Saturday, 6 August 2022

अमर निर्वाणाची सत्यता

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अमर निर्वाणाची सत्यता_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

          _लहानसहान सामान्य घटना सर्वांच्याच जीवनात घडत असतात. परंतु *कधी कधी अतिसामान्य वाटणारी घटना कुणा एखाद्या पुण्यवान व्यक्तीच्या जीवनात अपूर्व प्रेरणादायक ठरते.* त्याच्या अंतरंगात एक अदम्य उत्साह जागृत होतो. अन् साऱ्या विलास वैभवाचा त्याग करून मुक्तीच्या मार्गावर स्वतःला झोकून देतो, आणि पराक्रम करीत प्रगती करतो._

           _एखाद्या म्हातार्याला, आजाऱ्याला, प्रेताला, संन्याशाला पाहणे ही काही असामान्य गोष्ट नव्हे. लोकांना हे दिसतच असतं. शुद्धोधनाने आपल्या मुलाला सिद्धार्थ गौतमाला निवृत्ती मार्गापासून दूर ठेवण्यासाठी विलासमय रंगरंगेल्या जीवनात ठेवलंही असेल. हे देखील संभवनीय आहे की एखाद्याचं प्रेत पाहण्याची संधी त्याला मिळाली नसेल. पण वृद्ध म्हातारे तर त्याने अवश्य पाहिले असतील. कदाचित काही वृद्ध दास दासी त्याच्या सेवेत नसतील तथापि त्याची सावत्र माता प्रजावती गौतमी आणि खुद्द पिताश्री शुद्धोधन यांचे वयही ७० वर्षाहून अधिक झाले होते. कारण राजकुमार सिद्धार्थ तेव्हा २५-३० वर्षाचा होता. पित्याचे पांढरेशुभ्र केस व चेहऱ्यावर पडलेल्या सुरकत्या तरी त्याने निश्चित पाहिल्या असल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे कधी तरी त्यांच्यापैकी कोणाला तरी, वेदनाग्रस्त व्याधीपीडीत, आजारी अवस्थेत पाहिले असणारच. धर्मभीरू राजघराणे होते. राजगृही असलेल्या साधूसंतांना भोजनदान, त्यांचा आदर सत्कार होत असणारच. त्यांची वंदना करण्यासाठी व मंगल आशीर्वाद घेण्यासाठी राजपुत्राला पण तिथे उपस्थित केले जात असणारच. म्हणून *असे अनुमान करता येईल की अशा प्रकारच्या घटनाही त्याने पाहिल्या असल्या पाहिजेत. परंतु त्या दिवशी हीच कारणे पाहून त्याची अशी मनोवृत्ती झाली असावी की ज्यामुळे गृहत्याग करून, सत्य संशोधनाची प्रबल प्रेरणा जागृत झाली आणि त्यापासून त्याला कोणीही परावृत्त करू शकले नाही.*_

         _त्या दिवशी त्याने पाहिलेले वार्धक्य, रोगग्रस्तता आणि मृत्यू ह्या साऱ्या इहलोकीच्या प्रतिकांनी त्याचे दुःखाचे उमाळे उफाळले असावेत आणि त्याचवेळी गृहत्यागी शांत संन्याशाच्या प्रशांत दर्शनाने त्याला दुःखमुक्त जीवनाचे अपूर्व आश्वासन मिळाले असावे. त्याच्या मनात नवचैतन्याचे स्फूर्तिदायक प्रेरणादायी दृश्य ठसले असावे. याच प्रसंगामुळे चिंतनशील अशा या राजकुमाराच्या मानसाकाशात प्रचंड वादळ उठविणारे ठरले असावे._

           _*जिथे वार्धक्य, व्याधी, जन्म-मृत्यू यांनी ग्रासलेले दुःखी सांसारिक व्यथांचे अस्तित्य आहे तिथे त्या पलिकडील अजरामर-निर्वाणाची सत्यता असलीच पाहिजे ह्या अनिवार ओढीने, 'मला या सत्याचे संशोधन केलेच पाहिजे' अशा दृढ संकल्पाने तो प्रवृत्त झाला असावा.*_

       *_जसे जगात एकीकडे इंद्रियजन्य दुःख आहे तद्वतच दुसरीकडे इंद्रियजन्य सुखेही अस्तित्वात आहेत. तसेच भवचक्र आहे तर ह्या भवचक्राचे निराकरण निश्चितच असायला पाहिजे._*

        *_जगात जशी उष्णता आहे तशी शीतलता ही आहे, जसे त्रिविध ताप आहेत तसेच तापनिवारक निर्वाणाची परम शांतीही अवश्य असली पाहिजे._*

        *_जसं पाप आहे तसं पुण्यही आहेच, जशी जन्मावस्था आहे तशीच अजन्मावस्था ही असली पाहिजे. जरावृद्धावस्थेप्रमाणे अजरावस्था आणि मृत्यूप्रमाणे अमरत्वही असले पाहिजे. मला याचा शोध घेतला पाहिजे. मला याचे संशोधन केले पाहिजे._*

          *_जन्ममृत्यू, वार्धक्य व रोगग्रस्तता या दुःखद भवचक्राचे काही तरी मूलभूत कारण असलेच पाहिजे आणि काही कारण असले तर त्याचे निराकरण करण्याचा उपायही जरूर असलाच पाहिजे. आणि असा काही उपाय असला तर त्या उपायाने या जन्म, मृत्यू, वार्धक्य व रोगग्रस्ततायुक्त भवचक्रापासून मुक्त होऊन, नितांत दुःखनिरोध अवस्थेचे परम सत्य प्राप्त करता येईल. त्या सत्याचा शोध केला पाहिजे. केवळ माझ्याच दुःखाचे निवारण नको आहे तर जगातील असंख्य प्राणी दुःखाने तळमळत आहेत त्यांच्या दुःख मुक्तीसाठी या परमसत्याचा शोध घेणे आवश्यक आहे._*

       *_गलिच्छता-मलिनता दूर करण्यासाठी स्वच्छ पाण्याची सरोवरे उपलब्ध आहेत पण त्या सरोवरांचा शोध घेतला नाही तर दोष कुणाचा ? सरोवराचा नाही._*

      *_जीवावर उठलेल्या शत्रूंनी वेढून टाकले असता त्यातून निसटण्याचा मार्ग असतोच ना! पण तो शोधला नाही तर दोष कुणाचा? त्या मार्गाचा नाही._*

        *_अग्निज्वालांनी ग्रासलेल्या घरातून बाहेर पडण्याचा रस्ता असतो पण तिकडे लक्ष दिले नाही तर दोष कुणाचा? रस्त्याच्या नव्हे._*

         *_एखादा रोग निवारणासाठी औषध चिकित्सा पद्धती असते पण रोगी त्या पद्धतीला उपलब्ध करून घेत नसेल तर दोष कुणाचा? उपचार पद्धतीचा तर खासच नव्हे._*

       *_जन्मजन्मांतराच्या या भवचक्राने व्यथित असलेल्या प्राण्यासाठी क्लेशनिवारणाचा मार्ग आहे. पण त्या मार्गाचा शोधच घेतला नाही तर जबाबदारी कुणाची? त्या क्लेशनिवारक मार्गाची नाही._*

     _*आणि हे शोधकार्य घरबसल्या होणारे नाही.* घरगृहस्थी चालवितांना धार्मिकतेच्या नावाने कर्मकांडावर अधिक भर दिला जातो. या कर्मकांडात सत्य शोधणे म्हणजे पाणी नसलेल्या आडात पोहरा टाकणे. निस्सारात सार शोधणे तसा प्रकार होय. त्याच्या वडिलांनी तत्कालीन दार्शन शास्त्राचे आचार्य, शास्त्रवेत्ते, पंडीत यांना राजवाड्यात बोलावून सर्व प्रकारचे तत्त्वज्ञान व मान्यता ह्याविषयी ऊहापोह करवून सिद्धार्थाशी चर्चा घडवून आणली होती. परंतु या कोऱ्या व निस्सार चितन-मनन करण्याने परमसत्याचा साक्षात्कार होणे असंभवनीयच होते. पूर्व कालांतील मुक्त झालेल्या महापुरुषांनी सत्याचा साक्षात्कार स्वतः केला आणि तोही आंतरशोध करूनच. मलाही तसेच केले पाहिजे. परमसत्याचा साक्षात्कार आंतरशोध करूनच होईल. मलाही तसेच केले पाहिजे. परमसत्याचा साक्षात्कार आंतरशोध करूनच होईल. *यासाठी शास्त्रशुद्ध वैज्ञानिक विधीचा शोध करावा लागेल. त्याचा सखोल निरंतर व निर्वेध अभ्यास करण्यासाठी अनुकूल वातावरण हवे आणि ते या बहिर्मुखी राजसी वातावरणात मिळणे असंभव आहे.* परम सत्य संशोधनाच्या तीव्र धर्मसंवेगाला सामान्य वाटणाऱ्या या चार घटनांनी केवढे मोठे बळ दिले._

          _परमसत्याच्या संशोधनासाठी बाहेर पडलेला मुमुक्षु राजकुमार अनेक जागी भटकला, अनेक प्रयोग केले. आपल्या अंतरंगातील तळस्पर्शी सखोलता साधण्यासाठी त्याने वेगवेगळ्या प्रकारची साधना अंगिकारली. त्या कालात ध्यानसमाधिमध्ये उच्च पदाला पोचलेले महान आचार्य आलारकलाम आणि उद्दकरामपुत्त यांच्याकडून क्रमश: सातवी व आठवी ध्यानसमाधि शिकुन घेतली. पण त्या समाधि अवस्थेतही त्याला इंद्रियातीत परमसत्याचा साक्षात्कार झाला नाही. समाधि साधनेचे अपूर्णत्व जाणवले. तसं पाहिलं तर त्या कालांतील ती सर्वोच्च समाधि साधना होती. *एक ते चार समाधि अवस्था आपल्या आंतरिक आलंबनावर आधारित तर पाच ते आठव्या समाधिमध्ये बाहेरच्या आलंबनांच्या आधाराने अनंतापर्यंत प्रसरण. या ध्यानसमाधीत अनेक आलंबने असतात. तसेच पृथ्वी, जल, अग्नी, वायु या अतिरिक्त विभिन्न रंग-प्रकाश यांचाही आधार घेतला जात असतो. प्रदीर्घ कालावधीच्या सतत अभ्यासाने है आलंबन हळू हळू संकुचित करून लहानात लहान लेशमात्र बिंदूपर्यंत आणायचे. नंतर प्रबळ मनोबलाने त्यावर पूर्ण अधिपत्य मिळविण्यासाठी साधक अनेक प्रयोग करीत असतो. साधक नंतर त्या लेशबिंदूला पुन्हा येथेच्छ विस्तृत करतो व प्रसरण करतो. अनंतापर्यंत त्यांचे प्रसरण करीत जातो. लेशमात्र रंग बिंदु त्यानंतर शुभ्रप्रकाशाच्या बिंदूत परिवर्तन करून अनंतापर्यंत प्रसरण करतो. त्यात आपले मन समाविष्ट करतो. शुभ्र लेशबिंदूच्या ह्या अनंत आयतनद्वारे प्राप्त झालेल्या पाचव्या ते आठव्या ध्यानसमापत्तीच्या द्वारे साधकाचे मन बऱ्याच अंशी निर्मल होते.* परंतु अंतर्मनाच्या खोल तळामध्ये अनेक जन्मांची पूर्वसंचित कर्मसंस्कारांची कषाय-क्लेशाची काही मुळे तशीच राहून जातात. त्यांचेही निर्मूलन झाल्याशिवाय पूर्ण मुक्ती कुठे? आठही ध्यानपूर्ती झालेला साथक भवाग्र स्थित अरुप ब्रह्मलोकाचा अधिकारी निश्चितच होईल. पण भवातीत निर्वाण स्थिती कुठे? लोकातीत परम विमुक्ती कुठे ? असा साधक अशा अतींद्रिय अनुभूतीची प्राप्ती करून अनेक प्रकारच्या अलौकिक ऋद्धी सिद्धीचा अधिकारी अवश्य होतो पण इंद्रियातीत नित्य, शाश्वत ध्रुव अशा परम शांतीची अवस्था कशी मिळणार ? *जोपर्यंत अल्पांशाने का होईना कर्म क्लेश शिल्लक आहेत तोपर्यंत भवचक्र, लोकचक्र, दुःखचक्र चालूच रहाणार. जो विमुक्तीच्या परमसत्याचा शोधक आहे तो एवढ्यावरच कसा थांबणार? त्या ध्यान-आचार्यांच्या जवळ लेशमात्र शिल्लक राहिलेल्या अनेक जन्मापासूनचे अनुशयी, सुषुप्त क्लेश-निर्मूलन करण्याचे कोणतेच साधन नव्हते. म्हणून सत्यान्वेषी तपस्वी राजकुमार पुढे निघाला, अन्य साधनेचा शोध घेत राहिला.*_

          _त्या काळात एक प्रबल मान्यता होती की वेगवेगळ्या देहयंत्रणा करून अनेक प्रकारच्या शारीरिक यातना सहन करायच्या, अतोनात कष्ट यातना भोगल्या की पाप-कर्माचे क्षालन होते. आपणही असे प्रयोग करून पहावे असे सिद्धार्थाच्या मनात आले. असीम विलासातील सुकोमल सुकुमार राजयोगी अशा प्रकारच्या यातनायुक्त कठीण शारीरक साधना करू लागला. दृढतापूर्वक काम करीत त्याच्याही परमसीमा पडताळून शेवट पर्यंत गेला. त्या काळातील प्रचलित अनेक देहदंडाच्या तपश्चर्या करून बघितल्या. अनेक प्रकारे शरीराचे आतापन संतापनाचे प्रयोग केले. हाल हाल केले._

       _अनेक दिवस काट्यांच्या शय्येवर झोपून पाहिले. कडाक्याच्या थंडीत ओली वस्त्रे धारण करून झोपून पाहिले. थंडीच्या दिवसात रात्र-रात्र उघड्या जागी राहिला आणि दिवसा दमट घनदाट अरण्यात निवास केला. ग्रीष्मातल्या रणरणत्या उन्हात भरदुपारी सावली नसलेल्या मोकळ्या मैदानात राहिला तर रात्री घनदाट अरण्यात शरीराला अनेक प्रकारच्या यमयातना भोगायला लावल्या. नाना प्रकारचे अभक्ष्य भोजन केले, आणि उपोषण केले तर शरीर शुष्क होऊन काट्यासारखे झाले. मांस मज्जा नावालाही उरली नाही. केवळ हाडांचा सापळा आणि त्यावर सुरकुतलेली चामडी. वयाच्या पस्तीसाव्या वर्षीच ऐंशी वर्षापेक्षाही जास्त म्हाताऱ्यासारखी अवस्था दिसू लागली. सोन्यासारखी कांती असलेले शरीर निस्तेज झाले. शरीरावर ठिकठिकाणी चट्टे पडले. उंटाच्या पायासारखे कुल्हे दिसू लागले. पाठीचा मणका न् मणका असा दिसू लागला जणू दर्भाचा गाठाळ दोरखंड. जीर्ण शीर्ष घराच्या सुटलेल्या लाकडी कड्यांप्रमाणे छातीच्या बरगड्या दिसू लागल्या. खोल आडात ताऱ्याचे प्रतिबिंब पडावे तशी डोळ्यांच्या खाचेत बुबुळे दिसू लागली. कच्चा दूधीभोपळा कडक उन्हात सुकवावा तशी डोक्यावरची कातडी दिसू लागली. पोट पाठीला चिकटले. पोट हातात धरायला जावे तर पाठीच्या कण्याचा मणका हातात येई. शरीर इतकं दुर्बल आणि अशक्त झालं की ज्या अंगाला हात देऊन वर उठायला मदत करावी तेथील सडलेले केस उखडून हातात येत. मलमूत्र विसर्जनासाठी उठण्या बसण्याचीही ताकत राहिली नाही. इच्छा असूनही एक पाऊल पुढे पडत नव्हते. तिथेच कोलमडून पडत असे. अशी कायाक्लेशांची पराकाष्ठा._

        _देहदंडाची अशी कष्टविणारी देहयंत्रणा केली तरीही आठव्या समाधी अवस्थेनंतरही पाहिले तर अंतर्मनाच्या तळात जे लेशमात्र अनुशय क्लेश शिल्लक होते ते जसेच्या तसेच आहेत. थोडेसुद्धा कमी झाले नाहीत._

        _*तेव्हा एक गोष्ट स्पष्टपणे समजली की ज्याप्रमाणे काम-भोग विलास वैभवाचे जीणे जगून कुणी एक व्यक्ती एका टोकाचे जीवन जगते आणि मुक्तिपासून लांबच रहाते त्याप्रमाणेच कायाक्लेशयुक्त तपश्चर्येने दुसर्या टोकाचे जीवन जगते ती व्यक्ती सुद्धा त्याचप्रकारे मुक्तीपासून लांब रहाते. सुधारणा मनाची करायची आहे. त्याला विकारांपासून विमुक्त करावयाचे आहे. अशा विमुक्तीच्या साधनेसाठी असले एकांतिक मार्ग उपयोगी नाहीत मध्यममार्गच शोधला पाहिजे.*_

          *_युक्त आहार घेऊन, शरीराला आर्य साधनेसाठी योग्य बनवून स्वतःच्या साडेतीन हात कायेच्या परिघातच मध्यममार्गाच्या साधनेचा शोध घेणे योग्य समजून शोधकार्य सुरू केले. अनेक आंतरिक अडचणींना तोंड देत राहिला शेवटी आपल्या अनेक जन्मांच्या संचित संवर्धित पुण्यपारमीचे एक असीम सामर्थ्य जागे झाले आणि विपश्यना साधनेचा मुक्तीदायी मार्ग उजळला दिप्तिमान झाला._*

           *_कामभोगांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. देहदंडाची व्यर्थता लक्षात आली. कर्मकांडाचे निरर्थक प्रयोजन दिसून आले. विभिन्न दार्शनिक मान्यतांची कोळीष्टके दूर झाली. स्वानुभूतीच्या आधारावर जागृत झालेल्या भावनामयी प्रज्ञेच्या बळावर अंधविश्वासाचे दर्शन हे सम्यक् दर्शन बनले. बौद्धिक चिंतन-मननयुक्त भ्रामक ज्ञान सम्यक् दर्शनाच्या आधाराने प्रत्यक्ष अनुभूतीजन्य सम्यक् ज्ञान बनले. काल्पनिक विमुक्ती सम्यक् विमुक्ती झाली. परमकल्याणी सम्यक संबोधीची उपलब्धी झाली. सारे अनुशय क्लेश छिन्न भिन्न झाले. चित्त  साऱ्या विकारांपासून नितांत विमुक्त झाले. ती चेतोविमुक्ति प्रज्ञाविमुक्तिला सहाय्यक झाली. नित्य, शाश्वत, ध्रुव, प्रणीत, प्रशांत शीवाशी ते चित्त एकाकार झाले. परमसत्याचा साक्षात्कार झाला. सिद्धार्थ राजकुमार सम्यक् सम्बुद्ध झाला. सदैव जागरुक, प्रबुद्ध, सर्वज्ञ._*

        *_सर्वसामान्य वाटणारे ते चार प्रसंग कशा प्रकारे असीम प्रेरणादायी प्रसंग ठरले. साधकाच्या मनात सत्यान्वेषणाचा जो झंझावात जागला तो अनंत प्रशांतीच्या परमावस्थेपर्यंत जाऊनच निमाला. साधक कृतार्थ झाला. असा साधक लाभल्यामुळे साधना स्वतः धन्य झाली. असा साधक जो केवळ स्वतःचीच स्वस्तिमुक्ती होण्यास कारण झाला असे नव्हे तर लाखो करोड जनसामान्यांच्या स्वस्तिमुक्तिला प्रेरणास्रोत झाला. जीवन प्रवाहाच्या माजधारित बुडणाऱ्यांसाठी प्रकाशमान दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरला. अशीच मंगल प्रेरणा आमच्या जीवनांत जागो, जी असीम शुभ फलदायी होवो._*

*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- _*

*१) जागे पावन प्रेरणा_*

*२) गौतम बुद्धांचे चरित्र (कृष्णराव अर्जुन खेळूसकर गुरुजी)*

*३) बुद्धलीला (धर्मानंद कोसंबी)*

            


*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०७/०८/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/08/blog-post_31.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼






No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...