादात्म्य भावना, किती आसक्ती ? किती गठबंध न-साटेलोटे. अनेक जन्मांचे पूर्वसंचित जागे झाले. भाग्य उजळले! भगवानांनी पाहिले आता हिची धर्मभावना प्रबल झाली आहे. धमाचे ज्ञान समजून घेण्यालायक झाली आहे. तेव्हा ते अत्यंत करुण कोमल प्रज्ञा जागविणाऱ्या थोड्याच शब्दांत म्हणाले._

              *_"बघ खेमा! हे शरीर पहा, सडणारे आहे, सुटणारे आहे, घाणेरडं आहे, कुरुप आहे, मृत आहे! मूर्ख लोकच याचं अभिनंदन करतात. मनाची एकाग्रता साधून या शरीरातील घाणीचा अनुभव कर. कायगतासति म्हणजे ह्या कायेची काय गति आहे, अंत आहे हे सजगतेने समजून शरीराच्या ह्या घाणीचे वास्तव जाण. कायगतासतिद्वारे ह्याच्याविषयी निर्वेद जागव, अनासक्ति जागव ! समजून घे. जसं हे शरीर आहे तसंच तुझंही शरीर आहे. जसं तुझं शरीर तसंच हेही शरीर! जसं बाहेर तसंच आत. जसं आत तसं बाहेर. अपवित्रतेचा, घाणीचा ढिगारा आहे नुसता. या नश्वर शरीराकडे विमुख हो! पाठ फिरव! त्या परम विमुक्त अविनाशी अवस्थेला सन्मुख हो! सम्यक विपश्यना साधना करून आपल्या अहंकाराची पाळेमुळे खणून काढ. आणि निर्वाणिक अनुभूती करून घेऊन उपशांत चित्तासह जीवन जग!"_*

                 _*या अमृताच्या बोलांनी खेमाचं चित्त धर्माकडे सन्मुख झाले, मन प्रफुल्लित झाले. प्रमोदित झाले, ऋजु झाले तेव्हा भगवान बुद्धांनी तिला महानिदान सुत्तंतची गंभीर देशना दिली. ती ऐकता ऐकता तिला पूर्वजन्मातील भावित केलेली म्हणजे साध्य केलेली 'अनिच्च सञ्ञा' [अनित्य संज्ञा] अर्थातच अनित्यबोधाचे स्मरण झाले. अंतरंगात विपश्यना सुरू झाली. सर्व शरीरात अनित्यतेचा अनुभव येऊ लागला. चित्त निर्मल होऊ लागले, शांत होऊ लागले, विशुद्ध धर्मचक्षु जागृत झाले. जे काही उत्पन्न होते त्याचा विनाश होतच असतो. अशा प्रकारे निर्वाणिक निरोध अवस्थेचा साक्षात्कार झाला, आणि तिला स्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली. स्वयं भगवान सम्यक् संबुद्धांकडून कल्याणकारी मार्गाचे निर्देशन झाले. अनेक जन्माच्या संग्रहित पूर्व सुकृताचे फळ प्राप्त झाले. खेमा धन्य झाली!*_

               _तिने भावविभोर होऊन भगवानांच्या पायावर डोके ठेवले. कृतज्ञता व्यक्त केली. आपण या काममोहाने लोलुप होऊन महाकारुणीपासून दूर राहून आपल्याच हित-सुखाला वंचित राहिलो होतो हे तिच्या लक्षात आले. भगवानांच्या अमृतवाणीने अभिसिंचित झालेल्या खेमाने बिम्बिसारकडे धाव घेतली. त्याच्या विषयीदेखील तिने कृतज्ञता व्यक्त केली. कुशलतेने आपण मला भगवानांच्या संपर्कात आणले. *गेली होती वनदर्शनासाठी पण या महामुनीने निर्वाणदर्शन घडविले.* माझं कल्याण झालं. त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या मनांत निर्वेद जागला आहे. *"मला त्यांच्या धर्मशासनांत प्रव्रजित होऊन सामील होण्याची अनुज्ञा द्यावी." बिम्बिसार आता पूर्वीचा कामलोलुप बिम्बिसार राहिला नव्हता. आपल्या अंत:पुरातील सर्वोत्तम सौंदर्य सम्राज्ञी प्रव्रजित व्हायला उत्सुक झाली याचा त्याला अत्यानंद झाला. त्याने तिला सहर्ष अनुमति दिली.*_

             *_आणि खेमा प्रव्रजित झाली. भगवानांच्या पायाशी बसून भिक्षुणी खेमा विपश्यना साधनेचे गहन पाठ शिकली. आपल्या पूर्वजन्मीच्या अभ्यासामुळे तिला केवळ पंधरा दिवसातच अरहंत अवस्था प्राप्त झाली. पुढे ती आपले सारे शेषजीवन लोकसेवेच्याच कार्यात घालवू लागली. ह्या भावनेनेच की, या कल्याणकारी विपश्यना साधनेमुळे किती तरी पथभ्रष्ट-वाट चुकलेल्या स्त्रियांना जन्ममरणाच्या भवचक्रांतून दिलासा मिळून त्यांची सुटका होईल._*

*_“एतदग्गं भिक्खवे, ममसाविकानं भिक्खुणीनं महापञ्चनं यदिदं खेमा”_*

      _अशा प्रकारे सर्व भाविकांमध्ये, भिक्षुणीमध्ये तिला महाप्रज्ञावती अग्रपदाच्या या उपाधीने विभूषित केले._

  _*धन्य आहे धर्म! ज्याने त्या कामातुर भोगविलासी स्त्रीला कामवासनेच्या बंधनातून मुक्ती दिली आणि महाप्रज्ञावती बनवले.*_

*_सर्वानी असेच प्रज्ञावती व्हावे!_*

*_प्रज्ञावान व्हावे! सर्वांनी आपले कल्याण साधावे!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- १२/१०/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_12.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


No comments:

Post a Comment

योग

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_योग_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_19.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _भगवंतांनी संबोधी मार्गा...