🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_अभिलाषा पूर्ण झाल्या_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_मगध देशाचा राजा बिम्बिसार धार्मिक विचारांची व्यक्ती होती. त्याच्या राज्याच्या राजधानीत राजगिरीत कुणी संत, संन्यासी, विद्वान पंडित येत असत त्यांचा तो नेहमी आदर सत्कार करीत असे. त्यांची धर्म प्रवचने ऐकत असे आणि विपुल दान दक्षिणा देत असे._
_एक दिवस तो आपल्या राजमहालाच्या व्हरांड्यात उभा होता. त्याने समोरच्या राजमार्गावर काही लोकांची गर्दी पाहिली. त्याने पाहिलं की एक तेजस्वी संन्यासी खाली मान घालून मोजून पावले टाकीत राजमार्गावरून चाललेला आहे. त्याने जीर्ण पुराणी वस्त्रे परिधान केली आहेत. ती भगव्या रंगाची आहेत. एकाद्याच्या घरासमोर खाली मान घालून तो भिक्षापात्र पुढे करी. गृह-स्वामिनी त्याला भिक्षा घालून कृतार्थ होई व त्याच्याकडे एकटक पाहत राही. आणखीही जे कोणी पादचारी त्या संन्याशाला पाहात तेही अनिमिष नेत्रांनी पाहातच राहात. मळके जीर्ण कपडे देखील त्याच्या सुकुमार राजसी व्यक्तिमत्वाला झाकण्यासाठी सर्वथैव असमर्थ ठरले होते. जो कोणी पाही तो त्याच्याकडे आकर्षिला जाई. यामुळे त्याच्या भोवती एवढा लोकसमुदाय जमला होता._
_राजा बिम्बिसारदेखील त्या चुम्बकीय मोहक आकर्षक व्यक्तिमत्वाने त्याच्याकडे आकर्षिला गेला. त्याने त्या संन्याशाच्या मागे, तो कोण आहे व भिक्षाटन आटोपल्यावर कोठे राहतो हे पाहण्यासाठी आपले सेवक पाठविले. त्या राजसेवकांनी तो संन्याशी एका वृक्षाखाली भोजन करण्यासाठी बसला आहे असे सांगितले. राजाने आपला मुकुट चढविला आणि काही मंत्र्यांसमवेत इच्छित स्थळी पोहोचला. तोपर्यंत त्या युवा संन्याशाचा भिक्षा आहार खाऊन संपला होता. त्याला इतक्या जवळून पाहताच राजा आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिला. त्याच्या *अलौकिक सौंदर्यावर त्याची दृष्टी खिळून राहिली. त्याच्याइतके भव्य व्यक्तिमत्व आपल्या आजपर्यंतच्या जीवनांत त्याने कधीच पाहिले नव्हते. डोक्याच्या वरच्या टोकावर एका उपशीर्षात लहान कर्तन केलेले सुंदर रेशमी मुलायम कुरळे काळेभोर केस एखाद्या जटेप्रमाणे विलसत होते. विशाल भाल प्रदेश, धनुष्याकृती काळ्याशार भुवयातून डोकावणारे पांढरे केस आपले आगळे दिव्यत्व दर्शवीत होते. विशाल नेत्रांमधून पावित्र्य ओसंडून वहात होते. लांब सरळ नाक, सिंहासारखी सुंदर हनुवटी, उन्नत स्कंध, रुंद भरदार छाती, आजानुबाहू, चेहऱ्यावर अपूर्व शांती, तेजस्विता आणि चेहऱ्याभोवती ओजस्वी प्रकाशवलयांनी युक्त मंडल विराजत होते.*_
_राजा विचार करू लागला की, 'हा युवा संन्यासी निश्चितपणे कोणत्या तरी कुलीन घरंदाज घराण्यात असला पाहिजे.' त्याला वाटले की कोणत्या तरी उदात्त ध्येयवादाने प्रेरीत होऊन याने गृहत्याग केला असला पाहिजे, एकाएकी त्याच्या मनांत एक विचार विजेसारखा चमकून गेला, अरे हा राजकुमार सिद्धार्थ गौतम तर नव्हे ना?"_
_सिद्धार्थाचे वडील महाराज शुद्धोधन आणि बिंबिसाराचे पिताश्री हे परस्परांचे परमस्नेही होते. आपल्या वडिलांकडून शाक्य कुलाची मोठी ख्याती त्याने ऐकली होती. त्याने हे देखील ऐकले होते की महाराज शुद्धोधनाच्या घरांतील एक राजकुमार असा जन्मला आहे की ज्याची शारीरिक लक्षणे पाहून देशातील प्रख्यात ज्योतिषशास्त्रज्ञांनी भविष्य वर्तवले होते की हा एक तर गृहस्थ चक्रवर्ती सम्राट होईल अथवा वैराग्य शिरोमणी विरक्त सम्यक सम्बुद्ध तरी होईल. हा राजकुमार सिद्धार्थ तर नव्हेना?_
_महाराज बिंबिसारने आपले कुतूहल शांत करण्यासाठी विचारले, "योगिराज! आपण शाक्यपुत्र सिद्धार्थच आहात ना?_
_"हो, खरे आहे महाराज!"_
_तरुण संन्याशाने स्मित हास्य करीत उत्तर दिले. बिम्बिसाराच्या साऱ्या शरीरांतून रोमांच फुलले. त्या तपस्वी योगिराजाविषयी आपलेपणाचा भाव उफाळून आला. तो सद्रदित होत म्हणाला, 'बंधु ! हे संन्यस्त जीवन तुला अनुकूल नाही. तुझं जीवन राज्य-प्रशासकीय योग्यतेचे तू शाक्यवंशीय राज्य त्याग करून आलास तो आलास पण आता मी तुला माझ्या राजैश्वर्याचा भागीदार करण्यास तयार आहे.'_
_शाक्यांच्या लोकसत्ताक गणतंत्रीय प्रशासनापेक्षा मगधाचे एकसत्ताक साम्राज्य अधिक विशाल आणि ऐश्वर्य संपन्न होते. पण हा प्रस्ताव त्याला रुचला नाही. संन्यासी सिद्धार्थाने ते नम्रतापूर्वक नाकारले. ज्याने राजैश्वर्य मलमूत्राप्रमाणे फेकून दिले होते तो तेच पुन्हा स्वीकारणे कसे शक्य होते? तो तर परमसत्याच्या शोधात निघाला होता. मुक्तीच्या शाश्वत ऐश्वर्याचा संशोधक! त्याच्यासाठी हे विशाल पण क्षणभंगूर राजवैभव तुच्छ आणि त्याज्यच होते._
_श्रेणिक बिम्बिसारने सिद्धार्थाचा दृढ निश्चय पाहिला आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने दोन्ही हात जोडून म्हणाला, 'आपल्याला त्वरीत सम्यक् संबोधि प्राप्त होवो हीच मंगल कामना पण एक विनम्र प्रार्थनाही आहे की बोधि प्राप्त झाल्यावर माझ्या ह्या नगरवासीयांना आणि मला उपकृत करण्यासाठी व मुक्तीमार्गाचा उपदेश करण्यासाठी इथे अवश्य यावे. सिद्धार्थाने स्मित करीत स्वीकृती दिली._
_बिम्बिसार कृतार्थ भावनेने आपल्या राजमहालात परतला. मनात एकच प्रश्न उठत होता की सिद्धार्थ खरंच सम्यक सम्बुद्ध होईल? आजकालचे आचार्य आपण 'बुद्ध' झालो आहोत असे समजत आहेत. पण कुणाला ठाऊक ते खरे बुद्ध आहेत की नाहीत ? परंतु सिद्धार्थकडे पाहून असं निश्चितपणे वाटतं की हा खराखुरा बुद्ध अवश्य होईल. शिवाय या माणसाच्या बाबतीत नामवंत शीर्षस्थ ज्योतिषांची भविष्यवाणीही अशीच आहे. याचे असे सर्वांग परिपूर्ण व्यक्तिमत्वही त्याची ग्वाही देत आहे._
_*सहा वर्ष संपता संपताच गौतम सम्यक सम्बुद्ध झाला. त्याने स्वतःच अमृतत्वाचा साक्षात्कार केला. जगांतील दुःखी लोकांसाठीही या अमृतत्वाच्या साक्षात्काराचे दरवाजे खुले झाले पाहिजे अशी एक करुणाजन्य अंतर्चेतना उत्स्फूर्तपणे प्रबळ झाली आणि धर्मचक्रप्रवर्तनासाठी भगवान बुद्ध ऋषिपत्तन मृगदाय वनांत दाखल झाले. तेथे त्यांचे पूर्वाश्रमीचे पाच सहकारी सहधर्मी, धर्माच्या प्रभावाने अरहंत झाले. भगवानांनी तेथेच त्यांच्या समवेत वर्षावास केला. वर्षावासाच्या काळांत वाराणसीचा एक धनवान वाणिक पुत्र आणि त्याचे चोपन्न सहकारी मित्र भगवानांच्या सान्निध्यात आले, आणि विपश्यना साधनेच्याद्वारे त्यांना अरहंत अवस्थेचे फळ मिळाले. वर्षावासानंतर धर्मचारिका सुरू झाली. साठ अरहंत भिक्षूंना चारिकेसाठी निरनिराळ्या ठिकाणी पाठविले कारण ते अधिकाधिक लोकांवर अनुकंपा करून त्यांच्या हितासाठी शुद्धधर्म प्रकाशीत करतील, माहिती देतील. भगवान बुद्ध स्वतःदेखील या निमित्ताने बोध गयेला परतले. तेथे त्यांचा उरुवेल काश्यप, नदी काश्यप आणि गया काश्यप या नावाच्या तीन अग्निहोत्री अग्नीपूजक बंधूंचा त्यांच्या हजार शिष्यांसह संपर्क आला. भगवानांनी सर्वांना शुद्ध धर्माची अंतर्साधना करवून परममुक्त अवस्था प्राप्त करविली.*_
_मगध नरेश श्रेणिक बिम्बिसारला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी ते आपल्या विशाल शिष्यगणांसह राजगृहाला पोचले. बिम्बिसारला हे कळताच, तो अत्यंत श्रद्धाशीलतेने आपल्या मंत्रिगणांसह, राजदरबारी, नगरांतील प्रमुख ब्राह्मण आणि श्रेष्ठ नागरिकांसह जेथे भगवान बुद्ध थांबले होते त्या ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी पोहचला._
_उरुवेल काश्यप हा मगध देशाचा परमपूज्य धर्माचार्य होता. त्याच्या शिष्यांची, भक्तांची आणि अनुयायांची संख्या फार मोठी होती. एवढा मोठा लब्धप्रतिष्ठित धर्माचार्य आपल्या दोन लहान भावांसह, एक हजार शिष्यांसहित एवढ्या विशाल अनुयायांसह श्रमण गौतम बुद्धांच्या समवेत असलेले पाहून ते आश्चर्यचकित झाले. या सर्वांनी आपला देश का बदलला आहे? डोक्यावरील राखयुक्त जटा, दाढी मिशा काढून ते गौतमाचे शरणागत शिष्य झाले आहेत की काय? की श्रमण गौतमच यांचा शिष्य झाला आहे?_
*_सर्वांच्या मनांतील शंका निरसन व्हावे म्हणून सर्व उपस्थित जनसमूहाच्या समोरच उरुवेल काश्यपने भगवान बुद्धांना नमस्कार केला आणि आपण स्वतः त्यांचे शिष्य असल्याचे जाहीर केले. ते करतांना तो म्हणाला, "हे भगवान आहेत, अरहंत आहेत. सम्यक सम्बुद्ध आहेत. विद्या आणि आचरण संपन्न आहेत. सुगत आहेत. सान्या [एकतीस] भवलोकांना जाणणारे, सर्वज्ञ आहेत. एखाद्या मस्तवाल घोड्याला वठणीवर आणणाऱ्या कुशल मोतद्दाराप्रमाणे [तो जसा घोडा वठणीवर आणतो, त्याला सुधारतो त्याप्रमाणे] हे भगवान देखील बिघडलेल्या व्यक्तींना सुधारण्यात अनुपम आहेत. हे देवता आणि मनुष्य दोघांचेही शासक आहेत, शिक्षक आहेत असे हे भगवान बुद्ध आहेत."_*
_*हे ऐकतांच श्रेणिक बिम्बिसार याच्यासह साऱ्या श्रोतृवृंदाने अत्यंत श्रद्धेने, विनम्र भावाने भगवान बुद्धांना नमस्कार केला. भगवानांनी आपल्या अमृतवाणीने ह्यापूर्वी कुणालाही समजावला गेला नव्हता असा अनुपूर्वी धर्मोपदेश केला. शुद्धधर्म म्हणजे काय याची प्रारंभिक माहिती दिल्यावर जेव्हा त्यांना या लोकांचे मन निर्मळ आणि ऐकण्याच्या स्थितीत असल्याचे आढळले. तेव्हा त्यांना त्यांनी चार आर्य सत्यांचा गंभीर उपदेश दिला. दुःखाचे कारण व त्याचे निवारण करण्याचा मार्ग सांगून विपश्यना विधिची माहिती दिली. बिम्बिसार सहित जे जे पूर्व संचिताने संपन्न होते त्यांचे मन एकाग्र झाले. आत पंचस्कंधाच्या उदय-व्ययाची अनुभूती येऊ लागली आणि असे होता होता एकाएकी जे नित्य आहे, ध्रुव आहे. जिथे उदय आणि व्यवही नाही, जिथे उत्पादव्याच्या लैकिक क्षेत्राचा पूर्णतः निरोध होतो. अशा इंद्रियातीत परमसत्याची अनुभूती झाली. त्या सर्वांनाच प्रत्यक्ष अनुभवाने कळून आले की सारे, नामरूपाचे पचस्कंधीय क्षेत्र, जे समुदय धर्म आहे ते ह्या अवस्थेमध्ये पूर्णतः निरुद्ध होऊन जात आहे. अर्थातच जो उत्पन्नधर्मा आहे तो निरोधधर्माही आहे. या सत्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अशा रीतीने प्रथमच ते अमृतदर्शी झाले म्हणजेच अनार्याचे आर्य झाले, स्रोतापन्न झाले, मुक्तीच्या प्रवाहात पडले. आता जगातील कोणतीही शक्ती त्यांना मोक्षापासून रोख शकत नाही. आता अधःपतन होणे नाही. मनुष्य, देव अथवा ब्रह्मलोकांत जास्तीत जास्त सात जन्म घेऊन शेवटी पूर्णतया विमुक्त अरहंत पदाचे अधिकारी होणारच. स्त्रोतापन्न ही एक अशी अवस्था आहे की, जिथे व्यक्ती कुठल्यातरी शील किंवा व्रत ह्यामध्ये टोकाला जाऊन, त्याद्वारे मुक्त होण्याची सगळी भ्रामक आसक्ती सोडतो. जिथे ह्या शरीर आणि चित्ताच्या प्रती मी. माझेपणाचा भाव कायमचा सुटून जातो. आणि जिथे मार्ग आणि मार्गदर्शकाच्या प्रती साऱ्या शंका नष्ट होतात. कारण साधक प्रत्यक्ष अनुभूतीद्वारे परमसत्याला जाणूनच स्वीकार करतो..*_
_अनार्य अवस्थेतून आर्य अवस्था प्राप्त झाल्यावर सारेजण कृतज्ञता भावनेने भारावून गेले. श्रेणिक बिम्बिसार आपली अमर्याद श्रद्धाशीलता प्रकट करीत म्हणाला, "अहो आश्चर्य! भन्ते भगवान अत्यंत आश्चर्य आहे! अत्यंत अद्भुत आहे आपला धर्मोपदेश ! जसे कुणीतरी पालथ्याला सुलटे करावे, गुप्त गोष्ट उघड करावी, झाकण दूर करावे, चुकल्या वाटसरूला योग्य रस्ता दाखवावा, अंधारात दीपक प्रज्वलित करावा ज्यामुळे स्वच्छ प्रकाशात मार्ग दिसावा. आपल्या अंतःकरणातील सत्याचे वास्तव स्वरूपाचे दर्शन घडावे जे अजून पर्यंत अज्ञात होते. आजपासून भगवान बुद्धाविषयी, त्यांनी शिकविलेल्या धर्माविषयी आणि त्या धर्ममार्गाचे आचरण करून निर्मळचित्त झालेल्या साधक संघाच्याविषयी, *माझी आजीवन शरणागती मान्य करावी आणि मला आपला उपासक म्हणून स्वीकार करावे.'*_
_*राजा बिम्बिसारने सर्व भिक्षू संघाला भगवान बुद्धांसहित दुसऱ्या दिवशी राजप्रासादांत भोजनाचे निमंत्रण दिले. भगवान बुद्धांनी त्याला मौन स्वीकृती दिली. दुसऱ्या दिवशी तो श्रद्धाशील अंतःकरणाने बुद्ध व भिक्षु संघाला भोजनदान देऊन कृतार्थ झाला. त्यावेळी त्याच्या मनात असाही विचार आला की भगवान बुद्ध काही दिवस राजप्रासादात राहिले आणि त्यांनी आपल्या अमृतमय वाणीने, योग्य मार्गदर्शनाने धर्मदेशना केली तर माझ्या कुटुंबियांना, अन्य नातेवाईकांना, प्रजेतील पुण्यवंतांना त्याचा लाभ होऊन त्यांचे कल्याण होईल. भगवानांचे निवासस्थान शहरापासून फार दूर नसावे तसेच ते शहरांतील गजबजलेल्या भागातही नसावे. त्या संदर्भात त्याला त्यांचे उद्यान वेणुवन आठवले व ते त्याने भगवानांना दान दिले. भगवान बुद्धांनी या पुण्यकार्याला आशीर्वाद दिले आणि लोककल्याणकारी भावनेने भिक्षुसंघासाठी त्या दानाचा स्वीकार केला. बिम्बिसार कृतार्थ झाला. त्याला धन्यता वाटली.*_
_कृतज्ञता भावनेच्या त्या आनंदात श्रेणिक बिम्बिसारच्या तोंडून सहजोद्वार निघाले ते असे :- "भन्ते भगवान! मी अतिशय भाग्यशाली आहे. माझ्या मनांत जेव्हा मी राजकुमार होतो तेव्हापासून पाच तीव्र अभिलाषा होत्या. आणि त्या पाचही आज पूर्ण झाल्या आहेत. "_
*_पहिली अभिलाषा होती माझा राज्याभिषेक व्हावा. तो झाला."_*
*_“दुसरी अभिलाषा होती की माझ्या शासनकालांत कुणीतरी सम्यक् सम्बुद्ध व्हावे व त्याचे माझ्या राज्यात आगमन व्हावे. तेही घडले._*
*_"तिसरी अभिलाषा होती की त्या सम्यक् सम्बुद्धाचे मी अभिनंदन करावे, अभिवादन करावे. तीही अभिलाषा पूर्ण झाली. "_*
*_"चौथी अभिलाषा होती की त्या सम्यक् सम्बुद्धाने मला धर्मोपदेश करावा, तसा धर्माचा सदुपदेशही मला मिळाला."_*
*_"पाचवी अतिशय तीव्र अशी अभिलाषा होती की मी भगवान बुद्धांचा उपदेश हृदयंगम करावा, अंतःकरणांत भिनावा आणि भन्ते भगवान, तसंच घडून आले._*
“माझ्या पांचही मनोकामना पूर्ण झाल्या. मी खरोखर किती भाग्यशाली आहे!"
*_श्रेणिक बिम्बिसार खरोखरच मोठा भाग्यवंत होता._*
*_कल्याणकारी मार्ग सर्वांना लाभो !_*
*_मुक्तीदायिनी प्रेरणा सर्वांत जागृत हावो.._*
*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- ११/१०/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_11.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment